युट्युब वर टाईमपास करताना असाच कधीतरी अनाहत पिक्चर बघितला, उलटसुलट विचारांचं वादळ घोंघाऊन टाकणारा पिक्चर म्हणजे अनाहत. मल्ल देशाचा राजा आणि राणी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात पण त्यांना वारस नसतो म्हणून अमात्यसभेच्या निर्णयानुसार नियोग विधीस तयार होतात. राणीचा नियोग विधीस विरोध असतो पण अमात्य सभेच्या निर्णयापुढे राजा झुकतो आणि राणी ह्या दिव्याला सामोरी जाते. नियोगासाठी राणी धर्मनटी म्हणून राजवाड्याबाहेर जाऊन जमलेल्या प्रजाजनातून एकजण एका रात्रीसाठी उपपती म्हणून निवडणार असते. जाताना श्वेतवस्त्रे धारण केलेली अत्यंत नाराजीने गेलेली राणी परत येते तीच मुळी तृप्त शरीर घेऊन, ह्या तृप्तीच्या खुणा तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत असतात. ह्या एका रात्रीच्या अनुभवावर ती खुश असते आणि हेच राजा आणि अमात्यांना खटकते. तिच्या सखीशी नियोगरात्रीबद्दल बोलताना राणी आसुसून बोलते, हे सुख असं होतं, असं असतं हे तू कधीच का सांगितलं नाहीस असंही ती सखीकडे विचारणा करते. एका रात्रीने मिळालेलं शरीरसुख पुन्हा मिळावे म्हणून त्रिवार संधीच्या मान्यतेनुसार राणी राजाज्ञा देते आणि पुन्हा राजाला दवंडी द्यायला लावते. हि झाली ढोबळ कथा, त्यात जाणवलेल्या काही गोष्टी
राणीने नाराजीने का होईना नियोग पत्करला कारण तिने जर विरोध केला असता तर राजा साथ देईल अशी तिला खात्री नव्हती. सखीशी बोलताना तिची खंत दिसून येते, "पत्नीपेक्षा राज्य श्रेष्ठ वाटलं त्यांना, करायचा होता विरोध, नाकारायचा होता नियोग आणि राजेपद" पण असं होत नाही. स्त्रीत्व डिवचलेली दुखावलेली राणी सोनाली बेंद्रेने परफेक्ट साकार केलीये.
षंढ सिद्ध झालेला राजा, पौरुषाचा अपमान तरीही वारसांची लालसा. राणी नियोगाला जाताना पांढरे कपडे घालतेय, दागिणे नाकारते हे ऐकून खुश झालेला पुरुष. राणी परत आल्यावर स्त्रीत्व, पवित्रता गेली म्हणून रडेल, नाराज असेल म्हणून तिच्या सांत्वनाला सज्ज असलेला राजा आणि अमात्य तिचे समाधान बघून सटपटतात. नियोग आटपून तिने लगेच परत फिरायला हवं होतं पूर्ण रात्र तिथे ती काय करतेय म्हणून त्रासलेल्या राजाला राणीने फक्त वंशवृद्धीसाठीच हा विधी करणे अपेक्षित होतं, राणी मात्र तिच्या स्त्रीत्वाचा जागर करून येते.
सिनेमाचा शेवट मात्र घाईत उरकल्यासारखा मलातरी वाटला, राणी लग्नापासूनच्या प्रेममय क्षणांची राजाला आठवण करून देते आणि ह्या क्षणांच्या सोबतीने उरलेलं आयुष्य आनंदात काढेन असं सांगते आणि बाहेर तिच्या पुढच्या नियोगविधीची दवंडी पिटली जात असते. अनंत नागने राजाची भूमिका केलीये, नेहमीप्रमाणे तो अप्रतिम. मला अंकुरपासून अनंत नाग आवडतो, सगळ्या भूमिका जिथल्या तिथे करतो तो, कुठेही अति नाही की कमी नाही. नेहमी काहीतरी हटके घेऊन येणाऱ्या अमोल पालेकरांचा हा मराठी सिनेमा कोणतेही मत न देता ह्याचं इंटरप्रिटेशन प्रेक्षकांवर सोडतो.
स्त्रीच्या म्हटलं तर लहान म्हटलं तर मोठ्या अपेक्षा ह्यात दाखवल्यात, पती ठाम सोबत असता तर कदाचित राणीची पुढची वाटचाल वेगळी असती का ?
पती आपल्याला गृहीत धरून नको ते कृत्य करायला लावतोय हे समजून ती गोष्ट जबाबदारी म्हणून पार पाडताना त्यात रमणारी राणी योग्य की अयोग्य?
माझ्याकडे तरी ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, अजून खूप प्रश्न पडलेत परंतु लेखनमर्यादा ...
#अर्चना