Monday, 23 April 2018

अनाहत

युट्युब वर टाईमपास करताना असाच कधीतरी अनाहत पिक्चर बघितला, उलटसुलट विचारांचं वादळ घोंघाऊन टाकणारा पिक्चर म्हणजे अनाहत. मल्ल देशाचा राजा आणि राणी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात पण त्यांना वारस नसतो म्हणून अमात्यसभेच्या निर्णयानुसार नियोग विधीस तयार होतात. राणीचा नियोग विधीस विरोध असतो पण अमात्य सभेच्या निर्णयापुढे राजा झुकतो आणि राणी ह्या दिव्याला सामोरी जाते. नियोगासाठी राणी धर्मनटी म्हणून राजवाड्याबाहेर जाऊन जमलेल्या प्रजाजनातून एकजण एका रात्रीसाठी उपपती म्हणून निवडणार असते. जाताना श्वेतवस्त्रे धारण केलेली अत्यंत नाराजीने गेलेली राणी परत येते तीच मुळी तृप्त शरीर घेऊन, ह्या तृप्तीच्या खुणा तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत असतात. ह्या एका रात्रीच्या अनुभवावर ती खुश असते आणि हेच राजा आणि अमात्यांना खटकते. तिच्या सखीशी नियोगरात्रीबद्दल बोलताना राणी आसुसून बोलते, हे सुख असं होतं, असं असतं हे तू कधीच का सांगितलं नाहीस असंही ती सखीकडे विचारणा करते. एका रात्रीने मिळालेलं शरीरसुख पुन्हा मिळावे म्हणून त्रिवार संधीच्या मान्यतेनुसार राणी राजाज्ञा देते आणि पुन्हा राजाला दवंडी द्यायला लावते. हि झाली ढोबळ कथा, त्यात जाणवलेल्या काही गोष्टी

राणीने नाराजीने का होईना नियोग पत्करला कारण तिने जर विरोध केला असता तर राजा साथ देईल अशी तिला खात्री नव्हती. सखीशी बोलताना तिची खंत दिसून येते, "पत्नीपेक्षा राज्य श्रेष्ठ वाटलं त्यांना, करायचा होता विरोध, नाकारायचा होता नियोग आणि राजेपद" पण असं होत नाही. स्त्रीत्व डिवचलेली दुखावलेली राणी सोनाली बेंद्रेने परफेक्ट साकार केलीये.

षंढ सिद्ध झालेला राजा, पौरुषाचा अपमान तरीही वारसांची लालसा. राणी नियोगाला जाताना पांढरे कपडे घालतेय, दागिणे नाकारते हे ऐकून खुश झालेला पुरुष. राणी परत आल्यावर स्त्रीत्व, पवित्रता गेली म्हणून रडेल, नाराज असेल म्हणून तिच्या सांत्वनाला सज्ज असलेला राजा आणि अमात्य तिचे समाधान बघून सटपटतात. नियोग आटपून तिने लगेच परत फिरायला हवं होतं पूर्ण रात्र तिथे ती काय करतेय म्हणून त्रासलेल्या राजाला राणीने फक्त वंशवृद्धीसाठीच हा विधी करणे अपेक्षित होतं, राणी मात्र तिच्या स्त्रीत्वाचा जागर करून येते.

सिनेमाचा शेवट मात्र घाईत उरकल्यासारखा मलातरी वाटला, राणी लग्नापासूनच्या प्रेममय क्षणांची राजाला आठवण करून देते आणि ह्या क्षणांच्या सोबतीने उरलेलं आयुष्य आनंदात काढेन असं सांगते आणि बाहेर तिच्या पुढच्या नियोगविधीची दवंडी पिटली जात असते. अनंत नागने राजाची भूमिका केलीये, नेहमीप्रमाणे तो अप्रतिम. मला अंकुरपासून अनंत नाग आवडतो, सगळ्या भूमिका जिथल्या तिथे करतो तो, कुठेही अति नाही की कमी नाही. नेहमी काहीतरी हटके घेऊन येणाऱ्या अमोल पालेकरांचा हा मराठी सिनेमा कोणतेही मत न देता ह्याचं इंटरप्रिटेशन प्रेक्षकांवर सोडतो.

स्त्रीच्या म्हटलं तर लहान म्हटलं तर मोठ्या अपेक्षा ह्यात दाखवल्यात, पती ठाम सोबत असता तर कदाचित राणीची पुढची वाटचाल वेगळी असती का ?
पती आपल्याला गृहीत धरून नको ते कृत्य करायला लावतोय हे समजून ती गोष्ट जबाबदारी म्हणून पार पाडताना त्यात रमणारी राणी योग्य की अयोग्य?

माझ्याकडे तरी ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, अजून खूप प्रश्न पडलेत परंतु लेखनमर्यादा ...

#अर्चना

Friday, 13 April 2018

तो काय करत होता

#असिफा 8 वर्षांची मुलगी, तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून ज्या निर्दयतेने हे सगळं घडलं ते बघता अनेक प्रश्न मनाला पडले. सुरवातीला काही काळ सुन्न अवस्थेत बसून राहिले आणि नंतर मनात न थांबणारे वादळ सुरु झाले, ते वादळ जसंच्या तसं लिहायचा एक प्रयत्न

असिफा मुस्लिम मुलगी आणि बलात्कारी हिंदू , त्यातून हि घटना घडली तीच मुळी भारताच्या अतिसंवेदनशील जम्मू काश्मीरमध्ये मग ह्या घटनेला राजकीय धार्मिक वळण लागणारच होतं. सगळे हिंदू वाईट नसतात आणि सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण अशा घटना समाजकंटकाना एकमेकांबद्दल राळ उडवायला उपयोगी पडतात. आपल्याकडे मुसलमान आणि दलितांबद्दल सहानुभूती लांगुलचलन ठरते आणि हिंदूंबद्दल मात्र गर्व, अभिमान असतो. मला स्वतःला लांगुलचालन आणि गर्व, अभिमान ह्या सगळ्या गोष्टींचा तिटकारा आहे, सगळे समान आणि समान दर्जा हेच माझं धोरण असते. असो ह्या मुद्द्याचा कितीही काथ्याकूट केला तरी त्यातून निष्पन्न काहीच होत नाही , म्हणून ह्या विषयाला इथे विराम

जेव्हा मी लहान मुलींवरील बलात्काराच्या बातम्या ऐकते तेव्हा मला नेहमीच प्रश्न पडतो ह्या लोकांचं हे धाडस झालंच कसं. कुठलीही पिलं अगदी कुत्र्या , डुकराची पिलंही गोंडस गोजिरवाणी दिसतात, त्यांना बघून माया, वास्तल्य, कौतुक दाटून येतं मग ही माणसं अशी कशी बरं बनली असतील की ज्यांना लहान लेकरं बघून ह्यांचे अवयव वळवळू लागतात. अगदी तान्ह्या मुलीपासून ते म्हाताऱ्या वयोवृद्ध स्त्रियांवर बलात्कार होतात. ह्या पुरुषांच्या मानसिकतेचे आकलन माझ्या अल्पमतीला अद्याप झाले नाही, ह्यावर एकंदरच शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणं अत्यंत गरजेचे आहे. ह्या मनोवृत्तीच्या लोकांना तर मग कुत्री , मांजरही पुरत नसेल किंवा अगदी निर्जीव बाहुलीशीही चाळे करत असतील. हा एक आजार आहे, ह्याचा इलाज व्हायलाच हवा. आरोपींना नंतर पश्चाताप होत असेल का बरं? हिट ऑफ मुमेन्टमध्ये डोकं आणि शरीर तापलेले असताना अशा घटना घडून गेल्यावर त्यांना लज्जास्पद आणि खजील तरी वाटत असेल का?

देवळात पोरीवर अत्याचार होताना… “तो काय करत होता” किंवा “देव असता तर…” अशी वक्तव्य ऐकू यायला लागली. मी स्वतः नास्तिक की आस्तिक हा माझा स्वतःचा प्रचंड वैचारिक घोळ असतानाही मला देव हि संकल्पना आवडते. माझ्या काही श्रद्धा आहेत पण कर्मकांडाला माझा प्रखर विरोध आहे. दिसला देव की जोडा हात आणि वहा कुंकू,फुले अशी मी नाही. मला देवळातल्या देवापेक्षा माणसाच्या मनातला देव जास्त आवडतो. देव शिक्षा करतो, पाप लागतं म्हणून चुकीच्या गोष्टी टाळणारी भाबडी लोकं मला फारफार आवडतात… त्यांच्या मनातला देव त्यांना पाप करू देत नाही. इथे तर देवळातच बलात्कार झाला मग देव ह्यांच्या मनातून तर कधीच वस्ती उठवून गेलेला दिसतोय. तो तिथे नाहीच तर “तो काय करत होता” अशी पृच्छा करणेही व्यर्थ.

देवा,

जर तू असशीलच कुठे तर अशा अतृप्त लोकांच्या मनात रहा रे बाबा. तुझा धाक त्यांना वाटेल असं काही करच तू त्यांना. तुझ्या काठीला आवाज येऊ दे यार. “तो बघतोय” ते “तो काय करत होता” हा तुझा प्रवास मला अजिबात आवडला नाहीये… ये धावून, दाखव तुझे अस्तित्व आणि “तो बघतोय” असा तुझा दरारा कायम कायम राहू देत