#कुबेर_विनोदी_कथा_स्पर्धा
(नागराजअण्णांची माफी मागून आणि चार्लीला वंदन करून)
कथेचं नाव - सैराटची एैशी तैशी
एक छानसं, छोटंसं, टुमदार गाव होतं , इतकी विशेषणं लावलीत म्हणजे ते नक्कीच पुणे असणार हे अनुभवी लोकांना सांगणे न लगे...तर ह्या सुंदर सुंदर गावात तशीच एक छानशी हौसिंग सोसायटी होती, ह्या सोसायटीत आपली हिरोईन अर्चि आणि हिरो परश्या रहात होते. ह्यांची ही नावं त्यांच्या जन्मदात्यांनी जागतिक प्रसिद्धीचा सैराटनामक सिनेमा येण्याआधीच ठेवली होती आणि नंतर ती सिनेमातील मुख्य पात्रांना दिली गेली हा एक निव्वळ योगायोग होता. अर्चिचे पप्पा त्याना ती लहानपणापासून पप्पाच म्हणत होती , तर हे पप्पा महाचिकट मंजे कंजूस माणूस शेणातला पैसा उचलून धुवून वापरणारा, हे स्वतःच्या पैशाने चहा दूरची बात हॉटेलची पाटीसुद्धा वाचत नसत, अशा पप्पांना त्यांच्या एका मित्राने सैराट पिक्चर दाखवला आणि त्याने हे बरेच प्रेरित झाले. घरी आल्याआल्या त्यांनी लेकीला फर्माण सोडले “आरचे, तू आता मला पप्पा म्हणू नको तात्या म्हण. सैराटमधला तात्या बघितला का काय रुबाब आहे तात्या नावात” झालं अर्चिने रडायला सुरवात केली “तुला रडायला काय झालं आता, नुसतं तात्या म्हण म्हणलं तर मुंगी चावल्यासारखी काय रडायला लागलीस” अर्चिने रडत रडत डोळे पुसले “रडू नको तर काय, सैराटमध्ये तो तात्या अर्चिला मारतोSS वर प्रिन्सला ही मर्डरर बनवतो मला नको असले मारकुटे पप्पा” अर्चिने अजून गळा काढला ते ऐकून आतून आई गडबडीत बाहेर आली “काय गोंधळ लावलाय, जरा फेसपॅक लावावा म्हटलं तर झाला तुमचा गलका सुरू” “मम्मी फेसपॅक थोडा ज्यादा भिजव, माझ्याही गालावर पिंपल आलाय” अर्चि रडता रडता आरश्याकडे धावली “फेसपॅक कसला आणलाय , अरे देवा किती पैसे घालवले त्यात” पप्पाना म्हणजे भावी तात्यांना फेसपॅकच्या नावानेच घाम फुटला “विकत नाही हो आणला , मसूरडाळ मिक्सरमधून काढून दुधात भिजवली की झाला फेसपॅक. मेलं तुमच्यासारखा कंजूस नवरा असताना मी फेसपॅक विकत आणेन का? मला माझ्या सौभाग्याची काळजी आहे म्हटलं, बरं ही का रडतेय” आता अर्चिला आपलं आधीच रडणं आणि पप्पांना तात्याची आठवण आली “मम्मी तात्या मला पप्पा म्हण म्हणतायेत, मला नको असले पप्पा” गडबडीत अर्चिने पप्पा आणि तात्या उलटसुलट केले इकडे मम्मी चिंतेत,चिडून आणि आपलं ग्लॅमर अजून टिकून आहे ह्याचा नाही म्हटलं तरी थोडा आनंद ह्या संमिश्र भावात “कोण गं हा , माझ्या लेकीला पप्पा म्हण म्हणतोय” तशी अर्चिला आपली चूक समजली जीभ चावतच “सॉरी सॉरी , अगं पप्पा मला म्हणतात की तात्या म्हणून हाक मार म्हणून, तो सैराट बघून आले ना” तशी अंगावर पाल पडल्यासारखी आई ओरडली “आरचे तू अजिबात तात्या म्हणू नकोस, पप्पाच म्हण. तात्या म्हटलं की मला तो झपाटलेला तात्या विंचू आठवतो. माझा नवरा तात्या विंचू , ओ माँ माताजी चक्करच आली मला, डोळ्यापुढे अंधारीच आली माझ्या, आरचे मला धर,अहो SS” कुणाचं काय तर कुणाचं काय इथं आईचं वेगळंच सुरू झालं तशी अर्चि घाबरीघुबरी झाली “पप्पा, मी रिक्षा आणू का मम्मीला अंधारी आलीय” दाराकडे भराभरा निघालेल्या अर्चिला पप्पा ओरडले “अगं काही अंधारी आली नाही , तुझ्या आईच्या डोळ्यावर काळा गॉगल आहे आणि तिला वाटतंय चक्करच आली” तसा डोळ्यावरचा काळा गॉगल घाईने हटवत आई म्हटली “शी बाई ह्या घरात कुणाला माझी किंमतच नाही, चक्कर आली अंधारी आली तरी माझाच दोष, जळला मेला बायकांचा जन्म.” “पण मी म्हणतो घरात कुणी गॉगल घालतं का , जेव्हा बघावं तेव्हा नटून थटून बसलेला असता. त्या सिरियल्सनी बिघडवलं तुम्हाला, त्या बायका एक जरीच्या साड्या नेसून नुसत्या कटकारस्थानं करत असतात आणि ते बघून तुम्ही हे घरात गॉगल, जरीच्या साड्या आणि टिकल्या तर कसल्या हे एकेक बंदा रुपया जणू” पप्पा तावतावात भाषण मोडवर गेलेले बघून आईने तिथून काढता पाय घेतला आणि क्लासची वेळ झाली म्हणून अर्चिही पळाली.
ह्याच सोसायटीत दोन बिल्डिंग सोडून परश्या रहात असतो, त्याला अर्चि लई मंजे लई आवडायची पण सांगायची गोची. ही अर्चि त्या अर्चिसारखी स्मार्ट न्हवती हे आपलं एकदम बावळट ध्यान होतं. अर्चिला तू मला आवडतेस हे सांगायचं दूरच पण परश्या तिच्या समोरही जात नसे. रात्रंदिवस अर्चिचा विचार करू करू परश्या काट्यावर आला, एकेदिवशी आज साला काय व्हायचं ते होऊ दे कोर्टात जाऊदे अर्चिला सांगायचंच असं परश्यानं ठरवलंच पण च्यामारी तेवढी काय त्याला डेअरिंग होईना म्हणून ब्रेकअपच्या आधीच आमचा हिरो देवदास झाला आणि सॅडमूडमध्ये त्याने मोबाईलवर गाणं लावलं कुठलं गाणं तर ते नै का एकदा ऐकलं तर दहावेळा ब्रेकअप झाल्याचा फिल येतो ते गाणं “ तेरी मेरी यू टी टूट गये सोनिये जैसे तुटिया अंबर दा तारा” अंबर शब्द आला कि दरवेळी परश्या छपराकडे बघायचा तिकडं काय दिसणार होतं ते त्यालाच माहीत. तितक्यात मोबाईल वाजला हा मेसेज खोलून बघतोय तर दोस्ताचा मेसेज “अर्चि कट्ट्यावर बसलीय” काय, कवा,कुठं पुढचे प्रश्न विचारे पर्यंत मित्र ऑफलाइन, परश्याचे मित्र एकेक कलंदर सैराटमधल्या मित्रांसारखे मार खाणारे न्हवतेच उलट ह्याला अजुन अडचणीत आणणारे होते तरी अर्चिचं नाव ऐकलं की ह्याने चढवले अंगावर कपडे आणि निघाला. अर्चि मस्त कट्ट्यावर मैत्रिणी गोळा करून बसली होती हातात पाचपन्नास राख्या, परश्या लांबूनच बघत होता हिचं काय सुरुये म्हणून. ही येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना थांबवून राखी बांधत होती, “च्यामारी आज राखीपौर्णिमा आहे नाही का अन ही बया काय गावजेवण तसं गावराखीपौर्णिमा साजरी करतेय की काय. देवा मला वाचीव, हिच्या भावी मुलांचा मामा नाही पप्पा व्हायचंय रे मला” असं मनातल्या मनात बडबडत परश्या आल्या वाटेनं मागे गेला. मेसेज करणाऱ्या मित्राला फोनवर भोसडतच परश्या मागे फिरला.
अर्चिची लक्षण बघून , लक्षण म्हणजे ते हेच सार्वजनिक राखीपौर्णिमा वगैरे तर हे बघून पोरगी अरेंज मॅरेज करणार आणि आपल्याला खर्चापासून सुटका नाही हे तिच्या पप्पांना लक्षात आलं, तरी बापही कधी तरुण मुलगा असतोच त्यामुळे तरुणांच्या चाली त्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. परश्याचा अर्चिकडे ओढा आहे हे पप्पांना समजलं तसं त्याना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. चांगला पोरगा बिनखर्चाचा मिळून जाईल, चप्पल झिजवणे, चहा पोहे , लग्न कितीतरी पैसा वाचेल फक्त पोरीने परश्याला हो म्हणायला हवं. काही दिवस गेले तरी पुढची हालचाल दिसेना एकदिवस न राहवून पप्पानी अर्चिला सांगितलंच “तुला करमत नसेल तर परश्याला बोलवत जा गप्पा मारायला, नाही म्हणजे आम्ही नव्या जमान्याचे आहोत आमची हरकत नाही मुलामुलींनी बोललं तरी” अर्चि आपल्याच नादात “करमतंय की मला, कंटाळा आला की मीच संगीकडे जाईन” “अरे वा, छान” मनातल्या मनात “धत 'तेरीकी” काही झालं तरी हे स्थळ जाता कामा नये आणि शक्य तितके पैसे वाचवायचे ठरवून पप्पांनी घराबाहेर घुटमळणाऱ्या परश्याला हटकलं इकडचं तिकडचं बोलताना थेट विचारलंच “इथे सारखा का फिरत असतोस” परश्या गडबडला “परत नाही येणार” म्हणून खाल्ल्या मानेन परश्या निघाला तसा “नै येत जा तू” घसा खाकरत पप्पा “घरात अर्चिशी बोलत बसला तरी चालेल, नाही त्याचं काय आहे तिचाही वेळ जाईल” पप्पांच्या ग्रीन सिग्नलचा परिणाम होऊन परश्या अर्चिच्या घरात येऊजाऊ लागला. हो नाही म्हणता म्हणता पप्पांच्या प्रयत्नाला आणि परश्याच्या प्रेमाला फळं लागली. अर्चि चक्क परश्याच्या प्रेमात पडली, तरी पप्पा आपल्याला काय समजतच नाही दिसतंच नाही असं समजून वागू लागले. एके दिवशी तिच्या मम्मीने विषय काढला “परश्याच्या घरी कधी जायचं बोलणी करायला” कळून सवरून आडाण्याचा आव आणून पप्पा म्हटले “काय, कशाला” “अहो अर्चि परश्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला, त्यांचं प्रेम आहे “ अंगावर पाल पडल्यासारखे पप्पा “मी बोलणी करायला जाणार नाही, प्रेम आहे तर त्यांचं ते पळतील” जीभ चावून “अगं त्यांनी सांगू तर दे मला”. अर्चिपरश्याने दोघानीही आपआपल्या घरी एकदाची ही बातमी फोडली तशी पप्पा लटका नकार घेऊन बसले, परश्याच्या घरच्यांनीही मग ताणून धरलं. शेवटी वाट बघून दोघांनी आळंदीला जाऊन दोनाचे चार हात केले, तसं पप्पांना हुरूप आला आणि चारच दिवसात जंगी रिसेप्शन देऊन टाकलं. अर्चिची पाठवणी करताना डोळे पुसत पप्पा मनात विचार करत होते “नाही मी मुलीच्या सुखापुढे पैशाला महत्व देणारा बाप नाही पण सगळी सोंगं आणता येतात पैशाचं आणता येत नाही, चांगला मुलगा आहे त्यांनी लग्न करावं म्हणून मी किती प्रयत्न केले आता ऐपतीप्रमाणे मी रिसेप्शन करून दिलं” पाया पडणाऱ्या अर्चिला तोंड भरून आशीर्वाद दिला “सुखाचा संसार करा, अष्टपुत्रा भव”
No comments:
Post a Comment