Friday, 9 February 2018

कुटुंब व्यवस्थेवर स्वैर विचार

वाढत्या वयातले आणि विवाहबाह्य संबंध ह्यावर बरेच उहापोह होत असतात, हे संबंध अहितकारक आणि भावी पिढीच्या एकंदरच भावविश्वावर परिणाम करणारे असतात असं माझं स्वतःचं म्हणणं असताना अशा संबंधातील व्यक्तींच्या मनोव्यापाराचा मागोवा घेतला असता मला व्यक्तीशः त्यांच्याबद्दल कीव आणि दयाच वाटत आली आहे, घृणा वगैरे अजिबात वाटत नाही, मला जाणवलेले काही ठळक मुद्दे

1 बऱ्याचदा लग्नानंतर (ठरवून किंवा प्रेमविवाह)  आलेल्या जबाबदाऱ्या पेलता पेलता स्त्रीपुरुष दोघांचीही अवस्था आता उरलो मागच्या पिढीच्या सेवेकरता आणि पुढल्या पिढीच्या पालनापुरता अशी होऊन जाते. दाम्पत्याचे मनसोक्त जगणं, एकमेकांशी साध्या गप्पा, अधूनमधून फक्त स्वतःसाठी काढायचे क्षण दुर्मिळ होत जातात. आणि हे रितेपण शोधताना नजरा उंबरा ओलांडू लागतात

2 विवाहबाह्य किंवा ज्याला असामाजिक समजलं जातं अशा संबंधाचे कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक , काहीवेळा आर्थिक अतृप्तता असते त्याचं तुष्टीकरण जिथे होतं तिथे माणूस आपोआप खेचला जातो. ह्यात सहभागी दोन्ही व्यक्ती तारतम्याने वागणारी नसली कि त्यांचे संसार फाटलेच समजा, तारतम्याने वागणारे असतील तर त्यातल्या त्यात समाजमान्य रस्ते शोधले जातात किंवा स्वतःला आवर घातला जातो

3 विवाहानंतर काही नवरे डोमीनेटींग वागू लागतात, हरएक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागते. एक पैसा मनाने खर्च करायची सोय काही घरांत स्त्रियांना नाही, मोबाईल वापरू दिला जात नाही ; दिला तरी तो सतत तपासला जातो. काही ठिकाणी परिस्थिती उलटसुद्धा असू शकते, अशा नात्यात तिची आणि त्याची जीवघेणी फरफट सुरु होते. मुलांकडे बघून असे संसार रेटले जातात, त्यात ना आईबाप सुखी असतात ना मुलं. आईवडिलांचं आपसातील वागणं मुलांना दिसत असतं, समजत असतं त्यामुळे मुलंही चिडचिडी होतात

4 आपसात कितीही पटलं नाही तरी मुलांसाठी लग्न नावाचं जोखड मानेवर ठेवून खूप जण “सुखी संसार” करत असतात. आपली कुटुंबव्यवस्था अशी आहे की मुलांना आपण कायम जवळ बांधून ठेवतो. जनावरांची/ पक्ष्यांची पिलं पंखात बळ येईस्तोवर आईवडिलांना खेटून असतात, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो पैसा कमावू लागला, त्याला मुलं झाली तरी आईवडील आणि मूल ह्यातले बंध सुटत नाहीत. आशियाई देशांत तर ही पद्धत आहेच. युरोप, अमेरिकेत मात्र मुलांना आर्थिक सक्षम करून त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते, त्यामुळे त्या देशांत घटस्फोटाचा मुलांवर म्हणावा असा वाईट परिणाम होत नाही

5 कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कर्तव्यावर बांधली गेली आहे ह्यात स्व ला स्थान नाही. घरातील मुलं आणि ज्येष्ठ ह्यांच्याप्रति आपली कर्तव्य उचलण्यात हयात जाते आणि हाच वसा पुढच्या पिढीच्या पदरात आपण देत जातो. अतृप्ती, असामाधान असेल तरीही त्याची पूर्तता करण्याचं धाडस फार कमी लोकांत असतं. हजारातला एखादा हा मार्ग पत्करतो, हा मार्ग योग्य कि अयोग्य हे आपण नाही सांगू शकत, दुसऱ्यांच्या गरजा चूक कि बरोबर हे आपण नाहीच ठरवू शकत. त्यांच्या ह्या रुळलेल्या वाटा सोडून जगण्याने पूर्ण कुटुंब उद्धवस्त होते हे मात्र खरे आहे. कुटुंबाचं पूर्ण भावविश्व ढासळून जातं. मन मारून जगणे हा एकमेव उत्तम मार्ग आहे, ह्याला त्याग असं गोंडस नाव देता येईल.

आर्थिक, भावनिक गुंत्यात सापडलेली मधली पिढी मन मानेल तसं नाही जगू शकत. जेष्ठांना सन्मानाने रहाता येतील अशी ओल्ड एज होम आणि लहानांना लवकरात लवकर स्वावलंबी करणे हा व्यावहारिक उपाय मधल्या पिढीला जरा मोकळा श्वास घेऊ देईल पण ह्याला मधली पिढी तयार आहे का?

No comments:

Post a Comment