Monday, 26 February 2018

इश्यू नॉनइश्यू

दोन दिवसात तीन घटना घडतात,

एक प्रसिद्ध नटी अकस्मात हे जग नैसर्गिकरित्या सोडते तेही भारतभूपासून दूर कुठेतरी परदेशात. तिचे लाखो चहाते आहेत त्यांना वाईट वाटणं सहाजिक आहे. क्लासेस पासून मासेस पर्यंत दुःखं हळहळ व्यक्त केली गेली. खुपजनांना आपले टिनएज, कॉलेजचे दिवस आठवले. पहिलं प्रेम, ती हुरहूर, तिचे सिनेमे, तिचे नृत्य सगळं सगळं आठवून लोक हळवे झाले. मोहम्मद रफी गेले तेव्हा आईला मी ढसाढसा रडताना बघितलंय, त्यामुळे पोस्टींचा पाऊस आणि त्यातून जाणवणारा गहिवर मी समजू शकते. मला स्वतःला हे अजिबात खटकलं नाही, मी एकही पोस्ट लिहिलं नाही खरंतर मलाही वाईट वाटलं होतं पण दरवेळी व्यक्त व्हायलाच हवं असं काही नाही म्हणून नाही लिहिलं. पोस्टींचा पावसात काही बेडूक उलटेहि पोहून गेले अगदी अति झालं पासून तिचे समाजात योगदान काय इथंपर्यंत चर्चा झाली, हेहि ठीक आहे ती त्यांची अभिव्यक्ती म्हणून आपण मान्य करू पण काही पोस्टवर अगदी खालच्या थरातल्या कमेंट्स आल्या, तिच्या चारित्र्याबद्दल लिहिलं गेलं,तिच्या वेटलॉस आणि cosmatic सर्जरी बाबत मन मानेल ते लिहिलं गेलं, तिच्या पतीपत्नी मधील वोह असण्याबद्दल काही अतिहुशार आणि सर्वज्ञानी लोकांनी आपली अक्कल पाजळली. काय असतं ना अभिव्यक्ती आहे म्हणून आपण निरर्थक ,अर्थहीन , निराधार आणि अश्लील बोलत असू तर त्या बोलण्याला शून्य किंमत आहे.

तिकडे केरळात मधु नावाचा मनोरुग्ण आदिवासी तांदूळ चोरून जंगलात पळाला, त्याचा काही शहरी लोकांनी पाठलाग केला, त्याला पकडून जबर मारहाण केली. इतकं मारलं कि त्याने नंतर रक्ताच्या उलट्या करून प्राण सोडले. हे सगळं करताना त्यांनी व्हिडीओ शूट, सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. कुठून येतो इतका क्रूरपणा. तांदळासाठी माणसासारखा माणूस मारला जातो ,आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजात रहातो असं कसं म्हणावं. जंगलं कमी होत असताना आदिवासींची कायमच दैना होत आलीय त्यातून जर असे प्रकार झाले तर नक्षलवाद फोफावणे अटळ आहे. ह्या ज्वलंत विषयावर खूप कमी लोक रिऍक्ट झाले. आपले इश्यू अशारितीने नॉनइश्यू बनतात हे एकंदरच घातक आहे.

तिकडे बिहारमध्ये एका SUV ने नऊ शाळकरी मुलं चिरडली गेलीत, आता ही गाडी एका राजकीय नेत्याची आहे म्हणे. गाडी कुणाची, कोण चालवत होतं ह्यावर उलटसुलट मतं येत आहेत, ह्याला पूर्ण राजकीय वळण दिलं जाईल. हा प्रकार तर इथे खुपजनांना माहितीही नसेल

एकाच कालावधीत घडलेल्या तीन दुर्घटना, पहिली घटना नैसर्गिक समजून हळहळ , प्रेम व्यक्त करून सोडून देता येईल पण इथेही वेळकाळ न बघता त्याची वाट लावूनच टाकली गेली. उरलेल्या दोन बद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे पण होईल असे वाटत नाही. सिनेमा, क्रिकेटच्या बाहेर आपल्या अभिव्यक्तीचा टक्का कधी वाढेल तो सुदिन. आपल्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे, बोलून काय उपयोग असं वाटत असेल तर मग सिनेमा ,क्रिकेटवर लिहिताना लेखण्या कशा सरसावतात. इतकं सहजसोपं बघायचं का जगाकडे, मग आपल्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर बोलायचा अधिकार आपल्याला उरतो का? असो, इश्यू आणि नॉनइश्यू न समजणारा समाज कुठल्या दिशेने जाणार आहे कोण जाणे

No comments:

Post a Comment