Tuesday, 5 September 2017

भाऊ कदमचा गणपती



अप्रिय विषयावर लिहितेय कारण खूप उलटसुलट चर्चा वाचतेय, लॉजिकल पोस्ट खूपच कमी दिसतायेत, मी लॉजिकल लिहितेय असं माझं म्हणणं नाही पण मला जे वाटतंय ते लिहितेय. सगळ्यात आधी सांगणं म्हणजे कुणीही माझी जात शोधायला जाऊ नका मी सगळं सोडून बसलेय

1. पहिला मुद्दा भाऊ कदमने गणपती बसवला कदाचित श्रद्धेनं बसवला असेल किंवा तो व्यवसायाचा भाग म्हणून बसवला असेल. तो काम करतो त्या चॅनल्स तर्फे कलाकारांना तशा सूचना दिल्या जातात हे खुपजनांना माहीत आहे, नकार दिल्यास पुढे काम मिळणं अवघड होऊन बसतं हे सत्य आहे.

2. ज्या लोकांना भाऊने गणपती बसवला म्हणून संताप आला त्यांच्या प्रतिक्रिया सहाजिक होत्या. ज्या धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन तो धर्म सोडला त्याच धर्मातील गोष्टी 'आपला' माणूस करतो ह्याच्या यातना आणि त्यातून येणारी चीड आहे ती

3. बहिष्काराचा निषेध करणाऱ्या लोकांत प्रामाणिकपणे निषेध करणारे कमी आणि आता कसा तावडीत सापडलात म्हणून आनंदात पोस्ट टाकून उचकवणारे अधिक होते. ह्याच वेळी व्यक्तीस्वातंत्र्यचा आग्रह धरणाऱ्यानी हीच वर्तणूक कायम ठेवावी ही अपेक्षा

4. अतिशय त्रागा करून बहिष्कार, वाळीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांनी आपण एरवी संविधानाचा पुरस्कार करतो हे ध्यानात ठेवावे आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याबाबत आपली बांधीलकी विसरू नये. स्वधर्मि लोकांचे प्रबोधन करणे हाच एकमेव मार्ग तुमच्या समोर आहे

5. आपण जो धर्म सोडला त्यातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा याविषयी लिहिणं थांबवावे असा काही लोकांना सल्ला देऊ इच्छिते, कारण त्यामुळे कटुते शिवाय काही पदरात पडणार नाही. याबाबत काही लोक अतिशय टिंगल करणाऱ्या आणि थिल्लर पोस्ट लिहितात हे योग्य नाही, हे सोडून द्या

टीप - विषय माहीत नसल्यास कृपया चौकशी करू नये, उलटसुलट कमेंट्सला उत्तर देणार नाही. मी माझं म्हणणं लिहिलंय याउपर चर्चा नको. पटलं तर घ्या नाहीतर सोडा


No comments:

Post a Comment