Monday, 26 February 2018

इश्यू नॉनइश्यू

दोन दिवसात तीन घटना घडतात,

एक प्रसिद्ध नटी अकस्मात हे जग नैसर्गिकरित्या सोडते तेही भारतभूपासून दूर कुठेतरी परदेशात. तिचे लाखो चहाते आहेत त्यांना वाईट वाटणं सहाजिक आहे. क्लासेस पासून मासेस पर्यंत दुःखं हळहळ व्यक्त केली गेली. खुपजनांना आपले टिनएज, कॉलेजचे दिवस आठवले. पहिलं प्रेम, ती हुरहूर, तिचे सिनेमे, तिचे नृत्य सगळं सगळं आठवून लोक हळवे झाले. मोहम्मद रफी गेले तेव्हा आईला मी ढसाढसा रडताना बघितलंय, त्यामुळे पोस्टींचा पाऊस आणि त्यातून जाणवणारा गहिवर मी समजू शकते. मला स्वतःला हे अजिबात खटकलं नाही, मी एकही पोस्ट लिहिलं नाही खरंतर मलाही वाईट वाटलं होतं पण दरवेळी व्यक्त व्हायलाच हवं असं काही नाही म्हणून नाही लिहिलं. पोस्टींचा पावसात काही बेडूक उलटेहि पोहून गेले अगदी अति झालं पासून तिचे समाजात योगदान काय इथंपर्यंत चर्चा झाली, हेहि ठीक आहे ती त्यांची अभिव्यक्ती म्हणून आपण मान्य करू पण काही पोस्टवर अगदी खालच्या थरातल्या कमेंट्स आल्या, तिच्या चारित्र्याबद्दल लिहिलं गेलं,तिच्या वेटलॉस आणि cosmatic सर्जरी बाबत मन मानेल ते लिहिलं गेलं, तिच्या पतीपत्नी मधील वोह असण्याबद्दल काही अतिहुशार आणि सर्वज्ञानी लोकांनी आपली अक्कल पाजळली. काय असतं ना अभिव्यक्ती आहे म्हणून आपण निरर्थक ,अर्थहीन , निराधार आणि अश्लील बोलत असू तर त्या बोलण्याला शून्य किंमत आहे.

तिकडे केरळात मधु नावाचा मनोरुग्ण आदिवासी तांदूळ चोरून जंगलात पळाला, त्याचा काही शहरी लोकांनी पाठलाग केला, त्याला पकडून जबर मारहाण केली. इतकं मारलं कि त्याने नंतर रक्ताच्या उलट्या करून प्राण सोडले. हे सगळं करताना त्यांनी व्हिडीओ शूट, सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. कुठून येतो इतका क्रूरपणा. तांदळासाठी माणसासारखा माणूस मारला जातो ,आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजात रहातो असं कसं म्हणावं. जंगलं कमी होत असताना आदिवासींची कायमच दैना होत आलीय त्यातून जर असे प्रकार झाले तर नक्षलवाद फोफावणे अटळ आहे. ह्या ज्वलंत विषयावर खूप कमी लोक रिऍक्ट झाले. आपले इश्यू अशारितीने नॉनइश्यू बनतात हे एकंदरच घातक आहे.

तिकडे बिहारमध्ये एका SUV ने नऊ शाळकरी मुलं चिरडली गेलीत, आता ही गाडी एका राजकीय नेत्याची आहे म्हणे. गाडी कुणाची, कोण चालवत होतं ह्यावर उलटसुलट मतं येत आहेत, ह्याला पूर्ण राजकीय वळण दिलं जाईल. हा प्रकार तर इथे खुपजनांना माहितीही नसेल

एकाच कालावधीत घडलेल्या तीन दुर्घटना, पहिली घटना नैसर्गिक समजून हळहळ , प्रेम व्यक्त करून सोडून देता येईल पण इथेही वेळकाळ न बघता त्याची वाट लावूनच टाकली गेली. उरलेल्या दोन बद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे पण होईल असे वाटत नाही. सिनेमा, क्रिकेटच्या बाहेर आपल्या अभिव्यक्तीचा टक्का कधी वाढेल तो सुदिन. आपल्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे, बोलून काय उपयोग असं वाटत असेल तर मग सिनेमा ,क्रिकेटवर लिहिताना लेखण्या कशा सरसावतात. इतकं सहजसोपं बघायचं का जगाकडे, मग आपल्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर बोलायचा अधिकार आपल्याला उरतो का? असो, इश्यू आणि नॉनइश्यू न समजणारा समाज कुठल्या दिशेने जाणार आहे कोण जाणे

Thursday, 22 February 2018

छद्मस्त्रीवाद

लोक शिव्या देतात. आई बहिणीवरून मिळणाऱ्या शिव्या मनाला टोचतात , ह्या शिव्या वर्मावर घाव घालतात म्हणून त्या तशा जास्त दिल्या जातात. लायकी काढायला बापावर शिव्या दिल्या जातात. काही लोकांच्या सहज बोलण्यातही शिव्या असतात त्यात फार गंभीर काही नसतं पण त्यांची जीभ रुळलेली असते. मी स्वतः पुण्यातल्या मोठ्या झोपडपट्टीच्या जवळच्या चौकात वाढलेय, रात्री अपरात्री रस्त्यावरून भांडण शिव्यांची लाखोली कानावर कायमच पडलेय पण मी आयुष्यात कधीही शिवी दिली नाही. मी आणि माझी भावंडं शिवी देऊच शकत नाही असं वळण आमच्या आईवडीलांनी आम्हाला लावलं. ह्या शिव्यावरून एक कविता सध्या viral झालीय आणि गावभर फिरतेय, मला ती कविता खटकली अजिबात आवडली नाही म्हणून ती कविता फॉरवर्ड करणाऱ्या दोन पोस्टवर मी खालील कमेंट्स केल्या नंतर त्या वॉलवर पोस्टही केल्या

1) टोचणाऱ्या, डसणाऱ्या , बोचणाऱ्या गोष्टींच्या आरपार बघता आलं पाहिजे म्हणजे जगणं शक्य होतं. त्याच्यावर रिऍक्ट होणं म्हणजे त्या गोष्टींचं महत्व वाढवणे, त्यांना ग्लोरिफाय करणे. Ignorance is bliss.

2) अश्लीलता, अर्वाच्यता ह्यांचा धिक्कार करताना त्याच अस्त्रांचा वापर केला तर ह्यात नक्की विजय कशाचा होतो. सभ्यता तिथे मान टाकतेच ना ?

शिवीला उत्तर शिवी कशी होऊ शकेल किंवा आईबहिणीवरून शिव्या द्यायला नकोत म्हणून स्त्रीवादी जहाल भाषेत लिहिताना अर्वाच्य भाषेत लिहितात हे माझ्या अजिबात पचनी पडलं नाही. एकूणच सध्याचा स्त्रीवाद माझ्या अकलेबाहेरचा आहे. स्त्रीसक्षमीकरणात आपण अजून मैलोगणती दूर असतात स्त्रीवादी स्मोकिंग, ड्रिंक्स आणि खुल्या शरीरसंबंधावर चर्चा करतात तेव्हा भंजाळून जायला होतं, मंजे त्यांनी तसं जरूर वागावं लिहावं पण ही आपली प्राथमिकता नाही. आपली प्राथमिकता स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध, स्त्री शिक्षण, तिचा कुटुंबातील आणि समाजातील दर्जा उंचावणे ह्या पायऱ्यांवरून पुढे जायला हवाय असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या बेसिक गोष्टी सोडून तिला शारीरिक समाधान कसे मिळवायचे ह्याचे धडे देत बसणं मला अनाठायी आणि अनावश्यक वाटतं. एकंदरच सध्याचा एकूणच स्त्रीवाद भरकटला गेला आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही, चांगल्या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत पण दिसताना ह्या काही मोजक्या चुकीच्या गोष्टी समोर येतात कारण त्यात भपकेबाजपणा अधिक आहे. ग्राउंडलेव्हलवर काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष असलं आकर्षक लिखाण करत नाहीत त्यांना तितका वेळ वाया घालवायचा नसतो. हे छद्मस्त्रीवादी निव्वळ आकर्षक , चमकदार लिहून एकूणच स्त्रीवादाविषयी चुकीचा समज समाजात पसरवायला कारणीभूत होतात असे माझं स्पष्ट मत आहे. होय मी ह्याला छद्मस्त्रीवाद किंवा स्युडोफिमिनिझम असंच म्हणतेय, कारण ते तसंच आहे.

Friday, 9 February 2018

कुटुंब व्यवस्थेवर स्वैर विचार

वाढत्या वयातले आणि विवाहबाह्य संबंध ह्यावर बरेच उहापोह होत असतात, हे संबंध अहितकारक आणि भावी पिढीच्या एकंदरच भावविश्वावर परिणाम करणारे असतात असं माझं स्वतःचं म्हणणं असताना अशा संबंधातील व्यक्तींच्या मनोव्यापाराचा मागोवा घेतला असता मला व्यक्तीशः त्यांच्याबद्दल कीव आणि दयाच वाटत आली आहे, घृणा वगैरे अजिबात वाटत नाही, मला जाणवलेले काही ठळक मुद्दे

1 बऱ्याचदा लग्नानंतर (ठरवून किंवा प्रेमविवाह)  आलेल्या जबाबदाऱ्या पेलता पेलता स्त्रीपुरुष दोघांचीही अवस्था आता उरलो मागच्या पिढीच्या सेवेकरता आणि पुढल्या पिढीच्या पालनापुरता अशी होऊन जाते. दाम्पत्याचे मनसोक्त जगणं, एकमेकांशी साध्या गप्पा, अधूनमधून फक्त स्वतःसाठी काढायचे क्षण दुर्मिळ होत जातात. आणि हे रितेपण शोधताना नजरा उंबरा ओलांडू लागतात

2 विवाहबाह्य किंवा ज्याला असामाजिक समजलं जातं अशा संबंधाचे कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक , काहीवेळा आर्थिक अतृप्तता असते त्याचं तुष्टीकरण जिथे होतं तिथे माणूस आपोआप खेचला जातो. ह्यात सहभागी दोन्ही व्यक्ती तारतम्याने वागणारी नसली कि त्यांचे संसार फाटलेच समजा, तारतम्याने वागणारे असतील तर त्यातल्या त्यात समाजमान्य रस्ते शोधले जातात किंवा स्वतःला आवर घातला जातो

3 विवाहानंतर काही नवरे डोमीनेटींग वागू लागतात, हरएक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागते. एक पैसा मनाने खर्च करायची सोय काही घरांत स्त्रियांना नाही, मोबाईल वापरू दिला जात नाही ; दिला तरी तो सतत तपासला जातो. काही ठिकाणी परिस्थिती उलटसुद्धा असू शकते, अशा नात्यात तिची आणि त्याची जीवघेणी फरफट सुरु होते. मुलांकडे बघून असे संसार रेटले जातात, त्यात ना आईबाप सुखी असतात ना मुलं. आईवडिलांचं आपसातील वागणं मुलांना दिसत असतं, समजत असतं त्यामुळे मुलंही चिडचिडी होतात

4 आपसात कितीही पटलं नाही तरी मुलांसाठी लग्न नावाचं जोखड मानेवर ठेवून खूप जण “सुखी संसार” करत असतात. आपली कुटुंबव्यवस्था अशी आहे की मुलांना आपण कायम जवळ बांधून ठेवतो. जनावरांची/ पक्ष्यांची पिलं पंखात बळ येईस्तोवर आईवडिलांना खेटून असतात, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो पैसा कमावू लागला, त्याला मुलं झाली तरी आईवडील आणि मूल ह्यातले बंध सुटत नाहीत. आशियाई देशांत तर ही पद्धत आहेच. युरोप, अमेरिकेत मात्र मुलांना आर्थिक सक्षम करून त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते, त्यामुळे त्या देशांत घटस्फोटाचा मुलांवर म्हणावा असा वाईट परिणाम होत नाही

5 कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कर्तव्यावर बांधली गेली आहे ह्यात स्व ला स्थान नाही. घरातील मुलं आणि ज्येष्ठ ह्यांच्याप्रति आपली कर्तव्य उचलण्यात हयात जाते आणि हाच वसा पुढच्या पिढीच्या पदरात आपण देत जातो. अतृप्ती, असामाधान असेल तरीही त्याची पूर्तता करण्याचं धाडस फार कमी लोकांत असतं. हजारातला एखादा हा मार्ग पत्करतो, हा मार्ग योग्य कि अयोग्य हे आपण नाही सांगू शकत, दुसऱ्यांच्या गरजा चूक कि बरोबर हे आपण नाहीच ठरवू शकत. त्यांच्या ह्या रुळलेल्या वाटा सोडून जगण्याने पूर्ण कुटुंब उद्धवस्त होते हे मात्र खरे आहे. कुटुंबाचं पूर्ण भावविश्व ढासळून जातं. मन मारून जगणे हा एकमेव उत्तम मार्ग आहे, ह्याला त्याग असं गोंडस नाव देता येईल.

आर्थिक, भावनिक गुंत्यात सापडलेली मधली पिढी मन मानेल तसं नाही जगू शकत. जेष्ठांना सन्मानाने रहाता येतील अशी ओल्ड एज होम आणि लहानांना लवकरात लवकर स्वावलंबी करणे हा व्यावहारिक उपाय मधल्या पिढीला जरा मोकळा श्वास घेऊ देईल पण ह्याला मधली पिढी तयार आहे का?