Saturday, 16 December 2017

सैराटची ऐशीतैशी

#कुबेर_विनोदी_कथा_स्पर्धा

(नागराजअण्णांची माफी मागून आणि चार्लीला वंदन करून)

कथेचं नाव - सैराटची एैशी तैशी


एक छानसं, छोटंसं, टुमदार गाव होतं , इतकी विशेषणं लावलीत म्हणजे ते नक्कीच पुणे असणार हे अनुभवी लोकांना सांगणे न लगे...तर ह्या सुंदर सुंदर गावात तशीच एक छानशी हौसिंग सोसायटी होती, ह्या सोसायटीत आपली हिरोईन अर्चि आणि हिरो परश्या रहात होते. ह्यांची ही नावं त्यांच्या जन्मदात्यांनी जागतिक प्रसिद्धीचा सैराटनामक सिनेमा येण्याआधीच ठेवली होती आणि नंतर ती सिनेमातील मुख्य पात्रांना दिली गेली हा एक निव्वळ योगायोग होता. अर्चिचे पप्पा त्याना ती लहानपणापासून पप्पाच म्हणत होती , तर हे पप्पा महाचिकट मंजे कंजूस माणूस शेणातला पैसा उचलून धुवून वापरणारा, हे स्वतःच्या पैशाने चहा दूरची बात हॉटेलची पाटीसुद्धा वाचत नसत, अशा पप्पांना त्यांच्या एका मित्राने सैराट पिक्चर दाखवला आणि त्याने हे बरेच प्रेरित झाले. घरी आल्याआल्या त्यांनी लेकीला फर्माण सोडले “आरचे, तू आता मला पप्पा म्हणू नको तात्या म्हण. सैराटमधला तात्या बघितला का काय रुबाब आहे तात्या नावात” झालं अर्चिने रडायला सुरवात केली “तुला रडायला काय झालं आता, नुसतं तात्या म्हण म्हणलं तर मुंगी चावल्यासारखी काय रडायला लागलीस” अर्चिने रडत रडत डोळे पुसले “रडू नको तर काय, सैराटमध्ये तो तात्या अर्चिला मारतोSS वर प्रिन्सला ही मर्डरर बनवतो मला नको असले मारकुटे पप्पा” अर्चिने अजून गळा काढला ते ऐकून आतून आई गडबडीत बाहेर आली “काय गोंधळ लावलाय, जरा फेसपॅक लावावा म्हटलं तर झाला तुमचा गलका सुरू” “मम्मी फेसपॅक थोडा ज्यादा भिजव, माझ्याही गालावर पिंपल आलाय” अर्चि रडता रडता आरश्याकडे धावली “फेसपॅक कसला आणलाय , अरे देवा किती पैसे घालवले त्यात” पप्पाना म्हणजे भावी तात्यांना फेसपॅकच्या नावानेच घाम फुटला “विकत नाही हो आणला , मसूरडाळ मिक्सरमधून काढून दुधात भिजवली की झाला फेसपॅक. मेलं तुमच्यासारखा कंजूस नवरा असताना मी फेसपॅक विकत आणेन का? मला माझ्या सौभाग्याची काळजी आहे म्हटलं, बरं ही का रडतेय” आता अर्चिला आपलं आधीच रडणं आणि पप्पांना तात्याची आठवण आली “मम्मी तात्या मला पप्पा म्हण म्हणतायेत, मला नको असले पप्पा” गडबडीत अर्चिने पप्पा आणि तात्या उलटसुलट केले इकडे मम्मी चिंतेत,चिडून आणि आपलं ग्लॅमर अजून टिकून आहे ह्याचा नाही म्हटलं तरी थोडा आनंद ह्या संमिश्र भावात “कोण गं हा , माझ्या लेकीला पप्पा म्हण म्हणतोय” तशी अर्चिला आपली चूक समजली जीभ चावतच “सॉरी सॉरी , अगं पप्पा मला म्हणतात की तात्या म्हणून हाक मार म्हणून, तो सैराट बघून आले ना” तशी अंगावर पाल पडल्यासारखी आई ओरडली “आरचे तू अजिबात तात्या म्हणू नकोस, पप्पाच म्हण. तात्या म्हटलं की मला तो झपाटलेला तात्या विंचू आठवतो. माझा नवरा तात्या विंचू , ओ माँ माताजी चक्करच आली मला, डोळ्यापुढे अंधारीच आली माझ्या, आरचे मला धर,अहो SS” कुणाचं काय तर कुणाचं काय इथं आईचं वेगळंच सुरू झालं तशी अर्चि घाबरीघुबरी झाली “पप्पा, मी रिक्षा आणू का मम्मीला अंधारी आलीय” दाराकडे भराभरा निघालेल्या अर्चिला पप्पा ओरडले “अगं काही अंधारी आली नाही , तुझ्या आईच्या डोळ्यावर काळा गॉगल आहे आणि तिला वाटतंय चक्करच आली” तसा डोळ्यावरचा काळा गॉगल घाईने हटवत आई म्हटली “शी बाई ह्या घरात कुणाला माझी किंमतच नाही, चक्कर आली अंधारी आली तरी माझाच दोष, जळला मेला बायकांचा जन्म.” “पण मी म्हणतो घरात कुणी गॉगल घालतं का , जेव्हा बघावं तेव्हा नटून थटून बसलेला असता. त्या सिरियल्सनी बिघडवलं तुम्हाला, त्या बायका एक जरीच्या साड्या नेसून नुसत्या कटकारस्थानं करत असतात आणि ते बघून तुम्ही हे घरात गॉगल, जरीच्या साड्या आणि टिकल्या तर कसल्या हे एकेक बंदा रुपया जणू” पप्पा तावतावात भाषण मोडवर गेलेले बघून आईने तिथून काढता पाय घेतला आणि क्लासची वेळ झाली म्हणून अर्चिही पळाली.

ह्याच सोसायटीत दोन बिल्डिंग सोडून परश्या रहात असतो, त्याला अर्चि लई मंजे लई आवडायची पण सांगायची गोची. ही अर्चि त्या अर्चिसारखी स्मार्ट न्हवती हे आपलं एकदम बावळट ध्यान होतं. अर्चिला तू मला आवडतेस हे सांगायचं दूरच पण परश्या तिच्या समोरही जात नसे. रात्रंदिवस अर्चिचा विचार करू करू परश्या काट्यावर आला, एकेदिवशी आज साला काय व्हायचं ते होऊ दे कोर्टात जाऊदे अर्चिला सांगायचंच असं परश्यानं ठरवलंच पण च्यामारी तेवढी काय त्याला  डेअरिंग होईना म्हणून ब्रेकअपच्या आधीच आमचा हिरो देवदास झाला आणि सॅडमूडमध्ये त्याने मोबाईलवर गाणं लावलं कुठलं गाणं तर ते नै का एकदा ऐकलं तर दहावेळा ब्रेकअप झाल्याचा फिल येतो ते गाणं “ तेरी मेरी यू टी टूट गये सोनिये जैसे तुटिया अंबर दा तारा” अंबर शब्द आला कि दरवेळी परश्या छपराकडे बघायचा तिकडं काय दिसणार होतं ते त्यालाच माहीत. तितक्यात मोबाईल वाजला हा मेसेज खोलून बघतोय तर दोस्ताचा मेसेज “अर्चि कट्ट्यावर बसलीय” काय, कवा,कुठं पुढचे प्रश्न विचारे पर्यंत मित्र ऑफलाइन, परश्याचे मित्र एकेक कलंदर सैराटमधल्या मित्रांसारखे मार खाणारे न्हवतेच उलट ह्याला अजुन अडचणीत आणणारे होते तरी अर्चिचं नाव ऐकलं की ह्याने चढवले अंगावर कपडे आणि निघाला. अर्चि मस्त कट्ट्यावर मैत्रिणी गोळा करून बसली होती हातात पाचपन्नास राख्या, परश्या लांबूनच बघत होता हिचं काय सुरुये म्हणून. ही येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना थांबवून राखी बांधत होती, “च्यामारी आज राखीपौर्णिमा आहे नाही का अन ही बया काय गावजेवण तसं गावराखीपौर्णिमा साजरी करतेय की काय. देवा मला वाचीव, हिच्या भावी मुलांचा मामा नाही पप्पा व्हायचंय रे मला” असं मनातल्या मनात बडबडत परश्या आल्या वाटेनं मागे गेला. मेसेज करणाऱ्या मित्राला फोनवर भोसडतच परश्या मागे फिरला.

अर्चिची लक्षण बघून , लक्षण म्हणजे ते हेच सार्वजनिक राखीपौर्णिमा वगैरे तर हे बघून पोरगी अरेंज मॅरेज करणार आणि आपल्याला खर्चापासून सुटका नाही हे तिच्या पप्पांना लक्षात आलं, तरी बापही कधी तरुण मुलगा असतोच त्यामुळे तरुणांच्या चाली त्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. परश्याचा अर्चिकडे ओढा आहे हे पप्पांना समजलं तसं त्याना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. चांगला पोरगा बिनखर्चाचा मिळून जाईल, चप्पल झिजवणे, चहा पोहे , लग्न कितीतरी पैसा वाचेल फक्त पोरीने परश्याला हो म्हणायला हवं. काही दिवस गेले तरी पुढची हालचाल दिसेना एकदिवस न राहवून पप्पानी अर्चिला सांगितलंच “तुला करमत नसेल तर परश्याला बोलवत जा गप्पा मारायला, नाही म्हणजे आम्ही नव्या जमान्याचे आहोत आमची हरकत नाही मुलामुलींनी बोललं तरी” अर्चि आपल्याच नादात “करमतंय की मला, कंटाळा आला की मीच संगीकडे जाईन” “अरे वा, छान” मनातल्या मनात “धत 'तेरीकी” काही झालं तरी हे स्थळ जाता कामा नये आणि शक्य तितके पैसे वाचवायचे ठरवून पप्पांनी घराबाहेर घुटमळणाऱ्या परश्याला हटकलं इकडचं तिकडचं बोलताना थेट विचारलंच “इथे सारखा का फिरत असतोस” परश्या गडबडला “परत नाही येणार” म्हणून खाल्ल्या मानेन परश्या निघाला तसा “नै येत जा तू” घसा खाकरत पप्पा “घरात अर्चिशी बोलत बसला तरी चालेल, नाही त्याचं काय आहे तिचाही वेळ जाईल” पप्पांच्या ग्रीन सिग्नलचा परिणाम होऊन परश्या अर्चिच्या घरात येऊजाऊ लागला. हो नाही म्हणता म्हणता पप्पांच्या प्रयत्नाला आणि परश्याच्या प्रेमाला फळं लागली. अर्चि चक्क परश्याच्या प्रेमात पडली, तरी पप्पा आपल्याला काय समजतच नाही दिसतंच नाही असं समजून वागू लागले. एके दिवशी तिच्या मम्मीने विषय काढला “परश्याच्या घरी कधी जायचं बोलणी करायला” कळून सवरून आडाण्याचा आव आणून पप्पा म्हटले “काय, कशाला” “अहो अर्चि परश्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला, त्यांचं प्रेम आहे “ अंगावर पाल पडल्यासारखे पप्पा “मी बोलणी करायला जाणार नाही, प्रेम आहे तर त्यांचं ते पळतील” जीभ चावून “अगं त्यांनी सांगू तर दे मला”. अर्चिपरश्याने दोघानीही आपआपल्या घरी एकदाची ही बातमी फोडली तशी पप्पा लटका नकार घेऊन बसले, परश्याच्या घरच्यांनीही मग ताणून धरलं. शेवटी वाट बघून दोघांनी आळंदीला जाऊन दोनाचे चार हात केले, तसं पप्पांना हुरूप आला आणि चारच दिवसात जंगी रिसेप्शन देऊन टाकलं. अर्चिची पाठवणी करताना डोळे पुसत पप्पा मनात विचार करत होते “नाही मी मुलीच्या सुखापुढे पैशाला महत्व देणारा बाप नाही पण सगळी सोंगं आणता येतात पैशाचं आणता येत नाही, चांगला मुलगा आहे त्यांनी लग्न करावं म्हणून मी किती प्रयत्न केले आता ऐपतीप्रमाणे मी रिसेप्शन करून दिलं” पाया पडणाऱ्या अर्चिला तोंड भरून आशीर्वाद दिला “सुखाचा संसार करा, अष्टपुत्रा भव” 

सुशीला

हि एक सत्यकथा आहे, नावं गाव बदलून लिहितेय. आजूबाजूला खूप विस्मयकारी प्रकार दिसलेले असतात ते लिहावे म्हणतेय. जमेल तसे भाग करून लिहितेय

----

#सुशीला

ओपीडी सुरु होऊन तास उलटला, शहरात राहिलेली शिकलेली निशा पहिलं पोस्टिंग मिळून ह्या आडगावात येऊन पडली होती. चहासाठी उठावं कि पुढचे पेशन्ट तपासावेत ह्या विचारात असतानाच निकम कम्पाऊंडर एका पंचवीशीतल्या तरुणीला घेऊन आत आला
“डॉक्टर मॅडम, हि आमच्या आळीत रहाते. आज सकाळीच न्हाणीघरात चक्कर येऊन पडली. बरं तर नशीब नाहीतर डोक्याला मार बीर लागला असता”
तिला तपासायच्या टेबलावर नेता नेता, निशा मनात विचार करत होती...ह्या गावात येऊन सहा महिने उलटले, गावातले म्हातारेकोतारे, तरणेताठे, लेकरं , बायाबापड्या जवळजवळ सगळे बघून झाले हिला कसं कुठं बघितलं नाही. तपासता तपासता निशा तिच्याशी बोलत होती
“सोबत कुणी आलंय का तुझ्या, तुझी सासू नवरा”
“संगट मामंजी आलेत, मालक घरात न्हाईत”
“गुड न्यूज आहे...म्हणजे चांगली बातमी, बहुतेक तुला दिवस राहिलेत. तीन चार महिने झाले असावेत. उद्या रक्त, लघवी तपासून घे बरं, गोळ्या औषध लिहून देते शेजारच्या मेडिकलमधून घ्या. रिपोर्ट दाखवायला उद्या ये”
हातातली चिठ्ठी चुरगाळत खाल मानेनं सुशीला बाहेर पडली. तशी निकमाना आवाज देत निशा म्हटली “मास्तर तास झाला, चहा द्या गरिबाला”. हातातला ट्रे समोर ठेऊन निकमही समोरच्या खुर्चीत टेकले. निशा इथं आल्यापासून निकमच तिचे केअरटेकर बनले होते, रिटायरमेंटला दीडवर्ष बाकी असलेला निकम मायाळू आणि पापभिरू भाबडा माणूस होता त्याच्या पोटी लेकरू नसल्यानं तो बाकीच्या मुलातच स्वतःला रमवायचा. 
“ती आत्ता गेली तिला दिवस राहिलेत बरका, तिच्या घरी कळवा”
निशाचं वाक्य ऐकून निकमचा चेहराच बदलला, निशाचं तिकडे लक्ष न्हवतं
“हि दिसली नाही कधी, घराबाहेर पडत नाही का, तसं गावही बदललाय हल्ली बायका घोळक्याने का होईना बाहेर पडतात”
“सुशीला घरातच असते, कुठं जात नाही. माहेर तुटलं तिचं, आई बाप आहेत तवर बाईला माहेर बघा. खाऊन पिऊन सुखी आहे तशी ती, आपल्या पुरुषोत्तमची बायको आहे ही, सांगतो तिच्या जावंला घरी जाता जाता” चहाचे कप ट्रेत गोळा करून निकम गेले आणि कंबर लचकवत, बायकी हावभाव करत चालणारा पुरुषांत नसलेला पुरुषोत्तम निशाच्या नजरेसमोर खटकन उभा राहिला. बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा उलगडा व्हायचा होता...पुढचा पेशंट बोलवायला निशाने बेल दाबली
...
रखमाच्या दारापुढं मांडव पडला होता , अगदी साधासा होता. रखमा रांडाव होऊनही दहावर्ष उलटून गेली होती. पदरात दोन लेकरं, मोठा मुलगा बाप असतानाच शिकून शहरात नोकरीला म्हणून जोे गेला तो तिकडचाच झाला. पोरानं मनानचं बायको केली एक मुलंही झालं , गावी आई बहिणीकडे ढुकुणबी बघना झाला. सणासुदीला आधी आधी यायचा तेबी आता येत नाही. पोराच्या पाठीवर आठ वर्षांनी झालेली मुलगी सुशीला दिसायला गोरीगोमटी पण शिक्षणात डोकंच नाही, तसंबी पोरीच्या जातीला डोकं असून काय फायदा, रुपडं चांगलं असल तर झटक्यात उजवून टाकता येती बघा. सोयऱ्यातच एकाने मागणं आणलं त्याच जागी सुशीलाचं लग्न पक्कं झालं. नवऱ्यामागे रखमाची शेती पडीक राहिली होती, दोघी दुसऱ्याच्या रानात कामं करून पोट भरत होत्या.लग्नात देणघेणं जमणारच न्हवतं तसंच मागणं आलं देव पावला म्हणून रखमा खुशीत होती. पोराला बोलवून घेतला होता, सख्ख्या बहिणीच्या लग्नात भाऊ नसला तर गाववाले तोंडात शेण घालतील म्हणून हातापाया पडून पोराला बोलवून घेतलं होतं, तो बी उपकार केल्यासारखा सकाळी आला अन सांजच्या गाडीने परत जातो ह्या बोलीवरच.

भर दुपारी बाराचं लग्न , आत नवरी नटून बसली होती. लै दिवसांनी सुशिलाच्या अंगावर चांगले कपडे होते. हळदी अंगाची, मेंदी रेखल्या हातांची, नवीन लाल जरतारी रुंद हिरव्या काठांची साडी अंगावर ल्यालेली सुशीला उठून दिसत होती. रस्त्यावर ढोलीबाजा वाजू लागला, नवरदेव घोड्यावर चढला, त्याचे आठ दहा दोस्त लोक धमाल नाचत होते. पोरांना नाचाची नशा चढली, बेभान होऊन नाचत होते. एका दोस्तानं गाडीत ठेवलेली फटाकी बाहेर काढली. सुतळी बॉम्ब दणक्यात वाजीवले, मोठ्या फटाक्यांची माळ चेतवली. जो जो फटाके वाजत तो तो नवरदेवाचं घोडं बिथरत होतं. एक मोठी माळ लागली अन घोड्याने जोरदार खिंकाळी मारून पाठीवरचा नवरदेव उडवला, हवेतून उडून जमिनीवर आदळलेल्या त्याच्या छाताडावर घोड्याचे पुढचे पाय आपटले तशी तोंडातून रक्ताची पिचकारी येऊन जागेवरच नवरदेवाचा खेळ आटपला. एका क्षणात वाजंत्री थांबली, सगळी पळापळ सुरु झाली. रखमाचं काळीज लक्कन हाललं, मोठ्याने बोंब मारून ती जागीच चक्कर येऊन कोसळली.

पांढऱ्या पायाची, लग्नाआधीच नवरा खाल्ला गं हिने , असं म्हणून न झालेल्या सासवा, नंदा, जावा सुशिलाच्या नावाने शिमगा करत होत्या. रखमा आता भानावर आली. लग्नाला आलेली माणसं पांगली. नवरदेवाला उचलून घेऊन गेले. लग्नाच्या मांडवाला पार सुतकी कळा आली. सुशीला आतमध्ये हबकून बसली होती, अंगावरचे कपडे बदलावेत कि काय करावं हेही तिला कळत न्हवतं. उंबऱ्यात डोक्याला हात लावून रखमा बसली होती, तोच पोरगा एका माणसाला घेऊन आला.
“आई, हे वऱ्हाडात आले होते, सुशी ह्यांना पसंत आहे. ह्यांचा मुलगा आहे लग्नाचा. आपण हो म्हटलं तर मुलाला घेऊन येतील, संध्याकाळी ह्याच मांडवात लग्न लावून देऊ”
“बरं बाबा, आणा म्हणावं पोराला. तसंबी आता हिचं दुसरीकडं जमणं अवघड झालं. खर्चापाणी पण परत झेपणार नाही”
“अगं काळजी नको करू, घरचं खूप चांगलं आहे. दोनच भाऊ आहेत , 15 एकर बागायती आहे. मोठ्या भावाचं लग्नही झालंय, माझ्यावर विश्वास ठेव”
त्याच मांडवात संध्याकाळी सुशीलाने पुरुषोत्तमच्या गळ्यात माळ घातली


निकम सांगत होते आणि निशा होऊन ऐकत होती, एखाद्या पेशंटमध्ये इतकं गुंतायला नकोय असं निशा स्वतःलाच सांगत होती पण तिच्या डोळ्यासमोरून सुशीलाच भांबावलेला चेहरा हटता हटत न्हवता.

...



शिलाच्या लग्नातला अजब प्रकार ऐकल्यापासून निशा अजूनच अस्वस्थ झाली. लग्नानंतर काय घडलं असावं ह्याचा तिला काहीही अंदाज करता येईना, निकमानाही त्यानंतरच्या घटना माहित न्हवत्या. सुशिलाबद्दल अधिक जाणून घ्यायची उर्मी तर निशाला फार वाटत होती. निशाने सुनीललाही हा प्रकार सांगितला तसा तो बिथरलाच
“तुला काय करायच्या नसत्या उठाठेवी , तू तुझं काम करत जा. नैतर तो जॉब सोडून इथे परत ये इथे तुझा दवाखाना सुरु कर” झालं घरूनच असा दम मिळाल्यावर निशाने सुशीला प्रकरण डोक्यातून काढून टाकलं पण नियतीच्या मनात अजून काही वेगळंच असावं, नियती नशीब तुम्हाला एखाद्या गोष्टी भोवती इतकं फिरवत ठेवते कि ठरवूनही कुणीच त्यातून बाहेर पडू शकत नाही. एका सुस्त दुपारी दवाखान्यात फारशी गर्दी नसताना बाहेर अचानक गलका उठला, धावपळ सुरू झाली. इमर्जन्सी दिसते म्हणून निशा झटकन खुर्चीतून उठली बघते तर बेशुद्ध सुशिलेला उचलून दोन लोक धावतच आले, एक तिचा नवरा पुरुषोत्तम होता आणि दुसरा तिचा सासरा होता. “डॉक्टर मॅडम, हिला तपासा सकाळधरून उलट्या जुलाब करतेय” सुशिलाला तपासून तिला सलाईन चढवलं गेलं , तिला फूड पॉइझनिंग झाल्याचा निशाचा अंदाज होता , सुशीलाच्या पोटाचा आकारही चांगलाच वाढला होता
“काय खाल्लंय हिने, जेवणात शिळं काही खाल्लं का”
“काय खाल्लं काय जनू आम्ही गडी लोक स्वयंपाक घरात कशाला डोकवतोय, तिकडं सगळं ह्याचंच राज्य. मनाला वाटल ते करून खात्यात”
आता मात्र निशाचा आवाज चढला “हे बघा , हा लहान दवाखाना आहे. इथे किरकोळ पेशन्ट ठेवतो आम्ही. दोन तासात फरक पडला नाही तर तालुक्याला न्यावं लागेल, तयारीत रहा. आणि तिने चुकून काही खाल्लं कि तिला मुद्दाम चारलं हेही बघावं लागेल, शंका आली तर पोलीस केस करावी लागेल”
“असं कुठं असतंय का, उलट्या जुलाब झाले म्हणून पोलीस केस. काय मॅडम गंमत करताय गरिबांची. नीट इथंच ईलाज करा कशाला तालुक्याला”
सुशीलाचा सासरा जरा गुर्मीत पण मानभावीपणाचा आव आणून बोलतोय अशी शंका न्हवे खात्रीच वाटत होती निशाला. आराम करायला स्वतःच्या रूमवर जायचा विचार रद्द करून निशा जातीने सुशिलाच्या वॉचवर होती. दोन तासात सुशिलाची पल्स नॉर्मलला यायला लागल्यावर निशाने तिला तालुक्याला पाठवायचा प्लॅन रद्द केला.
दुसऱ्या दिवशी सुशीला चांगलीच भानावर आली, पुरुषोत्तम तिची बऱ्यापैकी काळजी घेत होता. तिला उलटी आली तर भांडं धरत होता, तिच्या पाठीवरून हात फिरवताना त्याच्या डोळ्यातली माया जाणवत होती, पुरुषोत्तम सुशिलेला आणि सुशीला त्याला जीव लावते हे बघणाऱ्याला लगेचच जाणवत होतं. ओपीडी संपली तशी निशा सुशीलाला तपासायला गेली “आता आराम पडतोय ना, सुधारणा आहे परवा घरी जा. तुम्ही बायकाही अशा कशा गं, शिळं अन्न टाकावत नाही तर खाऊन घेता. परत असं करू नको”
अचानक सुशीला ढसाढसा रडायला लागली “डॉक्टरताई , पाया पडते मला घरी धाडू नका, मला परत ते पाला खाया घालतील. मला माझं बाळ पाहिजे. कायबी होऊंदे मी तुमची धुणीभांडी करीन” आता मात्र निशा आवाक झाली

...



(भाग 4)


#सुशीला

पुरुषोत्तम वयात येत होता तसं तसं त्याचं वेगळेपण सगळ्यांच्या ध्यानात येत होतं, गावात त्यांच्या घराला मान होता म्हणून उघड कुणी बोलत न्हवतं पण गुपचूप चर्चा होतच होती. नव्याचे नऊ दिवस सरले तशा ह्या चर्चाबी बंद झाल्या. गावात कुणी पावना आला तर तेवढ्यापुरता त्याने स्वतःहून विचारलं तरच सांगणं होत असे. तोही मनमिळावू होता, सगळ्यांना धावू धावू मदत करायचा त्यामुळं लोकांची त्याच्यावर मायाही होती. त्याची आई गेल्यावर भावाचं लग्न झालं त्याला एक मुलंही झालं आत्ता ह्याचं काय करावं ते त्याच्या बापाला समजेना. भाऊ तालुकाच्या गावी पंचायत समितीत कामाला होता, तिकडंच आठवडाभर रहायचा, घरची शेती बाप आणि पुरुषोत्तम बघायचे, शेतावर कामाला काही गडी माणसंपण ठेवली होती असं सगळं बैजवार चाललं होतं. पुरुषोत्तमच्या वयाच्या पोरांची लग्नं होऊ लागली होती, आता ह्याचं लग्न करायचं तरी कसं , करायचं का नाही ह्याविचारानी त्याचा बाप बेजार झाला. तशातच सुशिलाच्या लग्नातला प्रकार बघून बापाला आयडिया सुचली आणि पुरषोत्तमला पुढं घालून घेऊन आला नि बार उडवून दिला. काय नाही तर एखादी गरीब पोर मार्गी लागल, पुषोत्तमलाहि आधार होईल असा चांगला विचार करूनच बापानं हे पाऊल उचललं होतं.  सुशीला माप ओलांडून घरात आली, जावही प्रेमानं वागली, लग्नानंतरची पूजा, गोंधळ उरकला तशी पावनेरावळे पांगले. पुरुषोत्तम सुशिलेचा शब्द खाली पडू देत न्हवता ती म्हणल तसंच वागत होता, ईळभर घरात असलेला पुरुषोत्तम रात झाली की मळ्यावर झोपायला जात होता, रोज वेगळं कारण सांगून हातावर पाणी पडलं की पसार व्हायचा ते दुसऱ्या दिवशी च्या प्यायलाच हजर व्हायचा , सुशीला एकटी खोलीत असताना तो तिथं टिकतंच न्हवता. हि चुकामुक सुशिलाच्या लक्षात आली, आधीच त्याच्या हावभावावरून तिचं डोकं ठणकलं होतं त्यात हे, काही केल्या तो हाती लागतच न्हवता. आता काय करायचं , कुणाला सांगायचं सुशीला आतून नुसती धुमसत होती पण करायचं काय तिला समजत न्हवतं. लग्न झालं की मालक एक रात सुनी जाऊ देत नाहीत, त्याच्या रसभरीत कथा तिनं मैत्रिणीकडून ऐकल्या होत्या त्या आठवून सुशीला झुरु लागली. एक दिवस दुपारच्या जेवणाच्या भाकरी बांधून घेऊन सुशीला रानात गेली, आज हिकडं वर्दळ तशी कमीच रहाणार होती हे तिला ठाऊक होतं. खोपटात जेवण वाढून तिने नवऱ्याला हाक मारली , घाम पुसंतच तो आला सोबत एक गडीपण होता. नोकराला बघून सुशिलाच्या कपाळावर आठी चढली. नोकरमाणूस खाल मानेन जेवण उरकून पळाला तसा पुरुषाच्या तोंडात घास फिरू लागला. सुशीला मुद्दाम दार अडवून उभी होती,
“दार सोड जाऊ दे, रानात लई कामं पडलीत” त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसतंच होता. खांद्यावरचा पदर पाडून सुशीला त्याला झोंबली, पुरुषाच्या तोंडावर मानेवर मटामटा मुकं घेऊ लागली, दोन्ही हातांनी त्याला घट्ट आवळून धरला. पुरुषोत्तमची ताकत तिच्यातून जास्त होती, त्याने जोर लावून तिला लांब ढकललं तशी भिताडाला आपटून सुशीला खाली पडली. कपाळावर मोठ्ठ टेंगुळ अन उभी रक्ताने न्हायलेली सुशीला त्वेषात त्याच्या अंगावर धावून गेली “असलं लक्षान व्हतं तर लगीन का केलं म्हणते मी, जन्माची नुकसानी झाली माझ्या, आता मी काय करू कुठं जाऊ” सुशीला मोठ्यानं गळा काढून रडू लागली तशी पुरुषाने तिच्या तोंडावर हात दाबला
“वरडू नको, माणसं गोळा व्हतील”
“होऊ दे कि, मी जगाला वरडून सांगणार हाय. फशिवलं मला” तिचे हुंदके सुरूच होते, पुरश्या मनातून कळवळला तिला जवळ घेऊन डोळे पुसताना त्याचेही डोळे भरले होते
“काय करणार आपणतरी, देवानं मला असंच घडवलं तुला माझ्या माझ्यामुळं तरास, माफी कर गं मला” अजूनच हमसत सुशीला रडत होती , घरात राहिलेली टोपी घ्यायला परत आलेला गडी सद्या खिडकीतून हे बघत होता.


दुसऱ्या दिवसापासून सद्याची वागणुक बदलली, उगाचच घराकडं येऊ लागला, सुशीला रानात आली की आजूबाजूला फिरू लागला. दिसायला सद्या देखण्यात जमा होता, आता त्याची रहाणीहि चांगली झाली. केसाचे कोंबडे काढून, गुळगुळीत दाढी केलेला सद्या मिशीला पीळ घालत सुशिलाच्या भवती फिरू लागला. भुकेली वाघीण ती , तिनेही हि खूण बरोब्बर हेरली, अन एका दिवशी दोघांना चान्स मिळाला तशी त्यांनी डाव साधला. एकदा तोंडाला रक्त लागलेली वाघीण अन शरीरसुखाची चव चाखलेली मादी तशी राहती व्हय. दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका सद्या अन सुशिलाचा खेळ रंगू लागला, पुरश्याला हि गोष्ट लक्षात आली पण तो काय करणार बिचारा उलट हे कुणाला कळू नये म्हणून पुरश्या राखण राहू लागला. रानातल्या खोपित सद्या अन सुशीला कपड्याचं भान विसरून एकमेकात रमले होते नि अचानक कुऱ्हाड हाती घेतलेला तिचा सासरा दाराला लाथ मारून आत घुसला तो शिव्या देतच
“भाडखाव, खाल्ल्या घरचे वाशे मोजताना लाज नाही वाटत. आमच्या टोपल्यातली भाकर खातो डुक्कर” हातातली कुऱ्हाड थोडक्यात नेम चुकन डोक्यावर यायची ती खांद्यावर बसली, हाताला लागतील तितके कपडे उचलून सद्या दारातल्या दैताला धक्का देऊन बाहेर पळाला. लुगडं कसंबसं गुंडाळत उभ्या राहिलेल्या सुशिलाच्या झिंज्या धरून “रांड साली, इतकी मस्ती आली व्हती तर आम्हाला सांगायचं चांगली जिरवली असती तुझी. घरात दोन दोन मर्द असताना बाहेर तोंड मारती शिंदळ, तुला दाखवतोच आता हिसका” फराफरा सुशिलाला ओढत घराकडं घेऊन गेला, तिच्या खोलीत तिला ढकलत “खबरदार कुणी आत आलं तर” असं ओरडतच सासरा म्हणणारा तिच्या अंगाला झोंबला. आरडाओरडा ऐकून धावत आलेली जाव चाललेला प्रकार बघून हबकून मागं फिरली. आपली भाकर आपणच खायची परक्याने तिला हात लावलाच कसा हा अजब तर्क असलेल्या सासऱ्याने सुनेबरोबर तोंड काळं केलं


सुशीला रडत तिची कर्मकथा ऐकवत होती, निशा खुर्चीत सुन्नपणे हे ऐकत होती “कसली गं हि लोकं, मुलीसारख्या स्त्रीवर हात टाकताना लाज कशी वाटत नाही म्हणते मी, ह्यांना माणूस तरी कसं म्हणायचं” निशाची फणफण सुरु झाली , मागे भीतीला टेकून उभे असलेले निकम आभाळाकडं बघून “श्रीहरी, विठूराया काय रे हे” असं पुटपुटत हळहळत होते

(दोन तीन ठिकाणी शिव्या लिहाव्या लागल्यात त्याबद्दल दिलगीर आहे, शक्य तितक्या मवाळ लिहिल्यात )


...

(भाग 5)

#सुशीला

आणि मग हे नेहमीचंच झालं, सुशीलाहि गप्प बसून होती. जावेला आपल्या नवऱ्याची काळजी आता तोही हिच्या कडे वळतो कि काय ह्या घोरानं जावेची झोप उडाली. आधीच तो घरी यायचा आठवड्यात दोन दिवस तेही जावेला जड जाऊ लागले, ती नवऱ्याला मिनिटभर एकटा सोडेना, ह्याला त्रासून त्याने तालुक्याच्या गावालाच बिऱ्हाड करायचं ठरवलं, आता इथं गावात सुशीला, पुरुषोत्तम आणि सासरेबुवा तीनच लोक उरले. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं , सुशिलाला आता घरातच नजरकैदेत घातलं गेलं, उंबऱ्याबाहेर पडायची बंदीच आणली तिच्यावर. एकदोन महिने उलटले अन सुशीला गरोदर आहे ही खबर फुटली तशी हे पोर त्या सद्याचं असणार ते पाडून घे म्हणून सासरा तिच्या मागे हात धुवून लागला. आता मात्र सुशिलाच्या अंगातील रणचंडिका जागी झाली ती काही केल्या ह्या गोष्टीला तयार होईना. आता ही बया काही ऐकेना म्हटल्यावर तो बाबा पिसाळला अन जवळच्याच गावच्या एका वैदाकडन पोर पडायचा पाला मिळवला. सुशिलेला अगदी जबरदस्तीनं तो पाला तोंडात कोंबून चारला. त्या पाल्याने पोर काही पडलं नाही पण हिला उलट्या जुलाब सुरु झाले...हि अशी सगळी रामकथा ऐकून आता पुढं काय करावं हा मोठा प्रश्न निशापुढे ठाकला

“पोलिस बोलावते ते सरळ करतील ह्या नीच माणसाला, पण एक गोष्ट कळत नाही आईकडे किंवा भावाकडं जायचं सोडून हे का सहन करत राहिलीस”

“लगीन झालं नि तीन हप्त्यात रानात पान लागून आई गेली, भाऊ तो तसा आधी तरी कुठं बघत व्हता तवा आता बगल म्हणून आधाराला जावं. हिथ पोटाला आधार हाय, कपडालत्ता कशात कमी नाय. एक गोष्टीची कमी हाय पर तेबी चालतंय. हिथून भायेर पडले तर कुत्र्यावानी गत व्हईल माझी. मला माझं पोर पायजे पोरगा पोरगी जे काय असल ते. एवढं एकच कस जमतंय ते बघा तुमचे उपकार जिंदगीभर इसरणार नाय, तुमच्या पायात कातड्याचे जोडे करून घालीन बघा” सुशीला हमसून रडत होती

निशाने ताबडतोब त्या भागाच्या पोलीस चौकीत ह्याची तक्रार नोंदवली, सासऱ्याने जरा दबाव आणायचा प्रयत्न केला पण निशाने ठामपणे बाजू लावून धरली. अटक व्हायच्या भीतीने त्याने ह्यापुढं असं काही होणार नाही असं शपथपत्र लिहून देऊनच प्रकरण सामंजस्याने मिटलं. सुशिलाला वेळच्या वेळी एक छान दणदणीत मुलगा झाला, दिसायला अगदी आईसारखा तोंडवळा असलेला पोरगा पदरात बघून सुशीला हरकून गेली, तिच्या जिंदगीचं सार्थक झाल्यागत तिची अवस्था झाली होती. ते पोरगं चार महिन्यांचं झालं आणि निशा बदली घेऊन शहरात गेली, तिचा संसार तिची वाट बघत होता, निकमही रिटायर झाले. सगळी जिकडं तिकडं पांगापांग झाली, निकम आणि निशा अधूनमधून ख्यालीखुशाली विचारायला फोनवर बोलायचे नंतर नंतर तेही कमी झालं. जवळपास 6 वर्षांनी निकमांचा निशाला फोन आला, नातवाच्या लग्नाला आग्रहाने आमंत्रण देताना निकम हळवे झाले “हल्ली तब्येत साथ देत नाही, एकदा येऊन भेटून जा पोरी” ह्या लग्नाला जायचंच ठरवून निशा चार दिवसासाठी परत त्याच गावात आली. लग्न पार पडलं , जरा निवांतपणा आला तसे निकम तिला घेऊन फिरायला शेतावर गेले. चालताना वाटेल सुशीला आडवी आली, अंगात रंगतदार पाचवारी नेसलेली अंगात गच्च भरलेली बऱ्यापैकी बदललेली सुशीला बघून निशाला आनंद आणि आश्चर्यहि वाटले. दोघींच्या जुजबी गप्पा होऊन सुशीला निघून गेली, सुशीला गेली त्या दिशेला वळून बघत बघत नकळत निशा बोलून गेली
“किती बदल झाला ना हिच्यात”

“खरंय, सासरा गेला तशी हि मनाची मालक झाली. दीरजाव काही हिकडं चुकून बघेनात. पुरुषोत्तम गडीमाणसं हाताशी घेऊन शेती चांगली करतोय. घरात काही कमी नाही बघा, पोरगंबी आता शाळेत घातलंय. पण हिची जुनी सवय काय मोडना बघा, रानातले गडी अलगद उचलती बघा हि. हि सवय काय सुटेना हिची. अंगात मुरलय सगळं हिच्या त्याबिगर तिला जमत नाही. गावात बोलायची कुणाची टाप नाही इतका दरारा आहे हिचा आता, कुणी बोललाच तर त्याच्या दहापिढ्यांचा उद्धार करती. तीचीबी काय चूक आहे म्हणा , देवानं तिची गाठंच नामर्दाशी घालून दिल्यावर हि बाहेर उकिरडे फुकत फिरणारच ना”

“एक सांगा मास्तर , घरातल्या पुरुषाने तिच्यावर बळजबरी केली, पोर पडायचा प्रयत्न झाला तेव्हा ती किती अगतिक दिसत होती आणि आता ही उर्मट, रंगेल, स्वतःच्या मर्जीने पुरुष उपभोगणारी सुशीला किती मस्तवाल दिसतेय ना. तुम्हाला कोणतं रूप आवडलं हिचं”

गालातल्या गालात हसत निकम उद्गारले “मला आजची सुशीला आवडली पोरी”

#समाप्त

#स्वल्पविराम

(स्वल्पविराम अशासाठी कि ह्यापुढे अधूनमधून अशा कथा तुमच्यासमोर मांडत जाणार आहे. लिंकवर पूर्ण कथा वाचा)



Thursday, 14 December 2017

डोळे उघडा डोळे

चार आंधळ्यांची गोष्ट आठवते का, चार आंधळे म्हणजे ते खरोखर आंधळे नसतात तर भ्रमाची पट्टी डोळ्यावर बांधलेली असते. ज्याच्या हाताला सोंड लागतो तो वर्णन करतो "अहाहा, हत्ती म्हणजे लांबच्या लांब नळकांडं जणू" दुसरा कानाला कुरवाळून म्हणतो " हत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक हलतं डुलतं मोठच्या मोठं सूप आहे" तिसरा पाय पकडतो तो म्हणतो "हत्ती म्हणजे चालता बोलता खांब रे खांब" तर चौथ्याच्या हाती लागतं शेपूट त्याला वाटतं हत्ती म्हणजे निव्वळ एक फालतूसं खराटाछाप तोंड असलेला दोरीसारखा प्राणी. डोळ्यावरची पट्टी काढली कि त्यांना दिसलं अरेच्या आपण बघत होतो तो हत्तीचा एक छोटासा भाग होता. जवळ उभं राहून बघितलं तर पूर्ण हत्ती स्पष्ट दिसतंच न्हवता. जरा मागे सरकलं कि हत्तीचा अजून थोडा भाग दिसला, अजून लांब गेलं की हत्तीचा पन्नास टक्के भाग दिसला. हत्तीचा पूर्ण आवाका लक्षात यायला त्यांना अजून जरा लांब सरकावं लागलं.

कुठलीही परिस्थिती, माणूस , जनसमुदाय, संस्था किंवा इतरकाही पुर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर डोळ्यावरच्या पट्ट्या हटवून बघायला हवं, तटस्थपणे अवलोकन करायला हवं, गरज पडल्यास जरा दूर सरकून परिस्थितीचा पूर्ण आवाका लक्षात घ्यावा लागतो. जवळीक डोळ्यावर नाहीनाही त्या पट्ट्या बांधते त्याने सत्य आणि पूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. याही पुढे जाऊन हत्ती खर्राखुर्रा कि भोंडल्यातला हे ओळखायचं असेल तर खूपसाऱ्या पट्ट्या सोडायला लागतील...डोळ्यावरच्या आणि मनावरच्या घट्ट पट्ट्या


Sunday, 10 December 2017

मार्मलेड



“किती भरभर खातोस जरा सावकाश” संध्या राजीव च्या भरभर नाष्टा करण्याला रोजच वैतागायची, तिच्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून राजीवने हसतच तिला खाली ओढलं आणि तिच्या गालावर एक मस्त पापी देऊन टाकली तशी बावरून संध्या जरा दूर सरकली “मस्का काय मारताय साहेब सकाळी सकाळी , ऑफिसला नाही जायचंय का?” संध्याच्या गालावरची रंगपंचमी आणि तिने टवकारलेलेे मोठ्ठे मोठ्ठे काळेभोर डोळे बघून राजीव सुखावला “ऑफिस रोजचंच असतं बाईसाहेब चल आज दोघेच कुठंतरी मस्त लॉंग ड्राइवला जाऊ” राजीवच्या खांद्यावर हनुवटी रोवून संध्या वाकली, तिची बोटं त्याच्या केसात फिरत होती “तू ऑफिसला पळ संध्याकाळी जाऊ आपण , तू तासभर लवकर ये छानपैकी खडकवासल्याला जाऊ खूप दिवसात गेलो नाही, बिट्टूही एन्जॉय करेल” राजीव खुर्चीतून उठला. “अरे थांब तुझं मार्मलेड सँडविच राहिलंय अजून, बॉटल संपली तर काल मी 5 किलोमीटर स्वतः गाडी चालवत जाऊन आणलंय” राजीवने मोठ्ठा आ केला तिच्या हातूनच सँडविचचा घास घेतला “खातो बरं मॅडम, मार्मलेड आणायला तुम्ही चक्क 5 किलोमीटर स्वतः गाडी चालवत गेलात आणि आम्ही तो खाऊ नये; ये बहोत नाईन्साफी झाली गं बाबा”  ब्रीफकेस आणि गाडीची चावी उचलून राजीव ऑफिसला निघालासुद्धा  “ओक्के डन, संध्याकाळी तयार रहा मी ऑफिस सोडताना कॉल करतो” धावतच घराच्या पायऱ्या उतरून रुबाबात गाडीकडे जाणाऱ्या राजीवकडे संध्या अभिमान आणि प्रेमाने बघत उभी राहिली. नोकरमाणसं घरात असूनही राजीव आणि बिट्टूची लहानसहान कामं करायला संध्याला खूप आनंद वाटायचा, मध्यमवर्गीय खाऊनपिऊन सुखी असलेल्या घराची लेक तालेवाराच्या घरात पडली होती, श्रीमंतीचा गर्व वगैरे तिच्या आजूबाजूला सुद्धा न्हवता. मियाबिवी आणि 5 वर्षांचं लेकरू अशी परफेक्ट फॅमिली होती. बिट्टू शाळेत आणि राजीव ऑफिसला आता दुपारपर्यंत संध्या मनाची मालक होती, बेडरूममध्ये घुसता घुसता तिने कुकला कॉफीची ऑर्डर दिली टीपॉयवरचं मासिक उचललं आणि ती बेडवर आरामात बसली. कॉफीचे घोट अलगद घशाला शेकत होते संध्या निवांतपणे कॉफीचा कडवटगोडपणा जिभेवर घोळवत होती तोच तिच्या खोलीच्या दारावर कुणीतरी नॉक केलं , त्या आवाजाने सावरून बसत असतानाच तिच्या मेडचा आवाज आला म्हणून ती उठून बाहेर आली आणि तिच्या खोलीबाहेर मुकेशला बघून थक्क झाली. “मुकेश तुम्ही ह्यावेळी इथे कसे? राजीवने एखादी फाईल वगैरे मागवलीय का घरून, बघा कोणती हवीय” संध्या भराभरा राजीवच्या स्टडीरूमकडे निघाली मेडकडे बघून मुकेशसाठी एक कॉफी पाठव अस फर्माण सोडायला ती विसरली नाही. तिच्या मागोमाग स्टडीमध्ये आलेला मुकेश चेहऱ्यावरून खूप गडबडलेला आणि काळजीत वाटत होता “भाभी कॉफी नकोय मला आणि मी तुम्हाला घ्यायला आलोय, आपल्याला लगेच निघायला हवं” संभ्रमात पडलेल्या संध्येकडे थेट बघायचं टाळून मुकेश पुटपुटला “आपल्याला लगेच निघायचंय, हॉस्पिटलमध्ये जायचंय कार बाहेर उभी आहे” “काय झालंय मुकेश? कशासाठी हॉस्पिटलमध्ये जायचंय ? कोण आहे तिथे?” एकापाठोपाठ संध्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिच्या प्रश्नांची उत्तरं न देता मुकेश घराबाहेर पडला आणि संध्याची वाट बघत कार मध्ये बसून राहिला. त्याला जास्त वेळ वाट बघावीच लागली नाही, संध्या गाडीत बसली तशी ड्राइवरने गाडी सुरू केली. संध्याचा हवालदिल चेहरा बघून तिला खरं कसं सांगावं हा प्रश्न मुकेशला पडला होता पण सांगायला तर हवंच “भाभी, ऑफिसला येताना राजीवच्या गाडीचा अकॅसिडेंट झालाय. काळजी करू नका तो सुरक्षित आहे थोडा जखमी झालाय“ राजीवला अपघात झालाय, जखमी झालाय , आता मात्र संध्या पांढरीफटफटीत पडली तिच्या हातापायाचं बळंच खचलं, कधी राजीवला बघेन असं तिला झालं. गाडी हॉस्पिटलच्या पोर्चला लागताच ती दार उघडून पटकन बाहेर पडली तिच्या मागोमाग मुकेश धावला. काचेच्या दारातून बेशुद्ध राजीवला बघत असताना तिचा संयम ढासळला आणि तिथेच बाकावर बसून तिने रडायला सुरवात केली. राजीवची सेक्रेटरी जेनीने तिला पाठीवर थोपटून शांत करायचा असफल प्रयत्न केला. रडणं थकून उमासे येऊ लागले , संध्या पाय पोटाशी घेऊन तिथेच एका बाकावर बसून होती राजीवच्या ऑफिसचे लोक सगळी धावपळ करत होते तिला काहीही सांगावं लागत न्हवतं. “तुम्ही आता घरी जावा आम्ही इथलं बघतो, बिट्टू घरी आलाय त्याच्याकडे लक्ष द्या” एका खणखणीत आवाजाने संध्या भानावर आली आणि चटकन उठून खाली वाकून तिने अण्णासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. तिला तिथे थांबावं वाटत होतं पण बिट्टूची पण काळजी वाटू लागली बाहेर अंधारून आलं होतं, रात्र झाली तरी मम्मीपप्पा घरी नाहीत म्हणून लेकरु घाबरलं असेल ह्या विचारांनी ती गाडीकडे निघाली. सकाळी लॉंग ड्राईव्हला जायचं प्लॅनिंग करणारा राजीव संध्याकाळी बेशुद्ध पडलेला होता, त्याच्या काळजीने खचलेली संध्या बिट्टूला झोपवून थकून रात्रभर तळमळत होती.

दुसऱ्या दिवशी राजीवचं पाठीच्या मणक्याचं मोठं ऑपरेशन झालं, संध्या ऑपरेशन पार पडेपर्यंत तिथेच बसून होती, 4 तासांनी राजीव शुद्धीवर आलेला बघून संध्याच्या जीवातजीव आला. कालपासून मनातल्या मनात तिने खुपसारे नवस बोलून ठेवले होते ते सगळे फळाला आले. अण्णासाहेब राजीवचे वडील स्वतः जातीने लक्ष ठेऊन होते , संध्या रात्रंदिवस सेवा करत होती, जगातली उत्तमात उत्तम वैद्यकीय सेवा डॉक्टर्स दिमतीला होते, राजीवच्या तब्येतीत भराभर फरक पडू लागला आणि आठच दिवसात तो घरी आला देखील. डॉक्टरांनी त्याला 1 महिना बेडरेस्ट सांगितली होती, त्यानंतर  घरातल्या घरात व्हिलचेअरवर फिरू शकणार होता. काही दिवसांनी पहाटे फोनच्या आवाजाने राजीव झोपेतून खडबडून जागा झाला, मुकेशला इतक्या सकाळी काय बोलायचंय विचार करतच राजीवने कॉल रिसिव्ह केला ,फोनवर बोलताना शेजारी गाढ झोपलेल्या संध्याकडे राजीव बघत होता, फोन कट करून तो कुठल्यातरी विचारात गढून गेला ; संध्या उठून आंघोळ करूनही आली तरी तो विचारातच होता. राजीवच्या मनातली खळखळ कधीच संध्याच्या लक्षात आली होती पण तसे काहीही न दर्शवता तिने राजीवला फ्रेश व्हायला मदत केली. “संध्या माझं एक ऐकशील का?”नाष्टा करता करता राजीवने संध्याला विचारलं, “काही हवंय का? कुठे दुखतंय का?” तिने काळजीने विचारलं तसं राजीवला हसू आलं “मी एकदम फिट आणि फाईन आहे गं, फक्त तुला एक काम सांगायचं होतं” काहीशी रिलॅक्स होत एकीकडे त्याला फळं चिरून देत “हो हो, सांग ना मी काय करू तुझ्यासाठी, तू मला भरभरून सुख दिलंस रे तुझ्या शब्दाबाहेर मी नाही” काहीशी हळवी झाली होती ती, बोलता बोलता तिचे डोळ भरून आले , राजीवने तिच्या गालावर ओघळलेला थेंब अलगद बोटावर उचलला थेंबाकडे निरखून बघताबघता “तू आजपासून माझ्या ऑफिसला जा, मी बरा होत नाही तोवर माझं काम सांभाळ” पटकन राजीव बोलून गेला, तशी संध्या उडालीच. “नको रे, मला नाही जमणार तुझी जागा घेणं. मी कॉलेजातून बाहेर पडले ते थेट तुझ्या सावलीत आले मला इथंच राहू देत, मला नाही जमणार ते...आणि मुकेश आहे की, तुझा स्टाफही खूप चांगला आहे...तू काहीही बोलू लागलास हं, पाठीला मार बसलाय साहेब तुमचं डोकं जागेवर आहे ना” संध्या नकार देण्याचे अनेक बहाने शोधत राहिली आणि न थांबता बोलत राहिली, तिचं बोलणं ऐकता ऐकता राजीवने नाष्टा संपवला “संध्या आवरून घे, तुला तासाभरात ऑफिसात पोचायचंय. मुकेश आणि जेनीला मी निरोप दिलाय, गाडीत ड्राइवर तुझी वाट बघतोय” राजीवचा आवाज निर्णायक होता, ठाम निश्चय त्यात दिसत होता ; आता आपलं काहीएक चालणार नाही हे संध्याला पुरतं समजलं, एक शब्दही न बोलता तिने आवराआवर सुरू केली.

संध्या ऑफिसात जाऊ लागली, मुकेश जेनी आणि इतर स्टाफही मदत करत होताच शिवाय राजीवचेही सारखे फोन, व्हिडीओ कॉल्स सुरू असायचे. बिट्टू शाळेला गेला की राजीवला नाष्टा देऊनच संध्या घर सोडत असे; घरीही आता गप्पांचे विषय बदलले, हळूहळू तिला राजीवच्या कंपनीचं कामकाज समजू लागलं. अण्णासाहेब रोज सकाळी राजीवच्या तब्येतीची चौकशी करायला फोन करायचे तेव्हा हटकून तिच्याशी एखादंतरी वाक्य बोलत असत त्यामुळे तिने राजीवच्या कंपनीत जायला सुरू केल्याचं त्याना ताबडतोब लक्षात आलं नाही तरीही त्यांच्या कानावर ही गोष्ट गेलीच; तशी ती कधीतरी त्यांना समजणार हे राजीवला माहीत होतं आणि त्यांना ते कदापि रुचणार नाही हेही राजीवला ठाऊक होतं. दर  रविवारची अण्णासाहेबांची चक्कर ह्यावेळी 4 दिवस अलीकडं आली, घरात आल्याआल्या ते राजीवला भेटायला त्याच्या खोलीत गेले; खिडकीजवळ व्हीलचेअरवर राजीव एक फाईल घेऊन बसला होता. अण्णासाहेब त्याच्या जवळ आले तसं त्याने खाली वाकून त्याना नमस्कार केला तसं करताना त्याला कष्ट होत होते पण म्हणतात ना लहानपणापासूनचे संस्कार;  अण्णासाहेब जरा घुश्श्यातच होते “हल्ली सुनबाई कामावर वाटतं” “होय अण्णासाहेब” राजीवने खुप शांतपणे ऊत्तर दिलं , दाबून ठेवलेला ज्वालामुखी फुटावा तसे अण्णासाहेब उसळले “अरे पण का? काय गरज होती? आपल्या आख्ख्या खानदानात घरची लक्ष्मी घराबाहेर पडली नाही; सगळी शिकवण मातीत घातली तुम्ही राजेहो. जग कसंय एकतर, ह्या पहिल्यांदा बाहेर पडतायेत , दुनियेची रीत ठावं आहे का? तू पडला बिछान्याला खिळून तरणीताठी बाई काय घ्या कुणावर मन गेलं तर ?” आपण अतीच बोलून गेलं हे ध्यानात आलं तसे अण्णासाहेब गपकन थांबले. बिछान्याला खिळून...हे शब्द ऐकून राजीवच्या काळजावर नाही म्हटलं तरी ओरखडा उठलाच होता तरीही राजीव शांतच होता, जसं कळतंय तसं त्याने पहिल्यांदाच अण्णासाहेबांच्या नजरेला नजर दिली “अण्णा, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय हो, आतापर्यंत संध्याला जगाची रीत माहीत न्हवती. झालेल्या अपघातातून मी नशिबाने वाचलोय; जर मला कमी जास्त काही झालं असतं तर संध्याला कंपनी सांभाळणं जमलं असतं का? मान्य आहे माझा पार्टनर मुकेश खुप चांगला आहे, पण तरीही मी नसताना तो असाच चांगला वागेल ह्याची काय खात्री अण्णासाहेब? तरणीताठी बाई...मी बिछाण्याला खिळलोय” राजीव हसला आणि खिडकीतून बाहेर बघू लागला “माझा संध्यावर विश्वास आहे अण्णा जसा तिचा मी ऑफिसात असताना माझ्यावर असायचा, न जाणो कदाचित तिला पुढेमागे दुसरा कुणी आवडेलही किंवा नाहीही आवडणार...मात्र तिच्या मनात कायम मीच असावा ह्याच्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन हे नक्की. गेल्या पंधरा दिवसात संध्याने खूप प्रगती केलीय, उद्या एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला चाललीय, जेनीही सोबत जातेय. पुढच्या कॉन्फरन्सला मात्र संध्या एकटीच जाईल इतकी तयारी मी करून घेणार आहे. अण्णा, अजून एक महिन्याने आम्ही दोघेही इथलं ऑफिस सांभाळू. मुकेश कलकत्ता ब्रांच बघणार आहे, तिकडे त्याचे आईवडिल थकलेत म्हणून हल्ली तो काळजीत असतो” राजीवने अण्णासाहेबांकडे नजर फिरवली तेव्हा खोलीबाहेर जातानाची त्यांची पाठ राजीवला दिसली, अण्णांचा राग नक्की निवळेल ते वरून फणस तर आतून नरमदिल आहेत हे राजीवला ठाऊक होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच संध्या दिल्लीसाठी रवाना झाली, रात्रीत किमान हं किमान 100 वेळातरी तिने दोन दिवसांचं वेळापत्रक वदवून घेतलं होतं...आणि राजीव मध्ये मध्ये कॉन्फरन्सची तयारी करून घेत होता. बिट्टू शाळेला गेल्यावर राजीव खिडकीशी व्हीलचेअरवर बसला होता... मेड नाष्टा देतेय की नाही मालकीण नाही तर ही बया कोणाशी फोनवर बोलतेय कोण जाणे म्हणून राजीव चरफडत होता तोच मेड आत आली “इतका वेळ कुणाशी बोलत होतीस” राजीवने सहज विचारलं..”संध्यामॅडम होत्या; चेकइन करताकरता फोन केला” राजीवचा प्रश्नार्थक चेहरा बघून मेड हसतच सांगत होती “किचनच्या खालच्या कप्प्यात मार्मलेडची नवीन बॉटल ठेवलीय ती काढ आणि साहेबांना ब्रेडला मार्मलेड लाऊन दे सांगत होत्या” थोड्यावेळाने ब्रेकफास्ट ट्रे मधलं मार्मलेड सँडविच उचलता उचलता विमानाचा आवाज आला… खिडकीतून आकाशात उंच उंच झेपावत जाणारे विमान बघताना राजीवला अतीव समाधान होत होते.

Friday, 8 December 2017

सगळं कसं व्यक्तीसापेक्ष

शाळेतून मुलं टीचरच्या नावाने ओरडत फणफणत घरी आली ना की समजून जायचं पोरांनी होमवर्क तरी केला नाही किंवा शाळेत मस्ती तरी केलीय. विनाकारण रागवायला टीचरचा काही कुणाच्या बांधाला बांध नसतो. हुशार, अभ्यासू मुलं बाईंना आवडतात म्हणून बाईंनी त्यांचे लाड केले तर इतर मुलं म्हणतात ती बाईंची चमची आहे. “ती ना टीचर वर्गात यायच्या आधी फळा पुसून ठेवते, तिच्या घरच्या बागेतले गुलाब बाईंना देते. टीचर्स डे ला तर काय नाटक, बाईंच्या पाया काय पडते. नुसती पुढं पुढं करत असते, म्हणूनच टिचरला ती आवडते”

हे असले एपिसोड माझ्या आणि भावाच्या घरात अधूनमधून सुरू असतात, आमचा विश्वास बसत नाही कारण आम्हाला माहित असतं मुलांनी काहीतरी गडबड केली.

सगळं कसं व्यक्तीसापेक्ष असतं नाही, आपल्या चुका दाखवून देणारा माणूस आपण लगेच बॅडबॉय किंवा बॅडगर्ल म्हणून स्टॅम्पिंग करून मोकळे होतो. मधाळ शब्दात साखरपेरणी करताना कान उघाडणी करणं हे मोठंच कसब आहे, हे ज्याला जमलं त्याने जग जिंकलं. अशा जगजेत्त्या लोकांचं कौतुक करावं तितकं कमी असतं


Tuesday, 5 December 2017

अंग हळदीचे ओले
पाऊले मेंदीने रेखीली
ओलांडता उंबऱ्याला
का ही नजर भिजली

कोण दाटला हा #मेघ
आले भरून आभाळ
ठेव आवरून त्याला
मांड नवाकोरा खेळ

येते कुणाची गं सय
काय शोधते नजर
आला जरी कुणी आता
तुझ्या जन्माला भ्रतार

नको रेंगाळूस आता
पडो पाऊले पुढती
नव्या संसारात सखे
येवो सुखाला भरती

Sunday, 3 December 2017

आमचा लेखनप्रवास



प्रवास म्हणण्या इतकं काही मी लिहिलं नाहीये पण भक्कम शब्द वाटतो म्हणून लिहिलाय हे आधीच स्पष्ट करते ☺ दुसरं म्हणजे ही मतं मागण्यासाठी #जाहिरात एज ईट इज नसून स्वतःला व्यक्त करण्याची संधी समजते, आणि संधीसाधूपणा करून लिहितेय 😁😂

लहानपणापासून वाचनाची खूप गोडी पण लेखन म्हणाल तर शाळेत पेपर सोडवण्यापलीकडे काहीही लिहिलं नाही, नंतर नोकरीत ऑफिसमध्ये कामाची पत्रं आणि नोट्स लिहिणे अशी थोडीशी प्रगती झाली. 2009 पासून फेसबुकवर आहे पण खरं लेखन सुरू झालं ते कुबेरवरच, इतरांच्या पोस्ट वाचून लाईक करणे, जास्त ओळखपाळख नसल्याने भीतभित कमेंट करणे असा प्रकार समूहावर नवीन असताना सुरू असे. श्रावण महिन्यात संतोषभाऊंनी चारोळी स्पर्धा सुरू केल्या, चित्रं बघून त्यावर चारोळ्या लिहायच्या आणि इथेच प्रेरणा मिळाली आणि मी लिहायला लागले. स्पर्धा म्हटली की का कुणास ठाऊक मला ते चॅलेंजिंग वाटतं त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेते(अर्थात झेपेल त्या स्पर्धेत 😛) त्यापुढे समूहाच्या कथास्पर्धेत भाग घेतला तेही जमतंय का बघितलं. हळूहळू धाडस येत गेलं आणि लिहीत गेले त्यातून हिम्मत आली आणि स्वतंत्र पोस्ट लिहू लागले. दाद द्यावी ती कुबेरकरांनीच , भरभरून दाद देतात त्यातून आत्मविश्वास वाढतो हा स्वानुभव आहे. मी कुबेरप्रमुखांचे खूप आभार मानते केवळ त्यांच्यामुळे मी लिखाण करू लागले.

माझा एक मित्र आहे त्याने मला ब्लॉग सुरू करून दिला. तो म्हटला ब्लॉग सुरू कर तर म्हटलं तूच सुरू करून दे, दिला करून बिचाऱ्याने 😃.  तू लिहीत जा म्हणून खुप प्रोत्साहन द्यायचा, मी लक्ष देत नाही म्हटल्यावर त्याने घरचा अभ्यास दिल्यासारखे विषय द्यायला सुरुवात केले 😁😂. तू रणछोडदासवर लिही, कधी अहिल्येवर लिही असं करून भरपूर लिहून घेतलं. हे सगळं लिखाण माझ्या ब्लॉगवर आहे. मत द्या की नका देऊ ब्लॉगला मात्र जरूर भेट द्या