Monday, 27 August 2018

रँडम थोट्स

प्रेम मिळवणं म्हणजे नेमकं काय असतं बुवा? ती एखादी वस्तू थोडीचे की उचलून तिजोरीत ठेवावी... मग ते मिळवायचं कसं. त्याने हो म्हटलं , तिने हो म्हटलं की प्रेम मिळतं का? की त्या नात्याला एक नाव द्यावं आणि मॅरेज सर्टिफिकेटमधून जखडून टाकावं एकमेकांना? प्रेमाचं माणूस आपल्या मालकीचं व्हावं ही इच्छा म्हणजे प्रेम मिळवणं म्हणावं का? मालकी आली की त्याला किंवा तिला आपल्या तालावर नाचवणे ही सुप्त इच्छा ह्या मालकी मिळवायच्या मागे असावी का?  अनेक प्रश्नांची गुंतावळ
प्रेम ही आदिम तहान आहे... ते कुणावरही होतं आणि सुरू होतो हे प्राप्त करायचा खेळ... ते मिळालं रे मिळालं की माणूस सुखावतो , निर्धास्त होतो असं काही नसतं, मग त्याला कायम ताब्यात ठेवण्याची चिरंतन धडपड सुरू होते... त्याला किंवा तिला फक्त आपल्यापुरतं राखीव ठेवण्यासाठी संरक्षित कुंपण घातलं जातं, हे कुंपण ज्याचं त्याचं वेगवेगळे असतं. काही कुंपण अगदीच घरालगत तर काहींचे परीघ विस्तारित असतात. बिनकुंपणाचं नातं बहुतेक अजून जन्माला यायचंय. वो जो अपना था और किसीका क्यूँ है... ह्या प्रश्नानंतरची तडफड म्हणजे प्रेमाच्या दुनियेतलं सगळ्यात विदीर्ण करणारं दुःखं, ही तडफड व्यक्तिमत्त्व उद्धवस्त करणारी ठरते... ह्यातून सुखरूप तरला तो जिंकला
प्रेमाची तहान कधी पूर्ण होऊच नये ... ही तृष्णा कायम रहावी म्हणून ते कधी आपलं होऊ नये. आपलं झालं की त्यातला चार्म नाहीसा होत असावा आणि मग शिरापुरी पुढल्या घरीचा खेळ सुरू होत असावा... म्हणून तर म्हणणारे म्हणतात की 'प्रेम एकदाच होतं ही अंधश्रद्धा आहे'

---

शॉर्टकट लॉंगकट हे मिथ्या असावं... शॉर्टकट सिटीतून जातो तिकडे ट्रॅफिक फार असते ह्या कल्पनेनं बरेचजण शहराबाहेरच्या थोड्या लॉंगरूटने जातात आणि मग तिकडेच ट्रॅफिक जाम होऊन अडकून पडतात. शहरातून तुलनेनं लवकर मुक्कामी पोचतो

भ्याड हल्ला हा शब्द खूपदा ऐकतो, हल्ला करणारे भ्याड कसे असतील? ते तर शूरपणाचं लक्षण... शांतता हे सामर्थ्याचं चिन्ह आहे की नेभळट असल्याचं? हल्ला हा भ्याडच असतो कारण अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या मानसिकतेतून तो निःशस्त्र आणि गाफील व्यक्तीवर केला जातो. शूरपणा तेव्हाच म्हणतात जेव्हा समोरचा व्यक्ती गाफील नसतो आणि समान शस्त्रे घेऊन सज्ज असतो

शांतता सामर्थ्यवान व्यक्तीला दागिन्यासारखी शोभते. नेभळट आणि भित्र्या माणसाची शांतता ही लगेच लक्षात येते. सामर्थ्यवान व्यक्तीने शक्यतो शांतच रहावे, अगदीच नाईलाज झाला तर निसटून जावे पण कधीही परत हल्ला करू नये. 

सामाजिक एकोपा टिकवणे हे बहुसंख्य असलेल्या समाजाची जबाबदारी असते. संख्येने थोडे असलेले भीतीपोटी घाबरून तरी राहतील किंवा अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या तत्वाने वागतील

#रँडम_थोट्स

©अर्चना चंद्रसेन

No comments:

Post a Comment