मतभिन्नता असणं हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. एका घरात देखील वेगवेगळी मतं असलेली मी पाहिली आहेत. मतभिन्नता अगदी कशावरून देखील असते... ड्रेस सेन्स ते शाकाहार मांसाहार, पाश्चात्य विचार योग्य अयोग्य, धार्मिक कट्टरता किंवा त्यातील सॉफ्टनेसचा आग्रह असे अगणित विषय आहेत ज्यावर वेगवेगळे विचार असू शकतात. प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचं एकमत व्हावं असा आग्रह एकंदरच समाजहिताचा नसतो आणि तो नसावा देखील. माझे विचार तेच योग्य आणि इतरांचे चूकच हा समज त्या व्यक्तीचा मोठा मानसिक लोचा असू शकतो. मतभिन्नतेसहित स्वीकारणे हे फार महत्वाचे आहे मग ते कुणालाही असो त्यासाठी फार घनिष्ठ संबंध असावेत असे नाही. प्रत्येकाच्या मताला आपण सहमत नसलो तरी त्याच्या ते मत बोलून दाखवण्यावर निर्बंध घालणं हे उचित नसते.
अनोळखी व्यक्तीलाही बोलू दिलं जात नसेल तर तिथे जाऊन त्याची बाजू घेता यायला हवी, कुणाच्याही अगदी कुणाच्याही मतप्रदर्शित करण्याच्या हक्काचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी समजणारे कितीजण अवतीभवती असतात हे बघायला गेलं तर आकडा तळाशी दिसतो.
मतप्रदर्शन करणे आणि एखाद्याचा मानभंग करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे इथे लक्षात घ्यायला हवं. मतप्रदर्शीत करणे ह्याचा अर्थ सरसकट दुसऱ्याची बदनामी करणे असा होत नाही, बदनामी करणे खोटं बोलणे ह्याला कायद्याने शिक्षा आहे. तार्किक आणि योग्य भाषेत कोणत्याही विषयावर माणसाने विनादहशत व्यक्त होणं(त्याची इच्छा असल्यास) हे बळकट समाजाचे चिन्ह आहे.
माझ्यापेक्षा वेगळे विचार असलेल्या व्यक्तीने बोलूच नये, आपली मतं मांडू नये ह्याकडे कल असलेली लोकं मनाने आणि विचाराने अतिरेकी असतात. वेगळे विचार, वेगळी मतं असली तरी ती ऐकता, बोलता यायला हवीत. फारतर तुम्ही चर्चेने, संवादाने त्या विचारांचे खंडन करू शकता... संवादाचा विसंवाद मात्र होता कामा नये.
"तू बोलतोस त्या तुझ्या मताशी मी सहमत नाही परंतू तुझे ते मत मांडण्याच्या हक्काचे मी शेवटपर्यंत रक्षण करेन" व्होल्टेअर ह्या जगप्रसिद्ध तत्ववेत्याने लिहिलेलं वाक्य माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया आहे.
©अर्चना चंद्रसेन
No comments:
Post a Comment