Sunday, 16 April 2017

रणछोडदास

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या दाराशी उभं आहे की काय अशी परिस्थिती आहे. जगातले जवळजवळ सगळेच पॉवरबाज नेते जहाल विचारसरणी बाळगून आहेत. युद्ध हे कधीही स्वागतार्ह नसतं, त्याचे परिणाम जेते आणि पराजित दोघांनाही सारखेच क्लेश देणारे असतात. आपला शेजारी सारख्या लहान मोठ्या कागळ्या करतच असतो तेव्हा आपले अतिउत्साही लोक आता ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे म्हणून बाह्या सरसावून पोस्टि पाडत असतात. मी स्वतः हिंसेच्या विरोधात आहे पण तरीही गरज पडल्यास आपण सक्षम आणि सामर्थ्यवान असलंच पाहिजे याबद्दल माझं दुमत अजिबातच नाही. युद्ध नको आणि त्यामुळं होणारी अपरिमित हानी नको म्हणून श्रीकृष्णाने केलेले प्रयत्न कृष्ण शिष्टाई म्हणून ओळखले जातात, अर्थात त्याच्या प्रयत्नांना यश आलंच नाही त्याची निष्पत्ती म्हणून मोठा विनाश झाला. याआधी सुद्धा कृष्णाने युद्ध टाळण्यासाठी मथुरा सोडली होती आणि द्वारकेला मुक्काम हलवला होता,मथुरेतून पळ काढला त्यामुळे श्रीकृष्ण रणछोडदास म्हणूनही ओळखला जातो. श्रीकृष्ण माझा ऑल टाइम फेवरेट असण्यामागचं कारण हेहि आहेच, की तो नेहमी प्रॅक्टिकली वागत आला. अत्यंत मुत्सद्दीपणे जेव्हा जेव्हा जेजे योग्य ते त्याने केले. श्रीकृष्णाने केलेल्या जादुई गोष्टींकडे मी नेहमीच कानाडोळा करत आलेय त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. पण त्याच्या प्रॅक्टिकल , वेळच्या वेळी घेतलेल्या अचूक निर्णयाची तर मी अक्षरशः फॅन आहे. त्यातलाच एक निर्णय मथुरा सोडण्याचा.

तर त्याचं झालं असं, मगधराज जरासंध हा कंसाचा सासरा, कृष्णाने कंसाला मारल्यानंतर त्याच्या दोन्ही मुली अस्ति आणि प्राप्ती विधवा होतात, कंसाच्या वधाची बातमी ऐकून आणि आपल्या दोन्ही लेकींची अवस्था बघून जरासंध जाम खवळतो. कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा आणि यादववंशाचा नाश करायचा हा पक्का निर्धार जरासंध करतो. जरासंध मथुरेवर एकामागोमाग एक असे 17 हल्ले करतो. मथुरेची जिवीत आणि वित्त हानी चिक्कार होते. या हल्ल्याना तोंड देऊन यादवांचा खजिना रिक्त होऊ लागतो. जरासंधाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धसामुग्री असते, यादवांकडे कृष्ण बलराम असूनही त्यांची ताकद कमी पडू लागते. अशातच एक दिवस मथुरेत निरोप येऊन धडकतो की जरासंध, छेदिनरेश दमघोष,  कुकुसेचा दत्वरका,  विदर्भराज रुक्मि,  अवंतीतील विंद आणि अरविंद हे भाऊ असे सगळे एकत्र झाले आहेत आणि यादववंश संपविण्यासाठी सज्ज झाले आहेत. हस्तिनापुराहून कसलीही मदत शक्य नसते. यादव एकटे पडतात म्हणजे एकटे पाडले जातात. मथुरानरेश उग्रसेन जे कृष्णाचे आजोबा असतात त्यांना जरासंध निरोप पाठवतो की फक्त कृष्ण बलराम आमच्या स्वाधीन करा मी या संकटातून तुम्हाला मुक्त करतो. उग्रसेन महाराज ही गोष्ट कृष्णाच्या कानावर घालतात. कृष्ण म्हणतो आपण मथुरा सोडून जाऊ. या परिस्थिती युद्ध करणं म्हणजे आत्मघात, यादवकुळ वाचवायचं असेल तर मथुरा सोडण्याशिवाय पर्याय नाही. उग्रसेन म्हणतात आपण जाऊ पण तुला पळपुटेपणा केला ह्याच खापर हा कलंक कायम घेऊन जगावं लागेल. कृष्ण म्हणतो मला पळपुटा म्हणू देत, रणांगणावरून युद्धाच्या आधीच पळालेला रणछोड समजू देत, मला आधीच असंख्य नावं आहेत, अजून त्यात एका नावाची भर.

जरासंधाची ताकद, त्यातुलनेत यादवांची दुर्बलता या गोष्टींमुळे कधीना कधी मथुरा सोडावी लागणार याचा कृष्णाला अंदाज होताच त्यामुळे त्याने विश्वकर्मा यांच्या कडून अगोदरच एक नगर बनवून घेतलं होतं ते म्हणजे द्वारका. द्वारका पाण्याखाली होती मग ती विश्वकर्माने वर आणली वगैरे गोष्टी सांगितल्या जातात ते असो. मथुरा सोडून सगळे यादव द्वारकेस निघून गेले, जरासंध आला तेव्हा त्याला मथुरेत काळं कुत्रंही दिसलं नाही. मथुरेतून पलायन केलं म्हणून श्रीकृष्णाला रणछोडदास हे नाव मिळालं ते मिळालंच , कृष्णाच्या इतर नावांप्रमाणे हे नावही गोड आणि सुंदरच आहे

(टीप- मी कुणी अभ्यासक नाही. इकडे तिकडे वाचलेलं आठवेल तसं माझ्या भाषेत लिहिलंय)

No comments:

Post a Comment