Thursday, 29 June 2017

बदल चिरंतन आहे...

कुठल्याही व्यक्तीला मिळणारा सन्मान हा प्रथमदर्शनी कशावर असतो? तुमचं राहणीमान क्लासी असेल,सगळं श्रीमंती थाटात असेल तर मान देणारे देतात ते तुमच्यातल्या व्यक्तीला नसून तुमच्या कडच्या पैशाला मान देतात. हा मिळणारा सन्मान तात्पुरता असतो जर तुम्ही माणूस म्हणून चोख नसाल तर पैशालाही कुणी विचारत नाही. माझ्या बघण्यात अशी एक बाई आहे , भरपूर पैसा असलेली , हरएक काम पैसा टाकून करून घेणारी...हळूहळू सगळ्यांना समजत गेलं की इथे तर आपण विकलो गेलो, आणि ती बाई लोकांच्या मनातून उतरत गेली पण लोकं इतके उपकराच्या ओझ्याखाली दबले गेले होते की ती सांगेल ती कामं ही लोकं निमूट करून देत. मागे तिला शिव्या देत पण तोंडावर मॅडम मॅडम करून कौतुकं करण्याशिवाय गत्यंतरच न्हवतं. ह्या प्रकरणात मिळणारा मान मिथ्या आणि विकतचा असतो.

अजून एक प्रकार म्हणजे दिखावा. कॅराक्टर म्हणजे चारित्र्य कसेही असलं तरी स्वच्छ , शुद्ध असल्याचा दिखावा करून बेमालूनपणे इतरांकडून मान सन्मान मिळवणारी मंडळी आजूबाजूला पोत्यानी सापडतील. रात्री पिऊन झिंगायचं, नळ्या फोडून , सगळी लफडी करून सकाळी अंघोळ पांघोळ करून हरी ओम म्हणायला मोकळे. चार भिंतीच्या आत घातलेला गोंधळ बाहेर गेला नाही की तुम्ही साजूक असता. अंतर्बाह्य पावित्र्य मिळणं जवळपास दुरापास्त आहे आणि तसा अट्टाहासही कुणी करू नये.

तुमची प्रतिष्ठा, रेप्युटेशन, मिळणारा मान हा बरेचदा तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता यावर असतो भले तुम्ही तसे नसलात तरीही पण एकदा का भ्रमाचा भोपळा फुटला की लोकांच्या नजरेतून उतरने सहन करायला मोठी ताकद लागते, भले भले इथे गारद होतात. मी पणा सगळ्यात घातक असतो, मी पणा करणारे कितीही थोर असले तरी फार काळ लोकांच्या मनात घर करू शकत नाहीत. मी पणा, गर्व सगळ्या कर्तबगारीवर पाणी फिरवतो.

आपल्या पैशाला, आपण कुणाच्या उपयोगी पडतो म्हणून जर कुणी आपला आदर आणि सन्मान करत असेल तर समोरची व्यक्ती स्वार्थी असते आणि आपली एकाअर्थी व्यक्ती म्हणून हार असते. फक्त पैशाने सन्मान मिळतो म्हणजेच तुमच्यातला माणूस कुणीच मोजला नाही.

स्वच्छ, शुद्ध चारित्र्य सांगून समजत नाही, जो सांगतो मी चारित्र्यवान आहे तो खोटारडा असतो...ही गोष्ट न सांगता इतरांना जाणवायला हवी.

चारित्र्याच्या कल्पना समाजनिहाय बदलत असतात. एखाद्या समाजात दारू पिणे, अनेक स्त्रियांशी संबंध असणे म्हणजे नीचपणा असतो पण ह्याच गोष्टी दुसऱ्या समाजात सर्वसामान्य असतात. आपण ज्या समाजात रहातो त्या चौकटीतील नियम पाळले की तुम्ही चारित्र्यवान असता नाहीतर गयेगुजरे, बिघडलेले म्हणून ठप्पा बसलाच समजा. रहाता तिथले नियम गुमान पाळा नाहीतर चारित्र्यहीन म्हणवून घ्या.

समाजाच्या चौकटी मोडायला धमक लागते आणि अशी भरपूर माणसं आपल्या समाजात होवून गेलीत. आपले सगळे समाजसुधारक चौकटी मोडून जगले आणि इतरांसाठी एक मार्ग प्रशस्त करून गेले. अजुन बऱ्याच भिंती तोडायच्या बाकी आहेत, काही नवीन भिंती बांधल्या जातात...

Monday, 26 June 2017

वेडी कुठली

जखमांचे हिशेब आता मी ठेवत नाही
वाहू देते त्यांना पुन्हा पुन्हा शिवत नाही

जखमा लपवायला सारखी हसत असते
म्हणूनच तर आता मी आनंदी दिसत असते

उघड उघड जखमांचा दोष तुला का देऊ
काही गोष्टीतरी जरा उंबऱ्याच्या आत ठेऊ

तू म्हटलास आरसा बघ, तो कुठे स्वच्छ होता
अहंकाराचा पडदा तू त्याच्यावर टाकला होता

हातावर मेंदी आता पहिल्यासारखी रंगत नाही
तिलाही आता तुझ्या नजरेची संगत नाही

तू दिसलास काल रस्त्याच्या पलीकडून जाताना
तिथेच नेमकी चप्पल तुटली मी परत येताना

दिसलास तरी मनात असून हाक मी मारत नाही
खांद्यावरचा तुझा हात मनातून वजा होत नाही

न बोलावता एकदा सहज असा येऊन जा
बघ जमलं तर घट्ट रुतलेलं तुझं नाव खोडून जा

खूप मळमळ साठलेली कवितेत या लिहून टाकली
बघ वाचून समजलं तर नाही तर म्हण वेडी कुठली

Saturday, 24 June 2017

मेघ

पावसाच्या सरी कोसळत आहेत बाहेर, मी बघतेय घरातून त्यांचं कोसळत रहाणे. सध्या तरी खिडकीतून पाऊस एन्जॉय करणं जास्त बरं वाटतंय. पाऊस अंगावर घ्यावा तो एकटंएकटं असताना नको, तू सोबत असतानाच पावसात भिजावं. तुझं असणं म्हणजे मीठ, बेचव आणि अळणी आयुष्याला चव येते ती तुझ्यामुळे... म्हणून मी जरा लांबच ठेवते तुला , तुला जास्त जवळ करून जिंदगी खारट नाही करून ठेवायचीय.

कभी किसींको मुक्कल जहाँ नहीं मिलता
कही जमी तो कही आस्मा नहीं मिलता

सगळ्यांना सगळंच मिळत नाही, एक मिळालं की दुसरं सुख सुटून जातं. छोट्या गोधडीत तोंडावर घेतलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडं रहातं... अशी ही सुखाची चिरंतन ओढाताण सुरू असते...म्हणूनच तू भेटूनही भेटत नाहीस

तेरे जहाँ मे ऐसा नहीं के प्यार न हो
जहाँ उम्मीद हो इसकी वहा नहीं मिलता

भरभरून प्रेम मिळतंय, कुणाचीही नजर लागेल इतकं सुख ओसंडून जात असतानाही ही कसली हुरहूर आणि अतृप्तता भरून राहिलीय...सगळीकडून सुखाची बरसात होत असताना अतृप्त धरणी पहात रहाते एका #मेघाकडे...तिची तहान भागवणारा तोच असावा का. कितीही पाऊस पडला तरी तिचा एक कोपरा न भिजणारा, कायम तहानलेला असेल त्या एका मेघाची वाट पाहत. जोपर्यंत त्याचं कोसळणं होत नाही तोवर ही अशीच भिजूनही कोरडी आणि मिळूनही रिती.

प्रेम आणि पाऊस नुसता येऊन चालत नाही...ते तिथूनच मिळावं लागतं जिथून मनाला हवंय...तोच #मेघ बरसावा लागतो जीसपें दिल आया है

युं तो बहोत चाहनेवाले है जमानेमें
ये कम्बक्त दिल है की गलत जगेह फिसल गया ❤

Wednesday, 21 June 2017

वारी

दिवस - दरवर्षी पुण्यात पालख्या आगमन होतो तो

रोजच्याप्रमाणे आज आरामात उठून चालत नाही, भल्या पहाटे उठून अंघोळपांघोळ करून , घरातलं आवरून शक्य तितक्या लवकर घर सोडायचं. हे लवकर म्हणजे सकाळचे 6 च्या आसपास असतं बरका. कितीही लवकर निघालं तरी पोलीस कसे काय आपल्याआधी रस्ते अडवतात तेच समजत नाही. इकडे रस्ता अडवलेला असला की तिकडे वळ असं करतकरत कसेबसे मेंटल कॉर्नरला जाऊन धडकते. तिथे परत पोलिसांनी रस्ता अडवलेलाच असतो. छोटी स्कुटी जायला सुद्धा रस्ता देत नाहीत मग कधी ऑफिसचे आयकार्ड दाखवा, कधी ओ पोलिसमामा रस्त्याच्या पलीकडे तर जायचं आहे सोडा की मी जाते हळूहळू अशी विनवणी करायची. नेम लागला तर आणि चुकून सोडलं तर जायचं पलीकडे नाहीतर गाडी अलीकडेच मेंटलच्या जवळ एखादया झाडाखाली पार्क करून वन टू करत ऑफिस गाठायचं.या दिवशीच एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस चुकूनही रागवत नाहीत, दुर्लक्ष करून हसून कुणी ऐकलेच नाहीतर ए माऊली पाया पडतो म्हणायलाही पोलीस कमी करत नाहीत.

इतकी यातायात करून ऑफिसला पोचेपर्यंत तास दिडतास सहज लागतो. आमच्या ऑफिसच्या आवारात एक दिंडी उतरते, त्या वारकऱ्यांच्या लगबगीने सगळं वातावरण फुलून गेलेलं असत. लवकर पोचल्यामुळे कामं करायला वेळच वेळ असतो. आणि मी एकटी नाही हं आमच्या प्रिमाइसिस मधल्या सगळ्या ऑफिसेसचा स्टाफ असाच ऑफिसला आलेला असतो. आमचा स्टाफ वर्गणी काढून ह्या दिंडीसाठी दुपारचं जेवण ठेवतो. आचारी बाहेर अंगणात जेवण तयार करतात आमच्यातले कुणी भाज्या चिरून दे वगैरे मदत करत असतात. वारकऱ्यांना जेवण वाढायला आमचीच लोकं असतात. गंमत म्हणजे इतका त्रास होऊनही शक्यतो दांडी कुणी मारत नाही.

दुपारी एकच्या आसपास लोकांचे निरोपावर निरोप येऊ लागतात पालखी दिघीत आली हं 15 मिनिटात इथे पोचेल, 15 मिनिटांनी परत कुणीतरी सांगत पालखी भोसरीत आली मॅडम. पालखी कुठपर्यंत आली ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, अखेर कुणीतरी पळत येतं चौकात आली चला लवकर तशी आमची धावपळ उडते. भराभर चालत रस्त्यावर उभं रहायचं. आता रस्ता चौपदरी केलाय. पालखी ह्या लाईनीतून (लेन)जाणार की त्या यावर परत तिथं चर्चा असतेच. 10 मिनिटात येणारी पालखी काही अर्धा तास होतोतरी येत नाही. पाय भरून येतात रस्त्यावरून वारकऱ्यांची गर्दी टाळ मृदुंग वाजवत पुण्याच्या दिशेने अविरत जात असते. आणि अचानक कुठूनतरी गलका येतो आली रे पालखी, वारकरीपण जास्त दिसू लागतात. दूरवरून चांदीच्या पालखीचा कळस झळाळतो आणि इकडे अंगावर सरसरून काटा उभा रहातो. जशी पालखी जवळ येईल हळूहळू अंदाजाने सगळे पुढे धावतात रथाला, पालखी पुढच्या अश्वाला हलकासातरी स्पर्श करायला मिळावं म्हणून सगळे धडपडत असतात. भराभर पालखी पुढेही निघून जाते आणि मी त्या पालखीच्या मागे पुढच्या दत्तमंदिरातील विसाव्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पुन्हा ऑफिसला येते. एक वेगळी शांती एक भारावलेपण अनुभवायला मिळतं. एखाद्या दिवशी जाऊदे नको दर्शनाला जायला म्हणून कंटाळा केला तर एक गिल्टी फिलिंग येतं आणि त्याचा मनावरचा अंमल काही जात नाही भारावून टाकणारं वातावरण असतं. वारकरी, सेवेकरी , जागोजागी दर्शनासाठी झुंबड करणारे नागरिक. पालखीच्या मार्गावर लोटांगण घालणारे, दिसेल त्या वारकऱ्यांच्या पाया पडणारे, एकमेकांच्या पाया पडणारे भाविक बघितलं की विठ्ठल ह्या गर्दीतच भारून राहिल्याचा फिलिंग येतं.

संतसाहित्य वगैरे फार उशिरा समजलेला प्रकार, जाणीवपूर्वक वाचून अर्थ माहीत करून घेतलेला (अजून नीटशी माहिती नाही हे सांगू इच्छिते) संतांचं आगमन आमच्या आयुष्यात जन्मतः आहे. आमचा वाडा भवानी पेठेत. ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या मुक्कामाला नाना आणि भवानी पेठेत असतात, सगळ्या पेठेला वारकरी छावणीचे रूप प्राप्त होतं. माझ्या पहिल्या पोस्टिंगच ऑफिस ज्ञानेश्वरपादुका चौकात होतं, दोन्ही पालख्या संध्याकाळी त्या चौकात येतात. माझं घर, दोन्ही ऑफिस सगळीकडे पालख्या आणि वारकरी मला भेटत आले त्यांचं नि माझं नातं काहीतरी आहे हे नक्की. कितीही त्रास झाला, घाण अस्वछता वाढली तरी पालख्या आणि वारी नको असं मला कधीही वाटलं नाही. सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणणारी वारी मला कायम भुरळ घालत आली आहे, फार नाही पुणे सासवड वारी एकदातरी करायची मनापासून इच्छा आहे. बघू कसं जमतंय

Friday, 16 June 2017

रंगीला रे

सौन्दर्य आणि गोरा रंग यांचा परस्पर संबंध लावला जातो. त्यावर सावळ्या आणि काळ्या रंगाचा सौन्दर्याचीसुद्धा चर्चा होते. बाह्यरुप महत्वाचं नाही मन बघा, स्वभाव बघा तसेच गोरा रंग दो दिनमें ढल जायेगा वगैरे गप्पा आपण ऐकत असतो. बाह्यरूपाला महत्व न देता मन, स्वभाव बघणारी नक्की किती लोकं आहेत हे आजूबाजूला बघितलं तरी सहज कळतं. मुलींच्या ग्रुप मध्ये सुंदर आणि उठून दिसणाऱ्या मुलींच्या मागेच मुलांचे घोळके लाळ गाळत असतात. 15,20 वर्षानंतरही भेटलेल्या वर्गमित्रांमध्ये चर्चा होते ती वर्गातल्या एकतर देखण्या मुलीची नाहीतर चालू मुलीची. खालमानेने अभ्यास करणाऱ्या टॅलेंटेड काळ्यासावळ्या मुलींची चर्चा क्वचितच होत असेल.

बाह्यरुपाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं म्हणून तर कपडे घेताना आपल्या अंगावर छान दिसतील असेच कपडे आपण निवडतो. फार लांब कशाला टीव्ही, फ्रीज घेतानाही त्यातल्या स्पेसिफिकेशनसह मॉडेल कसं दिसतं हेही आपण बघतच असतो. गोऱ्या रंगाला महत्व आहेच वधू पाहिजे वर पाहिजे जाहिरातीत गोरी मुलगी पाहिजे हे लिहिलं जातं, हटकून मुद्दाम कुणी सावळी किंवा काळी मुलगी हवी अशी  लिहिलेली जाहिरात माझ्या बघण्यात नाही. गोरं अपत्य होण्यासाठी गरोदरपणात गावठी उपाय जसं दूधकेशर प्याल जातं हे गोऱ्या रंगाचा आकर्षणाचा आहे म्हणूनच न.

मी स्वतः वर्णद्वेषी नाही, मुद्दाम गोरं अपत्य व्हावं म्हणून लोकांचा आटापिटा का होतो त्यामागे मानसिकता काय व कशी असते ह्याचा अंदाज सगळ्यांनाच असतो. गोरा म्हणजे मनाने काळा आणि काळा म्हणजे स्वभाव चांगलाच असेल असे सरसकट म्हणता येत नाही. रूपाने चांगली असणारी लोकं स्वभावाने सुद्धा चांगली असू शकतात त्याच्या उलट प्रकार सुद्धा असतातच.

गोरा रंग म्हणजे पांढरी पाल, पांढरं फटफटीत दिसतं त्यापेक्षा सावळा रंगच छान असं म्हणणं म्हणजे आत्मवंचना असते, गोऱ्या रंगाचं आकर्षण नसतं तर लोकांनी फोटो एडिट करून टाकलेच नसते. सावळा रंगही चेहरा सुंदर असेल तरच उठून दिसतो, गोऱ्याचं तसं नसतं नाकीडोळीचे फ़ॉल्ट्स गोरा रंग झाकून टाकतो म्हणून तर गोरी हजार गुण चोरी ही म्हण तयार झाली आहे.

रंगरूपाचा गर्व किंवा न्यूनगंड बाळगू नये कारण त्यात आपलं स्वतःचे काहीच कर्तृत्व किंवा दोष नसतो हे मात्र जाणीवपूर्वक अधोरेखित करू इच्छिते. रंग कसाही असला तरी अपटूडेट राहून आपल्या रुपाला खुलणारी वस्त्रे आणि मेकअप करून आपण स्वतःच व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रेझेंट करू शकतो, हे आपल्या हातात आहे

टीप - पोस्टलेखिका स्वतः रंगाने डार्क म्हणजे काळी आहे 😂😂😂😂😂

Wednesday, 14 June 2017

बचत

पैसा कमवायला कष्ट पडतात. गरिबीमुळे आलेला पैसा जपून वापरण्याची वृत्ती अंगात इतकी भिनत जाते की परवडत असूनही बरेचदा चैन करायचं धाडस होत नाही. तशी मी खूप हौशी नाटक, सिनेमा बघणे , हॉटेलिंग करणे, उगाचच भटकत रहाणं मला खूप आवडतं आणि खिशाला परवडेल इतकी चैन लग्नाआधी आणि नंतरही मी करत असते. तासभर कॉलेजला पायीपायी जा ये करून बसचे पैसे वाचवून सिनेमे बघायची हौस आम्ही भागवली. लग्नानंतरही सगळ्या हौशी करतो पण लिमिटमध्ये. आमच्याघरी ह्यांना हॉटेलिंग अजिबात आवडत नाही तरीही निव्वळ मला आवडतं म्हणून ते सोबत येत असत. घरी आल्यावर क्वचित गप्पा मारताना हॉटेलमध्ये खाणं मला आवडत नाही उगाचच पैसे वाया जातात, त्या बिलात 8 दिवस गाडीत पेट्रोल भरून झालं असतं असं बोललं जायचं. काहीही कर पिठलंभात कर पण घरीच जेवू असं ह्यांचं कायमच म्हणणं असतं. अमुक एकाच सेलिब्रेशन करावं म्हणून हॉटेलिंग करणं हे माझंही हळूहळू बंद होत गेलं. गेल्या कित्येक दिवसात आम्ही सहकुटुंब हॉटेलात असे गेलोच नाही, त्याच काही वाईटपण वाटत नाही. एखादि गोष्ट सेलिब्रेट करायला घरातच सगळ्यांना आवडणार जेवण बनवलं जातं, हे सगळी मदत करत असतात. भाज्या चिरून देणे, मसाले तयार करून देणे सगळं करतात फक्त फोडण्या देणे आणि पोळ्या लाटणे दोनच कामं माझ्या करता रहातात.

मी मुक्त विचारसरणी बाळगणारी स्त्री आहे तरीही मी स्वतःला मर्यादा घालून जगते, ही माझी स्वतःची चॉईस आहे. मला स्वतःला साधं रहाणं आवडतं तरीही मी वस्तू ब्रॅंडेड प्रिफर करते ही अजून एक गंमत आहे, चमकधमक मला न झेपणारी आहे. पैसा आहे म्हणून वारेमाप खर्च करणे मला जमत नाही, कायम हाताशी सेविंग असावं असं माझं मत असतं. उद्याचा दिवस सांगून येत नाही, आजची बचत हीच उद्याची कमाई हेच माझं तत्व आहे ह्याचा अर्थ मी दात कोरून जगा असं म्हणते असा नाही हं. सगळ्या हौशी, मौजी, चैनी करा पण मर्यादा ओळखून कराव्यात असं माझं तरी तत्व आहे.

हे लिहायचं कारण 2,3 दिवसांपूर्वी कुणाचीतरी (नाव आठवत नाही, हल्ली विस्मरण होतंय 😁) पोस्ट वाचली की पैसा असून उपयोग नाही त्याचा उपभोग घेता यायला हवं, त्या पोस्टवर मीही हो बरोबर आहे ह्यार्थी कमेंट केली होती 😜😝. पण हे बरोबर नाही , आहे तो पैसा उडवून ढुंगाला हात पुसणे योग्य न्हवे. Enjoy life but in limits कारण उद्या आपल्यालाच आपली सोय करायचीय तिथे कुणीही सल्लागार उपयोगी पडणार नाहीत

Tuesday, 13 June 2017

अहिस्ता अहिस्ता

हिंदी सिनेमाचं तसं मला हल्ली हल्ली वावडं आहे, न आवडणारेच प्रकार असतात. हिंदी आणि मराठीही जुनेच सिनेमे चांगले असं माझं नेहमीच मत असतं. माझ्या आवडी माझ्या आईच्या पिढीतल्या आहेत त्याला कारण आई सिनेमा बघायला मला घेऊन जायची त्यामुळं तिला आवडणाऱ्या हिरोहिरॉइन्सचे सिनेमे जास्त बघून झालेत. त्यामुळे आमच्या वेळच्या अनिल कपूर, सनी देओल, अक्षय आणि शारूख पेक्षा मला सगळे कुमार, कपूर लोक्स आणि देवसाब आवडतात. मी 7वीत असेल किंवा 6वीत एक पिक्चर बघायला आई आणि आम्ही अजून दोघी तिघी गेलो. तो पिक्चर हाऊसफुल्ल होता, A सर्टीफाईड पिक्चर आता काय करायचं. सारसबाग जवळच होती मनात म्हटलं  तिथं भेळ खाऊन घरी जायची वेळ येते की काय. तेवढ्यात ब्लॅकने तिकीट विकणारे तिथे आले 2 तिकिटं तिप्पट भावात घेतली आणि आई आणि काकू बघायला गेल्या, आम्ही उरलेल्या तिघी हिरमुसलं तोंड घेऊन न घशाखाली न उतरणारी भेळ खाऊन घरी आलो. पुढे तो पिक्चर थेटरात जाऊन दोनदा आणि टीव्हीवर बरेचदा बघितला. वेगळं कथानक आणि सदाबहार गाण्यांमुळे तो सिनेमा खूप आवडून गेलाय ह्या पिक्चरच नाव अहिस्ता अहिस्ता.

कुणाल कपूर सारखा अजिबात अभिनय न येणारा हिरो असूनही सिनेमा सुपरडूपर हिट ठरला तो पद्मिनी कोल्हापूरे, नंदा, शशिकला, शम्मी कपूर ह्यांच्या अभिनयाने. शशिकलाने साकारलेली मावशी तर बेफाम जमलीय तिचं ठुमकणं, साडी नेसायची पद्धत, तपकीर ओढण लाजवाबच. शम्मी कपूर उतारवयातला तरी ग्रेसफुल कशाला म्हणतात ते बघण्याजोगा. गिरीश कर्नाड थोडाच वेळ येऊन जातो पण त्याच्या दर्जेदार शैलीत छाप उमटवून जातो. अरुणा इराणी आणि देवेन वर्मा ह्यांचं छोटे उपकथानक आहे, कजाग बाहेरख्याली शेजारीण आणि गरीब अज्ञाधारक नवरा या दोघांनी रंगवलाय.

संगीता (नंदा) एक देवदासी, पदरात एक मुलगी असलेली आणि कजाग मावशीच्या (शशिकला) पंजात अडकलेली. ते रहात असलेल्या शहरात पोलीस पकडापकडी करतात म्हणून नवीन शहरात येतात, एक छानसं घर जे की एका मालदार माणसाचं असतं तिथे रहातात. हा माणूस म्हणजे धनी(कादरखान) रोज रात्री ठराविक वेळ येऊन आपली गरज भागवून जाणारा. मुलगी चंद्रा (पद्मिनी कोल्हापूरे) ह्या धणीलाच बाप समजत असते. ह्या कुटुंबाच्या समोरच्या घरात रहाणारं कुटुंब म्हणजे शम्मीकपूर त्याची 2 मुलं आणि बायको. शम्मी मस्त दिलदार आणि आधुनिक विचारसरणीचा तर बायको टिपिकल भारतीय नारी. मुलगा कुणाल (कुणाल कपूर) आणि मुलगी. समोरची चंद्रा ह्या घरी पूजेला येऊ लागली , ह्या दोन मुलांसोबतच शाळेत जाऊ लागली. तरुण वयात आल्यावर चंद्रा आणि कुणाल एकमेकांच्या प्रेमात पडतात. दरम्यान धणीचा मृत्यू होतो आणि चंद्राला आईकडून समजतं की ते तिचे वडीलच न्हवते. चंद्रा आईला खोदून खोदून विचारते पण संगीता मुलीला वडिलांचे नाव काही सांगत नाही.

चंद्रा आणि कुणालाचे प्रेम कुणालच्या आईला पसंत पडत नाही ती मुलाला समजवायचा प्रयत्न करते पण मुलगा हटून बसतो , वडीलही कुणालच्या बाजूने असतात. एक दिवस शम्मीचा मित्र चंद्रकांत (गिरीश कर्नाड) त्यांना भेटायला येतात. जेवत असताना समोरच्या घरातून सतारीचे ओळखीचे सूर कानावर आल्यावर चंद्रकांत अस्वस्थ होतो आणि एक काम आहे असं निमित्त करून तिथून बाहेर पडतो आणि गुपचूप समोरच्या घरात जातो तिथे त्याला संगीता दिसते. संगीता ही चंद्रकांतची हरवलेली बायको असते आणि चंद्रा ही त्या दोघांची मुलगी ही नवीन माहिती आपल्याला आणि चंद्रालाही समजते. बापाला बघून खुश झालेली चंद्रा तिला काय करू आणि काय नको असं होतं, ती वडिलांच्या गळ्यात पडते आणि नेमकं समोरून कुणाल ते बघतो, त्याचा गैरसमज होतो. दुसऱ्या दिवशी चंद्रा वडिलांनी दिलेली हिऱ्याची अंगठी कुणालला दाखवते तेव्हा कुणाल तिला वेश्या म्हणतो आणि रागाच्या भरात निघून जातो. कुणाल चंद्रावर इतका चिडतो की आईचं ऐकून तो लग्नाला तयार होतो. चंद्रकांतच्या मुलीशी त्याचं लग्न होतं.

कुणालाच लग्न होतं आणि चंद्रा खचते, इकडे मावशी तिला देवदासी बनवायला टपूनच असते. चंद्राचे प्रोफेसर तिला पुढे शिकवायला तयार असतात ते तिला स्वतःची मुलगी मानत असतात पण चंद्राच्या मनात काही वेगळंच सुरू असत. ती मावशीला सांगून देवदासी व्हायचं मान्य करते. त्यांच्या प्रथेप्रमाणे तिचं देवाशी रीतसर लग्न लावलं जातं, त्यानंतर तिच्या साठी निवडलेला मालक तिच्याशी संबंध ठेऊ शकतो. मावशी ह्या माणसाकडून भरपूर पैसा उकळणार असते. चंद्रा नवीन आयुष्याची सुरवात करण्यापूर्वी समोरच्या घरात आशीर्वाद घ्यायला जाते. तिथे तिचे जन्मदाते वडीलही असतात , सगळ्यांच्या पाया पडून निघताना चंद्रा खाली कोसळते , तिने वडिलांनी दिलेल्या अंगठितला हिरा गिळलेला असतो. आत्ता वडिलांना पाझर फुटतो आणि रडू लागतात, तेव्हा सगळ्यांना समजतं चंद्राचे खरे वडील म्हणजेच चंद्रकात. सगळं समजल्यावर कुणाल हताश होतो. मुलीचा शेवट बघून आईपण जीव सोडते आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजत रहातं

कभी किसींको मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कही जमी तो कही अस्मा नहीं मिलता

सिनेमाचा शेवटचा भाग बघताना खिन्न व्हायला होतं. देवदासी बनवताना देवाशी लग्न लावण्याचे विधी सविस्तर दाखवलेत अगदी हळद, वरात पण काढतात हे सगळे प्रसंग अंगावर येणारे आहेत. अजूनही समाजातला एक घटक ह्याच प्रकारे आयुष्य जगतय हे वास्तव जळजळीत पणे समोर येतं. कुठंतरी कितीतरी संगीता , चंद्रा अशाच जगत असतील...


Monday, 12 June 2017

प्रकाश

टोळ्या इथल्या मुजोर झाल्या
कुंपणाला शिरजोर झाल्या

न दिसे का वेदना कुणाची
डोळे असूनही कशा अंध झाल्या

पावसातही नसे ओल काही
संवेदना कोरड्या ठाक झाल्या

येशील का परतूनी पुन्हा तू
पाट्या मनाच्या आता साफ झाल्या

ओरखडे उठले मना मनावर
श्वापदांच्या भुका फार झाल्या

निसर्गा तुझे उपकार फार झाले
अंधारात तारका प्रकाश झाल्या

नको हाय खाऊ, घे मना तू उभारी
एक वार आला ढाली हजार झाल्या