Wednesday, 21 June 2017

वारी

दिवस - दरवर्षी पुण्यात पालख्या आगमन होतो तो

रोजच्याप्रमाणे आज आरामात उठून चालत नाही, भल्या पहाटे उठून अंघोळपांघोळ करून , घरातलं आवरून शक्य तितक्या लवकर घर सोडायचं. हे लवकर म्हणजे सकाळचे 6 च्या आसपास असतं बरका. कितीही लवकर निघालं तरी पोलीस कसे काय आपल्याआधी रस्ते अडवतात तेच समजत नाही. इकडे रस्ता अडवलेला असला की तिकडे वळ असं करतकरत कसेबसे मेंटल कॉर्नरला जाऊन धडकते. तिथे परत पोलिसांनी रस्ता अडवलेलाच असतो. छोटी स्कुटी जायला सुद्धा रस्ता देत नाहीत मग कधी ऑफिसचे आयकार्ड दाखवा, कधी ओ पोलिसमामा रस्त्याच्या पलीकडे तर जायचं आहे सोडा की मी जाते हळूहळू अशी विनवणी करायची. नेम लागला तर आणि चुकून सोडलं तर जायचं पलीकडे नाहीतर गाडी अलीकडेच मेंटलच्या जवळ एखादया झाडाखाली पार्क करून वन टू करत ऑफिस गाठायचं.या दिवशीच एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस चुकूनही रागवत नाहीत, दुर्लक्ष करून हसून कुणी ऐकलेच नाहीतर ए माऊली पाया पडतो म्हणायलाही पोलीस कमी करत नाहीत.

इतकी यातायात करून ऑफिसला पोचेपर्यंत तास दिडतास सहज लागतो. आमच्या ऑफिसच्या आवारात एक दिंडी उतरते, त्या वारकऱ्यांच्या लगबगीने सगळं वातावरण फुलून गेलेलं असत. लवकर पोचल्यामुळे कामं करायला वेळच वेळ असतो. आणि मी एकटी नाही हं आमच्या प्रिमाइसिस मधल्या सगळ्या ऑफिसेसचा स्टाफ असाच ऑफिसला आलेला असतो. आमचा स्टाफ वर्गणी काढून ह्या दिंडीसाठी दुपारचं जेवण ठेवतो. आचारी बाहेर अंगणात जेवण तयार करतात आमच्यातले कुणी भाज्या चिरून दे वगैरे मदत करत असतात. वारकऱ्यांना जेवण वाढायला आमचीच लोकं असतात. गंमत म्हणजे इतका त्रास होऊनही शक्यतो दांडी कुणी मारत नाही.

दुपारी एकच्या आसपास लोकांचे निरोपावर निरोप येऊ लागतात पालखी दिघीत आली हं 15 मिनिटात इथे पोचेल, 15 मिनिटांनी परत कुणीतरी सांगत पालखी भोसरीत आली मॅडम. पालखी कुठपर्यंत आली ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, अखेर कुणीतरी पळत येतं चौकात आली चला लवकर तशी आमची धावपळ उडते. भराभर चालत रस्त्यावर उभं रहायचं. आता रस्ता चौपदरी केलाय. पालखी ह्या लाईनीतून (लेन)जाणार की त्या यावर परत तिथं चर्चा असतेच. 10 मिनिटात येणारी पालखी काही अर्धा तास होतोतरी येत नाही. पाय भरून येतात रस्त्यावरून वारकऱ्यांची गर्दी टाळ मृदुंग वाजवत पुण्याच्या दिशेने अविरत जात असते. आणि अचानक कुठूनतरी गलका येतो आली रे पालखी, वारकरीपण जास्त दिसू लागतात. दूरवरून चांदीच्या पालखीचा कळस झळाळतो आणि इकडे अंगावर सरसरून काटा उभा रहातो. जशी पालखी जवळ येईल हळूहळू अंदाजाने सगळे पुढे धावतात रथाला, पालखी पुढच्या अश्वाला हलकासातरी स्पर्श करायला मिळावं म्हणून सगळे धडपडत असतात. भराभर पालखी पुढेही निघून जाते आणि मी त्या पालखीच्या मागे पुढच्या दत्तमंदिरातील विसाव्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पुन्हा ऑफिसला येते. एक वेगळी शांती एक भारावलेपण अनुभवायला मिळतं. एखाद्या दिवशी जाऊदे नको दर्शनाला जायला म्हणून कंटाळा केला तर एक गिल्टी फिलिंग येतं आणि त्याचा मनावरचा अंमल काही जात नाही भारावून टाकणारं वातावरण असतं. वारकरी, सेवेकरी , जागोजागी दर्शनासाठी झुंबड करणारे नागरिक. पालखीच्या मार्गावर लोटांगण घालणारे, दिसेल त्या वारकऱ्यांच्या पाया पडणारे, एकमेकांच्या पाया पडणारे भाविक बघितलं की विठ्ठल ह्या गर्दीतच भारून राहिल्याचा फिलिंग येतं.

संतसाहित्य वगैरे फार उशिरा समजलेला प्रकार, जाणीवपूर्वक वाचून अर्थ माहीत करून घेतलेला (अजून नीटशी माहिती नाही हे सांगू इच्छिते) संतांचं आगमन आमच्या आयुष्यात जन्मतः आहे. आमचा वाडा भवानी पेठेत. ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या मुक्कामाला नाना आणि भवानी पेठेत असतात, सगळ्या पेठेला वारकरी छावणीचे रूप प्राप्त होतं. माझ्या पहिल्या पोस्टिंगच ऑफिस ज्ञानेश्वरपादुका चौकात होतं, दोन्ही पालख्या संध्याकाळी त्या चौकात येतात. माझं घर, दोन्ही ऑफिस सगळीकडे पालख्या आणि वारकरी मला भेटत आले त्यांचं नि माझं नातं काहीतरी आहे हे नक्की. कितीही त्रास झाला, घाण अस्वछता वाढली तरी पालख्या आणि वारी नको असं मला कधीही वाटलं नाही. सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणणारी वारी मला कायम भुरळ घालत आली आहे, फार नाही पुणे सासवड वारी एकदातरी करायची मनापासून इच्छा आहे. बघू कसं जमतंय

1 comment: