Tuesday, 29 January 2019

नातं ... वेळ

नातं, मग ते रक्ताचं असो की आपण जोडलेल्या मैत्रीचं असो. नात्यात वेळ द्यायला लागतो हे मात्र शंभर टक्के खरं. आताशा वेगवान जगात वेळ देणं अवघड होऊन बसलंय. माणसाच्या आयुष्यात खुपसारी नाती असतात , त्या सगळ्यांना रोजच आणि सतत वेळ देणं कसं शक्य आहे. काही लोक समजूतदार असतात, वेळ नसणं समजून घेतात. आपलं सानिध्य, संभाषण जितकं अधिक तितकं नातं खुलत जातं आणि ह्याला वेळ तर हवाच. काही नाती निव्वळ वेळ न दिल्याने खुंटतात. स्वभाव, आवडनिवड सगळंसगळं पुरक असूनही एकमेकांसाठी वेळ नसणे हेच ते कदाचित होऊ शकणारं नातं संपवायला कारण ठरतं.

आपलं कुटुंब, उदरनिर्वाह आणि इष्टसंबंधित मित्रपरिवार ह्यात आपला वेळ कुणाला द्यायचा ह्यात जर प्राधान्यक्रम लावायचं ठरवलं तर प्रत्येकजण सगळ्यात आधी कुटुंबाचं नाव घेईल पण खरोखरच कुटुंबाला आपण तितका वेळ देतो का हे तपासायला हवं. उदरनिर्वाहासाठी वेळ देणं हे आपण टाळू शकतच नाही, पोट भरण्याचा व्यवसाय वेळ घेणारच. कुटुंब म्हटलं की जबाबदारी आली, त्याचं ओझं आलं. उदरनिर्वाहासाठी केलेल्या धावपळ, कष्टानंतर काहीवेळा नव्हे बरेचदा पुन्हा इतर जबाबदारी नको वाटते आणि मनुष्य मित्रांच्या सोबतीत आपली वेळ घालवतो. बहुतेकवेळा मित्रपरिवारास वेळ जास्त दिला जातो आणि ते खूप स्वाभाविक आहे; त्यात चूक काहीच नाही पण त्यामुळे होतं काय की आपला प्राधान्यक्रम आपणच विस्कळीत करून टाकतो.

नात्यात वेळेचं नियोजन करावं लागतं हे जास्त कुणाच्या ध्यानीमनी देखील नसतं पण ते करावं लागेल. जग खूप वेगवान आहे, सुरू झालेला दिवस संपतो कधी तेही समजत नाही. नात्यातील वेळेचे नियोजन केले नसेल तर नक्की करा. नियोजन करताना ज्याची जशी निकड तिकडे वेळ देताना फक्त स्वतःसाठी वेळेचा एक कवडसा ठेवायला विसरु नका. होतं काय की सगळ्यांची मनधरणी करता करता आपण आपल्यालाच वेळ देणं विसरून जातो, आणि जिथं स्वतःचं स्वतःशी नातं नसतं तिथं इतर नात्यांना अर्थ उरत नाही. आपलं आपल्याशी नातं म्हणजे नेमकं काय, तर अधूनमधून स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. आपल्यात होत असलेले र्हस्व दीर्घ बदल स्वतःच तपासावेत. आपली स्वतःची मानसिक अवस्था समजावून घेऊन त्यात बदल करणे गरजेचं आहे की नाही हे नक्की तपासून बघावं आणि त्यावर काम करावं हे स्वतःशी स्वतःचं नातं जितकं प्रामाणिक तितकं मानसिक आरोग्य खटाखट राहील

काही काही नाती अशी असतात की ती स्वतःच त्
आपल्यासाठी वेळ शोधतात, तुम्ही कितीही व्यस्त, त्रस्त असलात तरी मनाचे हे बंध तुम्हाला त्या नात्यासाठी वेळ द्यायला भाग पाडतात आणि खरं सांगायचं तर हीच नाती खूप सुंदर आणि देखणी असतात. हे नातं तुमच्याकडे असं काही धावत येतं की सगळी कामं मागे टाकून आपण नकळत तिथे वेळ देत रहातो. अशी नाती जपावी, चेरीश करावीत नव्हे ही नाती इतकी घट्ट असतात की ती स्वतःच स्वतःची जपणूक करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असं स्वतःच स्वतःची जपणूक करणारं, देखणं, सुंदर, वेळखाऊ नातं असावं ह्याच मनापासून सदिच्छा.

धन्यवाद

Saturday, 12 January 2019

There is always room on top

उंटाचे व्यापारी वगैरे आता कालबाह्य प्रकरण झालंय, उंटाच्या व्यापाऱ्याची गोष्ट मात्र चिरकाल टिकणारी आहे. उंटाचा व्यापारी त्याचे पाचशे उंट घेऊन बाजारात विकायला निघालेला असतो. वाटेत रात्रीचा मुक्काम करायला एका धर्मशाळेशी तो थांबतो. रात्रीच्या वेळी उंट इकडेतिकडे पांगतील म्हणून तो सगळे उंट खुंटे ठोकून दोरीने बांधून टाकतो. चारशे नव्यान्नव उंट बांधून झाल्यावर उरलेल्या एका उंटासाठी त्याच्याकडे खुंटा आणि दोरी नसते. प्रवासात बहुतेक कुठे गहाळ झाले असावेत, उंटाचा व्यापारी एक खुंटा आणि दोरी मागण्यासाठी धर्मशाळेच्या मालकाकडे जातो. मालकाकडे सुद्धा खुंटा आणि दोरी नसते, मालक त्याला म्हणतो की बाकीचे उंट सोडून एकटा उंट कुठे जाणार नाही त्यामुळे काळजी नको करुस. मागच्या एका अनुभवातून उंटाचा व्यापारी म्हणतो की बांधून ठेवलं नाही तर उंट रात्रीतून उठून खूप लांबवर निघून जातात, त्याचे काही अशारीतीने उंट गायब झालेले तो धर्मशाळामालकाला सांगतो. धर्मशाळामालक थोडा वेळ डोकं खाजवून एक आयडिया उंटाच्या व्यापाऱ्याला सांगतो. तू खुंटा ठोक आणि दोरी बांध आणि झोपायला निघून जा, खरा खुंटा तर नाही पण तशी अकटिंग कर आणि बिनधास्तपणे झोपून जा. दुसरा पर्यायच नसल्याने उंटव्यापारी तसंच करतो. काल्पनिक खुंटा ठोकतो , दोरी बांधतो आणि झोपून जातो. सकाळी उठल्यावर व्यापारी बघतो तर ज्याला खुंटादोरी नाही तो उंटसुद्धा तसाच बसून असतो. व्यापारी मग एकेक करून सगळ्या उंटाना सोडतो तसे ते सगळे अंग झटकून उभे रहातात. बिनखुंट्यादोरीचा उंट मात्र अजून बसून असतो. व्यापारी त्याला चुचकारतो, उभं रहा म्हणतो तरी तो हलत नाही. धर्मशाळामालक ते सगळं बघत असतो... न राहवून तो व्यापाऱ्याला सांगतो की रात्री तू खुंटा बांधलास तसाच तो काढून टाक. उंटाचा व्यापारी मग तो न ठोकलेला खुंटा उपसतो आणि न बांधलेली दोरी सोडतो तेव्हा कुठे तो उंट जागेवरून हालतो.

खुंटा आणि दोरी नसतेच तरी ती आहे हे समजून उंट वागतो ; आपली जागा सोडत नाही, तेच प्रत्येकजण करत असतो. अशा अनेक अनामिक खुंट्या आणि दोऱ्याला जखडून माणूस जगत असतो. भीती, द्वेष, घृणा, घमेंड अशा अनेक आणि अगणित खुंट्याला आपण आपल्यालाच बांधून घातलेले असतं. जोवर हे बंध सैलावत नाहीत तोवर आपला परीघ मर्यादित असतो, तिथल्या तिथे घुटमळणे होत राहते. नीतिमत्तेच्या खुंट्याला बांधून ठेवून इतर खुंट्या आपणच आपल्या तोडून टाकायच्या. ज्यांचे पंख बांधलेले, जड तितकी त्यांची उडान तोकडी. पंख गरुडाचे असतात पण त्यावरचं बारीक, छोट्याशा खड्याचं ओझंही त्याची भरारी छाटून टाकते.

There is always room on top
Bottom is crowded

स्वतःला अवळलेल्या दोऱ्या, पंखावरची ओझी, भार झटकून बंधमुक्त होत जाल तितकी भरारी आणि दौड सहज, सोपी आणि दूरवर होत जाईल. आपण कोणत्या खुंट्याला बांधलोय हे माहीत असणे हे तो तोडायची पहिली पायरी असते ... मग काय तोडताय ना खुंट्या !

#ऐकलेल्या_गोष्टी

#थिंक_पॉझिटिव्ह

©अर्चना चंद्रसेन 

Wednesday, 2 January 2019

नैतिकता , चिंतन मनन

नैतिकता म्हणजे काय? अनैतिक कृत्य म्हणजे नेमकं कोणतं? ह्याबद्दल जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये एकवाक्यता नाही आणि ती कधीही नव्हती. काही तत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार नैतिकता ही स्थल-कालपरत्वे बदलणारी असते. एका काळात एका समाजामध्ये असणारी नैतिकतेची संकल्पना ही दुसऱ्या समाजामध्ये असेलच असे नाही. तसेच एकाच समाजाच्या नैतिकेच्या संकल्पना कालपरत्वे बदलणाऱ्या असतात. उदा. आफ्रिकेतील बऱ्याच जमातींमध्ये Female Genital Mutilation नावाचा अघोरी प्रकार आहे. मुलींच्या कौमार्याचा भंग होऊ नये म्हणून असा प्रकार केला जातो. अत्यंत अमानुष, अमानवी आणि त्रासदायक अशा या प्रकाराला त्या समाजात नैतिक मानले जाते. मात्र आधुनिक समाजाकडून याची सदैव निर्भर्त्सना होत आहे. म्हणजेच नैतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर अवलंबून आहे. आणखी उदाहरण द्यायचे झालेच तर नैतिक सापेक्षतावाद्यांच्या मतानुसार एखादी कृती योग्य की अयोग्य, हे त्या समाजाच्या स्वत:च्या अशा नैतिक संकल्पनांवर अवलंबून असते. एका समाजामध्ये नैतिक असणारी संकल्पना दुसऱ्या समाजात नैतिक असेलच,  असे नाही. याच्या अगदी उलट म्हणजे Ethical Objectivism होय. यांनुसार जर Ethical Relativism चे म्हणणे ग्राह्य़ मानले तर दोन समाजांमध्ये नैतिकतेची कोणतीच समानता राहणार नाही आणि एक वैश्विक समाज या नात्याने जगणे अवघड होऊन जाईल. सर्वच संस्कृतीमध्ये काही समान अशा नैतिक मूल्यांना महत्त्व दिलेले असते/ दिले जावे. उदा. एखाद्याचा खून करणे हे अनतिक, तर पालकांचा आदर करणे हे नैतिक मानले गेले आहे आणि सर्वच समाजामध्ये/ संस्कृतींमध्ये याबाबतीत एकवाक्यता आहे.

काही तत्त्वांबद्दल सापेक्षता असली तरी ही काही नैतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. नैतिकतेची सापेक्ष संकल्पना एकूणच वैश्विक मानवतावादासाठी धोकादायक ठरू शकते. एक मनुष्यप्राणी या नात्याने विश्वातील सर्वच समाजांमध्ये नैतिकतेची किमान काही आधारभूत तत्त्वे असावीत, वाढवली जावीत; जेणेकरून काही अनैतिक प्रथा-परंपरांविरोधात वैश्विक समाजाकडून प्रतिरोध केला जाऊ शकतो. मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, लैंगिक अत्याचार/ छळवणूक,Female Genital Mutilation  सारख्या अघोरी प्रकारांना विरोध करणारी ‘नैतिकता’ सर्वच समाजांसाठी सर्व काळांमध्ये असायलाच हव्या आहेत. मुळात नैतिकतेची संकल्पना ही विश्वातील सर्वच मानवजातीचे कल्याण व्हावे आणि अन्याय दूर व्हावा यासाठीच आहे/असायला हवी. या दृष्टीने विचार करताना नैतिकतेचे उद्दिष्ट, संकल्पना अधिक योग्य आहे/ असायला व्हावी. नैतिकतेत अंतःकरणाचा आवाजही खुप महत्वाचा असतो.
अंतःकरणाचा आवाज (voice of conscience) मानवाला चांगले काय आणि वाईट काय यामधील भेद ओळखण्यासाठी आणि चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करेल. मराठीत यालाच आपण ‘सदसद्विवेकबुद्धी’ असे म्हणतो. आता सदसद्विवेकबुद्धी किंवा सदसद्विवेकाच्या आवाजाकडे लक्ष जावे यासाठी आपण काय, कसे, का करायला हवे तर आपणाला सदसद्विवेकबुद्धीचे विविध आयाम विचारात घ्यावे लागतील. न्यायबुद्धी, समतेचे तत्त्व, विषमताविरहित विचार, मानव अधिकारांची जाणीव.. इ. घटकांचा त्यात समावेश करावा लागेल. आता या बाबींची जाणीव निर्माण होण्यासाठी काय करावे लागेल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्वार्थी’ भाव सोडून आपण या समाजाचे घटक आहोत; मी, माझे, मला यासोबतच माझी समाजाप्रति काय कर्तव्ये आहेत, याची मला जाणीव असणे गरजेचे आहे. राग, लोभ, दंभ, मोह-मत्सर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला की आपोआप सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येतो. समाजामध्ये वावरताना व्यावसायिक जीवनामध्ये आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या; आपले आणि आपल्या पदाचे औचित्य याची जाणीव असणे हीच बाब सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येण्यासाठी आवश्यक ठरते

सद्सद्विवेक असणं खूप गरजेचं असतानाही काही वेळा त्याबाबत गोंधळाची मानसिकता येऊ शकते. विवेकाबद्दल मनुष्याला संकट हे दोन प्रकारचे असू शकते. एकतर विवेकवादी भूमिका काय आहे हेच न कळणे किंवा दोन विवेकवादी भूमिकांमध्ये कशाला प्राधान्य द्यावे यामध्ये गोंधळ उडणे. तसेच बऱ्याचदा विवेकवादी भूमिका काय आहे, हे कळत असूनदेखील ती केवळ बदल्याची भावना (Revenge), परंपरा (Tradition), पूर्वग्रह (Prejudice) आदी कारणास्तव आपण त्या विवेकवादी भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. एक वेळेस विवेकवादी भूमिका माहीतच नसेल तर निर्णय घेणे सोपे असते, विवेकवादी भूमिका काय आहे हे जाणून त्यावर निर्णय घेणे हे त्यापेक्षा अवघड आहे आणि विवेकवादी भूमिका माहीत आहे, पण केवळ वैयक्तिक आकसामुळे तिचे अवलंबन करणे अडचणीचे वाटणे ही सर्वात अवघड बाब आहे. या नैतिक पेचाचे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील उदाहरण देऊन स्पष्टीकरण करता येईल. या निवडणुकांत आम आदमी पक्षाने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना प्रचलित भ्रष्ट व्यवस्थेसाठी जबाबदार धरत संबंध निवडणूक प्रचारात त्यांच्या अध:पतनाची विविध रूपे जनतेसमोर मांडून आपल्या रूपाने स्वच्छ, प्रामाणिक राजकारणाचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच निवडणूक प्रचार आणि निकालानंतरही त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीतदेखील ‘आम्ही कुणाला समर्थन देणार नाही आणि कुणाचे समर्थन घेणार नाही’ अशी भूमिका घेतली.  तथापि, भाजपने सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असूनदेखील जेव्हा सरकार स्थापनेस नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेसने आम आदमी पक्षाला बिनशर्त पािठबा देण्याचे जाहीर केले तेव्हा ‘आप’पुढे जणू विवेकाचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. एका बाजूला निवडणुकीपूर्वी व त्यानंतरदेखील घेतलेली भूमिका आणि दुसऱ्या बाजूला सरकार स्थापन करून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी शिरावर घ्यावी, यासाठी वाढणारा दबाव व अपेक्षा अशा कात्रीत हा पक्ष सापडल्याचे चित्र दिसले.  अर्थात हा पेच व्यक्तिगत, संस्था, संघटनात्मक वा सार्वजनिक जीवनातील अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.