Tuesday, 29 January 2019

नातं ... वेळ

नातं, मग ते रक्ताचं असो की आपण जोडलेल्या मैत्रीचं असो. नात्यात वेळ द्यायला लागतो हे मात्र शंभर टक्के खरं. आताशा वेगवान जगात वेळ देणं अवघड होऊन बसलंय. माणसाच्या आयुष्यात खुपसारी नाती असतात , त्या सगळ्यांना रोजच आणि सतत वेळ देणं कसं शक्य आहे. काही लोक समजूतदार असतात, वेळ नसणं समजून घेतात. आपलं सानिध्य, संभाषण जितकं अधिक तितकं नातं खुलत जातं आणि ह्याला वेळ तर हवाच. काही नाती निव्वळ वेळ न दिल्याने खुंटतात. स्वभाव, आवडनिवड सगळंसगळं पुरक असूनही एकमेकांसाठी वेळ नसणे हेच ते कदाचित होऊ शकणारं नातं संपवायला कारण ठरतं.

आपलं कुटुंब, उदरनिर्वाह आणि इष्टसंबंधित मित्रपरिवार ह्यात आपला वेळ कुणाला द्यायचा ह्यात जर प्राधान्यक्रम लावायचं ठरवलं तर प्रत्येकजण सगळ्यात आधी कुटुंबाचं नाव घेईल पण खरोखरच कुटुंबाला आपण तितका वेळ देतो का हे तपासायला हवं. उदरनिर्वाहासाठी वेळ देणं हे आपण टाळू शकतच नाही, पोट भरण्याचा व्यवसाय वेळ घेणारच. कुटुंब म्हटलं की जबाबदारी आली, त्याचं ओझं आलं. उदरनिर्वाहासाठी केलेल्या धावपळ, कष्टानंतर काहीवेळा नव्हे बरेचदा पुन्हा इतर जबाबदारी नको वाटते आणि मनुष्य मित्रांच्या सोबतीत आपली वेळ घालवतो. बहुतेकवेळा मित्रपरिवारास वेळ जास्त दिला जातो आणि ते खूप स्वाभाविक आहे; त्यात चूक काहीच नाही पण त्यामुळे होतं काय की आपला प्राधान्यक्रम आपणच विस्कळीत करून टाकतो.

नात्यात वेळेचं नियोजन करावं लागतं हे जास्त कुणाच्या ध्यानीमनी देखील नसतं पण ते करावं लागेल. जग खूप वेगवान आहे, सुरू झालेला दिवस संपतो कधी तेही समजत नाही. नात्यातील वेळेचे नियोजन केले नसेल तर नक्की करा. नियोजन करताना ज्याची जशी निकड तिकडे वेळ देताना फक्त स्वतःसाठी वेळेचा एक कवडसा ठेवायला विसरु नका. होतं काय की सगळ्यांची मनधरणी करता करता आपण आपल्यालाच वेळ देणं विसरून जातो, आणि जिथं स्वतःचं स्वतःशी नातं नसतं तिथं इतर नात्यांना अर्थ उरत नाही. आपलं आपल्याशी नातं म्हणजे नेमकं काय, तर अधूनमधून स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. आपल्यात होत असलेले र्हस्व दीर्घ बदल स्वतःच तपासावेत. आपली स्वतःची मानसिक अवस्था समजावून घेऊन त्यात बदल करणे गरजेचं आहे की नाही हे नक्की तपासून बघावं आणि त्यावर काम करावं हे स्वतःशी स्वतःचं नातं जितकं प्रामाणिक तितकं मानसिक आरोग्य खटाखट राहील

काही काही नाती अशी असतात की ती स्वतःच त्
आपल्यासाठी वेळ शोधतात, तुम्ही कितीही व्यस्त, त्रस्त असलात तरी मनाचे हे बंध तुम्हाला त्या नात्यासाठी वेळ द्यायला भाग पाडतात आणि खरं सांगायचं तर हीच नाती खूप सुंदर आणि देखणी असतात. हे नातं तुमच्याकडे असं काही धावत येतं की सगळी कामं मागे टाकून आपण नकळत तिथे वेळ देत रहातो. अशी नाती जपावी, चेरीश करावीत नव्हे ही नाती इतकी घट्ट असतात की ती स्वतःच स्वतःची जपणूक करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असं स्वतःच स्वतःची जपणूक करणारं, देखणं, सुंदर, वेळखाऊ नातं असावं ह्याच मनापासून सदिच्छा.

धन्यवाद

No comments:

Post a Comment