Wednesday, 2 January 2019

नैतिकता , चिंतन मनन

नैतिकता म्हणजे काय? अनैतिक कृत्य म्हणजे नेमकं कोणतं? ह्याबद्दल जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये एकवाक्यता नाही आणि ती कधीही नव्हती. काही तत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार नैतिकता ही स्थल-कालपरत्वे बदलणारी असते. एका काळात एका समाजामध्ये असणारी नैतिकतेची संकल्पना ही दुसऱ्या समाजामध्ये असेलच असे नाही. तसेच एकाच समाजाच्या नैतिकेच्या संकल्पना कालपरत्वे बदलणाऱ्या असतात. उदा. आफ्रिकेतील बऱ्याच जमातींमध्ये Female Genital Mutilation नावाचा अघोरी प्रकार आहे. मुलींच्या कौमार्याचा भंग होऊ नये म्हणून असा प्रकार केला जातो. अत्यंत अमानुष, अमानवी आणि त्रासदायक अशा या प्रकाराला त्या समाजात नैतिक मानले जाते. मात्र आधुनिक समाजाकडून याची सदैव निर्भर्त्सना होत आहे. म्हणजेच नैतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर अवलंबून आहे. आणखी उदाहरण द्यायचे झालेच तर नैतिक सापेक्षतावाद्यांच्या मतानुसार एखादी कृती योग्य की अयोग्य, हे त्या समाजाच्या स्वत:च्या अशा नैतिक संकल्पनांवर अवलंबून असते. एका समाजामध्ये नैतिक असणारी संकल्पना दुसऱ्या समाजात नैतिक असेलच,  असे नाही. याच्या अगदी उलट म्हणजे Ethical Objectivism होय. यांनुसार जर Ethical Relativism चे म्हणणे ग्राह्य़ मानले तर दोन समाजांमध्ये नैतिकतेची कोणतीच समानता राहणार नाही आणि एक वैश्विक समाज या नात्याने जगणे अवघड होऊन जाईल. सर्वच संस्कृतीमध्ये काही समान अशा नैतिक मूल्यांना महत्त्व दिलेले असते/ दिले जावे. उदा. एखाद्याचा खून करणे हे अनतिक, तर पालकांचा आदर करणे हे नैतिक मानले गेले आहे आणि सर्वच समाजामध्ये/ संस्कृतींमध्ये याबाबतीत एकवाक्यता आहे.

काही तत्त्वांबद्दल सापेक्षता असली तरी ही काही नैतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. नैतिकतेची सापेक्ष संकल्पना एकूणच वैश्विक मानवतावादासाठी धोकादायक ठरू शकते. एक मनुष्यप्राणी या नात्याने विश्वातील सर्वच समाजांमध्ये नैतिकतेची किमान काही आधारभूत तत्त्वे असावीत, वाढवली जावीत; जेणेकरून काही अनैतिक प्रथा-परंपरांविरोधात वैश्विक समाजाकडून प्रतिरोध केला जाऊ शकतो. मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, लैंगिक अत्याचार/ छळवणूक,Female Genital Mutilation  सारख्या अघोरी प्रकारांना विरोध करणारी ‘नैतिकता’ सर्वच समाजांसाठी सर्व काळांमध्ये असायलाच हव्या आहेत. मुळात नैतिकतेची संकल्पना ही विश्वातील सर्वच मानवजातीचे कल्याण व्हावे आणि अन्याय दूर व्हावा यासाठीच आहे/असायला हवी. या दृष्टीने विचार करताना नैतिकतेचे उद्दिष्ट, संकल्पना अधिक योग्य आहे/ असायला व्हावी. नैतिकतेत अंतःकरणाचा आवाजही खुप महत्वाचा असतो.
अंतःकरणाचा आवाज (voice of conscience) मानवाला चांगले काय आणि वाईट काय यामधील भेद ओळखण्यासाठी आणि चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करेल. मराठीत यालाच आपण ‘सदसद्विवेकबुद्धी’ असे म्हणतो. आता सदसद्विवेकबुद्धी किंवा सदसद्विवेकाच्या आवाजाकडे लक्ष जावे यासाठी आपण काय, कसे, का करायला हवे तर आपणाला सदसद्विवेकबुद्धीचे विविध आयाम विचारात घ्यावे लागतील. न्यायबुद्धी, समतेचे तत्त्व, विषमताविरहित विचार, मानव अधिकारांची जाणीव.. इ. घटकांचा त्यात समावेश करावा लागेल. आता या बाबींची जाणीव निर्माण होण्यासाठी काय करावे लागेल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्वार्थी’ भाव सोडून आपण या समाजाचे घटक आहोत; मी, माझे, मला यासोबतच माझी समाजाप्रति काय कर्तव्ये आहेत, याची मला जाणीव असणे गरजेचे आहे. राग, लोभ, दंभ, मोह-मत्सर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला की आपोआप सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येतो. समाजामध्ये वावरताना व्यावसायिक जीवनामध्ये आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या; आपले आणि आपल्या पदाचे औचित्य याची जाणीव असणे हीच बाब सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येण्यासाठी आवश्यक ठरते

सद्सद्विवेक असणं खूप गरजेचं असतानाही काही वेळा त्याबाबत गोंधळाची मानसिकता येऊ शकते. विवेकाबद्दल मनुष्याला संकट हे दोन प्रकारचे असू शकते. एकतर विवेकवादी भूमिका काय आहे हेच न कळणे किंवा दोन विवेकवादी भूमिकांमध्ये कशाला प्राधान्य द्यावे यामध्ये गोंधळ उडणे. तसेच बऱ्याचदा विवेकवादी भूमिका काय आहे, हे कळत असूनदेखील ती केवळ बदल्याची भावना (Revenge), परंपरा (Tradition), पूर्वग्रह (Prejudice) आदी कारणास्तव आपण त्या विवेकवादी भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. एक वेळेस विवेकवादी भूमिका माहीतच नसेल तर निर्णय घेणे सोपे असते, विवेकवादी भूमिका काय आहे हे जाणून त्यावर निर्णय घेणे हे त्यापेक्षा अवघड आहे आणि विवेकवादी भूमिका माहीत आहे, पण केवळ वैयक्तिक आकसामुळे तिचे अवलंबन करणे अडचणीचे वाटणे ही सर्वात अवघड बाब आहे. या नैतिक पेचाचे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील उदाहरण देऊन स्पष्टीकरण करता येईल. या निवडणुकांत आम आदमी पक्षाने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना प्रचलित भ्रष्ट व्यवस्थेसाठी जबाबदार धरत संबंध निवडणूक प्रचारात त्यांच्या अध:पतनाची विविध रूपे जनतेसमोर मांडून आपल्या रूपाने स्वच्छ, प्रामाणिक राजकारणाचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच निवडणूक प्रचार आणि निकालानंतरही त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीतदेखील ‘आम्ही कुणाला समर्थन देणार नाही आणि कुणाचे समर्थन घेणार नाही’ अशी भूमिका घेतली.  तथापि, भाजपने सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असूनदेखील जेव्हा सरकार स्थापनेस नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेसने आम आदमी पक्षाला बिनशर्त पािठबा देण्याचे जाहीर केले तेव्हा ‘आप’पुढे जणू विवेकाचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. एका बाजूला निवडणुकीपूर्वी व त्यानंतरदेखील घेतलेली भूमिका आणि दुसऱ्या बाजूला सरकार स्थापन करून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी शिरावर घ्यावी, यासाठी वाढणारा दबाव व अपेक्षा अशा कात्रीत हा पक्ष सापडल्याचे चित्र दिसले.  अर्थात हा पेच व्यक्तिगत, संस्था, संघटनात्मक वा सार्वजनिक जीवनातील अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.

No comments:

Post a Comment