"भेटी लागे जीवा, लागलीसे आस
आतुरतेने तुझ्या भेटीची वाट बघताना होणारी कासावीस, घालमेल सांगितली ना मी तुला. पण , पण तुला मनाची ही अवस्था समजली का? ऐकलं म्हणजे सगळं समजतं असं थोडीच आहे. किती आर्जवं, किती विनंत्या केल्या असतील तुला ह्याची गणनाच नाही. प्रेमात कुठं हिशेब असतात रे म्हणून माहीतही नाही की नेमकं कितीदा तुला सांगितलं असेल की येऊन भेटून जा एकदा. तू येतो गं म्हटलास की मनातल्या पारिजातकाला बहर यायचा आणि मनातच पहाट व्हायची. एक अलगद झुळूक आणि पारिजातकाच्या पायघड्या घालायचं मन. पारिजातकाचे असे कित्येक बहर आले गेले पण तू आला नाहीस. पार चोळामोळा होऊन सुकून गेली सगळी फुलं मनातल्या मनात आणि पहाटेची रात्र झाली... मिट्ट काळोख असलेली रात्र. नेमक्या कोणत्या क्षणी विरसलं सगळंच, ती माझी आर्जवं, ती निमंत्रणे वारंवार वाया जाऊ लागली तसा मिठाचा खडा पडला आणि हळूहळू नातं फाटत गेलं. आता तितकी उर्मी उरली नाही की हाक मारावी किंवा आलेल्या हाकेला ओ द्यावी. मनाचे बंध तुटले ना की निरिच्छ होऊन जातं सगळं. आता तू समोरून स्वतः चालत आलास तरी मी बहरेन का ह्याची मलाच खात्री नाही. वूई लॉस्ट दॅट केमिस्ट्री रे... वूई मिस्ड द ट्रेन डिअर"
लिहिता लिहिता गपकन थांबली ती, कोर्टात जजमेंट दिल्यावर पेनाचं निप तोडताना सिनेमात दाखवतात त्या आवेशात तिने बॉलपेनची पॉईंट मोडून टाकली
No comments:
Post a Comment