Saturday, 8 June 2019

रँडम थोट्स

काही वर्षांपूर्वी आमच्या नात्यामध्ये मोठी भानगड झाली होती. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, आत्ता ते लोक माझ्या सासरचे आहेत पण आमचे पूर्वीपासून चांगले संबंध असल्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहेत.  तर त्याचं झालं असं एका मुलाने प्रेम विवाह केला, एक-दोन महिने गुण्यागोविंदाने संसार झाला नंतर काही दिवसांनी ज्या मुलीशी लग्न केलं होतं त्या मुलीचा भाऊ ह्या मुलाच्या बहिणीला पळवून घेऊन गेला तू माझ्या बहिणीशी लग्न केलंस ना मग मी तुझी बहीण कशी काढून नेतो ते बघ ह्या भाषेतच तो पोरगा बोलला होता. आमच्या इज्जतीला हात घातलास ना मग आता बघ तुमच्या इज्जतीची मी कशी वाट लावतो.

तर सांगायचा मुद्दा असा की भारतीय समाजमनाच्या इज्जतीच्या, अब्रूच्या सगळ्या संकल्पना स्त्रीच्या मालकी हक्कापाशी येऊन थांबतात. आपली बाई आपल्या ताब्यात ठेवणे, तिला दुसऱ्या कोणी हस्तगत नको करायला याची काळजी घेणे ह्याला मोठा पुरुषार्थ समजला जातो, याला कारण मला वाटतं पूर्वापार उत्तरेकडून होत असलेली वेगवेगळी परकीय आक्रमण असावीत. एकंदरच जे जेते असतात ते शत्रूच्या बायकांना पहिला हात घालतात, शत्रूच्या स्त्रीचा उपभोग घेणे ही विजेत्यांच्या उन्मादाची प्रमुख खुण पूर्वापार चालत आली आहे. उत्तर भारतात त्यामुळे स्त्रियांवर फार बंधनं आणली गेली, योनीशुचिता इतकी महत्वाची मानली गेली की त्यासाठी बायकांना घराबाहेर पाऊल ठेवण अशक्य केलं गेलं. स्त्री घराबाहेर पडली तरी घरातल्या पुरुषाच्या देखरेखीखाली ती घराबाहेर पडू लागली. कुलूपबंद अंतर्वस्त्रे स्त्रीला पुरविण्यात आली. परपुरुषाची सावली अंगावर पडणे हे देखील पाप मानणारे संस्कार इथे आहेत. अब्रूला सगळ्यात जास्त महत्व, अब्रूला जपण्यासाठी बायकांनी जोहार केल्याची उदाहरणे देखील आहेत.

उत्तरेकडून जसे दक्षिणेकडे जातो तसे स्त्रियांच्या बाबतीतले नियम जास्त उदार होत जातात. दिल्लीसारख्या ठिकाणी आजदेखील संध्याकाळी सातनंतर एकटी स्त्री घराबाहेर पडत नाही. माझ्या ओळखीच्या काही उत्तरेतील महिला पुण्यात येऊन अक्षरशः खूप खुश आणि अचंबित झालेल्या मी बघितल्या आहेत, 'भाभी सचमें आप रात दस बजे अकेली बाहर जाती हो' ह्यावर हो म्हटलं तर त्यांना फार नवल वाटलेलं. बऱ्याचजनी त्यासाठी पुणेमुंबई सोडायला तयार नसतात कारण उत्तरेत महिलांना अजूनही तसे सन्मानाने वागवले जात नाही.

महिला अत्याचार, बलात्कार, बदला घ्यायला दुसऱ्याची मुलगी बायको पळवणे, एकंदरच महिलांचा शारीरिक छळ आणि उपभोग घेण्याची पाशवी पुरुषी वृत्ती उत्तर भारतात अधिक बघायला मिळते. दक्षिण भारत त्यामानाने फारच सुसंस्कृत आणि लिबरल आहे. ह्याचा अर्थ सरसकट सगळे उत्तर भारतीय वाईट आणि दक्षिणि गुणी असा घेऊ नये, चांगल्या वाईट वृत्ती सगळीकडे असतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी माणसाला घडवत असते हे मात्र शंभर टक्के खरे आणि उत्तर भारतावर झालेली सततची परकीय आक्रमणे ही सगळ्या बाबतीत दूरगामी परिणाम करणारी ठरली आहेत. माणसाची माणूस म्हणून वृत्ती, विचारप्रक्रिया , नीतिमत्ता, नैतिक बैठक ठरवायला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. परकीयांच्या जोखडातून आपल्याला मुक्त करणारे छत्रपती शिवाजीराजे आणि नंतर उदारमतवादी विचार देणाऱ्या आपल्या समाजसुधारकांचे महाराष्ट्रावर अगणित उपकार आहेत हे माझ्या दिल्लीतल्या मैत्रिणींशी बोलल्यावर प्रकर्षाने जाणवले.


No comments:

Post a Comment