Thursday, 30 March 2017

रोमिओ ज्युलियेट



काही दिवसांपूर्वी रोमिओ स्कॉडवरून दोन पोस्ट टाकल्या, म्हणून रोमिओज्युलियेट प्रेमकथेविषयी लिहावं असं मनात आलं. या विषयावर खूप लिखाण झालं आहे, आपण खूपसे वाचलही असेल,तरी हा एक छोटा प्रयत्न. रोमिओ ज्युलियेट हे नाटक शेक्सपियरच्या सुरवातीच्या काळातील लिखानापैकी आहे. हे नाटक त्याने लिहिलं तो काळ साधारणपणे इसवीसन 1591-1595 असा मानण्यात येतो. हे कथानक इटालियन दन्तकथा वरून बेतलेले आहे.

***

वेरोना शहरात हि गोष्ट घडते, त्या शहरातली दोन मोठ्ठी नावाजलेली कुटुंबं असतात, एक मॉन्टेग्यु कुटुंब आणि दुसरं केपुलेट कुटुंबं, दोन्ही कुटुंबात पिढीजात वैर असतं, टोळीयुद्ध सदृश परिस्थिती सारखीच येत असते, दोन्हीकडच्या माणसांना एकमेकांबद्दल प्रचंड राग असतो. मॉन्टेग्यु परिवाराचा रोमिओ हा जवळचा मित्र, त्यान्च्या टोळीत स्थान मिळवून असलेला. एकदा मॉन्टेनग्यू कुटुंबात मुखवटे घालून नृत्य करायची पार्टी असते, तिथे ज्युलियेट हि केपुलेट कुटुंबातली 13 वर्षीय सुंदरी येते. नृत्यादरम्यान तरणाबांड रोमिओ आणि लावण्याखणी ज्युलियेट एकमेकांकडे आकर्षित होता, दोघेही एकमेकांच्या नजरेत गुंतून पडतात. नृत्य संपल्यावर सगळे आपापल्या घरी निघून जातात. हा इकडे आणि ती तिकडे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, दुराव्यामुळे अजूनच टोचत असलेली सल. दोघेही एकमेकांसाठी तडफडत असतात, कसंही करून ज्युलियेटला आपलं प्रेम व्यक्त करायचंच असा निग्रह करून एक दिवस रोमिओ धाडस करतोच आणि तिच्या खाजगी दालनातल्या गच्चीत बाहेरच्या भिंतीवरून चढतो.रोमिओला गच्चीत अचानक बघून ज्युलियेट गडबडते, लाजते तिचे लज्जित रूप बघून रोमिओ घायाळ होतो आणि आपल्या ओठांनी तिचे ओठ टिपून घेतो. तिच्या कानात तिच्या बद्दलच्या आपल्या भावना प्रेम व्यक्त करून रोमिओ आल्यामार्गे परत जातो. दोघेही खूप अल्लड बालिश असतात आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेले,प्रेम न जाणते जगाची रित म्हणून दोघेही गुपचूप जवळच्या चर्चमध्ये जाऊन लग्न करतात. प्रेमाचा पहिला स्पर्श झाल्याने आनंदित ज्युलियेट आणि तिच्यासोबत भावी आयुष्याची स्वप्नं बघणारा रोमिओ ह्यांना आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय हे माहीतच नसतं.

प्रेमाच्या भावविश्वात गुंतलेले जीव जमिनीवर आणायचं काम लगेच होतंच. दोन्ही कुटुंबात परत वादावादी सुरु होते, गोष्टी हाणामारीपर्यंत जातात त्यात रोमिओचे जिवलग मित्र मारले जातात. डोक्यात राख घालून रोमिओ बदला घ्यायच्या नादात ज्युलियेटच्या चुलत भावाचा खून करतो. खुनाची शिक्षा म्हणून रोमिओला वेरोनातून तडीपार केलं जातं. इकडे ज्युलियेटशी विवाह करण्यास काऊंट पॅरिस इच्छुक असतो तो तिच्या घरच्या लोकांना तशी गळ घालतो, पॅरिसचं खानदान, वैभव बघून ज्युलियेटचं पॅरिस सोबत लग्न ठरवण्यात येतं. तडीपार झालेला रोमिओ ज्युलियेटच्या आठवणींनी कासावीस होतो, तिच्या आठवणी काढत तिचं नाव घेत तो शहराभोवती वेड्या सारखा फिरत रहातो. इकडे पॅरिससोबत लग्न ठरल्याने कासावीस ज्युलियेट यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागते, लग्नाची तारीख जवळ येते तसा तिचा गोंधळ अजूनच वाढतो. लग्नाचा दिवस उजाडतो, ज्युलियेटने गुपचूप झोपेचं औषध मागवलेलं असतं ते घेऊन ती झोपून रहाते,तिला बिचारीला वाटतं की ती बेशुद्ध असताना ती मेली असं समजून तिचं लग्न रद्द होईल.

तिला गाढ बेशुद्ध बघून ती गतप्राण झाल्याची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरते, हि बातमी रोमिओला समजल्यावर त्याचा जीव रहावत नाही, तो सगळे नियम धुडकावून शहरात घुसतो आणि धावतच ज्युलियेटच्या घरी धडकतो. ज्युलियेटला त्या अवस्थेत बघून रोमिओ वेडापिसा होतो, तिच्या कपाळाचे,ओठांचे शेवटचे चुंबन घेऊन तो जवळचं जहाल विष प्राशन करतो. विष घेतल्यावर थोड्यावेळातच रोमिओ मरतो. इकडे गुंगीच्या औषधाची धुंदी उतरून ज्युलियेट शुद्धीवर येते. रोमिओला मृत बघून ज्युलियेटच्या दुःखाला पारावर रहात नाही, ती धाडकन त्याच्या शरीरावर पडून विलाप करते. रोमिओशिवाय पुढे जगणं नको म्हणून ज्युलियेट रोमिओच्या कमरेचा चाकू काढून स्वतःला भोसकुन घेऊन जीवाचा अंत करते. अशा रीतीने दोन प्रेमी जीव या जगात नाही तरी परलोकात एकमेकांच्या सहवासात रहातात. या दोन प्रेमिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्याचे डोळे उघडतात आणि दोन्ही कुटुंबातील दुष्मनी संपते

Sunday, 26 March 2017

श्रमप्रतिष्ठा



वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेलं, वाचलेलं एकत्र करून माझ्या शब्दात लिहीलं आहे

***
एका कारखान्यात मोठीच्या मोठी यंत्र असतात, सतत 3 शिफ्ट मध्ये कारखान्यात काम सुरु असायचं. यंत्र म्हटलं की ती बिघडणारच, त्या यंत्रावर काम करणारे कामगार छोट्या मोठ्या दुरुस्त्या करण्यात चांगलेच हुशार झाले होते.तरीही...तरीही एकदा एक महत्वाचं यंत्र बंद पडतं, सगळं काम ठप्प होतं. कामगार त्यांना जमेल तशी पळापळ करून यंत्र दुरुस्त करायचा प्रयत्न करतात पण परिस्थिती जैसे थे. शेवटी अतीव नाईलाजाने एका इंजिनीयरला दुरुस्ती साठी बोलावण्यात येते. इंजिनियर येतो यंत्राकडे थोडावेळ बघतो आणि एका हाथोड्याने एका ठिकाणचा खिळा ठोकतो. झालं यंत्र एक मिनीटात परत सुरु होतं. कारख्यानाचा मॅनेजर इंजिनिअरला त्याच्या कामाचं बिल किती झालं विचारतो आणि त्याची रक्कम चुकती करतो. सगळे कामगार एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात कारण इंजिनिअरच्या बिलाची रक्कम कामगारांच्या पगारापेक्षाही जास्त असते. न राहवून एक कामगार विचारतोच 'काय केलं या माणसाने असं , एक खिळा तर ठोकला आणि त्यासाठी त्याला इतके पैसे कशासाठी द्यायचे, आम्ही मरमर महिनाभर काम करतो तेव्हा कुठं पगार हातात मिळतो तोसुद्धा इतका नसतो' इंजिनिअर त्याला उत्तर देतो 'मित्रा , मी हे पैसे खिळा ठोकण्याचे घेतलेलं नाहीतच तर कुठला खिळा ठोकला म्हणजे यंत्र सुरु होईल या ज्ञानाचे घेत आहे'

कष्टाचा मोबदला कमी असतो हे सत्यच आहे. कुठलीही संस्था किंवा संघटना यामध्ये व्यक्ती जितका वरच्या पदावर तितकं त्याला अंगमेहनतीचे काम कमी करावे लागते आणि निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग वाढतो. निर्णय घेणे, अंमलबजावणी करून घेणे तसेच कामाचे कार्यक्षेत्र वाढते , कक्षा वाढतात. म्हणजेच कम्पणीचा मालक स्वतः फार कष्टाची कामं करत नसतो, ac केबिन मध्ये बसून रहातो त्याचं काम कम्पनीची धोरणं ठरवणं त्यानुसार हाताखालच्या लोकांकडून ते काम करून घेणं, संपूर्ण कंपनी हि त्याची जबाबदारी असते. कामगार ठरवून दिलेलं काम ते तेवढंच तो करतो इतर ठिकाणी लक्ष द्यायची त्याला गरज नसते पण तुलनेत श्रम जास्त आणि मोबदला मात्र खूपच कमी असतो.

सध्या जगात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं. शेतकरी काबाडकष्ट करतो परंतु त्याच्या हातात फारसं काही पडत नाही त्याउलट उच्चपदस्थ अधिकारी, बिझनेसमेन, डॉक्टर्स, इंजिनिअर तुलनेने अंगमेहनत कमी करूनही भरपूर पैसा कमावतात आणि सुखवस्तू जीवन जगतात. शिक्षण घेणे, एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे हेच सध्यातरी आपल्या हातात आहे. श्रमाला प्रतिष्ठा हवी , कष्टाची लाज नसावी इत्यादी फक्त पुस्तकात वाचायला भाषणात बोलायची वाक्य म्हणून बरी आहेत. खऱ्या जगात श्रमाला म्हणावं असं यश, पैसा नाही असेच मला तरी वाटतं


Friday, 24 March 2017

कच्या

आमच्या घराच्या आसपास कुठंतरी रहात असावा... शरीर वाढलेलं पण बुद्धीने एकदमच मंद...घरची गरिबी, आई आणि तो दोघेच रहायचे...आई लोकांची धुणी भांडी करून दोघांचं पोट भरायची...कच्याचं एक होतं दादा कोंडकेंची सगळी गाणी त्याला पाठ...आई चार घरची कामं करेपर्यंत हा रस्त्याच्या कडेला फुटपाथला बसून रहायचा, रस्त्यावरून एखादी तरणी ताठी पोरगी दिसली की ह्याचा दादा कोंडके सुरु व्हायचा...पोरी बिचाऱ्या लांबून लांबून भरभर निघून जायच्या...हं पण कधी जवळ नाय गेला कुणाच्या, फक्त जोरा जोरात गाणी म्हणायचा... बाकी तसा कच्या निरुपद्रवी होता

दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत एक प्रकार मात्र नेहमी हमखास बघायला मिळायचं...आजूबाजूची रिकामटेकडी मुलं कच्याला दगड मार, खडा मार आणि पळून जा असे उद्योग करायची..मग मात्र कच्या खूप चिडायचा, अगदी दिसेल तो दगड, चप्पल घेऊन त्या पोरांच्या मागे मारायला धावायचा, एकीकडे शिव्या सुरूच असायच्या...तो असा आरडा ओरडा करू लागला की त्याच्या वेडेपणावर परतपरत शिक्कामोर्तब व्हायचं...मग पोरं परत ये वेड्या करून त्याला चिडवायची...बरेचदा पोलिसांनाही कच्याच्या आईला समज द्यायची वेळ आली होती...ती माऊली पार वैतागून जायची, माझा पोरगा मारतो का स्वतःहून...ह्या पोरांनी चिडवलं तरच तो चिडतो...माझा लेक येडा नाही साहेब तो मंद आहे...पण पोलीस तरी काय करणार, पोरं कच्याला डिवचनार तो चिडणार हे आता नेहमीचं झालं होतं...आणि एक मतिमंद मुलगा सर्टिफाईड वेडा झाला होता

Tuesday, 21 March 2017

हल्ली हल्ली

गुंतू नये वाटते कुठेही, पण
नजरेसमोर तू फार येतो हल्ली हल्ली

तू न केली दिशाभूल जराही
भान माझेच सुटते बघ हल्ली हल्ली

खेळ इथला तसा न्याराच सारा
संन्याशालाही मोह सुटतो हल्ली हल्ली

भुंकले जरी कुत्रे किती इमानी
चोरांचेच फार फावते हल्ली हल्ली

या तमाची पर्वा कधी केलीच नाही
सूर्यही पण दडू लागला हल्ली हल्ली

या दिशांनी काय केले पहा असे
पाय माझा घरात टिकेना हल्ली हल्ली

तसे कठोर आहे फार मन माझे
तू हसतो अन मी वितळते हल्ली हल्ली

तू माझाच ना मी कसे विचारू
मी मात्र तुझी होऊन चुकले हल्ली हल्ली

कविता तसाही माझा प्रांत नाही
यमक कसे जुळून येतात बुवा हल्ली हल्ली


Thursday, 16 March 2017

व्यवहार

हळव्या मनाचे प्रश्न भोळ्या मनाची उत्तरे
कळतील का कधीही...तू व्यवहारी शहाणा

हा कसला नगारा धडाडतो कानावरी
शांत निवांत .. कुठे पहावा ठिकाणा

चुकांवरी चुकांची रास क्लास रचली मी
अक्कलखातीचा शून्य..काही केल्या टळेना

भेगाळल्या भुईची किती कौतुके करावी
धुवांधार पावसाचा..कर ना काही बहाणा

मौसम पानगळीचा उलटून कधीच गेला
नव्या पालविचा तरीही..कोंब का फुटेना

Sunday, 12 March 2017

काय करावे बरे

कशास करावी मगजमारी
रहावे आपुले आलबेल बरे

लिहावे वाचावे हसावे खेळावे
राजकारणातून आम्ही बाद बरे

नसे कुणीही इथे वेगळा
नेते आपले तडीपार बरे

हसला कि तू कातिल दिसतो
त्या तिकडे बघून हास बरे

भिजुनही रंगात कोरडी मी
जरा चुंबू दे तुझे ओठ बरे

काठावर कितीदा आलो गेलो
करावे च्यामारी आरपार बरे

हल्ली मीही जागत नाही
तुझे इशारेहि सोड बरे

आता मीही खुशीत आहे
तुझी खुशालीही दिसेल बरे

तो विठ्ठल उभा विटेवर
भक्तांचीच वर्दळ अमाप बरे

विचारांची नुसती गर्दी आता
कशाशी घ्यावी फारकत बरे

Friday, 10 March 2017

डोळ्यात जपून घे
शब्द शब्द टिपून घे

ये असा सामोरी
अलगद भेटून घे

कसा लपेल गंध हा
मोगरा लुटून घे

जागेपणी स्वप्न बघून
पापणी मिटून घे

नको आता दुरावा
मिठीत मला मिटून घे

मी सर्वस्वी तुझी
पुरावा पटवून घे

कमजोर न मी जरा
ताकत अजमावून घे

तुझ्या मनीचे सर्व ठावे
खुणा तपासून घे


Wednesday, 8 March 2017

माझे जीणे

मी गाते तुझी गाणी
माझं जीणे लंबी कहाणी

माझ्या डोळ्यातली आग
बघ लागते का धग

माझ्या ओठी कसले हसू
नाव गाव नको पुसू

माझ्या नखावरला रंग
फुलवी तुझा माझा संग

माझा साजन साजन
नाही दुनियेत सर

माझे मन आता कुठे
बघ तपासून खिसे

माझ्या घराचा उंबरा
साऱ्या दुःखाचा उतारा

माझ्या ओटीतले फुल
वाढो त्याचा दरवळ

Tuesday, 7 March 2017

स्त्री

महिला दिन आला की महिलांविषयी आदर आणि प्रेमाच्या पोस्ट बघून स्तिमित व्हायला होतं. हाच का तो समाज जो चार आठ दिवसांपूर्वी गुरमेहर कौरविषयी नाही नाही ते बोलत होता. कार मध्ये तिचे दारू पिऊन धिंगाणा घालणारे फेक व्हिडीओ बनवून व्हायरल करणारी लोकं आज महिलांचं समाजातील स्थान आणि महत्व सांगायला हिरीरीने पुढे सरकतील. गुरमेहरच्या वक्तव्याला राजकीय पार्श्वभूमी असेलही तरीही तिला दिल्या गेलेल्या धमक्यांचे समर्थन कुणी करेल असं वाटलं न्हवत पण तेही बघायला मिळालं, आश्चर्य म्हणजे यात बायकाही कमी न्हवत्या. अरेच्या अशी कशी बोलली हि मुलगी , आमच्या पक्षाची नाही न मग मिळू दे धमकी, ब्रर्रर्रच झालं असाही सूर बरेच ठिकाणी वाचायला मिळाला...श्रुती धन्य झाल्या

कोण म्हणतं कि आता दिवस बदललेत पूर्वीसारखे अन्याय अत्याचार होत नाहीत, अजूनही हे सगळे प्रकार वेगवेगळ्या रुपात समोर येतंच असतात, फार कशाला लोकांना मुलगी अपत्य सुद्धा नकोसे असते. मुलग्याना जन्म दिला म्हणून स्वतःच काहीतरी तिर मारला असा समजणाऱ्या स्त्रिया सुद्धा कमी नाहीत. काल परवाच सांगली जिल्यात 19 स्त्रीभ्रूण मृत अवस्थेत सापडलेत हि अत्यंत शरमेची गोष्ट आहे. माहिलांबद्दल हा सावत्रभाव नवा नाही, एक तर देवी अथवा दासी या दोन रुपात तिला अडकवून टाकलं जातं, माणूस म्हणून तिच्याकडे कधीही बघितलं जात नाही, याला कारणीभूत ज्या काही धार्मिक मान्यता प्राप्त गोष्टी आहे त्यातली एक मनुमहाशयांनी सांगितलेली म्हणजे "स्त्री स्वातंत्र्यम न अर्हती" म्हणजेच स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नका. स्वातंत्र्य उपभोगण्याची तिची लायकी नसावी अशा पुरुषी कांक्षेतुनंच हे असे श्लोक रचले गेले.

मुकोऽस्ति को वा बधिरश्च को वा
वक्तुं न युक्तं समये समर्थः ॥
तथ्यं सुपथ्यं न श्रुणोति वाक्यं
विश्वासपात्रं न किमस्ति नारीम ॥19॥
-मनिरत्नमाला, (रचयिता :आद्य शंकराचार्य)
अर्थ - गुंगा कौन है? जो समयपर उचित बात कहने समर्थ नही है. बहरा कौन है? जो यथार्थ और सुपथ्य वचन नही सुनता है. विश्वास के योग्य कौन नही है, नारी

धर्मव्यवस्थेच्या मूळ ढाच्यातच समस्या आहे.महिला विश्वासपात्र नाहीत हे धर्माने ठरवून टाकले आहे. महिलांवरील भेदभावाचे मुळ असे खोलवर रूजलेले आहे.

ढोल, गवार, पशु, शुद्र , नारी
ये सब ताडन के अधिकारी
तुलसीदासाने रामचरित मानस मध्ये म्हटलंय.
 माता, पत्नी, मुलगी यांना साधे विश्वासपात्रही समजू नका, अशी शिकवण धर्म देतो. त्यांची तुलना पशु आणि निर्जीव ढोलाशी केली जाते. ज्यांना बडवत राहिले पाहिजे. ही मानसिकता बदलली तरच महिलांवरील अत्याचार थांबतील.

पुरुषांना जितक्या सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळाल्या तितक्या स्त्रियांना कधीही मिळालेल्या नाहीत. त्यासाठी त्यांना कायमच झगडावं लागलंय आणि यापुढेही हि लढाई सुरूच असणार आहे. खरं तर महिला दिन हा स्त्रियांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी साजरा करण्याची पद्धत आहे व होती पण हल्ली काही ठिकाणी याला निव्वळ उत्सवाचे आणि सणाचे रूप देण्यात येत आहे. पूर्वी जागतिक महिला दिन खूप वेगवेगळ्या तारखांना साजरे केले गेले आहेत, 8 मार्च हि तारीख आता जागतिक स्तरावरून मान्य करण्यात आली आहे. आता 8 मार्च तारीख कुठून आली तर 8 मार्च 1914 रोजी लंडन येथे महिलांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोरच्यात भाषण देण्यासाठी जात असताना सिलवीया पँनखर्स्ट नावाच्या स्त्रीला अटक झाली, आणि याच आंदोलनानंतर स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला म्हणून 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या तारखेचे इतर अनेक संदर्भही मी वाचलेले आहेत

मुक्त स्त्री कशाला म्हणायचे , माझ्या मते जी स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते त्यानुसार स्वतः कष्ट करण्याची जीची तयारी असते निर्णय चुकलाच आणि सगळं फसलं तर चुकांची जबाबदारी घेते ती खऱ्या अर्थाने मुक्त स्त्री. आजची स्त्री सर्वार्थाने पुढे आहे असं मी तरी समजत नाही. पुढे म्हणजे नक्की कुठं जायचंय पुरुषांना मागे टाकण्याचा अट्टाहासच स्त्रीसक्षमीकर्णाला मागे खेचतो. पहिलं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे स्त्री पुरुष हे समान नाहीतच, त्त्यांच्यात नैसर्गिक भेद आहेत . स्त्री पुरुष समान नसून एकमेकाना पूरक आहेत. कुणाला तरी मागे टाकण्याची उबळ स्त्रीमुक्तीला घातक आहे. स्त्रीने स्वतःला बिचारं समजणं आधी बंद करायला हवं. समाजाकडून दया, कीव याची अपेक्षा न करता सन्मानाने जगावं मग ती स्त्री असुदे अथवा पुरुष. स्त्रिया जोपर्यंत स्वतः हे बिचारेपण झुगारून देत नाहीत तोवर त्या मुक्त होणं अशक्य मात्र त्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम असणं आवश्यक आहे. मी बरेचदा बघते बायकांची एन्जॉयमेन्ट हळदीकुंकू,साड्या, उखाणे यापलीकडे जातच नाही. स्त्रीला नटण्याची हौस उपजतच असते तिने जरूर नटावे पण एक व्यक्ती म्हणून स्वतः आधी खंबीरपणे उभे रहाणे गरजेचे आहे.

Monday, 6 March 2017

करण जोहर बाप बन गया

करण जोहर गे आहे हे जगजाहीर आहे. आता तो सरोगसीच्या मदतीने बाप झालाय ते पण एक नाही तर दोन मुलांचा. गे असणं हि कमतरता नसून खूपच नैसर्गिक गोष्ट आहे फक्त ती कमी लोकांच्या नशिबी येते, हि लोकं चारचौघांसारखीच असतात फक्त त्यान्च्या सेक्स पार्टनरच्या चॉइसेस विरुद्ध नसून समलिंगी असतात, बाकी गे माणूस आपल्यासारखाच असतो. त्याच्या बाप बनण्यावरून खिल्ली उडवणारी लोकं एक गोष्ट विसरतात ते म्हणजे तुमच्या टिंगल टवाळीचा त्याच्यावर काडीइतकाही परिणाम होणार नाही. तो यशस्वी निर्माता दिग्दर्शक आहे, त्याच्या क्षेत्रात त्याने अमाप लौकिक आणि पैसा कमावला आहे. कितीतरी नवोदित कलाकार सिनेमासृष्टीत एक संधी मिळावी म्हणून करणच्या घराचे उंबरे झिजवतातयेत.
यानिमित्त एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे जे जसं आहे तसं स्वीकार करण्यात आपण मागे पडतो, लोकांच्या गुणदोषांसाहित त्त्यांचा स्वीकार करावा. अर्थात आपण स्वीकारलं किंवा नाही तरी त्याला फारसा फरक पडणार नाही आता नुक्ती जन्माला आलेली त्याची मुलं करोडोंच्या संपत्तीची वारसदार झालीत सुद्धा

Sunday, 5 March 2017

कसक

कसक

बेताब तमन्नाओ की कसक रहने दो!
मंजिल को पाने की कसक रहने दो!
आप चाहे रहो नज़रों से दूर!
पर मेरी आँखों में अपनी एक झलक रहने दो!

कसक म्हणजे एक छोटीशी अगदी बारीकशी कळ, वेदना जी सतत आपला पाठलाग करत असते. रूढ अर्थाने वरवर आपलं सगळं आलबेल सुरु असलं तरी अंतर्मनात एक खंत, अपुरेपण काहीतरी नक्की असतं. आपण एकटेच आणि निवांत बसलो कि ती खंत ती कमतरता तो अपुरेपणा डोकं वर काढतो आणि एक सूक्ष्म वेदना कळ जाणवते ती म्हणजे कसक.

कसक जीवघेणी नसते, धाय मोकलून रडायला लावणारी नसते तरीही, तरीही संथ सुंदर जीवनातल्या अस्वस्थतेची ती कन्फरमेटरि टेस्ट आहे. कभी किसिको मुकम्मल जहाँ नहीं मिलता...असं म्हणून आपण स्वतःची समजूत काढू शकतो...तरीही तरीही आतून कुठूनतरी एक आवाज येतंच असतो, एक बोच जाणवतच असते , एक जखम ठसठसंत असते ती म्हणजे कसक.

कसक सुंदर आहे...भळभळणारी रक्ताळ नाही तर आतून एक किंचित हळवं करणारी आयुष्याची सोनेरी रुपेरी किनार आहे... जे गवसून हरवलंय कसक त्याची याद आहे... भळाभळा वाहणारे डोळे नसून ओठावर हसू असताना किंचित पाणावलेले डोळे म्हणजे कसक...भरल्या ताटावर आडवा हात मारताना लागणारा ठसका म्हणजे कसक... कुणाच्यातरी मिठीत असताना मनात वेगळीच प्रतिमा स्वच्छ दिसणे म्हणजे कसक... फुलं माळताना बोचणारा काटा म्हणजे कसक... कांदाच मेला तिखट म्हणून कुणाच्यातरी आठवणीत भरलेले डोळे हळूच पुसणं म्हणजे कसक...

काय लिहू काय नको समजत नसताना , हि पोस्ट लिहिणं म्हणजे कसक

Friday, 3 March 2017

वळण

या वळणावरच त्याला मला भेटायचं होतं
आयुष्या तुला अजून किती लुटायचं होतं

मोजायला चांदण्याहि आभाळात नाहीत
मळभ नेमकं आत्ताच दाटायचं होतं

पोटाची खळगी काही भरता भरत नाही
तोंडातल्या घासानेही आत्ताच फिरायचं होतं

मागितले कुठे होते मी आकाशाचे दान
तुझ्या दोन डोळ्यातच तर मला रहायचं होतं

सूर्याच्या उन्हाची मात्तबरी ती कशाला
मंद चांदण्यातही ही मला पोळायचं होतं