वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेलं, वाचलेलं एकत्र करून माझ्या शब्दात लिहीलं आहे
***
एका कारखान्यात मोठीच्या मोठी यंत्र असतात, सतत 3 शिफ्ट मध्ये कारखान्यात काम सुरु असायचं. यंत्र म्हटलं की ती बिघडणारच, त्या यंत्रावर काम करणारे कामगार छोट्या मोठ्या दुरुस्त्या करण्यात चांगलेच हुशार झाले होते.तरीही...तरीही एकदा एक महत्वाचं यंत्र बंद पडतं, सगळं काम ठप्प होतं. कामगार त्यांना जमेल तशी पळापळ करून यंत्र दुरुस्त करायचा प्रयत्न करतात पण परिस्थिती जैसे थे. शेवटी अतीव नाईलाजाने एका इंजिनीयरला दुरुस्ती साठी बोलावण्यात येते. इंजिनियर येतो यंत्राकडे थोडावेळ बघतो आणि एका हाथोड्याने एका ठिकाणचा खिळा ठोकतो. झालं यंत्र एक मिनीटात परत सुरु होतं. कारख्यानाचा मॅनेजर इंजिनिअरला त्याच्या कामाचं बिल किती झालं विचारतो आणि त्याची रक्कम चुकती करतो. सगळे कामगार एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात कारण इंजिनिअरच्या बिलाची रक्कम कामगारांच्या पगारापेक्षाही जास्त असते. न राहवून एक कामगार विचारतोच 'काय केलं या माणसाने असं , एक खिळा तर ठोकला आणि त्यासाठी त्याला इतके पैसे कशासाठी द्यायचे, आम्ही मरमर महिनाभर काम करतो तेव्हा कुठं पगार हातात मिळतो तोसुद्धा इतका नसतो' इंजिनिअर त्याला उत्तर देतो 'मित्रा , मी हे पैसे खिळा ठोकण्याचे घेतलेलं नाहीतच तर कुठला खिळा ठोकला म्हणजे यंत्र सुरु होईल या ज्ञानाचे घेत आहे'
कष्टाचा मोबदला कमी असतो हे सत्यच आहे. कुठलीही संस्था किंवा संघटना यामध्ये व्यक्ती जितका वरच्या पदावर तितकं त्याला अंगमेहनतीचे काम कमी करावे लागते आणि निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग वाढतो. निर्णय घेणे, अंमलबजावणी करून घेणे तसेच कामाचे कार्यक्षेत्र वाढते , कक्षा वाढतात. म्हणजेच कम्पणीचा मालक स्वतः फार कष्टाची कामं करत नसतो, ac केबिन मध्ये बसून रहातो त्याचं काम कम्पनीची धोरणं ठरवणं त्यानुसार हाताखालच्या लोकांकडून ते काम करून घेणं, संपूर्ण कंपनी हि त्याची जबाबदारी असते. कामगार ठरवून दिलेलं काम ते तेवढंच तो करतो इतर ठिकाणी लक्ष द्यायची त्याला गरज नसते पण तुलनेत श्रम जास्त आणि मोबदला मात्र खूपच कमी असतो.
सध्या जगात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं. शेतकरी काबाडकष्ट करतो परंतु त्याच्या हातात फारसं काही पडत नाही त्याउलट उच्चपदस्थ अधिकारी, बिझनेसमेन, डॉक्टर्स, इंजिनिअर तुलनेने अंगमेहनत कमी करूनही भरपूर पैसा कमावतात आणि सुखवस्तू जीवन जगतात. शिक्षण घेणे, एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे हेच सध्यातरी आपल्या हातात आहे. श्रमाला प्रतिष्ठा हवी , कष्टाची लाज नसावी इत्यादी फक्त पुस्तकात वाचायला भाषणात बोलायची वाक्य म्हणून बरी आहेत. खऱ्या जगात श्रमाला म्हणावं असं यश, पैसा नाही असेच मला तरी वाटतं
No comments:
Post a Comment