Wednesday, 28 December 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रिय असलेली व्यक्ती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अगदी लहानात लहान किंवा मोठ्यात मोठ्या गोष्टी, घटनेवर व्यक्त होता येणं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती असावं या प्रश्नावर माझं उत्तर असेल कि ज्याला जेवढं हवं तितकं असावं, अमर्याद असावं. ज्याला जे बोलायचंय ते बोलता यावं , त्या व्यक्तीचे म्हणणं आपल्याला नेहमीच पटणारं असेल असं नाही. आपल्या मताशी न जुळणारी मतही शांत पणे ऐकून घेता आलं पाहिजे, दरवेळी माझंच खरं असं म्हणून चालत नाही. मतभेद असल्यास प्रतिवाद करण्याचे पर्याय आपल्याकडे असतातच फक्त चर्चेत कडवटपणा टाळला गेला पाहिजे. अभिव्यक्ती मुळे कुणाच्या जीवाला घात होणार असेल किंवा बोलण्यामुळे हिंसेला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र ते बेकायदेशीर आहे. एरवी प्रत्येकाला व्यक्त होण्याचा संविधानिक हक्क आहे.

नोटबंदी विरोधात मी बऱ्याच पोस्ट टाकल्यात काही खोचक टोमणेवजा लिहायचा मी प्रयत्न केला तेव्हा बऱ्याच कमेंट्स अशाही आल्या की राजकारणावर लिहू नको मित्र दुरावतात, पण असा सल्ला देणारेच दुसऱ्या पोस्टींवर नमोनमो चा जयजयकार करताना किंवा विरोध करणाऱ्यांची टिंगल करताना दिसले, मग असे हे सल्ले मला फसवे वाटतात. कशाला विरोध करता आता काही उपयोग नाही किंवा अडीच वर्ष काही बोलूच नका असंही ऐकावं लागलं. का नाही बोलायचं कुठलाही निर्णय योग्य कि अयोग्य हे त्यातून निष्पन्न होणाऱ्या आउटपुट वर अवलंबून असतं, सध्या तरी आउटपुट दिसत नाहीत. प्रचंड बहुमताने आलेल्या सरकारला प्रश्न विचारायचा हक्क भारतातील शेवटच्या नागरिकालाहि असायला हवा. आणि प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा इतर नागरिकांनी सन्मानच करायला हवा तेही जमत नसेल तर खिल्ली तरी उडवू नये कारण तुम्ही नागरिक तसे इतरही नागरिकच आहेत. माझे कितीतरी मित्र नोटबंदीच समर्थन करतायेत मी अजिबात त्यांना विरोध केलेला नाही उलट या तात्पुरत्या वादळाने मित्र गमावू नयेत म्हणून मी कित्येक जवळच्या लोकांशी प्रयत्नपूर्वक वाद टाळले आहेत.




तात्पर्य - नागरिकशास्त्र शिका रे जरा

फसवणूक

नारबा पुण्याला निघाला होता, सकाळची पहिली एस.टी. गाठली, स्वारगेटला गाडी लागली तेव्हा 10 वाजून गेले होते, नारबा उतरला, आळस देऊन,त्याच्या नेहमीच्या वाड्याच्या दिशेने निघाला. ऊन चांगलाच भाजून काढत होत, पाऊस लागायला अजून महिना पंधरा दिवस होत, तोवर काय तो धंद्याचा टाइम, एरवी गावाकडं कुणाच्यातरी शेतात मोलमजुरी करावी लागायची. त्यातून कारभारीन आजारी, सारख्या पोटदुखीने हैराण झाली होती,औषधाचा खर्चपण परवडत नव्हता, आपल्याच विचारात नारबा चालला होता.

वाड्याच्या दारात पोचताच अंगणात खेळणारी पोरसोर पळत आली, नारबा पारावार बसला, 'ये पोरांनो तुमच्या आईबाला बोलवा भाईर' सगळे लोक बाहेर आले, एकीने पाण्याचा तांब्या आणला, नारबा पाणी पिऊन, बोलला 'हा बोला ताई, कुणा कुणाची घर शेकरायचीत यंदा' 'नारबा, आमच लय गळतय बघ, मागल्या वर्षी नाय केल , यंदा हेळसांड करता नाय येत' मालनबाई बोलली 'बघ बरं, जरा आत ये , किती खर्च येईल, तूच करतोस दरखेपेला' नारबा कपडे झाडत उठला, 'चला ताई' घरात जाऊन आतून बारकाईन निरीक्षण करत, शेजारच्या झाडावर चढून छपरावर गेला, 'ताई, कौलं तर लय फुटल्याती , शेकडाभर तरी लागतील बघा' नारबा वरूनच ओरडला 'अरे काय कराव, ही पोर जरा ऐकत नाहीत, सारखी जांभळाला दगड मारतात, कौल फुटली बघ'

नारबा घरावरून खाली आला ,'ताई,शेकडाभर नळीची कौल , आणि 50एक विंग्रजी लागतील बघा, परत चटया, कामटि अस सगळे लागलं , अंदाजानी 4 हजार खर्च ईल' मालनबाई विचारात पडली 'ठीक आहे, दुपारी 2 वाजता , मालक जेवायला येतील, तेव्हा ठरवू. तू आराम कर, जेवण देते तुला,खाऊन घे' नारबा जेवण करून, झाडाखाली सावलीला पडला, मालनबाईचे मालक आले, दोघांनी बोलाचाली केली, शेकरायला लागणारे समान, मजुरी अस सगळे अडीच हजारावर ठरले. पण आता सामान आणून काम पूर्ण होणार नसल्याने, मालनबाईन संगितले 'आज सामान आणून ठेव , आणि उद्या काम कर' दोन हजार रुपये अडवांस घेवून नारबा बुरुडआळी कड गेला. नारबा गेला , आणि एक 17-18 वर्षाच पोरगं आल, 'आमच, आबा हायेत का ? शेकरायच काम करत्यात' 'अरे तो आत्ताच गेलाय बुरूडआळीत, पण तू रं कोण' मालनबाई. 'मी पोरगा त्यांचा, बघतो मी त्यान्ला' अस म्हणून पोरगं गेल.

नारबा बुरुडआळीत नुकताच पोचला, ओळखीच्या दुकानदाराशी काय काय सामान पाहिजे, भाव काय ह्याची विचारपूस करू लागला. तेवढ्यात त्याचं पोरगं आल, 'आबा, आईला लय पोटात दुखाय लागलय, दवाखान्यात नेल्त, दाग्दर म्हंत्यात आपरेश्न कराव लागलं , 2-3 हजार तरी खर्च व्हईल'नारबा एकदम गडबडून गेला गप्पकन खालीच बसला 'आरं, आता रं कस कराव, अत्ताशीक एक काम भेटलय, कुठून आणायच रं इतक रुपय' नारबाला घाम फुटला, घाम पुसूता पुस्ता विचार करू लागला नकळत हात खिश्यात गेला , हात बाहेर आला तेव्हा 2 हजारच्या नोटा होत्या हातात, काय कराव आयष्यभरचा विश्वास तोडायाचा, का कारभारणीचा जीव बघायचा , एका सेकंदात नारबा उठला , गडबडीनं पोराच्या हाताला धरून म्हटला 'चल लेका,लगोलग गाडीन गावी जाऊ,हायेत माझ्याकड पैकं' तासाभरान नारबा गावाच्या गाडीत बसला आयुष्यभर ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता, तोच विश्वास आज त्याला तोडावा लागला होता. त्यानंतर कितीतरी पावसाळे आले गेले नारबा मात्र पुण्याकडं फिरकला नाही , मजबूरीपाई केलेली फसवणूक आयुष्यभर त्याचं मन खात राहिली.

आत्महत्या

निधि फार निराश,हताश झाली होती. रवीने तिला खूप मोठा मानसिक धक्का दिला होता. निधि एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला होती, रवीची आणि तिची तिथच भेट झाली , दोघांचे प्रेम जमले, लग्नाचा विचार अजून जरी केला नसला, तरी ते कपल आहेत, हे सगळ्यांनाच माहीत होते, दोन्ही कुटुंबाचा अजिबात विरोध नव्हता, विरोध असण्याच कारणच नव्हते, दोघे एकमेकांना एकदम अनुरूप होते. पण कुठे माशी शिंकली , आणि एक दिवस रवीने तिला सांगितलं, की तो तिच्यात इंटरेस्टेड नाहीये, त्याला दुसरीच कुणी जास्त आवडू लागली होती. तिच्याघरचे खूप समजावत होते पण तो शहर सोडून निघुन गेला. तिने स्वतःला कोंडून घेतलं , हाताची शिर कापून घेतली रवीशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हती निधि,तिच्या मैत्रिणीने फोन केला बराच वेळ फोन उचलला नाही, तेव्हा सगळे धावत आले, दार तोडून, तिला दवाखान्यात नेलं, डॉक्टर म्हटले तिच्या मनावर मोठा आघात झालाय , काळजी घ्यायला हवी.

निधिला आता कुणीच एकटे सोडत नव्हते , सतत कुणींना कुणी सोबत असायचे. सध्या जॉबवरुन सुट्टीच घेतली होती, टाइमपास साठि सहजच कम्प्युटर सुरू केला आणि नकळत मेसेंजरच्या चॅटरूम मध्ये गेली, लगेच एक मेसेज समोर आला 'हाय,आय अॅम शाहरुख खान, आप कौन' तिला माहीत होत चॅटरूम मध्ये सगळेच शाहरुख,सलमान बनून फिरतात 'मी, रोझ म्हणजे गुलाब' तिने उत्तर टाइप केल, नकळत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या वेळ कसा गेला कळलच नाही 'मै कल फिर ईसी टाइम आता हूं, रोजा खोलना है' इतके बोलून तो अचानक offline झाला, 'अरे, हा तर मुस्लिम होता' तिच्या डोक्यात पहिला विचार हाच आला, असू दे चॅटरूममध्ये एकदा भेटलेला माणूस परत भेटण्याची शक्यताच नसते, तिला माहीत होत. 

दुसर्‍यादिवशी, त्याच वेळेला ती चॅटरूममध्ये गेली तो होताच,ते छान गप्पा मारू लागले , मग हे रोज सुरू झाले ठराविक वेळेला तो online यायचा त्याचा वेळ झाला की जायचा. तिने त्याला आपली खरी माहिती दिली नव्हती, त्यानेपण नव्हती दिली, ते एकमेकाशी खूप आनंदाने गप्पा मारायचे एकमेकाचे छंद, आवडीनिवडी सगळे त्याना समजले होत. निधीच्या घरचेहि तिच्याबाबत थोडे रीलॅक्स झाले. सलग 8 दिवस अस सुरू होतं, रवीच्या आठवणी तिला आता पूर्वीइतक्या छळेनाशा झाल्या. शाहरुख तिला आवडू लागला. रात्री ती विचार करू लागली, रविवर खरोखर प्रेम केल का मी, नाही म्हणावं तर लगेच हा कसा आवडू लागला , एक गोष्ट मात्र तिला नक्की समजली आता रवी तिच्या आयुष्यात राहिला नव्हता. निधि आता पुर्णपणे वेगळ्या वाटेन निघाली.

एका रात्री एक वाजता निधिने त्याला sms केला, लगेच उत्तर आल, मेसेज बरोबर sms चा सिलसिला सुरू झाला, त्या दोघांनी एकमेकांना पाहिले नव्हते, एकदा तिने आपला फोटो त्याला पाठवला, आणि त्याचा मागितला, पण त्याने काही दिला नाही, 'मी तुझ्याइतका देखणा दिसत नाही जान' ,'जान, हो तू माझी जान आहेस, तुझ्या शिवाय मला काही सुचत नाही, पण मी तुझ्या योग्य नाही गं' ती म्हटली 'तू कसाही असलास तरी तुझ मन खूप छान आहे, तू मला उद्या भेटशील का, नक्की भेट नाही तर मी बोलणार नाही कध्धी'

सकाळीच निधिला फोन आला 'मै आपसे कुछ कहेना चाहता हूं ' निधिने विचारले 'ठीक है' 'जी,मेरा नाम शाहरुख नाही , शकील है', निधि म्हटली 'कोई बात नाही , मै भी रोझ नही , निधि हूं'. दोघेही मनापासून हसले, 'और एक बात , मै शादिशुदा हूं, और दो बच्चे है मेरे' आता मात्र निधीला थोड विचित्र वाटलं 'ठीक है, मी मराठीत बोलू का ' 'हो, समजत मला'. 'लग्न झाल असून तुम्ही एखाद्या मुलीशी कस काय इतके बोलता' निधीन विचारले 'माझा डावा हात फ्रॅक्चर होता, त्यामुळे मी घरातच अडकून पडलो होतो, टाइमपास करायला चॅट करायचो, आता प्लास्टर काढलय, तुमचं बोलण मला आवडू लागलं होत, आणि तुमच्या बोलण्यात एक प्रकारची उदासी जाणवायची मला , म्हणून मी बोलत गेलो , आणि गुंतत गेलो, पण सॉरीमाझ्यामुळे तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल' निधि सुन्न झाली.

'पण मी खरच तुझ्यावर प्रेम करू लागलोय गं, मी लग्न करायला तयार आहे, माझ्या मजहब मध्ये चालते दुसरी बायको, माझी पहिली बायको काही बोलणार नाही, मी समजावेल तीला, आणि माझा बिझनेस पण चांगला चालतो, तू काळजी करू नकोस जान' निधि थोडा वेळ शांत बसली मग ती बोलू लागली 'शकिल, मला तू खूप आवडतोस रे, तू मला खूप अडचणीच्या वेळी आधार दिलास, नाही तर तुझी निधि आज वेडी झाली असती. मी आज आणि नेहमीच तुझीच राहील, पण दुसर्‍या स्त्रीच्या हक्कावर मी आक्रमण नाही करू शकत रे, तुझ्या मजहब मध्ये असेल पण माझ मन मला परवानगी देत नाही. पण मी आता तुला 100 टक्के सांगते की जर मला कधीही तुझी गरज लागली, जेव्हा कधी मला लग्न करायची इच्छा होईल तेव्हा मी तुझ्याकडेच येईल, पण अत्ता मला आग्रह करू नकोस, मी उद्या नवीन कंपनी जॉइन करणार आहे , मोठ्या संधि आहेत, तू माझी काळजी करू नकोस, तू सुखी रहा ' इतक बोलून निधिने फोन खाली ठेवला, तिला कधी न्हवे ते खूप मोकळे वाटत होते, आत्महत्येचा विचार सुदधा तिच्या मनाला शिवला नव्हता, कसा शिवणार , रवीने तिला सोडले होते आणि आज दूसरा कोणीतरी तिचा स्वीकार करायला तयार होता, तिला खात्री होती शकिल तिची वाट पाहणार होता, कुणीतरी आपल्यावर प्रेम करतय आपली वाट पहातय हा विचारच आनंददायक होता आणि ती परत त्याच्याकडेच जाणार होती, कारण तो तिचा प्राण आणि ती त्याची जान होती.

पोतराज

माझ माहेर पुण्यात, भवानी पेठेत , भवानी मातेच्या देवळाजवळ, आमच घर म्हणजे जुना वाडा होता, दगडी बांधकाम केलेला. घराला दरवर्षी दोन वेळा रंगकाम करायचा मोठा कार्यक्रम व्हायचा. आमचे दादा दोन दिवस आधी रंगवाल्याला बोलावून चुना , रंग वगैरे किती साहित्य लागेल, त्याची मजुरी वगैरे गोष्टी ठरवायचे.

रंगवाला म्हणजे एक माणूस यायचा , पांढरा पायजमा शर्ट घातलेला , काळा तुकतुकीत रंग , कपाळाला हळदीचा मळवट भरलेला असायचा . घरच्या पुढच्या चौकात झोपडपट्टी आहे, तिथे त्याचं घर होत , रंगकाम चांगल दोन तीन दिवस चालायच. रंगवाला छान गप्पा मारायचा , चहा , दुपारचं जेवण आमच्याकडेच असायचे.

आम्ही मूल बोलायचो त्याच्याशी, एकदिवस मला नक्की आठवत नाही , बहुदा आषाढ महिना असावा , आम्ही बहीण भावंडे शाळेतून येत होतो ,रस्त्यात काहीतरी वाजवल्याचा आवाज आणि जोरदार फटक्या सारखा आवाज आला, आम्ही सगळे धावत बघायला गेलो, बघतो तर काय तो आमचा रंगवाला होता. उघड्या अंगाला तेल चोपडले होते, कमरेला रंगीबेरंगी कापडाचा स्कर्ट सारखे काहीतरी घातलेले , पायात चाळ. थयथया नाचत हातातील आसूड पाठीवर मारून घेत होता , सोबत त्याची बायको, तिच्या डोक्यावर देवाचा देव्हारा , गळ्यात वाजवायचे वाद्य .

लोक थांबत होते , काही जण पैसे देत होते , काही जण पीठ धान्य वाढत होते. आम्ही त्याला मामा मामा अशी हाक मारली त्यांन आम्हाला बघितलं, हसला , 'घरी जा रे पोरांनो लय येळ झाली, चला पाळा' त्याने आम्हाला हाकलून लावल. घरी जाऊन आम्ही आई दादांना सांगितलं, तो रंगवाला तिकडे चौकात फटके मारून घेत होता वगैरे. मग आम्हाला समजले , की तो पोतराज आहे, त्यांच्याकडे अशी परंपरा आहे . देवाची सेवा करून उरलेल्या वेळात तो मिळतील तशी रंगाची काम करून घर चालवायचा.

काही वर्षानी आमचा वाडा पडला , मोठी बिल्डिंग उभी राहिली, पुण्यातले ठीक ठिकाणचे वाडे पडले , आता कुणी चुना फक्कीचा रंग देत नाही. आता लस्टर पेंट , ऑइल बॉन्ड आणि काय काय मारतात भिंतींना . चित्रकाथा स्पर्धेचं पोतराजाच चित्रा बघितलं रंगवाला आठवला , आता काय करत असेल तो ,कस बर त्याचं पोट भरत असेल. की आता आधुनिक मंगळावर पोचलेल्या भारतात सुद्धा स्वतःला फटके मारून पोट भारायचच त्याच्या नशिबी असेल का ?
(बरच सत्य व थोडसं काल्पनिक)

ती

तिला जाग आली, सगळं अंग जड झाल होत, अजिबात उठायची इच्छा नव्हती , पण पोरांच्यासाठि उठाव तर लागणारच होत. पडल्या पडल्या खिडकीचा पडदा सरकवून तिने बाहेर पाहिलं , कालच्या सारखच आभाळ भरून आल होत , पावसाची रिपरिप सुरू होती. काल तीनं बाहेर जायचे टाळले होते, पण आज कस करावे , असा विचार करतच ती उठली . नित्यकर्म उरकून तीन दोन्ही मुलांना उठवले आणि त्यांना त्यांचं आवरायला पाठवल. धाकटा 4 वर्षांचा, थोडा अवखळ पण ऐकायचा, मोठी मुलगी 6 वर्षांची वयाच्या मानान लवकर समज आली होती , परिथिति माणसाला सगळं शिकवते हेच खर.

तिचा नवरा 2 वर्षामागच देवाघरी गेला होता. तेव्हापासून तीच्यावर सगळी जबाबदारी आली होती. म्हणायला नातेवाईक खूप होते पण वेळेला आपल आपल्यालाच बघाव लागत हे तिला चांगलच माहीत झाल होत. कलकत्त्याच्या जवळच्या तालुक्यात तीच गाव , तालुक्याच्या ठिकाणी बचतगटाची बाईजि होती , तिच्या कडून कशिदा करायची कामं मिळायची , 8 दिवसातून तालुक्याच्या गावाला जायचं, आधी केलेले कामं देवून नवीन कामं आणायची असा तिचा नेम होता. कालच खर तर जायला हव होत , पण पावसामुळे गेली न्हवती , आज नाही गेल तर उद्या खायच काय हा प्रश्न होता. जवळचे सगळे पैसे संपून गेले होते , घरातले धान्य रेशन सगळं संपलं होत.

घरातले डबे डुबे उघडून तिने काय काय शिल्लक आहे ते बघितल ,फार काहीच नव्हते थोडीशी डाळ, तांदूळ होती फक्त , त्याची खिचडी बनवली ,पोरांना खाऊ घातले उरलेले थोडे तिने खाल्ले वर तांब्याभर पाणी प्याली , पोरांच्या गालावर प्रेमाने हात फिरवले आणि "मी तालुक्याच्या गावाला जाऊन येते , संध्याकाळ होईल, घरातच खेळा, बाहेर जाऊ नका, तू लक्षं दे ग याच्याकडे " दोघांना समजाऊनं ती निघाली. कशीदाकामाच गाठोड भिजू नये म्हनून प्लॅस्टिक च्या पोत्यात भरल आणि ती निघाली .

घरच्या बाहेर पडल्यावर अनवाणी पायांनी चिखल तुडवत ती चालली,बस टमटम काही दिसतय का बघत होती, बस थांब्यावर कोणीच न्हवत ,पावसामुळे बाहेर पडलं नसावं कुणी. लांबूनच एक बस येताना दिसली पळत पळत जाऊन तिने हात दाखवला, गाठोड सांभाळून कशी बशी ती बस मध्ये चढली तिकीट काढलं आणि सकाळ पासूनच्या सगळ्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला .

जोरदार हदरा जाणवून ती जागी झाली , डोळे चोळत इकडे बघितले तर तालुक्याच गाव आल होते. बोचक सांभाळून ती खाली उतरली , पाय ओढत बचतगटाच्या ऑफिस कड निघाली,हळू हळू चालत तिथपर्यंत पोचला अर्धा तास लागला. तिथ पोचली तर ऑफिसला कुलूप , ऑफिसच्या मागच्या शिपायच्या घरी जाऊन चौकशी करावी अस वाटून ती तिकडं गेली .केविलवाण्या चेहर्‍याने तिने तिथे उभ्या असलेल्या बाईला विचारलं बाईजि कुठे गेल्यात हो , 'आताच बाहेर गेल्यात , घंटभरात येतील, बसा ' त्या बाईला दया येवून तिणी हिला चहा पाणी दिले , परत ऑफिस च्या पडवीत बसून राहिली. सगळा जीव पोरकडे अडकलेला .

पावसाची रिपरिप सुरूच होती , पोर काय करत असतील , जाताना रेशन घेऊन जायचे , अनेक विचार मनात सुरू होते , तेवढ्यात बाईजि येताना दिसल्या तिचा जिव भांड्यात पडला , बाईजि आल्या 'काय ग कशी आहेस, मुले काशी आहेत' त्यांनी विचारले 'सगळे नीट हाय बघा' तीच उत्तर. 'चल हिशेब करून टाकू तुझा' बाईजिणी केलेलं काम नीट बघून घेतले. ' आता पुढचं काम देवू का , कशी ग नेशील तू' बाईजि नि विचारले 'बाईजि येवस्थित न्हेते बघा, भिजून नाही देत ' असे म्हणून बाईजि ने दिलेल्या कापडचे गठ्ठे तिने प्लॅस्टिक च्या पोत्यात भरले,पोते उचलून बाईजिला नमस्कार करून 'येते पुडल्या हप्त्यात ' सांगून ती निघाली.

बसथांब्या च्या वाटेतच किरण्याच्या दुकानातून तिन लागणार्‍या सगळ्या वस्तु घेतल्या, पोरांसाठी शेव कुरमुरे बांधून घेतले, सगळे पोत्यात भरून ती ,बसस्टॉप च्या दिशेनं गेली. बस लागलीच होती, तिचा जीव भांड्यात पडला , आता काळजी नाही, वेळेवर घरी पोचू, ती निश्चिंत झाली. एकतासभर बस हळू हळू जात होती, पावसा मुले बस चा वेग खूपच कमी होता. थोड्यावेळाने बस गप्पकण थांबली, 'गाडी पुढं जाणार नाही, पूल पाण्याखाली गेलाय' ड्रायवर ने माग वळून सगळ्यांना संगितले. एकेक प्रवासी खाली उतरु लागले , 'काय करायचे व आता ' तिन बाकीच्यानं विचारले , 'थांबू गाडीतच 5-6 तासात पाणी ओसरल की जाऊ' बापरे 5-6 तास म्हणजे रात्र किती होईल, पोरे काय करतील या विचारांनीच ती हैराण झाली , डोक बधिर झाले , थोडा वेळ तशीच बसून राहिली.

मुलांचे चहरे डोळ्यापुढे उभे राहिले, भुकेले असतील, मी जर गेले नाही तर उपाशी राहतील, मला शोधयला बाहेर पडले तर , एक न अनेक विचार मनात येत होते. खिडकीतून बाहेर नजर टाकली , दूरवर नदीकाठी एक नाव दिसली , नावाडी नव्हता, थोडा वेळ विचार केला , मनाशी निर्धार करूनच ती उठली, नदीच्या दिशेने चालू लागली, सहप्रवासी बघतच राहिले , 'ये बाई कुठे चालली' सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती नदी काठी आली, लोखंडी खांबाला बांधलेली नाव सोडली आणि पोत आत टाकून त्यात चढली. होडी पाण्यावर हेलकावत होती, तोल सावरत बसली . आतल वल्ह उचलल आणि जिवाच्या आकांतान तिने वल्ह मारायला सुरुवात केली.

आता ती लवकरच तिच्या लेकराणा भेटणार होती, त्या परिस्तिथितही तिच्या चेहर्‍यावर हसू फुलले.

प्रहार

किती प्रहार केले आपल्याच माणसाने
हर एक वार मजला कठीण करून गेला

रडणे कधीच सोडले मी किरकोळ कारणाने
ओघळला प्रत्येक थेंब कोरडा करून गेला

नको दुःख दर्शविणे, बरे नुसतेच सोसणे ते
आधार घेतला तो हात मज खोल ढकलून गेला

आतल्या आत सहावे, कोरडे रडे रडावे
अश्रूंचा बाजार बघ तो कधीचाच उठून गेला

केले असे काय पाप, पदरी पडले हे दुःख
माझाच दोस्त आज मज परकी करून गेला

नको फुलांच्या माळा, नको अत्तराचे वास
येशील का बनूनी, तू स्वतः फुलांचा झेला

हृदयात बाळगीन, तुज अंतरी पूजिन
क्षण दे तो फिरून, जो तू विझवून गेला

गायी पाण्यावर काय म्हणुन आल्या

(कविता  रसग्रहण) 

हि कविता खूप लहान असल्यापासून माझी आवडती आहे, जसं वय वाढत गेलं तशी ती आणखीन अधिक आवडू लागली. हि कविता आवडण्याचं मागचं कारण लहानपणी बघितलेली आमची गरिबी, चार मुलांचं शिक्षण करताना आईवडिलांची झालेली ओढाताण हे सगळं असावं.

कवी बी यांची कविता आहे ही, त्यांचं खरं नाव नारायण मुरलीधर गुप्ता असं आहे. हि कविता खूप सरळ सोप्या नी साध्या थीमवर लिहिलेली आहे. गरीब बाप आपल्या मुलीची समजूत काढत आहे, त्या मुलीला शाळेत मैत्रिणींनी चिडवल्यामुळं ती खूप रडवेली होऊन रडतच वडिलांकडे येते नी वडील तिची समजूत घालतात. बस फक्त दोन ओळीत सांगता येईल एवढीच हि थीम कवी 8 कडव्यात लिहून जातात. अतिशय भावस्पर्शी आणि काळजाला हात घालणारे शब्द आहेत,

1.
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

वडील मुलीला विचारत आहेत, काय झालं बाळ तुझे डोळे असे पाण्यानं का भरलेत. डोळे पाण्यानं भरण्याला त्यांनी गाई पाण्यावर आल्या अशी अफाट उपमा दिली आहे. का रडतेस बाळ तू, आई आणि वडील अशा दोघांच्या कुटुंबाची लाडकी लेक तू, रंगानं गोरी आणि सगळ्यांची आवडती अशा तुला कोण बरं बोललं?

2.
तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
“अहा,आली ही पहां भिकारीण”

तुझ्या अंगावर अजिबात दागिणे नाहीत, स्वतःच्या दागिन्यांचा गर्व करून तुला शाळेतील मुलींपैकी कुणी 'हि बघा भिकारीण आली' असं बोललंय का बाळे

3.
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

अतिशय दुःखी झालेला पिता पुढे आपल्या मुलीची समजूत घालत आहे, अगं कुणी बोलल्याने तू भिकारीण होणार आहेस का, चिखलात उगवलं म्हणून कमळ भिकारी ठरत का, धुळीत पडलेलं रत्न भिकारी होतं का, साध्या धाग्यात ओवला म्हणून फुलांचा हार भिकारी असतो का, नाही नं मग तुही कशी बरं माझ्यामुळं भिकारी होशील.

4.
नारीमायेचे रुप हे प्रसिध्द
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिध्द
तोच बिजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

पुढे मुलीला समजवताना त्याच्यातला बाप तिला स्त्रियांच्या मूळ आणि उपजत गुणांचीपण जाणीव करून देतो. स्त्रियांना जन्मतः एकंदरीतच दागिन्यांचा सोस आणि आवड असते तेच बीज तुझ्यात आले नसेल तरच नवल.तू तशीच इतर स्त्रिया मुलींप्रमाणे नटण्या मुरडण्याकडे वळशील बघ.

5.
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सूवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

वडिलांना आपल्या मुलीची हौस पुरवायची कोण आवड ते म्हणतात, तुला मखमलीचे पोलके, मोत्याची कुडी, सोन्याचे कानातले फुल सगळं सगळं घेईन आणि तुझी हौस पुरविण पण हा अश्रूंचा महापूर आवर आता.

6.
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

बापानं मुलीला सांगितलं की मी तुझी सगळी हौस पुरविण तसा जीव खूप न लेकीवर पण गरिबीमुळे तिचे कोडकौतुक करता येत नाही म्हणून त्या पित्याला किती बरं यातना होत असतील, हा अनुभव ज्यांनी घेतला असेल ते बरोबर बापाच्या मनीची व्यथा समजतील

7.
देव देतो सद्‍अगुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

तुझ्या सारख्या सद्गुणी मुलांना देव का बरे आमच्यासारख्या करंट्या लोकांच्या पदरात घालत असेल, थांब मुली आता मी लांब तिकडे देवाच्या गावाला जातो आणि त्याला यामागचं कारण विचारतो.

8.
"गावी जातो” ऎकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालुनी करपाश रेशमाचा
वदे,”येते मी, पोर अज्ञ वाचा”

आपले वडिल लांब कुठं गावाला जातायेत म्हटल्याबरोबर मुलीची बालसृष्टी तिचं लहानगं जग एकदम बदलून गेलं. आणि लेकीने लगेच बापाच्या गळ्याला मिठी मारली आणि तुम्ही कुठं जाणार असाल तर मी पण सोबत येते असं म्हणाली.

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये

सनी बदमाश गँगचा मेंबर, नुसता राडा करण्यात पटाईत. त्यात त्याचाही दोष न्हवता म्हणा आई लहानपणीच गेलेली, वडिलांचा सगळा वेळ पोट भरण्यासाठी वणवण करण्यातच जाई कुठलंही ठराविक काम न्हवतं, मिळेल ते काम करत असत. मुलाला वळण लावायला त्यांच्याकडे वेळच न्हवता. सनी गुंड मवाली झाला नसता तरच नवल. देवानं चांगलं रंगरूप दिलं होत, धिप्पाड शरीरयष्टी होती. पण कारनामे असे होते कि पंचक्रोशीत त्याच्या नावाचा वेगळ्याच प्रकारचा दबदबा होता. त्याच त्यालाही काही विशेष वाटत नसे, तो आपल्याच मस्तीत जगत होता. गद्धे पंचवीशीतला सनी मस्त मजेत जगत होता आणि एक दिवस त्याची नजर त्याच भागात रहाणाऱ्या एका मुलीवर पडली. तिचं नाव नीता एकदम साधी सरळ, मध्यमवर्गीय घरातली मुलगी. दिसायला रूप मात्र लाखात एक. तिला भुलवण्यासाठी सनीच्या निरनिराळ्या क्लुप्त्या सूरु झाल्या, सुरवातीला त्याला टाळणारी नीता हळूहळू चोरून द्याच्याकडे बघू लागली, त्याचं पिळदार शरीर तिला खुणावू लागलं. आणि लपुनछपुन भेटी गाठी पण सुरु झाल्या. त्याचं रांगडेपण तिला भूल घालत होतं, घरच्यांशी खोटं बोलून ती त्याला भेटू लागली, हिंडण फिरणं मस्त मजेत सुरु झालं. नीता आणि सनीचं जवळ येणं हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं, मांजराने डोळे बंद केले तरी बाकीचे बघतच असतात. लवकरच हि बातमी तिच्या घरी जाऊन धडकली.

सज्जन नाकासमोर बघून चालणाऱ्या आई वडील आणि भावाच्या पोटात गोळाच आला. सनी तो मवाली आपल्या पोरीचा जोडीदार नुसत्या विचाराने त्या तिघांचेही धाबे दणाणले. नीताला सनीपासून दूर करण्यासाठी तिच्या घरचे सरसावले, गोड गोड बोलून नीताला लांबच्या एका मावशीकडे पाठवण्यात आलं, नीता घरच्यांना विरोध तरी कशाच्या जीवावर करणार ती ज्याच्यावर जीव लावून बसली होती तो दिसायला गोरागोमाटा असला तरी आपल्या काळ्याकृत्यांबद्दल प्रसिध्द होता. निताचं लग्न ठरलं,तारीख नक्की झाली , तिला घरात जवळजवळ कोंडून घातलं होतं. एकदा हि मुलगी उजवली तिचे हात पिवळे झाले की आपण सुटलो असं तिच्या आईवडिलांना वाटत होत. मुहूर्त नसून पण काढिव मुहूर्तावर लग्नाची तिथी धरली. नीता स्वस्थ बसणाऱ्यातली न्हवती तिचं मन नुसतं सनीकडं ओढ घेत होत. मैत्रिणीकरावी तिनं त्याला निरोप पाठवला नी भेटायला ये असं कळवलं, तो पण भेटायला उत्सुक होता. त्याची अवस्थापण तिच्यापेक्षा वेगळी न्हवती. भेटायला गेलं की तसंच पळून जाऊन लग्न करायचं असं दोघांनी गुपचूप ठरवून टाकलं.

सकाळपासूनच पावसाची झड लागली होती, मुसळधार कोसळत होता. नीताने आपल्या छोट्या हॅण्डबॅग मध्ये एकजोडी ड्रेस आणि थोडे पैसे घेतले, मैत्रिणीला बोलवून घेतले. ठरल्याप्रमाणे बाजारात जाऊन येतो असं आईला सांगून दोघी बाहेर पडल्या. नीताच्या सोबतच रहा नी तिला परत घरी लवकर सोड असं तिच्या मैत्रिणीला बजावायला आई विसरली नाही. त्यांच्या नेहमीच्या स्पॉटला नीताला सोडून मैत्रीण गेली, तुमचं शुभमंगल झालं की कळवा असं चिडवून ती गेली. नीता आडोश्याला उभी राहिली, श्रावणात आषाढ लागल्या सारखा बरसत होता. उभं राहून पायाला रग लागली तिथंच एका दगडावर टेकली. तास झाला दोन तास झाले सनीचा पत्ता नाही जीव कासावीस झाला. होताहोता संध्याकाळ झाली अंधारून आलं. आता तो येणार नाही याची खात्री होऊन नीता उठली, रिक्षा करून घरी आली. बाहेरचा पाऊस तिच्या डोळ्यातून कोसळू लागला प्रेमभंग, अव्हेरला गेल्याचा अपमान, आपली निवड चुकल्याचं दुःख ओसंडून वाहू लागलं. चार दिवसावर लग्न आलेलं असताना आपण असल्या माणसासाठी आई वडिलांना फसवायला निघालो होतो याची शरम पण वाटत होती.

पुढच्या काही दिवसातच नीता सौ. अजय झाली मागचं सगळं पाठीमागे सोडून नवा डाव मांडला, अजय पण तिच्यावर खूप प्रेम करू लागला. काही दिवसातच सनी तिच्या मनातून पूर्ण नाहीसा झाला कधी आठवलाच तर त्याच्याबद्दल फक्त चीड आणि संताप वाटे. प्रेमाच्या वाटेवर फसवणूक करणाऱ्याबद्दल तिला आपुलकी तरी का वाटावी. अजय आणि नीताच्या लग्नाला 2 वर्ष उलटून गेले, लवकरच त्यांच्या कुटुंबात छोटंसं गोड बाळ येणार होत. अजयच्या मित्राकडे काहीतरी कार्यक्रम होता म्हणून नीता नी तो असे दोघे तयार होऊन निघाले. घराबाहेर पडतानाच पावसाळी हवा बघून नीताला नकोसं वाटत होतं. त्या मित्राच्या घराच्या पार्किंग मध्ये गाडी शिरता शिरता हलक्या श्रावणसरींनी चांगलंच उग्ररूप धारण केलं होतं. पार्किंग एरियापासून मुख्य प्रवेशद्वार जरा दूर होतं, तिच्या तलम साडीकडं नजर टाकून अजय म्हटला, तू इथंच थांब मी आतून छत्री आणतो आणि तो पळतच आत गेला. ती अजयची वाट बघत उभी होती तितक्यात आपल्याकडं कुणीतरी बघतय याची जाणीव होऊन तिनं इकडं तिकडं पाहिलं तर समोरच्या पॅसेज मध्ये सनी उभा होता, तोच रुबाब तोच देखणा चेहरा.

ती तिथून निघायच्या विचारानं पाऊल पुढे टाकणार तोच सनी झपझप तिच्या दिशेने आला. तिच्या समोर उभा राहून एकवार त्यानं तिचं निरीक्षण केलं, नजर तिच्या मंगळसूत्रावर रेंगाळली. त्याच्या नजरेत थोडी विश्शनता नीताला जाणवली. ती बोलायला तोंड उघडणार तोच दुरून तिला अजय छत्री घेऊन येताना दिसला, नीताच्या काळजात धस्स झालं. हा गुंड मवाली सनी अजयसमोर काहीबाही बरळला तर माझ्या संसाराचं काही खरं नाही असा विचार झटकन तिच्या डोक्यात चमकून गेला. भित्र्या हरिणीसारखी ती जवळ येणाऱ्या अजयकडे आणि समोर उभ्या असलेल्या सनीकडे बघत होती. अजय जवळ येत 'अगं चल लवकर' असं तिला म्हटला तोच पुढे होऊन सनीने त्याला शेकहॅण्डला हात पुढे केला,'मी सनी नीताच्या घराजवळ रहात होतो, तुम्हाला भेटून आनंद झाला' अजय पण फॉर्मलिटी पूर्ण करून छत्री उघडून पुढे गेला, मागून नीता खाली मान घालून सनीच्या जवळून पुढे गेली, जाताजाता तिनं त्याचे हळुवार आवाजातले शब्द ऐकले जे फक्त तिच्यासाठी होते,'मी इतका वाईट नाही गं, त्यादिवशी माझा अकॅसिडेंट झाला म्हणून येऊ शकलो नाही, तू संसारात खूप पुढे गेलीस अशीच सुखी रहा'

'का आला हा आताच नको तेव्हा समोर आणि परत चूक त्याची न्हवतीच कि, इतके दिवस त्याला दूषण नी दोष देऊन संसारात रमले आता हे मला जमेल का, छे जमलंच पाहिजे' एक ना अनेक विचार तिच्या डोक्यात घिरट्या घालत होते, अजयसोबत चालताना बाहेरचा श्रावण तिच्या डोळ्यातून पण बरसू लागला होता, नशीब पावसाचं पाणी चेहऱ्यावर येत होतं म्हणून अजयला तिचं रडणं दिसणार न्हवतं, ती कधी ते दिसू पण देणार न्हवती.

रिमझिम प्रेम

दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती, हवेत मस्त गारवा पडला होता. अशा वातावरणामुळे जुई खूपच खूष झाली होती, पावसामुळं आलेला गारवा तिला खूप आल्हाददायक वाटत होता. अशा वातावरणात काही तरी भारी करावं असं तिला राहून राहून वाटत होतं. तिचे आईबाबा नेहमी अशी छान पावसाळी हवा असली कि गरमागरम कांदाभजी आणि चहा असा भारी बेत करतात. पण आज कांदाभजी नको वेगळं काहीतरी करावं असं वाटत होतं, दिवसभर घरात अडकून पडल्यानं सगळी एनर्जी शरीरात साठून राहिली होती ती बाहेर पडणं आवश्यक होतं. ऐनतारुण्यात असल्यानं असणारी चपळता, चंचलता यामुळं जुईचे पाय घरात टिकतच नसतं , कॉलेजमध्ये आपल्या स्वभावाने ती सगळ्या मित्रमंडळीत प्रिय होती तरी तिचा जवळचा खास असा एकही मित्र न्हवता. इतक्या सुंदर मुलीला प्रियकर नसावा याचं खूप लोकांना आश्चर्य वाटत असे. खरं तर तिला अजून कुणीही भावलाच न्हवता डोळ्याच्या दारातून मनामध्ये अजून कुणी आलाच न्हवता.

हळूहळू पाऊस कमी झाला तशी जुई पटकन उठली 'आई मी आले गं एक राउंड मारून' असं ओरडत तिच्या ऍक्टिवाची चावी घेऊन बाहेर पळाली. गाडी रस्त्यावरून सुसाट चालली होती, जुईने गार हवेचा दीर्घ श्वास घेतला, ओढणी वाऱ्यावर उडत होती. मस्त स्वैर पक्षिणी प्रमाणे ती गाडीबरोबर उडत होती. अर्धातास राउंड मारून झाल्यावर आता पुरे घराकडे परतावे असा विचार करून ती परत फिरली. काही अंतर गेल्यावर तिच्या गाडीने भन्नाट गचका दिला आणि गाडीसहित जुई जमिनीवर आदळली. नशीब गाडीचा वेग कमी होता म्हणून फार लागलं नाही पण अचानक पडल्याने तिला पटकन उठता येईना तेवढ्यात मागे एक स्कॉर्पिओ येऊन थांबली. ती गाडीकड बघत असताना स्कॉर्पिओ मधून एक अतिशय रुबाबदार तरुण बाहेर आला. पायात टॉमबॉयसारखे बूट, जीन्स, ब्लॅक शर्ट, लेदर जॅकेट, हातात सलमान स्टाईल ब्रेसलेट, केस बारीक कापलेले, मेन्टेन केलेली ट्रिम दाढी, भरदार शरीरयष्टी. जुई एकटक सगळे बारकावे निरखत होती आणि तो तिच्याकडं बघत बघत पुढं आला खाली वाकून तिला हात दिला. नकळत जुईने आपला हात त्याच्या हातात दिला, त्याने ओढून तिला पायावर उभं केलं मग तिची गाडी उचलून स्टॅन्डला लावली. स्वतःचे हात पॅन्टला पुसत 'तुम्हाला लागलं तर नाहीना' त्याने चौकशी केली जुईने फक्त नकारार्थी मान हलवली. तिचं भांबावनं बघून त्याच्या ओठावर हसू आलं तसा तो अजून छान दिसू लागला जुई वेड्यासारखी एकटक त्याच्याकडं बघतच होती. आणि लख्खकन तिच्या डोक्यात प्रकाश पडला पहिल्या नजरेत प्रेम हे तर न्हवे, ती अजूनच गडबडून गेली. तो तिच्या चेहऱ्यावर झरझर बदलणाऱ्या भावनांचा खेळ बघत होता, तिला वाटणारं आकर्षण त्याला समजलं त्याच्यातल्या पुरुषाने ते लगेचंच जाणलं. त्यालाही ती आवडली होती, डॅशिंग, गाडीवर सुसाट पळणारी, पहिलं प्रेम ऊमजताच गालावर लाली चढलेली.

तो लवकर भानावर आला, आपण रस्त्यात उभे आहोत आणि गाड्या बाजूनं जातायेत. त्यानं हलकेच परत मगाचच प्रश्न विचारला तिनं मघासारखीच मान हलवली. ती सुरक्षित आहे हे कळताच तो त्याच्या गाडीच्या दिशेने गेला तीन झटकन पर्स उघडली आणि आपला मोबाईल फोन बाहेर काढला. गाडीत बसताना त्यानं सुचकपणे गाडीच्या मागच्या काचेकडे बोट केलं आणि गाडी सुरु केली तिच्या जवळून गाडी जाताना त्यानं डोळेभरून तिला बघून घेतलं. गाडी पुढं गेल्यावर तिनं मागच्या काचेवर बघितलं त्यावर एका कंपनीचं नाव आणि काही फोन नंबर होते, खाली मालकाचं नाव आणि मोबाईल नंबर होता. झटपट आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून तिनं त्या नाव आणि नंबरचा फोटो काढला. तिनं फोटो काढलेला त्याला रिअर मिरर मध्ये दिसलं , छानसं हसून त्यानं गाडी सुरु केली. तिनं पर्स डिकीत ठेवून आपली ऍक्टिवा सुरु केली आणि पावसाची रिमझिम पुन्हा सुरु झाली, आता तिला पावसाची पर्वा न्हवती, आयुश्यातलं पहिलं प्रेम तिला गवसलं होतं. तिचं तनमन एका अनोख्या पावसात चिंब झालं होतं , हा पाऊस तिच्यासाठी नव्या भावना नव्या उमंगा घेऊन आला होता , पावसात भिजत ती घराकडे निघाली

Thursday, 22 December 2016

कृष्णच दिसतो सगळीकडे

असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस

ग्रेसच्या कवितेतील या ओळी जीव कासावीस करायला पुरेशा ठरतात. रूढार्थाने मी स्वतःला नास्तिक समजते, कुठलंही कर्मकांड मी करत नाही. प्रश्न विचारणे , चिकित्सा करणे या सवयी अंगात मुरल्याने मला कुठलीच गोष्ट लवकर भुरळ घालू शकत नाही. या सगळ्याला अपवाद कृष्ण. का कुणास ठाऊक मला कृष्णाबद्दल कधीही चिकित्सा करावीशी वाटली नाही, वाटतंच नाही, मी त्याच्या प्रेमात आहे असं म्हणायला हरकत नाही

महाभारत होऊन गेलंच नाही काल्पनिक गोष्टीवर कसं काय तुम्ही प्रेम करता असं म्हणायला माझा एक मित्र नक्कीच सरसावून येईल ☺ पण काल्पनिक तर काल्पनिक कृष्ण मला आवडतोच. सोळासहस्त्र स्त्रिया होत्या की शरीरातील नाड्या काहीही असेल त्याचा हा स्वामी, कर्ता करविता सगळं करून नामानिराळा कृष्ण. अत्यंत मुत्सद्दी युद्ध जिंकायला प्रयत्नांची शर्थ करणारा प्रसंगी कपटही करणारा कृष्ण मला प्रिय आहे. माझा स्वभाव तसा जरा तापटच मला राग आला की डोकं कामातून जातं पण कृष्ण आठवला कि मन आणि डोकं शांत होतं , हे असं का होतं याचं माझ्याकडे कसलंही स्पष्टीकरण नाही. राधेला मिळाला तो एकटाच असला तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तो मिळतोच मिळतो.

कृष्ण मला सगळीकडे दिसतो जाणवतो, मी ज्या ज्या व्यक्तीवर गोष्टीवर प्रेम करते त्यात मला तो दिसतो. कृष्ण मला सकाळच्या कोवळया उन्हात दिसतो, झाडाच्या पानात दिसतो, तो मला आल्हाददायक वाऱ्यात दिसतो, रिमझिम पावसात दिसतो. कृष्ण मला एखादया छानशा सुरेल गाण्यात ऐकता येतो. कृष्ण मला नवऱ्याच्या सरळसोट नाक आणि उंच कपाळात दिसतो, माझ्या मुलीच्या खळखळून आलेल्या हस्यात दिसतो.

कृष्ण मला सावळ्या रंगात दिसतो, कुरळ्या केसात दिसतो, टपोऱ्या तेजस्वी डोळ्यात दिसतो, कपाळावरच्या खुणेत दिसतो, शांत समंजस मौनात दिसतो, मनमोहून टाकणाऱ्या अर्धवट बोलात दिसतो, मुलांना जोजवणाऱ्या बापात दिसतो, प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसात दिसतो.

Tuesday, 20 December 2016

नवा अध्याय

मित्र-मैत्रिणींनो,
२0१६ या वर्षाची संध्याकाळ सुरू आहे. नवे वर्ष यायला आठ-दहा दिवसांचा अवकाश आहे. नव्या वर्षाचे स्वागत नव्या ब्लॉगने करते आहे. धर्म, अर्थ, समाज, राजकारण अशा विविध विषयांवरील विचार घेऊन या ब्लॉगवर तुम्हाला नियमित भेटत राहीन.

हा ब्लॉग आयुष्याच्या वाटचालीतील एक नवा अध्याय ठरावा, ही मनोमन दयाघनाकडे प्रार्थना, तसेच आपण माझे शब्द गोड मानून घ्याल ही आपणाकडून अपेक्षा.

आपली
अर्चना