Wednesday, 28 December 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रिय असलेली व्यक्ती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अगदी लहानात लहान किंवा मोठ्यात मोठ्या गोष्टी, घटनेवर व्यक्त होता येणं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती असावं या प्रश्नावर माझं उत्तर असेल कि ज्याला जेवढं हवं तितकं असावं, अमर्याद असावं. ज्याला जे बोलायचंय ते बोलता यावं , त्या व्यक्तीचे म्हणणं आपल्याला नेहमीच पटणारं असेल असं नाही. आपल्या मताशी न जुळणारी मतही शांत पणे ऐकून घेता आलं पाहिजे, दरवेळी माझंच खरं असं म्हणून चालत नाही. मतभेद असल्यास प्रतिवाद करण्याचे पर्याय आपल्याकडे असतातच फक्त चर्चेत कडवटपणा टाळला गेला पाहिजे. अभिव्यक्ती मुळे कुणाच्या जीवाला घात होणार असेल किंवा बोलण्यामुळे हिंसेला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र ते बेकायदेशीर आहे. एरवी प्रत्येकाला व्यक्त होण्याचा संविधानिक हक्क आहे.

नोटबंदी विरोधात मी बऱ्याच पोस्ट टाकल्यात काही खोचक टोमणेवजा लिहायचा मी प्रयत्न केला तेव्हा बऱ्याच कमेंट्स अशाही आल्या की राजकारणावर लिहू नको मित्र दुरावतात, पण असा सल्ला देणारेच दुसऱ्या पोस्टींवर नमोनमो चा जयजयकार करताना किंवा विरोध करणाऱ्यांची टिंगल करताना दिसले, मग असे हे सल्ले मला फसवे वाटतात. कशाला विरोध करता आता काही उपयोग नाही किंवा अडीच वर्ष काही बोलूच नका असंही ऐकावं लागलं. का नाही बोलायचं कुठलाही निर्णय योग्य कि अयोग्य हे त्यातून निष्पन्न होणाऱ्या आउटपुट वर अवलंबून असतं, सध्या तरी आउटपुट दिसत नाहीत. प्रचंड बहुमताने आलेल्या सरकारला प्रश्न विचारायचा हक्क भारतातील शेवटच्या नागरिकालाहि असायला हवा. आणि प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचा इतर नागरिकांनी सन्मानच करायला हवा तेही जमत नसेल तर खिल्ली तरी उडवू नये कारण तुम्ही नागरिक तसे इतरही नागरिकच आहेत. माझे कितीतरी मित्र नोटबंदीच समर्थन करतायेत मी अजिबात त्यांना विरोध केलेला नाही उलट या तात्पुरत्या वादळाने मित्र गमावू नयेत म्हणून मी कित्येक जवळच्या लोकांशी प्रयत्नपूर्वक वाद टाळले आहेत.




तात्पर्य - नागरिकशास्त्र शिका रे जरा

No comments:

Post a Comment