Wednesday, 28 December 2016

फसवणूक

नारबा पुण्याला निघाला होता, सकाळची पहिली एस.टी. गाठली, स्वारगेटला गाडी लागली तेव्हा 10 वाजून गेले होते, नारबा उतरला, आळस देऊन,त्याच्या नेहमीच्या वाड्याच्या दिशेने निघाला. ऊन चांगलाच भाजून काढत होत, पाऊस लागायला अजून महिना पंधरा दिवस होत, तोवर काय तो धंद्याचा टाइम, एरवी गावाकडं कुणाच्यातरी शेतात मोलमजुरी करावी लागायची. त्यातून कारभारीन आजारी, सारख्या पोटदुखीने हैराण झाली होती,औषधाचा खर्चपण परवडत नव्हता, आपल्याच विचारात नारबा चालला होता.

वाड्याच्या दारात पोचताच अंगणात खेळणारी पोरसोर पळत आली, नारबा पारावार बसला, 'ये पोरांनो तुमच्या आईबाला बोलवा भाईर' सगळे लोक बाहेर आले, एकीने पाण्याचा तांब्या आणला, नारबा पाणी पिऊन, बोलला 'हा बोला ताई, कुणा कुणाची घर शेकरायचीत यंदा' 'नारबा, आमच लय गळतय बघ, मागल्या वर्षी नाय केल , यंदा हेळसांड करता नाय येत' मालनबाई बोलली 'बघ बरं, जरा आत ये , किती खर्च येईल, तूच करतोस दरखेपेला' नारबा कपडे झाडत उठला, 'चला ताई' घरात जाऊन आतून बारकाईन निरीक्षण करत, शेजारच्या झाडावर चढून छपरावर गेला, 'ताई, कौलं तर लय फुटल्याती , शेकडाभर तरी लागतील बघा' नारबा वरूनच ओरडला 'अरे काय कराव, ही पोर जरा ऐकत नाहीत, सारखी जांभळाला दगड मारतात, कौल फुटली बघ'

नारबा घरावरून खाली आला ,'ताई,शेकडाभर नळीची कौल , आणि 50एक विंग्रजी लागतील बघा, परत चटया, कामटि अस सगळे लागलं , अंदाजानी 4 हजार खर्च ईल' मालनबाई विचारात पडली 'ठीक आहे, दुपारी 2 वाजता , मालक जेवायला येतील, तेव्हा ठरवू. तू आराम कर, जेवण देते तुला,खाऊन घे' नारबा जेवण करून, झाडाखाली सावलीला पडला, मालनबाईचे मालक आले, दोघांनी बोलाचाली केली, शेकरायला लागणारे समान, मजुरी अस सगळे अडीच हजारावर ठरले. पण आता सामान आणून काम पूर्ण होणार नसल्याने, मालनबाईन संगितले 'आज सामान आणून ठेव , आणि उद्या काम कर' दोन हजार रुपये अडवांस घेवून नारबा बुरुडआळी कड गेला. नारबा गेला , आणि एक 17-18 वर्षाच पोरगं आल, 'आमच, आबा हायेत का ? शेकरायच काम करत्यात' 'अरे तो आत्ताच गेलाय बुरूडआळीत, पण तू रं कोण' मालनबाई. 'मी पोरगा त्यांचा, बघतो मी त्यान्ला' अस म्हणून पोरगं गेल.

नारबा बुरुडआळीत नुकताच पोचला, ओळखीच्या दुकानदाराशी काय काय सामान पाहिजे, भाव काय ह्याची विचारपूस करू लागला. तेवढ्यात त्याचं पोरगं आल, 'आबा, आईला लय पोटात दुखाय लागलय, दवाखान्यात नेल्त, दाग्दर म्हंत्यात आपरेश्न कराव लागलं , 2-3 हजार तरी खर्च व्हईल'नारबा एकदम गडबडून गेला गप्पकन खालीच बसला 'आरं, आता रं कस कराव, अत्ताशीक एक काम भेटलय, कुठून आणायच रं इतक रुपय' नारबाला घाम फुटला, घाम पुसूता पुस्ता विचार करू लागला नकळत हात खिश्यात गेला , हात बाहेर आला तेव्हा 2 हजारच्या नोटा होत्या हातात, काय कराव आयष्यभरचा विश्वास तोडायाचा, का कारभारणीचा जीव बघायचा , एका सेकंदात नारबा उठला , गडबडीनं पोराच्या हाताला धरून म्हटला 'चल लेका,लगोलग गाडीन गावी जाऊ,हायेत माझ्याकड पैकं' तासाभरान नारबा गावाच्या गाडीत बसला आयुष्यभर ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला होता, तोच विश्वास आज त्याला तोडावा लागला होता. त्यानंतर कितीतरी पावसाळे आले गेले नारबा मात्र पुण्याकडं फिरकला नाही , मजबूरीपाई केलेली फसवणूक आयुष्यभर त्याचं मन खात राहिली.

No comments:

Post a Comment