Sunday, 9 December 2018

ना उम्र की सीमा हो

ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन
जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन

ही गझल खुपजनांना आवडते. प्रेमाला वयाचं बंधन नसतंच... बंधनं पाळतं ते प्रेम कसलं, प्रेम अटी आणि शर्थी घालून होत नसतं, खासकरून वयाची अट. राधा ही कृष्णापेक्षा वयाने मोठी होती, श्रीकृष्णाच्या विवाहित पत्नींऐवजी आजही राधेलाच कृष्णाचं अर्धअंग मानलं जातं.

भारतीय संस्कृती पुरुषप्रधान, पत्नीने पतीपेक्षा वयाने लहानच असावे हा अलिखित नियम जणू. हा नियम भेदून राधाकृष्ण प्रेम चिरंतन कसे झाले हे गूढ वाटावे असं इथलं वास्तव आहे. आत्ता आता पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यँत बहुपत्नीत्व होतं, बऱ्याचदा पुरुष हे बायकोपेक्षा वयाने बरेच मोठे असत. जुनी आत्मचरित्र वाचली तर काही न्हवे बऱ्याच ठिकाणी नवरे हे बायकोपेक्षा वीसवीस वर्षानीसुद्धा मोठे दिसतात. जरठकुमारी विवाहाचे अनेक प्रकार त्याकाळी समाजात सर्रास होत असावेत, पैशाच्या जोरावर म्हातारपणात कोवळ्या मुलींशी लग्न करणं ह्यात मोठेपणा मानला जात असावा. जरठकुमारी विवाह रोखण्यासाठी त्याकाळी सामाजिक प्रबोधन करण्यात आले किंवा कसे याबद्दल मी अनभिज्ञ आहे मात्र संगीत शारदा नाटकात आणि कुंकू सिनेमात हा विषय घेऊन तसा प्रयत्न केल्याचे दिसते.

पतीचं वय जास्त असणं हे इतकं सवयीचं झालंय की पत्नीपेक्षा वयाने लहान असलेले नवरे खूप खुप रेअर आहेत, आणि जे काही मोजके आहेत त्यांच्याकडे एलियन असल्यासारखं बघितलं जातं. माझ्या माहितीत पती पेक्षा वयाने मोठी असणारी पत्नी म्हणजे नर्गिस दत्त आणि अमृता सिंग. अजून नावं असतीलही पण ही नावं ठळकपणे पटकन आठवतात. सिनेमाच्या ग्लॅमर जगातही ह्या गोष्टींची चर्चा झालीच पण पेज थ्री दुनियेत सगळे ऑड्स सामावून घेण्याचा एक चांगला गुण आहे, ह्यांनाही सन्मानाने सामावून घेतलं.

हे सगळं आठवायचं आणि लिहिण्यामागचं कारण म्हणजे आताची फेवरेट सिरीयल 'तुला पहाते रे' आणि निक प्रियांकाचं लग्न. तुपारे मध्ये हिरो वयाने जास्त आहे आणि हिरोईन लहान आहे त्याउलट निक वयाने लहान आहे. ह्या दोन्ही प्रकारांवर सध्या टीका सुरू आहे. वेगवेगळ्या जोक्स , मेमे मधून टीकेची झोड सुरूच आहे. तुपारे म्हणे मुलींवर वाईट परिणाम करेल म्हणून सिरीयल बंद करावी अशी याचिकासुद्धा दाखल करण्यात आली आहे. निक आणि प्रियांकावर जी टीका होत आहे ती तर अगदी खालच्या दर्जाची आहे, त्यात निक परदेशी त्यामुळे टीका विनोदि तर आहेच पण काहीवेळा विकृतसुद्धा बघायला मिळाली. नवरा वयाने थोडा लहान आहे म्हणून त्याला गोद घेतलंय म्हणजेच दत्तकविधान हे जोक विकृतीचा गंध घेऊन येतात. निकला त्याच्या उंचीवरून सुद्धा टोमणे मारले गेले , का तर नवरा हा उंचच असावा ही आणखीन एक पुरुषी इगो जपणारी मानसिकता. मुळात कुणी कुणावर प्रेम , लग्न करायचं तो ज्याचात्याचा विषय आहे. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे मानणारे आपण ह्या पवित्र बंधनांच्यावर तर बोलूच नाही.

इथे मला राजकपूर, नर्गिसचा किस्सा आठवतो. राजने नर्गिसचा खूप त्रास दिला हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, ती अगदी आत्महत्या करण्याच्या विचारात होती आणि तेव्हाच तिला सुनील दत्त भेटला. सुनील दत्त वयाने नर्गिसपेक्षा लहान पण त्याने शेवटच्या श्वासापर्यंत तिची साथ दिली अगदी ती गेल्यावर सुद्धा तिच्या नावाने टाटा हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड बनवून दिला. तर सुनील दत्त उंच म्हणून राज त्याच्यावर जळायचा, एका पार्टीत राजने नर्गिसला कुजकटपणे बोलला की हा माझ्यापेक्षा उंच आहे म्हणून तुला आवडला का. तो खरंच तुझ्यापेक्षा उंच आहे शरीराने आणि मनाने देखील हे नर्गिसचं उत्तर होतं. मनाची उंची गाठणं सोपी गोष्ट नाही.

बघून, ठरवून केलेल्या लग्नात वयातली अंतरं फार नसतात. त्यातूनही मुलगा पैसेवाला असेल आणि मुलगी देखणी पण परिस्थिती गरिबीची असेल तर आईवडील अशी लग्न हौसेनं लावून देतात. श्रीमंत मुलाला मिरवायला ट्रॉफी वाईफ मिळते आणि मुलीला रूपाच्या जीवावर ऐश्वर्य भोगायला मिळते. वयातली उलटसुलट अंतरं ही प्रेमविवाहात बघायला मिळतात... जो समाजात राधाकृष्णाला पूजतो तोच समाज अशा प्रेमप्रकरणाकडे बघताना निष्ठुर का बरं होत असावा. सिरीयल ही करमणूकीचा विषय उरावी त्यावर टिंगल, जोक्स ठीक आहेत परंतु नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या निक आणि प्रियांकाला शुभेच्छा द्यायचे सोडून हलके विनोद करण्याची बुद्धी येणे ही प्रगल्भता नक्कीच नाही, भारतीय संस्कृती इतकी कमजोर कशी झाली? हॉलिवूड, बॉलिवूड मध्ये लग्न फारशी टिकत नाहीत असा दावा विनोदीवृत्ती करतीलही तरीही गैर ते गैरच. टीका जरूर असावी पण जिथे पातळी घसरते आणि त्यावरही लोक मजा घेऊन स्वतःची करमणूक करून घेतात तेव्हा समाजाच्या मानसिक आरोग्यविषयी काळजी वाटू लागते.

त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं
तुमच्या बापाचं काय गेलं

वयाचा आकडा प्रेमात वाकडा होऊन आडवा येत नाही ही खूणगाठ मनात बांधा आणि लेखाच्या अगदी सुरवातीला दिलेली गझल मनसोक्तपणे ऐका.

Sunday, 28 October 2018

यश म्हणजे काय असतं

#यश मिळणं , यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय. यशाने हवा डोक्यात जाते, यशाचे शॉर्टकट्स, यश बघून लोकं जळतात, अर्ध्या हळकुंडात पिवळा हे आणि असे अनेक शब्दप्रयोग ऐकलं की यशाची महती पटते. भौतिक सुख मिळणं हे सर्वमान्य यशस्वी असल्याचं लक्षण समजलं जातं. पैसा, कीर्ती, संतती, मनाजोगता जोडीदार मिळाला की माणूस यशस्वी झाला रे झालाची अघोषित दवंडी पिटली जाते आणि सुरू होतो त्या व्यक्तीच्या परीक्षेचा काळ. भले त्या व्यक्तीला आपण यशस्वी आहोत हे माहीतही नसते पण लोकांच्या नजरेतून ते हळूहळू समजू लागतं. यशस्वी आहेस ना मग तुझं साधं बोलणं ही अहंकारी वाटू लागते जे आधी आत्मसन्मान कॅटेगरीत मोडत असतं. यशस्वी होणं इतकं वाईट असतं की चोवीस तास अंडर सर्व्हिलन्स रहाणं नशिबी येतं. अनेक नट, लेखक, राजकीय नेते ह्यातून जात असतात. सोशल मिडियामुळे इथे वावरणारे कित्येक सामान्यजन सेलिब्रिटी स्टेट्सला जाऊन पोचले आणि थोडं का होईना त्यांच्या नशिबी हे सीसीटीव्ही प्रकरण आलं. चोवीस तास निगराणी असणे चांगली गोष्ट असावी की नसावी, सेलिब्रिटीना सामान्य माणूस म्हणून जगू द्यावं की नाही हे असे अनेक प्रश्न सोशल मिडियामुळे तुमच्याआमच्या वॉल पर्यँत येऊन ठेपले आहेत. एकमात्र सगळ्यांनी लक्षात ठेवावे की आभासी जगातलं यश आभासी असतं त्याने कुणी हुरळून जाऊ नये की कुणावर डूख धरू नये, अभासातून जितकं वास्तवात याल तितकं यशाच्या अधिक जवळ पोचाल.

यश जर का भौतिक सुखात असेल तर मग राज्यसुख सोडून सिद्धार्थ गौतम संन्यस्त का झाला असावा? यश जर पैशात असेल तर ज्यांच्या उश्या पायथ्याशी लक्ष्मी पाणी भरतेय ते सगळे अजून पैसा कमवायच्या मागे का असावेत ? यश जर चांगला जोडीदार मिळण्यात असेल तर यशस्वीपणे संसार असलेली लोकं उंबऱ्याबाहेर कोणतं सुख शोधत असतात ? या व अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवायला थोडा डोक्याला ताण दिला की बऱ्याच गोष्टींचं आकलन होईल. यश मिळणं, यशस्वी होणं हा एक प्रवास असतो जो समाधानाच्या स्टेशनवर जाऊन संपतो. रूढार्थाने यशस्वी समजल्या जाणाऱ्या लोकांचा हा प्रवास निरंतर सुरू असतो तो समाधानाच्या शोधात. यशस्वीपणाच्या ज्याच्या त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. जो तो आपल्या मोजमापाने इतरांना तोलत असतो, खरंतर ही मोजणी चुकीची आहे. माझं यश जो पर्यंत मी स्वतः ठरवत नाही तोपर्यंत ते यश नसतं पण ते दुसऱ्या कुणाला यश वाटू शकतं कारण त्यांच्या मोजपट्टीवर ते तसं दिसतं. यशाचे शॉर्टकट्स कधीही नसतात, ही पळवाट नंतर अधिक लॉंग रूटवर आणून ठेवते. प्रत्येकाचे यशाचे रूट वेगळे, त्याची मोजपट्टी वेगळी, थांबे वेगळे पण सगळ्यांनाच घाई असते ती दुसऱ्यांना जज करण्याची. कष्टाला पर्याय नसतो त्यामुळे स्वतःला आपल्या क्षेत्रात अधिक एक्स्पर्ट बनवावे, अहोरात्र झोकून द्यावे मग यश तुमचंच आहे. वय वर्ष वीस ते चाळीस सतत कार्यमग्न रहावे आणि चाळिशीनंतर थोडं सुखासीन होत समाजासाठी काही करता आलं तर जरूर करावं. यश आपलं पोट भरून झालं तर दुसऱ्या मुखी घास भरवण्यात आहे, त्यात जे समाधान आहे ते पैशाने नाही मिळत. दुसऱ्यांसाठी काही करता येण्याची पात्रता सगळ्यांना मिळावी हीच सदिच्छा कारण ते सगळ्यात मोठं यश असतं.

#थिंक_पॉझिटिव्ह

#अर्चना

Monday, 24 September 2018

भेटी लागे जीवा

"भेटी लागे जीवा, लागलीसे आस
आतुरतेने तुझ्या भेटीची वाट बघताना होणारी कासावीस, घालमेल सांगितली ना मी तुला. पण , पण तुला मनाची ही अवस्था समजली का? ऐकलं म्हणजे सगळं समजतं असं थोडीच आहे. किती आर्जवं, किती विनंत्या केल्या असतील तुला ह्याची गणनाच नाही. प्रेमात कुठं हिशेब असतात रे म्हणून माहीतही नाही की नेमकं कितीदा तुला सांगितलं असेल की येऊन भेटून जा एकदा. तू येतो गं म्हटलास की मनातल्या पारिजातकाला बहर यायचा आणि मनातच पहाट व्हायची. एक अलगद झुळूक आणि पारिजातकाच्या पायघड्या घालायचं मन. पारिजातकाचे असे कित्येक बहर आले गेले पण तू आला नाहीस. पार चोळामोळा होऊन सुकून गेली सगळी फुलं मनातल्या मनात आणि पहाटेची रात्र झाली... मिट्ट काळोख असलेली रात्र. नेमक्या कोणत्या क्षणी विरसलं सगळंच, ती माझी आर्जवं, ती निमंत्रणे वारंवार वाया जाऊ लागली तसा मिठाचा खडा पडला आणि हळूहळू नातं फाटत गेलं. आता तितकी उर्मी उरली नाही की हाक मारावी किंवा आलेल्या हाकेला ओ द्यावी. मनाचे बंध तुटले ना की निरिच्छ होऊन जातं सगळं. आता तू समोरून स्वतः चालत आलास तरी मी बहरेन का ह्याची मलाच खात्री नाही. वूई लॉस्ट दॅट केमिस्ट्री रे... वूई मिस्ड द ट्रेन डिअर"

लिहिता लिहिता गपकन थांबली ती, कोर्टात जजमेंट दिल्यावर पेनाचं निप तोडताना सिनेमात दाखवतात त्या आवेशात तिने बॉलपेनची पॉईंट मोडून टाकली

Thursday, 20 September 2018

कविता 20/9/2018

आठवायला आधी विसरावं लागतं
खिशातल्या तुला जमेसही धरावं लागतं

आयुष्य अलगद कुस बदलताना
सुखाचा सावलीतही पोळावं लागतं

मुद्दल सगळी मोडीत काढताना
लपवलेल्या गल्ल्याला फोडावं लागतं

करताना बेरजा वजाबाक्या होत गेल्या
आता शून्याला पुन्हा गुणावं लागतं

येशील का स्वतः कधीतरी दारात माझ्या
तुझ्या वाटेवरचं दार अलगद लोटावं लागतं

जाणतोस ना नेहमीच घेतली माघार मी
जिंकण्यासाठी मात्र वादळाला भिडावं लागतं

गर्दीतल्या तुला खेचून आणणार पुन्हा मी
श्वासाला फुफ्फुसात खोल खोल कोंडावं लागतं

अलवार मिठीची , धुंद श्वासांची स्वप्नं बघताना
जगाच्या पटावर इज्जतीला मोडीत काढावं लागतं

#अर्चना

Saturday, 15 September 2018

कविता 15 सप्टेंबर 2018

नात्यांची फरफट इतकी होते
की दखल घेऊनी टाळणे होते

दिलेस भरून अश्रू ओंजळीने
फुले समजून त्यांना माळणे होते

केलेत नजरेने कित्येक जायबंदी
गोंडा घोळणारे तू पाळले होते

चंद्राची चकोर भुलली भास्कराला
जीवघेणे हे आगीशी खेळणे होते

सजला होता बाजार सुशिलेचा
तीने स्वतःस खिडकीत मांडले होते

केले प्रेम मीही अपरंपार अपार
तागडीने त्यालाही तू मोजले होते

भेटशील का पुन्हा नव्या वळणावर
जुन्या चुकांची पुस्तके रद्दीत विकणे होते

सांग ना काय जादू अशी आहे तुझ्यात
की पुन्हा पुन्हा तुझ्यावर भाळणे होते

#अर्चना

पैसा झाला मोठा

राम आणि श्याम हे दोन मित्र, ही नावं काल्पनिक आहेत बरका तर हे खूप फास्ट मित्र … दोघांमध्ये हवेलाही जागा नव्हती. दोघेही एकमेकांच्या जीवाला जीव देणारे ,आर्थिक परिस्थिती उत्तम दोघांच्याही घरी सगळे व्यवस्थित आलबेल चाललेलं. एकमेकांच्या गरजेला धावणारे मित्र हे ह्याला त्रास झाला तर त्यांना व्हावा व त्याची काही काम असेल तर ह्याने पळावे असं मस्त चाललेलं होतं दोघांच्याही घरच्या लोकांच्या ही एकमेकांच्या ओळखी होत्या दोन्ही छान फॅमिली फ्रेंड झालेले होते.  नवीन बिझनेससाठी राम जागा शोधत होता चार पाच ठिकाणी त्याने बघूनही ठेवलं होतं पण त्याला समजत नव्हतं की आता नेमकं कोणती डील फायनल करू नेमकं कळेना म्हणून त्याने शामला म्हटलं ‘चल रे जरा मदत कर मला मला या चार-पाच जागांमध्ये कोणती जागा घेऊन हे कळत नाहीये तर तू जरा मला फायनल करायला मदत कर’ झालं आता राम आणि शाम ही जोडी निघाली कामगिरीवर सगळ्या जागा दोघांनी मिळून लागोपाठ बघून घेतल्या आठ दिवस दोघे सतत फिरत होते. रामला खरंतर एक जागा जरा बरी वाटत होती पण शामचा आग्रह दुसऱ्या एका जागेबाबतीत होता. रामला काय ही नैतर ती त्यामुळे त्याने शामच्या आवडीची जागा फायनल करून टाकली. पूजाअर्चा उरकून बिझनेस सुरूही झाला, असंच जवळपास वर्ष निघून गेलं. रामचा बिझनेस मस्त सुरू होता आणि एकेदिवशी अचानक जागेचा व्यवहार करणारा एजंट त्याला रस्त्यात भेटला. अघळपघळ गप्पा मारणारा तो एजंट नकळत बोलून गेला की ह्या जागेच्या व्यवहारात शामने पन्नास टक्के कमिशन त्याच्या कडून उकळलं होतं. रामचा विश्वासच बसेना, माझा इतका जवळचा मित्र असं वागू शकतो? ह्या विचाराने राम मानसिक रित्या हताश झाला…

“माझं जे काही ते सगळं तुझंच होतं, कवचकुंडल मागितली असती तरी तुला दिली असती रे पण मला असं फसवून पैसे का घेतलेस तू?” फोनवर इतकं बोलून रामने शामशी असलेली सगळी नाती त्याक्षणी तोडून टाकली तरीही तो असं का वागला हा प्रश्न उरतोच

Tuesday, 11 September 2018

लोकं_अशी_का_वागतात



फुल्ल दारू पिऊन लडखडत घरात घुसलेल्या लखुला बघून त्याची दोन्ही पोरं पार घाबरून खाटंखाली दडून बसली, पिल्यावर सगळया जगाचा राग तो बायकोपोरांवर काढायचा आणि चोपचोप चोपायचा. त्याची बायको चार घरची धुनीभांडी करून संसार रेटत होती. लखुला चांगल्या पगाराची नोकरी पण दारूपायी पैसाच पुरत नव्हता. टोपल्यातली एकुलती एक भाकरी हातात घेऊन कढईतच कालवणात चुरून वर तांब्याभर पाणी पिऊन लखू तिथंच कलंडला. चांगली तीनचार तास झोप घेऊन थोडी उतरल्यावर मोरीत तोंडावर पाण्याचे हबके मारून लखुने खिसा चाचपडला. हातात धा धा च्या तीनचार नोटा आल्या. परत देशीवादाकडे वळायची तलफ आली तसा पायात चपला सरकवून लखू दाराबाहेर पाय टाकणार तोच धाकलं पोरगं आडवं आलं. 'बाप्पा भूक लागली, आईला यायला येळ आहे पैसं दे की, आमी दोघ तवर वडापाव तरी खाऊन येतो'. पोरांची भुकेली तोंडं बघून पण लखू जराबी पाघळला नाही उलट पोरांना ढकलून तसाच बाहेर पडला. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते, कोपऱ्यावरची कन्याशाळा सुटली होती. हिरवा स्कर्ट आणि पांढऱ्या पोलक्यातले मुलींचे थवे कलकल करत घरी निघाले होते. लखू जाताजाता पोरींना निरखीत होता, त्याचा अवतार बघून मुली लांबून लांबून जात होत्या. दोन लहानग्या बहिणीबहिणी एकमेकींच्या हाताला धरून घरी निघाल्या होत्या आणि लखुनं गपकन त्यांना अडवलं, तशा पोरी दचकून जाग्याव उभ्या राहिल्या. दोघींच्या तोंडावर मायेनं हात फिरवीत लखुने खिशातल्या चुरगळलेल्या नोटा त्यांच्या हातात कोंबल्या. घरी जाताना चॉकलेटी घेऊन खा गं अन वैनीला सांगू नका काकानं दिलं म्हणून' मान हालवून दोघी पुढं निघून गेल्या अन पुढच्या नाईन्टीची सोय करायला लखू कुणाकडं हात पसरावं ह्या विचाराने डोकं खाजवीत बराचवेळ पोरी गेल्या त्या दिशेला बघत राहिला.

स्वतःच्या भुकेल्या मुलांना खायला पैसे न देणाऱ्या लखुने भावाच्या मुलींचा लाड का बरं केला असेल.


Wednesday, 5 September 2018

शिक्षकदिन

आता शाळा आणि शिक्षक आठवायचे म्हणजे कोणेएकेकाळी वगैरे प्रकरण , चांगलंच धूसर झालेलं तरीही त्यातून काही ठळक चेहरे लक्कन चमकून जातात. पटकन आठवणारी मोजकी नावं आणि त्यातलं पहिलं नाव आमच्या कन्या शाळेतल्या संस्कृत आणि मराठीच्या पै बाई. कन्या शाळेत शिक्षिका भरणा जास्त, बापे शिक्षक जवळपास नाहीतच त्यामुळे सतत कोणी ना कोणी मॅटरनिटी लिव्हवर असे त्याला बदली शिक्षिका म्हणून तात्पुरत्या आलेल्या पैबाई खूप लवकर मुलींच्या गळ्यातला ताईत बनल्या. दिसायला बऱ्यापैकी देखण्या, शांतपणे आणि खूप रंजक शिकवण्याची पद्धत , पाठांतर करून घेण्यावर त्यांचा खूप भर असायचा.आज जे काही शुद्धलेखन आणि मराठी लिहायचा सराव आहे त्याचं पूर्ण क्रेडिट मी पै बाईंना देते. बाईंच्या साड्या बहुतेक प्लेन , सुळसुळीत आणि सायलेंट कलरच्या असत, लेमन, पिस्ता, गुलाबी , बदामी हे रंग खास बाईंसाठीच निर्माण झाले असावेत इतक्या ह्या रंगाच्या साड्या त्यांच्यावर सुंदर दिसत. लांब केसांची सैल वेणी आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फुल हमखास असे. अतिशय प्रसन्न दिसणाऱ्या पै बाई तेव्हा शॉफर ड्रीवन कार मधून शाळेत येणाऱ्या एकमेव शिक्षिका होत्या. त्यांच्या कारचं आम्हा मुलींना खूप कौतुक वाटायचं, त्यांच्या शाळेत यायच्या वेळेला आम्ही मैत्रिणी गेटजवळ घुटमळत असू आणि ती कार बाईंना सोडून जाईपर्यंत एकटक बघत असू. सुखवस्तू, संसारी , आनंदी स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच सौन्दर्य असतं ते पै बाईंमध्ये आम्हाला गवसलं. नंतर त्या पर्मनंट आमच्याच शाळेत आल्या, अगदी दहावीचा सेंडऑफ होईपर्यंत सोबत होत्या. आता त्या जिथे कुठे असतील तिथे त्यांना मनोभावे नमस्कार.

पै बाईंच्या उलट दुसऱ्या एकजण होत्या उमर्जी बाई. त्यांना माझ्या कुरळ्या केसांचा काय राग होता कोण जाणे. तेल लावून चापूनचोपून वेणी घातली तरीही माझे केस थोड्या वेळातच बंड करून स्वतःची आग्र्याहून सुटका करून चेहऱ्यावर आक्रमण करायचे. उमर्जी बाई इंग्रजी शिकवायच्या, कायम त्रासिक चेहरा खुर्ची तर कधी सोडतच नसत. खुर्चीत बसूनच शिकवायच्या आणि नेम धरून खडू टपकन माझ्या डोक्यावर मारायच्या की मी समजायचे आणि केस शक्य तितके आवरायचे. त्यांच्या तासाला शिकले कमी आणि केसच जास्त आवरले. कहर म्हणजे एकदा त्यांनी माझ्या समोरून झेपावणाऱ्या केसांना कात्रीने कापून मोक्ष मिळवून दिला. जेव्हा मला कावीळ होऊन मला शाळेतच उलट्या होऊ लागल्या तेव्हा मात्र उमर्जी बाईंनीच मला घरी सोडायची व्यवस्था केली तेव्हा कुठं थोडीथोडी त्यांच्याविषयी आपुलकी वाटली.

शाळेतून ज्युनियर कॉलेजला गेलो आणि पहिल्यांदा बॉईज आणि गर्ल्स मिक्स बॅच अनुभवली. आमचे बायोचे सर दीपक शहा, नुसता गोरापान चिकना देखणा. सरांना सर म्हणायला जीभ रेटत नसे, त्यांचं वय तिशीच असावं. शिकवायचे कसे हा प्रश्न अलाहिदा दिसायचे मात्र खूप भारी. मला खरंतर आर्टसला जायचं पण वडिलांचा आग्रह म्हणून नाराजीने सायन्स घेतलं पण सरांना बघून नाराजीचा मिस्टर इंडिया झाला. वर्गातल्या सगळ्या पोरी सरांवर फिदा आणि त्यामुळे पोरांची सरांवर खुन्नस. सरांवरच सगळ्या पोरी मरू लागल्यावर पोरांची डाळ कशी शिजावी. सरांनी मात्र ह्याचा फायदा कधीच घेतला नाही. पोरी आपल्याकडे एकटक बघतात हे त्यांनाही माहिती होतच पण ते बिचारे नुसते शिकवतच असत. त्यामुळे किती नाजूक हृदयं कोमेजली ह्याची गणनाच नाही. फ्रॉग मेटिंगचा चॅपटर शिकवताना लालेलाल झालेले आणि नंतर झटकन वर्गाबाहेर गेलेले सर, खाली मान घालून खुदुखुदू हसणाऱ्या मुली आणि एकमेकांत जोक करून हसणारी मुलं हे लिहिताना जसंच्या तसं डोळ्यासमोर फ़िरतंय. आता सर काय करत असतील कोण जाणे

सिनियर कॉलेजला मात्र कोणतेही सर, बाई म्हणावी असे आवडले नाहीत. शिक्षक म्हटले की  शाळेचेच शिक्षक आठवतात कॉलेजचे नाही ह्यामागचं कारण काय असावं बरं... कदाचित आपल्या नाजूक आणि कोवळ्या मनावर उमटणारे हे फॉसिल्स असावेत जे खूप वर्षांनी आपल्या खुणा जपून ठेवतात

Tuesday, 28 August 2018

कविता 2018

ताकानेही पोळला जीव इथे
दुधावर घ्यावा आळ कशाला

आपलेच बनतात पुरते वैरी
दुष्मनाला उगाच भार कशाला

मीही ओढते रेघा, काढते अक्षरे
अर्थहीन शब्दांचे घ्यावेत माग कशाला

माझ्यातून पुरता सरला नाही
अवकाळी पावसाचा राग कशाला

केलेस पुरते घायळही नाही
आता पुसावा हालहवाल कशाला

#अर्चना
वाटेला पावलं विसरावीत असं काही घडलंय
पुन्हा आरशाने हसणं सोडलंय

अंतरंगात डोकावणारं वहीचं शेवटचं पान तू
पुन्हा कोरंकरकरीत होऊन सजलंय

मनाला उभारी कशी यावी आता
स्वप्नं तुझ्या पापणीत डोळे मिटून निजलंय

जुन्याच खाणाखुणा अनोळखी भासतात
एका चेहऱ्यावरचं आपलेपण धुळीनं माखलंय

मीही अजून नाद सोडला नाही पुरता
बघते मी काहीतरी जे तू वळून लपलंय

#अर्चना

Monday, 27 August 2018

रँडम थोट्स

प्रेम मिळवणं म्हणजे नेमकं काय असतं बुवा? ती एखादी वस्तू थोडीचे की उचलून तिजोरीत ठेवावी... मग ते मिळवायचं कसं. त्याने हो म्हटलं , तिने हो म्हटलं की प्रेम मिळतं का? की त्या नात्याला एक नाव द्यावं आणि मॅरेज सर्टिफिकेटमधून जखडून टाकावं एकमेकांना? प्रेमाचं माणूस आपल्या मालकीचं व्हावं ही इच्छा म्हणजे प्रेम मिळवणं म्हणावं का? मालकी आली की त्याला किंवा तिला आपल्या तालावर नाचवणे ही सुप्त इच्छा ह्या मालकी मिळवायच्या मागे असावी का?  अनेक प्रश्नांची गुंतावळ
प्रेम ही आदिम तहान आहे... ते कुणावरही होतं आणि सुरू होतो हे प्राप्त करायचा खेळ... ते मिळालं रे मिळालं की माणूस सुखावतो , निर्धास्त होतो असं काही नसतं, मग त्याला कायम ताब्यात ठेवण्याची चिरंतन धडपड सुरू होते... त्याला किंवा तिला फक्त आपल्यापुरतं राखीव ठेवण्यासाठी संरक्षित कुंपण घातलं जातं, हे कुंपण ज्याचं त्याचं वेगवेगळे असतं. काही कुंपण अगदीच घरालगत तर काहींचे परीघ विस्तारित असतात. बिनकुंपणाचं नातं बहुतेक अजून जन्माला यायचंय. वो जो अपना था और किसीका क्यूँ है... ह्या प्रश्नानंतरची तडफड म्हणजे प्रेमाच्या दुनियेतलं सगळ्यात विदीर्ण करणारं दुःखं, ही तडफड व्यक्तिमत्त्व उद्धवस्त करणारी ठरते... ह्यातून सुखरूप तरला तो जिंकला
प्रेमाची तहान कधी पूर्ण होऊच नये ... ही तृष्णा कायम रहावी म्हणून ते कधी आपलं होऊ नये. आपलं झालं की त्यातला चार्म नाहीसा होत असावा आणि मग शिरापुरी पुढल्या घरीचा खेळ सुरू होत असावा... म्हणून तर म्हणणारे म्हणतात की 'प्रेम एकदाच होतं ही अंधश्रद्धा आहे'

---

शॉर्टकट लॉंगकट हे मिथ्या असावं... शॉर्टकट सिटीतून जातो तिकडे ट्रॅफिक फार असते ह्या कल्पनेनं बरेचजण शहराबाहेरच्या थोड्या लॉंगरूटने जातात आणि मग तिकडेच ट्रॅफिक जाम होऊन अडकून पडतात. शहरातून तुलनेनं लवकर मुक्कामी पोचतो

भ्याड हल्ला हा शब्द खूपदा ऐकतो, हल्ला करणारे भ्याड कसे असतील? ते तर शूरपणाचं लक्षण... शांतता हे सामर्थ्याचं चिन्ह आहे की नेभळट असल्याचं? हल्ला हा भ्याडच असतो कारण अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या मानसिकतेतून तो निःशस्त्र आणि गाफील व्यक्तीवर केला जातो. शूरपणा तेव्हाच म्हणतात जेव्हा समोरचा व्यक्ती गाफील नसतो आणि समान शस्त्रे घेऊन सज्ज असतो

शांतता सामर्थ्यवान व्यक्तीला दागिन्यासारखी शोभते. नेभळट आणि भित्र्या माणसाची शांतता ही लगेच लक्षात येते. सामर्थ्यवान व्यक्तीने शक्यतो शांतच रहावे, अगदीच नाईलाज झाला तर निसटून जावे पण कधीही परत हल्ला करू नये. 

सामाजिक एकोपा टिकवणे हे बहुसंख्य असलेल्या समाजाची जबाबदारी असते. संख्येने थोडे असलेले भीतीपोटी घाबरून तरी राहतील किंवा अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या तत्वाने वागतील

#रँडम_थोट्स

©अर्चना चंद्रसेन

Thursday, 23 August 2018

मर्द को भी दर्द होता है

आपल्या सोसायटीत किंवा आपण सध्या जगतोय त्या समाजात जे जे  वरिष्ठ आणि उत्तम मानलं जातं त्यांना तितकंच क्रीटीसाईज सुद्धा केलं जातं. ह्यात पुरुष  असणं, सुंदर असणं, श्रीमंत असणं हा अपराध किंवा गुन्हा असावा ह्यातऱ्हेनं बोललं जातं. ह्या उच्च समजल्या जाणाऱ्या लोकांना इतकं का बरं डोळ्यावर धरलं जात असेल ह्याचा विचार केला असता त्यांच्या वरिष्ठ असण्याचाच अर्थ कुणीतरी कनिष्ठ आहे आणि ते चेपले जातात हेच आहे. सगळेच थोर समजले जाणारे लोक वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मेजोरीटीने ह्या लोकांच्या एकंदरच वर्तणूक आणि बॉडी लँग्वेज मध्ये स्वतःला वेगळं आणि विशेष समजणे दिसूनच येतं. सुपीरिओरिटीचा एक प्रकारचा माज अशा लोकांच्या चालण्याबोलण्यात असतोच त्यामुळे हे लोक टीकेचे धनी होतात. ह्याच सुपिरिअर लोकांमधले काही जण बिनकामाचे ह्या सगळ्या टीकेचे लक्ष्य होतात किंवा मोठेपणाच्या ह्या अवजड ओझ्याखाली दबून जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे पुरुष असणं, पुरुष असणं म्हणजे जणूकाही पाप आहे अशातऱ्हेनं पुरुषांना लिहिलं, बोललं जातं. महिलांवर होणाऱ्या अन्याय , अत्याचाराविषयी लिहिताना समस्त पुरुषवर्ग जणूकाही बलात्कारी, जुलूमजबरदस्ती करणारा, अमानुष असा रंगवला जातो आणि नकळतपणे मी चपापुन जाते. लहानपणापासून माझ्या भोवती असणारे पुरुष असे नाहीत मग पुरुषांचं हे एकांगी रेखाटन मला खटकत जातं. माझा बाप, भाऊ, नवरा, मित्र असे जुलमी नाहीत मग सगळ्या पुरुषांना कायमच कोलत रहाणं मला तरी नाही आवडत.

पुरुषप्रधान संस्कृतीत नाही म्हटलं तरी ही मोठेपणाची ओझी पुरुषाला वहावी लागतात, मर्द को दर्द नही होता हे सगळ्यात भंपक आणि टुकार वाक्य. पुरुष असला तरी आधी तो माणूस आहे, माणूसपणाच्या सगळ्या संवेदना त्याच्याकडे असतातच. तो आनंदी होतो, दुःखी होतो, कष्टि होतो. बाई आपल्या आनंदाचं आणि दुःखाचं प्रदर्शन मनसोक्त करते, ही एकप्रकारे चैनच आहे... अशी ऐश पुरुषाला नाही करता येत. आनंद झाला तर तो त्याला एन्जॉय तरी करता येतो पण दुःखं, वेदना जाहीर करण्याचा पुरुषाचा हक्कच ही पुरुषप्रधान संस्कृती हिरावून घेते. वेदनेत, त्रासात, दुःखात ढसढसून रडणारा पुरुष म्हणजे दुर्मिळ जीव. आपल्या घरातील स्त्रियांना सांभाळणे , त्यांची काळजी घेणे, त्यांची दुःखं हलकी करताना त्यांना रडायला खांदा देणे ह्यात सहृदय पुरुष इतके जखडून जातात की त्यांच्या स्वतःच्या भावना व्यक्त करणं ते जणू विसरूनच जातात. ही दबलेली घुसमट मग त्यांना नैराश्याकडे घेऊन जाते, ह्यातूनच नशेच्या आधीन होणे उपजत असावं.

ऑफिसच्या आणि घराच्या ओढताणीत कधीतरी थकून मीही रडले आहे, मला नेहमीच प्रश्न पडतो माझ्याइतकंच थकणारे माझे सहकारी असं रडत असतील का...  स्टेशन,विमानतळावरून टाटाबायबाय करताना बायका डोळ्याला रुमाल लावताना झटकन दिसतात, आपल्या पोटचा गोळा सातासमुद्रापार पाठवताना बापाला रडू येत नसेल का... घरातील कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात धावपळ करणाऱ्या पुरुषांना टचकन डोळ्यात पाणी आणावं वाटत नसेल का ... ह्या आणि अशा अनेकप्रसंगात पुरुष कमीच रडतात, समजा ते रडलेच तर लोक काय म्हणतील म्हणून लपूनछपून रडत असतील. पुरुषांचं हे मनमोकळं न रडणं व्यसन आणि इतर डिप्रेशनची कारणं आहेतच त्यापलीकडे जाऊन ही घुसमट त्यांना आत्महत्येपर्यंतही घेऊन जाते... ही पोस्ट वाचणाऱ्या तमाम पुरुषांना तुम्हीही माणूस आहात,  कुणी सुपरमॅन वगैरे नाही आहात हे सांगू इच्छिते... दुःखात आणि आनंदात तुमचं मन तुमच्या डोळ्यांवाटे मोकळं होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा मित्रांनो... 'मर्द को भी दर्द होता है' ही नवी म्हण आम व्हावी

Wednesday, 4 July 2018

झाकली मूठ

थोर लेखक, कलाकार लोकं आपल्या मनात घर करून असतात, त्यांच्या कलाकृती आपण आवडीने वाचतो. त्यांना नावाजतो, कौतुक करतो, डोक्यावरही घेतो. आपल्या मनात त्यांच्या बद्दल उत्तम अशी प्रतिमा तयार होते. पण काही काळाने त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या बायकांची आत्मचरित्रे आपण वाचतो आणि आपल्या मनातल्या प्रतिमा धडाधड मोडकळीस येतात. आपल्या मनातल्या प्रतिमाभंजनाचे खापर आपण इतके दिवस मखरात बसवलेल्या लोकांवर फोडतो. एक आत्मचरित्र काय बाहेर येतं त्या कलाकारांची सर्वदूर बदनामी होते. ख्यातनाम आणि सगळ्यांचे लाडके लेखक पु.ल. देशपांडे आणि रणजित देसाई ह्या दोघांच्या विषयी अशीच लोकांची मनं गढुळली. नामदेव ढसाळ यांच्या बायकोचे आत्मचरित्र मी अजून वाचलं नाही पण तेही त्यांच्या खाजगी आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय असं ऐकिवात आहे.

इथे मला नेहमी प्रश्न पडतो की ही झाकली मूठ उघडली नसती तर समीक्षकानी कुणाला बरं नावं ठेवली असती, आपलं खरं रूप जगापुढे येऊ देणं म्हणजे आपल्या चुकांसाठी उठसुठ जोडे खाण्याची सोय तयार करून ठेवणं का ? मुळात आपण कुणाकडूनही अगदी कुणाकडूनही परफेक्ट असण्या वागण्याची अपेक्षा का करतो, आणि अशी अपेक्षा करणं योग्य का?  ते कलाकार आहेत, सेलिब्रिटी आहेत पण आधी ते माणूस आहेत, कुणी देवाचे अवतार किंवा अवलिया आणि चमत्कारि स्त्री पुरुष नाहीत. तुमच्या आमच्या इतकंच त्यांनाही चूका करण्याचा हक्क आहे. काही वेळा... न्हवे बरेचदा आपण आपला आणि इतरांचा चुका करण्याचा हक्कच मान्य करत नाही. चुकने ही सहजवृत्ती आहे, सराईतपणे आणि वारंवार केलेल्या घोडचुका आणि गुन्हेगारी वृत्ती मात्र ह्यात धरू नये.

खरंतर आपले खरे चेहरे जगापुढे आणू द्यायला मोठं धाडस लागतं, तुमचं आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे समोर ठेवलं तर त्याला चिकित्सा करून त्याचं पार खिळखिळ केलं जातं, ही दुनिया फार बाजींदी आहे ही तुम्हाला हसरे, परफेक्ट, बिनचूक मुखवटे घालायला भाग पाडते, मुखवटा हलला की भिंग घेऊन परीक्षण सुरू. अगदी मायक्रोस्कोप खालचा पॅरासाईट होतो तुमचा. तुमचं खरं रूप झेपत नाही जगाला म्हणून तुम्हाला आत एक बाहेर एक रहावंच लागतं. मोठेमोठे ह्यातून सुटले नाहीत , तुम्ही आम्ही तर सामान्य लोक... ह्या भीतीपायीच कित्येकजण आपल्या खाजगी गोष्टी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करत नाहीत. सहजवृत्तीने, भावनेच्या भरात घडलेल्या सगळ्याच गोष्टी जगाच्या चव्हाट्यावर मांडायच्या लोकं टाळतात ...  आपली झाकली मूठ लाखाची हाच बाणा योग्य असावा

टीप- वेगवेगळ्या बाओपिक, आत्मचरित्रावरच्या काथ्याकुटीनंतर मला जे वाटलं ते लिहिलंय, ह्याचा संजूशी संबंध नाही 😛 हो नाहीतर सगळा फोकस तिकडे जाण्याचा धोका आहे 😉