Tuesday, 10 December 2019

तृष्णा

दिवसभरची दगदग, धावपळ
अलगद डोळे मिटते अन
दिवसभर टिकटिक करणारा मेंदू
क्षणात शांत होतो

दोन तीस तास शांत झोप झाली
की अलगद जाग येते
नी नेऊन सोडते मला तुझ्या राज्यात
तुझ्या सोबत असते मी

अर्धवट झोप , त्यात तुझी नशा
त्यातच गुंगून, गुंफून पडणारी मी
हेच जग मला खऱ्या अर्थाने जगवत असतं
माणूस म्हणून, बाई म्हणून भरभरून जगते मी

तुझ्याच संगतीत, तुझ्याच मिठीत
तुझ्याशी गुजगोष्टी करत सांगत बसते मनातलं सगळं
तू ही ऐकत असतोस मन लावून
तृप्त तृप्तशी नकळत पुन्हा झोपेत ओढली जाते

सकाळ उजाडते तीच मुळी
रात्रीची स्वप्नं जागवत
घड्याळ खुणावते तशी
धडपडून स्वप्नं बाजूला सारते

पुन्हा नवा दिवस, त्याची नवी यातायात
नवी आव्हानं, उबग आणणारं रुटीन
नेहमीचीच कामं, टिफिन अन चहा
नेहमीची गर्दी ट्रॅफिक तुडवणारे आपण

सगळं आटपून आपल्या घरट्यात यायचं
नेहमीचीच सिरीयल, स्वयंपाक जेवण
त्याच साचेबंद गप्पा
सगळं कसं आखीवरेखीव ठाशीव

मग पुन्हा दमलेली झोप
आताही पडलेय आससून
तुझ्याच स्वप्नांच्या वाटेवरची एक तृष्णा
मी एक अखंड #तृष्णा... तुझी वाट बघणारी

Friday, 23 August 2019

ती कमीच चुकते ... तरीही


एक व्हिडिओ व्हायरल झालाय... आई मोबाईल मध्ये मग्न रस्त्याने पुढे चाललीय, एक माणूस तिचं बाळ घेऊन ओ मॅडम करत मागे... मोकळा रस्ता, रस्त्याच्या कडेला आणि त्या माणसाच्या मागे बघ्यांची गर्दी, पलीकडल्या रस्त्यावर गाड्या ये जा करतात ... ह्यावरूनच समजतं की हा स्क्रिप्टेड व्हिडीओ आहे
बायकांमध्ये आई इतकी ठासून भरलेली असते की त्या शक्यतो बाळ विसरतच नाहीत आणि त्या व्हिडीओत दाखवलं त्या वयाचं तर नाहीच ... मग काय मिळतं असे व्हिडीओ बनवून... स्त्रीने मोबाईल वापरुच नयेत? तिने स्वतःला कायम कोणत्यातरी गिल्टमध्ये जगावं का? जरा कुठं मनासारखं वागलं की लगेच तिचं घरादाराकडे दुर्लक्ष होतेय, आई म्हणून ती किती नालायक आहे हे तिच्यावर सारखं सारखं ठसवणारे हे व्हिडीओ माझ्या डोक्यात जातात... एकीकडे सतत बाईला कसले कसले डोस पाजणारे तिर्थांकरी प्रकार आणि दुसरीकडे हे असले वंगाळ स्क्रिप्टेड व्हिडीओज ... जाने कहाँ से आते है ये लोग
तिलाही माणसासारखं वागायचा, चुकायचा, विसरायचा हक्क आहेच की... कशाला तिच्याकडून सतत आदर्शवत मातेची अपेक्षा करायची...
ती असतेच आदर्श, मुद्दाम विसरत नसते तरीही हे सतत तिला दर्शवणे , सांगणे की बाई तू आधी आई आहेस तू स्वतःसाठी काहीही करू आणि जगू नकोस ... हे खुपतेच , खटकतेच
व्हिडीओ , लिंक मागू नका... स्वतःच शोधा 😁😂

©अर्चना चंद्रसेन

Friday, 26 July 2019

आहे ते तसे राहू द्यावे

लिंपु नयेत भिंती काही
थोडेसे तडे राहू द्यावे

करावे विसर्जन त्यांचे
गाभारे रिते राहू द्यावे

सांधू नयेत दऱ्या खोऱ्या
दुरावे वरतून राहू द्यावे

मिटवू नयेत नावे धुळीतून
पुरावे अंतरात राहू द्यावे

काय कसे कधी कुठे पुसू नये
हसणे गूढ मुखी राहू द्यावे

बसावे घरट्यात आपुल्या
मिटले पंख शांत राहू द्यावे

त्या तिथे नजर रोखलेली
इशारे अबोल राहू द्यावे

©अर्चना चंद्रसेन


Monday, 22 July 2019

कुबेर वर्धापनदिन 21 जुलै 2019

काल 21 जुलै 2019 रोजी कुबेर वर्धापनदिनाचा कार्यक्रम एकाचवेळी निरनिराळ्या ठिकाणी साजरा झाला ही अत्यंत अभूतपूर्व आणि आनंददायी गोष्ट आहे. 18 जुलै 2014 ला लावलेलं रोपटं आता खूप बहरलं आहे ह्याचा सार्थ अभिमान कुबेरशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला आहे. काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमाला सलील कुलकर्णी , डॉ मनीषा आणि अभिजित सोनवणे हे दांपत्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सलील कुलकर्णीना कोण ओळखत नाही, मराठी जाणणारे सगळेच जण त्यांच्या गायनाचे चाहते आहेत, सलीलजींच भाषण काल मी पहिल्यांदाच ऐकलं आणि ते उत्तम वक्तेदेखील आहेत हेही समजलं. सोशल मिडिया बद्दल त्यांना खडानखडा माहिती आहे, कानपिचक्या देत देत समोर बसलेल्या श्रोत्यांशी संवाद साधत केलेलं नर्मविनोदी शैलीतील त्यांचं भाषण मला फार आवडलं. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनात घर करून गेली. इथं त्यांनी सांगितलेला एक किस्सा सांगावा वाटतो, प्रवासात त्यांनी एकदा दोनतीन जणांना लिफ्ट दिली , त्यातल्याच एका बाईंनी गाडीत त्यांचा फोन आणि फेसबुक लॉगिन करायची परवानगी मागितली त्यांनी ती दिलीही. बाई खुश झाल्या, काय केलंत विचारलं तर झाडाला पाणी घालायचं राहिलं होतं ते घातलं म्हटल्या... फार्मविले गेममधल्या आभासीच शेतात शेती करून लोक खुश होतात त्याचवेळी खऱ्या शेतावर दुष्काळ असतो. आभासी फुलं फुलवण्याच्या नादात आपली खरी फुलं तर सुकत नाहीत ना? सलीलजींचा सोशल मीडिया बाबतचा अभ्यास मानायला हवा, तो कसा वापरावा ह्याचा त्यांचा अप्रोच सगळ्यांनी लक्षात ठेवावा असाच आहे.

दुसरे प्रमुख पाहुणे श्री व सौ डॉक्टर मनीषा आणि अभिजित सोनवणे ह्यांचं कार्य फारच कौतुकास्पद आहे. "हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे , माणसाने माणसाशी माणसासम वागणे" हे गीत अक्षरशः जगणारं हे जोडपं भिकाऱ्यांच्यासाठी काम करतं. वारानुसार वाटून दिलेल्या देवाच्या दारात, मशिदी आणि दर्ग्याच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना औषध देणं, भीक मागणारे म्हातारे आजीआजोबा नावासहित आपले म्हणणे, तरुण मुलांना भिकेपासून रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं इतक्या मोठ्या पटलावर त्यांचं काम सुरू आहे. त्यांच्या भाषणातली त्यांची काही वाक्य कायमची मनावर कोरली गेली आहेत.
- उगाचच मजा म्हणून, काळजी / चिंतेपोटी जागतात त्याला जागरण म्हणतात आणि मनावरची धूळ झटकून अज्ञानातून जे जागे होतात त्याला जागृती म्हणतात.
- भक्त गाभाऱ्यात भीक मागतात आणि भिकारी देवाच्या दारात भीक मागतो.
- भिकाऱ्याला भीक देऊ नका, त्याला काम देऊन मदत करा.
-भीक देणं आणि मदत करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

पुण्यात कुबेरचा वर्धापनदिन आपल्या लौकिकाला साजेलसा दिमाखदार झाला... नियोजन समितीचे मनापासून कौतुक. कुबेरमध्ये कलागुणाची कमी नाही... सादर करणारे सगळेच एकसेएक बढकर. अनुजा रणावरेची गणेश वंदना, मनीष कानडेचं गीत सादरीकरण, स्मिता देशपांडे हिचं अभिवाचन, अरुण देशपांडे काकांचं अभिवाचन, सुवर्णा तांबोळीचं कविता सादरीकरण सगळंच बहारदार. सगळ्यात शेवटी कसायदान सादर करणारे कोण होते त्यांचं नाव नाही आठवत पण ते कसायदान एक नंबर होतं. मुग्धा आणि तनुजाने सादर केलेला संगीत शारदा मधला नाट्यप्रयोग अप्रतिम. अपर्णाने सिंथसायझरवर मस्त गाणी वाजवून माहौल जमवला. सत्याचा आयटम मात्र वेळेअभावी राहिलाच, अगदी तो मी नव्हेच मधला निप्पानीचा तंबाखूचा व्यापारी वाटत होता. मीही यंदा कविता वाचन करताना सुनील पाटील सारखं सादरीकरण करायचा प्रयत्न केला, मला त्याची स्टाईल आवडते ते फॉलो करायचा छोटासा प्रयत्न.

बाकी पुण्याचा कार्यक्रम झकासच झाला, फोटो काढणारे सिद्धू चिलवंत आणि वसंत सुसर ह्याचे खूप आभार , न सांगता सगळ्यांचे परफॉर्मन्स व्हिडीओ शूट करणाऱ्या नीलिमा दिक्षितला धन्यवाद... इतरठिकाणीही छानच झालाय, फोटोंवरून अंदाज येतोय. संतोषभाऊंनी हेडक्वार्टरवर बसून सगळीकडेच देखरेख केली आहे... ठिकठिकाणच्या नियोजनकर्त्यांचे मनापासून कौतुक... मॅन ऑफ द टीम संतोषभाऊंचे आभाळभर धन्यवाद.

कळावे लोभ असावा.

Sunday, 14 July 2019

आपण दोघे

एकमेकांना टाळत असतो आपण दोघे
कुठले नाते पाळत असतो आपण दोघे

आवरून उधाण थकतो आपण दोघे
समजून उमजून वेडे बनतो आपण दोघे

कुठे न माथा आपला झुकतो स्वाभिमानी
कणाकणात विठ्ठल शोधतो आपण दोघे

नदीकाठावर नुसतेच बसुनी बघत रहातो
जन्मभराची तहान मागतो आपण दोघे

जे तुझे ते माझे असते, खच्चून सारे खिशात भरतो
समुद्र होऊन निथळत रहातो आपण दोघे

खंत लेऊन पुऱ्या जन्माची उणीव दिसते
भाळावरच्या रेषामधुनी एकमेका शोधत उरतो आपण दोघे








Thursday, 4 July 2019

अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है

धुंद पावसाळी दिवस सुरू झाले तरी तिची दगदग संपत नव्हती. मुळातच रसिक स्वभाव त्यात पाऊस, तिचे मन मोठ्ठाले इमले बांधत होतं आणि जबाबदाऱ्या इमले दणादण पाडत होत्या... एका साधारण मध्यमवर्गीय स्त्रीची स्वप्नं ती अशी काय असतात. पाऊस कोसळताना उबदार घरट्यात आपल्या सोबत्यासह बसून रहायचं, आजूबाजूला पंखाखाली पिलं असावीत... असंच धो धो पाऊस कोसळताना घरट्यात बसावं म्हणून तिने कालच अर्ज देऊन सुट्टी घेतली. झोपतानाच लेकीला आणि नवऱ्याला सांगितलं की उद्या सुट्टी आहे उशिरा उठवा. निवांतपणे साडेआठला उठून मुलीने आणून दिलेला चहा पीत अख्खा आणि ताजाताजा पेपर तिने वाचून काढला, रोजच संध्याकाळी शिळा पेपर तेही उत्साह असेल तर बघणाऱ्या तिला ही मेजवानीच म्हणावी. आज निवांत अंघोळ करावी का ? च्यामारी मरू दे एखाद दिवस पारोसं राहिलं तर काय आकाश कोसळत नसतंय असलं कायकाय मनात घोळत असतानाच सवयीप्रमाणे शॉवर घेऊन सुद्धा झाला. आता कॉफी बनवून कादंबरी घेऊन वाचत पडावं मग त्याला जवळ घेऊन दुपारभर नुसतं कडल करून पडून रहावं ... विचारच किती थ्रिलिंग. रोजरोज काय मेलं गॅसपुढे उभं रहायचं आज छानपैकी पार्सल मागवावे.

उबदार कॉफी घशाखाली जातच होती अन मोबाईल वाजला बघेपर्यंत कट, व्हाट्सअप्प नोटिफिकेशन उघडलं तर इमिडिएट ऑफिसरचा मेसेज अर्जंट मीटिंग लागलेय मी कोर्ट कॉलला चाललोय तुम्ही मीटिंग अटेंड करा... सर माझी लिव्ह वगैरे रिप्लाय करायची सोयच नसते अशावेळी, चरफडत निघणं आलं. घरच्याना अशी सवयच असावी, सतत काहीतरी सुरूच असतं हिचं. 'तुम्ही पार्सल मागवून घ्या मला मीटिंग लंच असेल' असं बोलतच चपला सरकावून ती घराबाहेर पडली. मिटींगला जायचं तर हातात काही कागद नकोत का? मग आधी स्वतःच्या ऑफिसात जाऊन रिपोर्ट्स कलेक्ट केले मग तिथून मिटींगला हजेरी... उलट सुलट प्रवासात ट्रॅफिकने अजून जीव काढला, पुणेदर्शन सकाळीच झाले. मिटींग आवरता आवरता सहा वाजून गेले, घरी जाऊन साधं काही करावं, नुसतं पिठलंभात नैतर अंडाबुर्जी असं ठरवतच घरात गेली. किचनमध्ये पाऊल टाकलं तर कट्ट्यावर एका ताटात मासे पडले होते ; प्रश्नार्थक चेहऱ्याने नवऱ्याकडे बघितलं "तू आज घरीच थांबणार होतीस म्हणून सकाळीच मार्केटवरून घेऊन आलो होतो, आता करशील नाहीतर वाया जातील" इतकं म्हणून तो सटकला. झक मारून तिनं मसाला वाटण करायला घेतलं. फिश फ्राय, फिश करी, भात, भाकरी असं सगळं उरकून जेवण आवराआवर करून बेडवर पाठ टेकायला अकरा वाजून गेले होते. भरगच्च जेवून मुलं कधीच झोपायला पळाली. सकाळपासूनची पळापळ आता बोलू लागली , पाठ ठणकत होती, डोकं ठकठक ओरडत होतं. पलीकडे जेवून मस्त गझल मोडवर कांरवा ऐकत नवरदेव मुडात पडले होते. त्याने किमान मिठी मारावी, कपाळावर ओठ टेकून थकलीस का इतके दोनच शब्द बोलावेत इतकी छोटी आशा उस्मरून डोळ्यांच्या कडेवर साचुन राहिली होती... "मस्त जेवण झालं...अंगावर येतेय..." इतकं कसेबसे ऐकून पाठोपाठ त्याचं घोरणं सुरू झालं.

कायकाय प्लॅन केले होते आजचे हे आठवून कढत कढत टपोरे थेंब तिला आवरेनासे झाले होते, कांरवावर पलीकडे गझल सुरूच होती

अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है
रुख हवाओ का जिधर का है उधर के हम है

Friday, 21 June 2019

फेमिनिझम तपासून घेतोय

ती आली ... तिने पद्धतशीर प्रोव्होक केलं... मग ती ट्रोल झाली... ट्रोल करणाऱ्यांवर तिने तोंडसुख घेतलं, तिची बाजू घेणारे दुर्लक्षित केले, काही कमेंट्स डिलीट केल्या, ज्याचा इश्यू करून बोंब ठोकता येईल अशा कमेंट्स ठेवल्या... मग त्यावर चर्चा झाली..  आता सहानुभूती मिळवणे सुरू आहे... बॅड पब्लिसिटी इज ऑलसो पब्लिसिटी... करियर बुस्टिंग calculated मूव्ह आहेत तिच्या

सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेत ट्रोलिंग होणं हे फक्त तिच्या एकटीबाबत नाही होत आहे, कोणतेही पेज उघडा हीच भाषा सोशल मीडियावर दिसते. त्याबद्दल वारंवार मी स्वतः खंत खेद व्यक्त करून झालेला आहे. बाई म्हणून अनेक स्त्रियांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मी बोलत, लिहीत असते. पायल रोहतगी, केतकी चितळे ह्यांनी ज्या तर्हेने हे सगळं सुरू केलं त्याबद्दल सहानुभूती नाही वाटत. हे सगळं ठरवून केलं गेलेलं आहे हे नक्की. तिला गरजच नव्हती आधी लोकांना चिडवण्याची ,कोणी जबरदस्ती नव्हती केली तिला मराठी बोलण्याची आणि अंगावर आल्यावर तिला तुमचे शिवाजी महाराज अस म्हणायला सुचलं... मावळे वगैरे म्हणताना तिला काय माहिती सगळे मावळे होते ...इतकं तोंड वाकड करून शुद्धलेखन सांगत होती तिला ग्रामीण मराठी , बोलभाषा हा प्रकार सुद्धा माहिती नसावा

मराठी भाषेवर मुद्दाम बोलताना राडा होणारच हे ठाऊक होतं तिला... वाईट भाषेत ट्रोल करणं ही संस्कृती ज्यांनी कुणी सुरू केली त्यांनी स्वतःला थोडातरी दोष द्यावा... शरम वाटू द्यावी. इतरांना हिणकस रीतीने ट्रोल करणारे आपल्यावर आलं की चांगल्या भाषेची अपेक्षा करतात हे इथलं डबल स्टँडर्ड हल्ली सोसवत नाही... एकंदरच विसंगती ठायीठायी दिसतेय

असभ्य कमेंट्सला उत्तर देताना दुसरा व्हिडीओ जो बनवलाय त्यातही त्याच भाषेत बोलणं हे कोणत्या सभ्यतेत बसते. आपली प्रतिक्रीया असभ्यांबरोबर काही सभ्य,विचारी माणसंही ऐकणार आहेत आणि म्हणून आपण कुठल्या प्रकारची भाषा आपल्या जीभेवरुन बाहेर ढकलावी याचं भान ठेवण्याची सदबुध्दी,केतकी चितळेंना का झाली नाही ? हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे... मी स्वतः इथे बरेचदा ट्रोल झालेली आहे पण त्याबद्दल मला कधीही ना बोलावं वाटलं ना उत्तर द्यावं वाटलं. तेच शब्द तीच भाषा जर उत्तर देताना आपण वापरत असू तर मग आपल्या आणि त्यांच्यात अर्थाअर्थी फरकच काय, मग कुठल्या तोंडाने आपण त्यांना असभ्य आणि विकृत म्हणावे. रस्त्याने जात असताना एखाद्या माणसाला गाढवाने लाथ मारली तर पाहणारे समजून घेतील. पण, तिथेच त्या माणसाने गाढवाला लाथ घातली तर,पाहणारे कुणास अधिक मुर्खात काढतील ? या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे... एकंदरीत मुर्खपणाला प्रतिउत्तर देताना कोणी प्रसिध्दीच्या हव्यासापोटी सहेतूक मुर्खाचं सोंग वटवीत तसंच बोलत असेल तर,त्या शहाण्या व्यक्तीने अंगीकारलेला मुर्खपणा त्या मुर्खांच्याही अगोदर निंदणीय आहे असे मला वाटते...

अजून एक विशेष बाब म्हणजे सतत स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतच असतात ही दुर्दैवाची बाब आहे पण एरवी त्याविरुद्ध ब्र देखील न उच्चारणारे ह्या ग्लॅमरी बायकांसाठी का धावाधाव करू लागतात हे समजत नाही. अलीकडेच पायल तडवी, ट्वीनकलबाबत अत्याचार झाले तेव्हा बोलावं असं कुणाला का वाटलं नसावं की आडनाव, नाव, जात, धर्म बघूनच आपण व्यक्त होणार आहोत...

एक मात्र नक्की की ह्यापुढे उठसूट बायकांची बाजू घेऊन बोलणं, लिहिणं होणार नाही मग कुणी आम्हाला निर्लज्ज नालायक असे दोष दिले तरी चालतील... स्त्रीत्वाचा फायदा उचलणाऱ्या, बाई म्हणून सतत रडून सॉफ्ट पॉईंट मिळवून वागणाऱ्या बायका बघितल्या की त्रास होतो... नकोतिथे मुलुखमैदानी तोफा डागणाऱ्यानी जिथे खरोखरच अन्याय होतो तिथे सोयीस्कर दुर्लक्ष करणे हे आमच्यासारख्यालाही मग सिलेक्टिव्ह व्हायला भाग पाडत आहे. आमचं फेमिनिझम आम्ही कुणासाठी बोलायला वापरतोय हे तपासून घेऊनच तोंड उघडणार हे मनोमन ठरवलं आहे... Yes, I m selective feminist... Not going to waste my words on glamour world.

काहीजणांना माझं म्हणणं पटणार नाही हे मला माहित आहे. असभ्य विकृत भाषेत बोलणाऱ्यांवर कारवाई व्हावीच... उचकावणे, प्रोव्होक करणे ह्याकडे मात्र मी स्वतः डोळेझाक करणार नाही आहे ह्याकडे जे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे त्यांना नमस्कार.

फेमिनिझमच्या माझ्या स्वतःच्या मतात ज्यांच्यामुळे फरक झालाय त्या पायल, केतकीताईचे धन्यवाद. आमचं फेमिनिझम तपासून बघायची संधी दिलीत त्याबद्दल आभारी आहोत. कळावे लोभ असावा

©अर्चना चंद्रसेन

Monday, 17 June 2019

तुझा रुबाब

तुझा मर्दानी रुबाब
मन पाणी पाणी झालं
भरदार उरामधी
उभं आभाळ तोललं

जीव थोडा थोडा होतो
मन शिवार पेटतं
देता मिशीला तू पिळ
लक्कं काळीज हालतं

गोरा चिट रंग तुझा
माझी सावळीच काया
गाठ बांधली आपली
अभ्री जांभूळ पेराया

तुला बघून बघून
माझं गोंदण हसतं
तुझ्या व्हटाला डसाया
मनं आखाडी कुढतं

नको नजरेचा झिम्मा
आता अवचित भेट
नाही तूटणार कधी
असा अंतरात खेट

बघू कडेला बसून
दुनियादारी आक्रीत
जीव शांत शांत व्हावा
तुझ्या उबारी मिठीत

Saturday, 8 June 2019

रँडम थोट्स

काही वर्षांपूर्वी आमच्या नात्यामध्ये मोठी भानगड झाली होती. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, आत्ता ते लोक माझ्या सासरचे आहेत पण आमचे पूर्वीपासून चांगले संबंध असल्यामुळे सगळ्या गोष्टी माहिती आहेत.  तर त्याचं झालं असं एका मुलाने प्रेम विवाह केला, एक-दोन महिने गुण्यागोविंदाने संसार झाला नंतर काही दिवसांनी ज्या मुलीशी लग्न केलं होतं त्या मुलीचा भाऊ ह्या मुलाच्या बहिणीला पळवून घेऊन गेला तू माझ्या बहिणीशी लग्न केलंस ना मग मी तुझी बहीण कशी काढून नेतो ते बघ ह्या भाषेतच तो पोरगा बोलला होता. आमच्या इज्जतीला हात घातलास ना मग आता बघ तुमच्या इज्जतीची मी कशी वाट लावतो.

तर सांगायचा मुद्दा असा की भारतीय समाजमनाच्या इज्जतीच्या, अब्रूच्या सगळ्या संकल्पना स्त्रीच्या मालकी हक्कापाशी येऊन थांबतात. आपली बाई आपल्या ताब्यात ठेवणे, तिला दुसऱ्या कोणी हस्तगत नको करायला याची काळजी घेणे ह्याला मोठा पुरुषार्थ समजला जातो, याला कारण मला वाटतं पूर्वापार उत्तरेकडून होत असलेली वेगवेगळी परकीय आक्रमण असावीत. एकंदरच जे जेते असतात ते शत्रूच्या बायकांना पहिला हात घालतात, शत्रूच्या स्त्रीचा उपभोग घेणे ही विजेत्यांच्या उन्मादाची प्रमुख खुण पूर्वापार चालत आली आहे. उत्तर भारतात त्यामुळे स्त्रियांवर फार बंधनं आणली गेली, योनीशुचिता इतकी महत्वाची मानली गेली की त्यासाठी बायकांना घराबाहेर पाऊल ठेवण अशक्य केलं गेलं. स्त्री घराबाहेर पडली तरी घरातल्या पुरुषाच्या देखरेखीखाली ती घराबाहेर पडू लागली. कुलूपबंद अंतर्वस्त्रे स्त्रीला पुरविण्यात आली. परपुरुषाची सावली अंगावर पडणे हे देखील पाप मानणारे संस्कार इथे आहेत. अब्रूला सगळ्यात जास्त महत्व, अब्रूला जपण्यासाठी बायकांनी जोहार केल्याची उदाहरणे देखील आहेत.

उत्तरेकडून जसे दक्षिणेकडे जातो तसे स्त्रियांच्या बाबतीतले नियम जास्त उदार होत जातात. दिल्लीसारख्या ठिकाणी आजदेखील संध्याकाळी सातनंतर एकटी स्त्री घराबाहेर पडत नाही. माझ्या ओळखीच्या काही उत्तरेतील महिला पुण्यात येऊन अक्षरशः खूप खुश आणि अचंबित झालेल्या मी बघितल्या आहेत, 'भाभी सचमें आप रात दस बजे अकेली बाहर जाती हो' ह्यावर हो म्हटलं तर त्यांना फार नवल वाटलेलं. बऱ्याचजनी त्यासाठी पुणेमुंबई सोडायला तयार नसतात कारण उत्तरेत महिलांना अजूनही तसे सन्मानाने वागवले जात नाही.

महिला अत्याचार, बलात्कार, बदला घ्यायला दुसऱ्याची मुलगी बायको पळवणे, एकंदरच महिलांचा शारीरिक छळ आणि उपभोग घेण्याची पाशवी पुरुषी वृत्ती उत्तर भारतात अधिक बघायला मिळते. दक्षिण भारत त्यामानाने फारच सुसंस्कृत आणि लिबरल आहे. ह्याचा अर्थ सरसकट सगळे उत्तर भारतीय वाईट आणि दक्षिणि गुणी असा घेऊ नये, चांगल्या वाईट वृत्ती सगळीकडे असतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी माणसाला घडवत असते हे मात्र शंभर टक्के खरे आणि उत्तर भारतावर झालेली सततची परकीय आक्रमणे ही सगळ्या बाबतीत दूरगामी परिणाम करणारी ठरली आहेत. माणसाची माणूस म्हणून वृत्ती, विचारप्रक्रिया , नीतिमत्ता, नैतिक बैठक ठरवायला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. परकीयांच्या जोखडातून आपल्याला मुक्त करणारे छत्रपती शिवाजीराजे आणि नंतर उदारमतवादी विचार देणाऱ्या आपल्या समाजसुधारकांचे महाराष्ट्रावर अगणित उपकार आहेत हे माझ्या दिल्लीतल्या मैत्रिणींशी बोलल्यावर प्रकर्षाने जाणवले.


Wednesday, 5 June 2019

सोल्ड आउट

खेळण्याच्या दुकानात बापा बरोबर गेलेल्या छोटूला एकही खेळण पसंद पडेना. सुंदर सुंदर बाहुल्या, बार्बी सारख्या क्युट डॉल, झालंच तर वेगवेगळ्या गाड्या, ट्रेन , व्हिडीओ गेम्स सगळं सगळं पप्पा त्याला दाखवत होते. आपल्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांनी भिरिभिरी बघत छोटू सगळ्याला नाही म्हणत होता. पप्पा म्हटले जाऊदेत आपण आपली अजून एक बॅट घेऊ तर छोटू तेही नकोच म्हटला. थोडावेळ बघू नाहीतर नंतर परत येऊ असं पप्पा ठरवत असतानाच छोटू कौंटरवर ठेवलेल्या एका झिपऱ्या बाहुलीच्याजवळ गेला. आपल्या छोटुशा हातांनी त्याने ती बाहुली उचलली, नाजूक बोटांनी तिच्या गालावर हात फिरवून छोटूने ती बाहुली पप्पांना दाखवली. फायनली काहीतरी आवडलं पोराला 'झिपरी आवडली तुला' म्हणून हसतंच पप्पा ही केवढ्याची वगैरे विचारावं म्हणून वळले तोच कौंटरवरचा माणूस म्हटला ही सोल्ड आउट आहे आताच एकजण पैसे देऊन गेलाय. छोटुच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, अंकल त्यांना दुसरी बाहुली द्या ना मला हीच हवीय. दुकानदाराने काही न बोलता झिपरी बॉक्समध्ये ठेवून दुसरीकडे ठेवून दिली. लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघून बाप कळवळला 'दुसऱ्या खूप सुंदर आहेत त्या घे रे, बघ हिच्याहून छान छान आणि महाग आहेत. नैतर असं कर तू दोन घे'. भरल्या डोळ्याने खाली मान घालून छोटू रिकाम्या हाती दाराकडे निघाला.

होतं ना असं ... मोगरा आवडतो पण हातात गुलाब कोंबला जातो. भाकरी आवडते आणि पुढ्यात रोजच पोळी वाढली जाते. पोट भरतं पण तरीही आवड पुरवली नाही जात म्हणून रुखरुख लागतेच की. असंख्य माणसांच्या गर्दीत नेमकं कुणीतरी असं आवडतं जे सोल्ड आउट असतं, आपल्या मालकीचं नसतं

Monday, 3 June 2019

बडे अच्छे लगते है

खूप दिवसांनी काल पूर्ण दिवस घरात एकटी होते. वाचन झालं, टीव्ही झाला, फेसबुक झालं तरी वेळ जाता जाईना. प्राईमवर बालिका वधू दिसला, खूप वर्षांनी बघितला. कुठेही न कंटाळता सलग बघितला. मागे कधीतरी बघताना टिन एज ते तारुण्य ह्यातले त्या दोघांना झालेले साक्षात्कार, छोटे छोटे भावनिक, शारीरिक बदल लक्षात राहिले होते. #और_तुम हे बडे अच्छे लगते है मधले शब्द अजूनही अंगावर रोमांच फुलवतात म्हणजे आपण अजूनही तरुण आहोत हे स्वतःला सांगून टाकलं.

एक समांतर गोष्ट जी आधी आत पर्यँत पोचली नव्हती ती मात्र ह्यावेळी धारदारपणे मनावर आदळली. अमलला शिकवणारे मास्तर ए. के. हंगल जे व्हायोलिन वाजवायचे त्यात शेवटी बॉम्ब सापडतात. अजून एक तरुण मुलगा जो विदेशी बांगड्या वापरू नका म्हणून जत्रेत गात असतो. रजनी ते गाणं ऐकून बांगड्या लपवून आणते. पुढे तोच मुलगा पोलिसांकडून मारला जातो, मास्तरला बेड्या घालून नेताना गाड्यावर टाकलेला कपाळात गोळी घुसलेला इंकीलाबी सताड डोळे आकाशाकडे लावून पडलेला असतो. हे सगळं बघत असलेली रजनी बांगड्याचा डब्बा अमलकडे देते आणि त्या पाण्यात सोडायला सांगते.

इंग्रजांकडून देश स्वतंत्र व्हायच्या वाटेवर असे कितीतरी मास्तर, इंकीलाबी झटले असतील त्यांची मोजदाद नाही. घराघरात रजनीनी आपल्या आवडत्या साड्या, बांगड्या स्वदेशीसाठी होळीत टाकल्या असतील. म्हणायला लव स्टोरी पण अशी नको ती हुरहूर लावून गेली


Saturday, 1 June 2019

सदा सर्वदा योग तुझा घडावा


आमच्या सोसायटीत ओळीने सहा बिल्डिंग आहेत. मराठी कुटुंब बोटावर मोजण्याइतकी म्हणूनच जास्त आपुलकी. समोरच्या बिल्डिंगमध्ये उमर सत्तरपार पण दिल सोळा ते बावीस सोडतंच नाही असे काका एकटेच रहातात. पैसापाणी चिकार आहे, तब्येत खटाखट आहे त्यामुळे एकटे असले तरी जगणं छान एन्जॉय करतात. तीनचार महिन्यांपूर्वी ऑफिसला निघाले तर काका खिडकीत उभे आणि मेरे सामनेवाली खिडकी में वगैरे सुरात सुरू होतं मी हात करून मस्तच ओ काका म्हणून आवाज दिला काका छान हसले. संध्याकाळी गप्पा मारताना आमचे साहेब म्हटले तीन नंबर बिल्डिंगमध्ये नवी फॅमिली मराठीच कुणीतरी आली दिसतेय. मराठी फॅमिली ऍड झाली की आपला पण दिल खुश होतो, रविवारी संध्याकाळी सोसायटीत खाली सगळ्याजणी भेटू तेव्हा नवं कोण आलंय त्यांची ओळख करून घेऊ असं मनोमन ठरवूनच टाकलं. वयस्कर पण वय चेहऱ्यावर न दिसणाऱ्या, गुलाबी गोरा रंग , सुंदर अशा काकू भेटल्या. एकंदरच प्रसन्न व्यक्तिमत्त्व. सून आणि मुलगा दिवसभर कामाला जातात , दोन वर्षांच्या नातीला काकू खूप छान सांभाळतात. मलाही गप्पा मारायला एक छान पार्टनर काकूंच्या रूपाने मिळाला पण काकूंचा हट्ट की मला ताई म्हण त्यांना बरं वाटतंय म्हणून ताई तर ताई.  परवा सकाळी सकाळी काकूकम ताईंचा जोरदार आवाज सोसायटीत घुमला, सगळ्यांची कामाला निघायची गडबड पण jcb लावल्यावर लोकं गोळा होतात तशी पटापट खिडकीतून, गच्चीतून डोकी बाहेर आली. 'क्या हो गया आंटी, सुबह सुबह क्यूँ चिल्ला रहे' एक आवाज कुठूनतरी आला , त्याला उत्तर म्हणून काकूंचा आवाज 'क्यूँ चिल्ला रहे म्हणजे, चिल्लायुं नको तर काय करू, ये सामने वाला बुढा काका रोज मुझे देखते हुए कुछ भी बकता है, इस्को समजाओ' च्यामारी आता सगळेजण अजूनच चार्ज झाले 'क्या बोलते है काकाजी' इकडून तिकडून विचारणा सुरू. 'अरे बोलते कुछ नहीं पण मुझे देखते ही इनको भागवान याद आते है और सदा सर्वदा योग तुझा घडावा , तुझे कारणी देह माझा पडावा ऐसा शूरु करते है' 'इसमे गलत बात क्या है, कुछ समजा नहीं , मेघना की मम्मी ईसका मतलब क्या है' म्हणून माझ्या नावाने दोन हाका. 'मुझे ऑफिसके लिये देर हो रही है भाभी, बाद में बताती हुं' म्हणून मी टाळलं, आमचे साहेब मात्र जोरदार हसत सुटले 'मानलं बुवा काकाला 😁😂'

Wednesday, 22 May 2019

जो जे वांच्छिल तो ते लाहो

राजकीय पोस्ट, चर्चा केली तर मित्र दुरावतात म्हणे, मैत्रीत वाद होतात... हे एक नवेच सुरू झालेय. मैत्रीचा राजकारणाशी काय संबंध. माझे मित्र, नातेवाईक, सहकारी गेली अनेक वर्षे सगळ्या पक्षात आहेत मग आताच ही हाकाटी कशासाठी. मैत्रीत वितुष्ट येतही असेल पण त्याला फक्त राजकारण जबाबदार नाही.

राजकीय लिहिणारे, चर्चा करणारे नालायक असे काहीसे बोलणे दिसू लागलेय ह्याला माझा कडाडून विरोध आहे. राजकीय चर्चा वैयक्तिक व्हायची गरजच नसते, ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं असतं. स्क्रीनशॉट खेळणारे, ह्याला टार्गेट कर त्याला टार्गेट कर, एखाद्याची ठरवून बदनामी कर, गॉसिप कर, इनबॉक्सला भिड असले धंदे करणारे राजकीय पोस्टींना नावं ठेवतात तेव्हा गंमत वाटते.

ना मोदी कुणाचे सगे आहेत ना रागा. ती राजकीय व्यक्तिमत्त्वे आहेत त्यांच्यावर बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. अर्थात जो तो आपल्या लायकीच्या भाषेत बोलतो आणि राजकीय व्यक्तींना, नेत्यांना पूर्ण कल्पना असते की त्यांना काय बोललं जातं. व्यक्तिशः मी मोदी, राहुल, पवारसाहेब, केजरीवाल आणि सगळ्या राजकीय नेत्यांचे ह्याबद्दल खूप कौतुक करते की ते इतकी टीका सहन करूनही राजकारणात ठामपणे उभे आहेत.

राजकीय टीकाटिप्पणी चर्चा होत राहील, त्याला कुणीही वाईट ठरवू नये. जे राजकीय नाहीत अशा आपल्या ओळखीच्या लोकांची बदनामी करणाऱ्यांना धारेवर धरा, तिकडे गप्प बसून एन्जॉय करणाऱ्यांना राजकीय पोस्टींचा त्रास का व्हावा.  अनेकदा अनेकांना पर्सनली ट्रोल केले गेले त्याबद्दल कुणीही आवाज उठवत नाही आणि राजकीय पोस्टवर मात्र आक्षेप असतो. हे डबल स्टँडर्ड बंद करा.

उद्या निकाल काहीही आले तरी शिरोधार्य असतील, सत्ताधारी कुणीही असले तरी चुकेल तिथे बोलणारच.

जो जे वांच्छिल तो ते लाहो

©अर्चना चंद्रसेन

Tuesday, 16 April 2019

अभिव्यक्ती


मतभिन्नता असणं हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. एका घरात देखील वेगवेगळी मतं असलेली मी पाहिली आहेत. मतभिन्नता अगदी कशावरून देखील असते... ड्रेस सेन्स ते शाकाहार मांसाहार, पाश्चात्य विचार योग्य अयोग्य, धार्मिक कट्टरता किंवा त्यातील सॉफ्टनेसचा आग्रह असे अगणित विषय आहेत ज्यावर वेगवेगळे विचार असू शकतात. प्रत्येक गोष्टीवर सगळ्यांचं एकमत व्हावं असा आग्रह एकंदरच समाजहिताचा नसतो आणि तो नसावा देखील. माझे विचार तेच योग्य आणि इतरांचे चूकच हा समज त्या व्यक्तीचा मोठा मानसिक लोचा असू शकतो. मतभिन्नतेसहित स्वीकारणे हे फार महत्वाचे आहे मग ते कुणालाही असो त्यासाठी फार घनिष्ठ संबंध असावेत असे नाही. प्रत्येकाच्या मताला आपण सहमत नसलो तरी त्याच्या ते मत बोलून दाखवण्यावर निर्बंध घालणं हे उचित नसते.
अनोळखी व्यक्तीलाही बोलू दिलं जात नसेल तर तिथे जाऊन त्याची बाजू घेता यायला हवी, कुणाच्याही अगदी कुणाच्याही मतप्रदर्शित करण्याच्या हक्काचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी समजणारे कितीजण अवतीभवती असतात हे बघायला गेलं तर आकडा तळाशी दिसतो.
मतप्रदर्शन करणे आणि एखाद्याचा मानभंग करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे इथे लक्षात घ्यायला हवं. मतप्रदर्शीत करणे ह्याचा अर्थ सरसकट दुसऱ्याची बदनामी करणे असा होत नाही, बदनामी करणे खोटं बोलणे ह्याला कायद्याने शिक्षा आहे. तार्किक आणि योग्य भाषेत कोणत्याही विषयावर माणसाने विनादहशत व्यक्त होणं(त्याची इच्छा असल्यास) हे बळकट समाजाचे चिन्ह आहे.
माझ्यापेक्षा वेगळे विचार असलेल्या व्यक्तीने बोलूच नये, आपली मतं मांडू नये ह्याकडे कल असलेली लोकं मनाने आणि विचाराने अतिरेकी असतात. वेगळे विचार, वेगळी मतं असली तरी ती ऐकता, बोलता यायला हवीत. फारतर तुम्ही चर्चेने, संवादाने त्या विचारांचे खंडन करू शकता... संवादाचा विसंवाद मात्र होता कामा नये.
"तू बोलतोस त्या तुझ्या मताशी मी सहमत नाही परंतू तुझे ते मत मांडण्याच्या हक्काचे मी शेवटपर्यंत रक्षण करेन"  व्होल्टेअर ह्या जगप्रसिद्ध तत्ववेत्याने लिहिलेलं वाक्य माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया आहे.
©अर्चना चंद्रसेन

Saturday, 30 March 2019

टीका करताना जरा दमानं

पुण्यातून सुरेखा पुणेकरला उमेदवारी घोषित होईल ह्याअर्थी बातमी काल टीव्हीवर दाखवली आणि त्यावर सोशल मीडियावरून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्या बिलो द बेल्ट होत्या. त्यांना कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळणार होतं ही बाब अलाहिदा पण ज्या तर्हेने त्यावर रिऍक्ट केलं गेलं ते कोणत्याच संस्कारात बसत नाही.

'ह्यांना नाचीच भेटली का' 'आता xxx चा देठ हिरवा होणार' 'बाई दमानं घेणारी हाये' ह्या मी वाचलेल्या काही प्रतिक्रिया अजून बऱ्याच वाचल्यात पण इकडे लिहीत नाही.

सुरेखा पुणेकर कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, बालगंधर्व सारख्या प्रस्थापित नाटकगृहात तमाशा घेऊन जाणारी सुरेखा कोण ओळखत नाही. तुम्ही जर तिला ओळखता, तिचे परफॉर्मन्स युट्युबवर एन्जॉय करता तर तिला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. केवळ ती बाई आहे आणि तमाशा कलावंत आहे म्हणून पातळी सोडून बोलणार का? ह्यात लायकी तिची दिसते की बोलणाऱ्याची?

ती उघडउघड तमाशा कलावंत आहे, ठोक सुपारी वाजवून तिचे कार्यक्रम थेटरावर लागतात. तो तिचा पेशा आहे. पैसे कमावण्यासाठी तिने स्वतः निवडलेला हा व्यवसाय आहे पण म्हणून ती सगळ्याना अवेलेबल आहे असा अर्थ काढून तिला क्रीटीसाईज करणारे फारच गयेगुजरे आहेत. उलट मी तर म्हणते इच्छा असेल तर तिने नक्की उभं रहावं कारण तिच्यापेक्षा बरबटलेले लोक राजकारणात सन्मानाने मिरवत आहेत. ज्याच्यावर आरोप नाहीत असा राजकारणी दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी जाहिरात केली तर रुपाया कुणाला मिळणार नाही अशी इथली परिस्थिती आहे त्यामानाने सुरेखा फार उजळ आहे.

राजकारण फार गचाळ आहे सोनिया ते स्मृती सगळ्यांनाच फार वाईट रितीने बोललं जातं. हेमा मालिनी, जयाप्रदा , प्रियांका गांधी, उर्मिला मातोंडकर अशा अनेक स्त्रिया राजकारणात आहेत आणि अजून येतील. टीका जरूर करावी पण ती लॉजिकल असावी. समोरच्याला वाईट बोलताना आपण आपली लायकी दाखवत असतो हे विसरून चालणार नाही.

Wednesday, 20 March 2019

रंगात रंगून

वाजे मंदमंद पावा
त्याची मखमली धून
सूर ऐकता ऐकता
गेले भिजून भिजून

तुझ्या ओठांची निशाणी
खुले मोरपीस गाली
रुते कंकण हातात
अति घुसळण झाली

गेले रंगून रंगात
तूच मनात ध्यानात
जिथे तिथे तूच तूच
माझ्या कणात कणात

माझ्या ओठांत खुलतो
तुझ्या ओठीचा गुलाल
आलं उधाण उधाण
तुझा बिल्लोरी शृंगार

©अर्चना चंद्रसेन

#होळी_स्पेशल

Wednesday, 20 February 2019

उल्टी सलवार

अडचणीत फसलेली एक मोलकरीण, कामवाली. थोड्या पैशांसाठी बदल्यात शरीरसुख ओरबाडणारा मालक. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट... माझं काम होईल ना, मला पैसे मिळतील ना असं काळजीने विचारणारी ती जेव्हा खोली उघडून बाहेर पडते तेव्हा गडबडीत ती उलटी सलवार घालते. त्यातही शेजारचे कुणी पहात तर नाहीत ही खात्री करून दार उघडणारा तो.

सगळं आटपून तो टीव्ही बघत असतो आणि मिळणाऱ्या प्रमोशनच्या खुशीत बायको घरात आनंदातच येते. चिवचिव करत इतर स्टाफ कसा जळतो तरी मलाच प्रमोशन मिळणार कारण मॅनेजर माझ्या कामावर खुश आहेत ... आणि त्याचं लक्ष जातं तिने घातलेल्या उलट्या सलवारवर... द एन्ड

#उल्टी_सलवार - सहादत हसन मंटोच्या कथेवर बेतलेली ही केवळ 6-7 मिनिटांची शॉर्ट फिल्म खूप काही सांगून जाते. शरीर विक्रीच्या दोन बाजू ठळक दिसतात. मोलकरीण शरीर विकते, तिच्या चेहऱ्यावर असहाय्य भाव असतात, तिला पैसे हवे असतात; आणि त्याची बायको जमीर विकते, चूक वागल्याची, लाच दिल्याची शरम तिच्या चेहऱ्यावर अजिबात नसते , उलट प्रमोशन मिळाल्याचा आनंद ओसंडून वहात असतो.

शेवटी काही वाक्य दिसतात आणि फिल्म संपते. चेहरे बदलतात पण गोष्टी बदलत नसतात. जेव्हा तुम्ही कुणाच्यातरी जवळचे लोक वापरत असता तेव्हा तुमच्या जवळचे लोक दुसरं कुणीतरी वापरत असतं. सगळं देणंघेणं असतं, जे देतो तेच परत मिळतं.

Karma whether good or bad is a result of what we do in our life. Some says it is the mirror of what we do to others.

#Karma_is_bitch

©अर्चना चंद्रसेन

Saturday, 16 February 2019

रँडम_थोट्स2

अपूर्णता, दुर्लक्षित राहिल्याची भावना, सतत आपल्यावर अन्याय-अत्याचार होतात हे विचार माणसाला बंडखोर बनवतात. मनामध्ये एक आग खदखदत असते. इतर माणसांसारखेच आपण आहोत तरी आमच्यावर अन्याय आणि भेदभावाची वागणूक का? हे प्रश्न मनात भेडसावू लागले की पुढची वाटचाल फार कठीण असते. ह्यातूनच अतिरेकी विचारांची निर्मिती होत असावी.

स्वतः सबळ होणं, शिक्षित आणि सक्षम होणं हाच एकमेव मार्ग असतो जो आपल्यातली न्यूनगंडाची भावना आणि त्यातून तयार होणारी बंडखोरी कमी करतो. जगातले दोन लढे ह्याबाबत आदर्श असे आहेत. काळ्यांची समानतेसाठीची लढाई आणि महाराष्ट्रातील दलितांची सामाजिक उत्थानाची लढाई. काळे आणि दलित शतकानुशतके अन्याय सहन करून पिचलेले होते , संघर्ष करून त्यातून ते बाहेर आले. ह्या दोन्ही लढ्यात त्यांना मिळालेले नेतृत्व असामान्य होते त्यामुळे काळे आणि दलित कोणत्याही वाईट चक्रात न सापडता स्वतःला समृद्ध करते झाले.

खूप सोपं असतं बंडखोरी करून इतरांना त्रास देत रहाणं. उपद्रवमूल्य अधिक असलं की अंजरलं गोंजरलं तरी जातं किंवा पेकाटात लाथ तरी बसते. आपल्याला हीन, दुय्यय वागणूक मिळतेय हे समजलं की स्वतःला प्रगल्भ करणं हाच एकमेव मार्ग असतो जो मुख्य प्रवाहात आणि अग्रभागी आणून ठेवतो. स्वतःला मोठं करणं हे आपल्या हातात असतं, दुसऱ्याची रेघ पुसून स्वतःला कधीही मोठं होता येत नाही. स्वतःची रेघ मजबूत वाढवत न्यायची हाच मार्ग सगळ्यांच्या हिताचा असतो.

#violence_is_the_last_refuge_of_the_incompetent

#रँडम_थोट्स2

Wednesday, 13 February 2019

ब्रेक डॅम रुल्स

गेले काही दिवस #ईशान_हिलाल ह्या मुलाच्या मी अक्षरशः प्रेमात आहे. तो पुरुष आहे, त्याला नाचायला आवडतं. नृत्य हे त्याचं पॅशन आहे. तो ड्रेस डिझायनर पण आहे. अवघा चोवीस वर्षांचा हा मुलगा प्रचंड फ्लेकजीबल आहे. तो भारतातला व्यावसायिक पुरुष मेल बेलीडान्सर आहे. दिल्लीत राहणारा हा मुलगा नाचतो सुंदर म्हणून मला आवडतो असं नाही, त्याचा डान्स उत्तमच आहे पण आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यासाठी, मिळवण्यासाठीचा त्याचा झगडा त्याच्या प्रेमात पाडतो. त्याने कथ्थक नृत्य सुद्धा शिकले आहे. जेव्हा त्याने आईला आपल्या डान्स पॅशनबद्दल सांगितलं तेव्हा तू मर्दानी गोष्टी का करत नाहीस हा आईचा पहिला प्रश्न होता, हे नचनियो सारखं तू नाचायला का मागतोस. त्यात इस्लाममध्ये डान्स हराम समजला जातो त्यामुळे विरोध त्या कारणामुळे सुद्धा झाला. आपल्या आवडीचं करियर निवडतानाही ते तुमचं पुरुष किंवा बाई असणं गृहीत धरून बघितलं जातं. पुरुषाने कोणते प्रोफेशन करावेत कोणते करू नयेत. बाईने कोणते करावेत की घरच सांभाळावे ह्या समजुती इतक्या घट्ट आहेत की ईशान सारख्या मुलांना अक्षरशः मारहाणीलासुद्धा सामोरं जावं लागतं. त्याच्या डान्समुळे तो 'गे' तर नाही, त्यामुळे 'तसले' धंदे तर करत नाही ह्या अशा अनेक शंकामुळे ईशान सध्या आपल्या कुटुंबापासून दूर झालाय. इतकंच काय तर त्याची गर्ल फ्रँड सुद्धा त्याला सोडून गेली.

बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीत इशानने त्याची खंत बोलून दाखवलीय. पूर्वापार धारणामुळे आपण किती दिवस माणसाचं मूल्यमापन करणार आहोत हा त्याचा प्रश्न आहे. किती दिवस आपण फक्त कपडे, स्तननितंबाच्या हालचाली बघणार आहोत? नृत्याविष्काराकडे एक कला म्हणून का बघितलं जात नाही? आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी आपलं पॅशन, आवड समजून घ्यायला हवी . प्रत्येकाने  स्वतःवर विश्वास ठेवावा आणि स्वतःला हवं तेच करावं, लोकं तुम्हाला कायम खच्ची करत असतात त्यामुळे हार मानू नये. विल पॉवर स्ट्रॉंग ठेवावी.

ईशान हिलाल हा मुलगा एक आशा आहे ,उमेद आहे जो जेंडर बायस व्यवस्थेला छेद देऊन त्याच्या छाताडावर पाय देऊन दिमाखात उभा आहे. एक यशस्वी व्यावसायिक डान्सर म्हणून त्याचं करियर उत्तम सुरू आहे. युट्युबवर त्याचे डान्स व्हिडिओज धुमाकूळ घालत आहेत. व्यवस्थेला ठोकर मारणारी ही नवी मुलं मला कायम प्रेमात पाडत आलीत. आकाश उत्तुंग आहे, पंख फैलावून भरारी घ्यायचं काम आपलं आहे. यश मिळतच जिगरबाज असणं महत्वाचं.

#ब्रेक_डॅम_रुल्स

#बुरसटलेले_जुनाट_विचार_फाट्यावर_मारा

©अर्चना चंद्रसेन

Monday, 4 February 2019


मनाची अवस्था झालीये
निर्वात पोकळी सारखी
याला कारण तुझं नसणं कि
असून नसल्यासारखं दाखवणं
तशीही तुझ्या असण्याची
इतकी सवय चांगली नाही
तु नसताना जीव होतो कासावीस
जे व्हायला नको आहे मला
तू आता जर गेलाच आहेस
कुठंतरी लांब न सांगता
तर बरंच आहे कि
मला हि आजमावता येतील माझ्या भावना
तू आता येऊच नकोस परत
माझ्या भावविश्वात भूकंप घडवायला
ते झेपण्याची ताकत कधीच संपलीये
तसं दिल हलकं नाही आपलं, तरी
तरी ... नकोच येऊस परत कधीही
©अर्चना चंद्रसेन

Tuesday, 29 January 2019

नातं ... वेळ

नातं, मग ते रक्ताचं असो की आपण जोडलेल्या मैत्रीचं असो. नात्यात वेळ द्यायला लागतो हे मात्र शंभर टक्के खरं. आताशा वेगवान जगात वेळ देणं अवघड होऊन बसलंय. माणसाच्या आयुष्यात खुपसारी नाती असतात , त्या सगळ्यांना रोजच आणि सतत वेळ देणं कसं शक्य आहे. काही लोक समजूतदार असतात, वेळ नसणं समजून घेतात. आपलं सानिध्य, संभाषण जितकं अधिक तितकं नातं खुलत जातं आणि ह्याला वेळ तर हवाच. काही नाती निव्वळ वेळ न दिल्याने खुंटतात. स्वभाव, आवडनिवड सगळंसगळं पुरक असूनही एकमेकांसाठी वेळ नसणे हेच ते कदाचित होऊ शकणारं नातं संपवायला कारण ठरतं.

आपलं कुटुंब, उदरनिर्वाह आणि इष्टसंबंधित मित्रपरिवार ह्यात आपला वेळ कुणाला द्यायचा ह्यात जर प्राधान्यक्रम लावायचं ठरवलं तर प्रत्येकजण सगळ्यात आधी कुटुंबाचं नाव घेईल पण खरोखरच कुटुंबाला आपण तितका वेळ देतो का हे तपासायला हवं. उदरनिर्वाहासाठी वेळ देणं हे आपण टाळू शकतच नाही, पोट भरण्याचा व्यवसाय वेळ घेणारच. कुटुंब म्हटलं की जबाबदारी आली, त्याचं ओझं आलं. उदरनिर्वाहासाठी केलेल्या धावपळ, कष्टानंतर काहीवेळा नव्हे बरेचदा पुन्हा इतर जबाबदारी नको वाटते आणि मनुष्य मित्रांच्या सोबतीत आपली वेळ घालवतो. बहुतेकवेळा मित्रपरिवारास वेळ जास्त दिला जातो आणि ते खूप स्वाभाविक आहे; त्यात चूक काहीच नाही पण त्यामुळे होतं काय की आपला प्राधान्यक्रम आपणच विस्कळीत करून टाकतो.

नात्यात वेळेचं नियोजन करावं लागतं हे जास्त कुणाच्या ध्यानीमनी देखील नसतं पण ते करावं लागेल. जग खूप वेगवान आहे, सुरू झालेला दिवस संपतो कधी तेही समजत नाही. नात्यातील वेळेचे नियोजन केले नसेल तर नक्की करा. नियोजन करताना ज्याची जशी निकड तिकडे वेळ देताना फक्त स्वतःसाठी वेळेचा एक कवडसा ठेवायला विसरु नका. होतं काय की सगळ्यांची मनधरणी करता करता आपण आपल्यालाच वेळ देणं विसरून जातो, आणि जिथं स्वतःचं स्वतःशी नातं नसतं तिथं इतर नात्यांना अर्थ उरत नाही. आपलं आपल्याशी नातं म्हणजे नेमकं काय, तर अधूनमधून स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. आपल्यात होत असलेले र्हस्व दीर्घ बदल स्वतःच तपासावेत. आपली स्वतःची मानसिक अवस्था समजावून घेऊन त्यात बदल करणे गरजेचं आहे की नाही हे नक्की तपासून बघावं आणि त्यावर काम करावं हे स्वतःशी स्वतःचं नातं जितकं प्रामाणिक तितकं मानसिक आरोग्य खटाखट राहील

काही काही नाती अशी असतात की ती स्वतःच त्
आपल्यासाठी वेळ शोधतात, तुम्ही कितीही व्यस्त, त्रस्त असलात तरी मनाचे हे बंध तुम्हाला त्या नात्यासाठी वेळ द्यायला भाग पाडतात आणि खरं सांगायचं तर हीच नाती खूप सुंदर आणि देखणी असतात. हे नातं तुमच्याकडे असं काही धावत येतं की सगळी कामं मागे टाकून आपण नकळत तिथे वेळ देत रहातो. अशी नाती जपावी, चेरीश करावीत नव्हे ही नाती इतकी घट्ट असतात की ती स्वतःच स्वतःची जपणूक करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असं स्वतःच स्वतःची जपणूक करणारं, देखणं, सुंदर, वेळखाऊ नातं असावं ह्याच मनापासून सदिच्छा.

धन्यवाद

Saturday, 12 January 2019

There is always room on top

उंटाचे व्यापारी वगैरे आता कालबाह्य प्रकरण झालंय, उंटाच्या व्यापाऱ्याची गोष्ट मात्र चिरकाल टिकणारी आहे. उंटाचा व्यापारी त्याचे पाचशे उंट घेऊन बाजारात विकायला निघालेला असतो. वाटेत रात्रीचा मुक्काम करायला एका धर्मशाळेशी तो थांबतो. रात्रीच्या वेळी उंट इकडेतिकडे पांगतील म्हणून तो सगळे उंट खुंटे ठोकून दोरीने बांधून टाकतो. चारशे नव्यान्नव उंट बांधून झाल्यावर उरलेल्या एका उंटासाठी त्याच्याकडे खुंटा आणि दोरी नसते. प्रवासात बहुतेक कुठे गहाळ झाले असावेत, उंटाचा व्यापारी एक खुंटा आणि दोरी मागण्यासाठी धर्मशाळेच्या मालकाकडे जातो. मालकाकडे सुद्धा खुंटा आणि दोरी नसते, मालक त्याला म्हणतो की बाकीचे उंट सोडून एकटा उंट कुठे जाणार नाही त्यामुळे काळजी नको करुस. मागच्या एका अनुभवातून उंटाचा व्यापारी म्हणतो की बांधून ठेवलं नाही तर उंट रात्रीतून उठून खूप लांबवर निघून जातात, त्याचे काही अशारीतीने उंट गायब झालेले तो धर्मशाळामालकाला सांगतो. धर्मशाळामालक थोडा वेळ डोकं खाजवून एक आयडिया उंटाच्या व्यापाऱ्याला सांगतो. तू खुंटा ठोक आणि दोरी बांध आणि झोपायला निघून जा, खरा खुंटा तर नाही पण तशी अकटिंग कर आणि बिनधास्तपणे झोपून जा. दुसरा पर्यायच नसल्याने उंटव्यापारी तसंच करतो. काल्पनिक खुंटा ठोकतो , दोरी बांधतो आणि झोपून जातो. सकाळी उठल्यावर व्यापारी बघतो तर ज्याला खुंटादोरी नाही तो उंटसुद्धा तसाच बसून असतो. व्यापारी मग एकेक करून सगळ्या उंटाना सोडतो तसे ते सगळे अंग झटकून उभे रहातात. बिनखुंट्यादोरीचा उंट मात्र अजून बसून असतो. व्यापारी त्याला चुचकारतो, उभं रहा म्हणतो तरी तो हलत नाही. धर्मशाळामालक ते सगळं बघत असतो... न राहवून तो व्यापाऱ्याला सांगतो की रात्री तू खुंटा बांधलास तसाच तो काढून टाक. उंटाचा व्यापारी मग तो न ठोकलेला खुंटा उपसतो आणि न बांधलेली दोरी सोडतो तेव्हा कुठे तो उंट जागेवरून हालतो.

खुंटा आणि दोरी नसतेच तरी ती आहे हे समजून उंट वागतो ; आपली जागा सोडत नाही, तेच प्रत्येकजण करत असतो. अशा अनेक अनामिक खुंट्या आणि दोऱ्याला जखडून माणूस जगत असतो. भीती, द्वेष, घृणा, घमेंड अशा अनेक आणि अगणित खुंट्याला आपण आपल्यालाच बांधून घातलेले असतं. जोवर हे बंध सैलावत नाहीत तोवर आपला परीघ मर्यादित असतो, तिथल्या तिथे घुटमळणे होत राहते. नीतिमत्तेच्या खुंट्याला बांधून ठेवून इतर खुंट्या आपणच आपल्या तोडून टाकायच्या. ज्यांचे पंख बांधलेले, जड तितकी त्यांची उडान तोकडी. पंख गरुडाचे असतात पण त्यावरचं बारीक, छोट्याशा खड्याचं ओझंही त्याची भरारी छाटून टाकते.

There is always room on top
Bottom is crowded

स्वतःला अवळलेल्या दोऱ्या, पंखावरची ओझी, भार झटकून बंधमुक्त होत जाल तितकी भरारी आणि दौड सहज, सोपी आणि दूरवर होत जाईल. आपण कोणत्या खुंट्याला बांधलोय हे माहीत असणे हे तो तोडायची पहिली पायरी असते ... मग काय तोडताय ना खुंट्या !

#ऐकलेल्या_गोष्टी

#थिंक_पॉझिटिव्ह

©अर्चना चंद्रसेन 

Wednesday, 2 January 2019

नैतिकता , चिंतन मनन

नैतिकता म्हणजे काय? अनैतिक कृत्य म्हणजे नेमकं कोणतं? ह्याबद्दल जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये एकवाक्यता नाही आणि ती कधीही नव्हती. काही तत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार नैतिकता ही स्थल-कालपरत्वे बदलणारी असते. एका काळात एका समाजामध्ये असणारी नैतिकतेची संकल्पना ही दुसऱ्या समाजामध्ये असेलच असे नाही. तसेच एकाच समाजाच्या नैतिकेच्या संकल्पना कालपरत्वे बदलणाऱ्या असतात. उदा. आफ्रिकेतील बऱ्याच जमातींमध्ये Female Genital Mutilation नावाचा अघोरी प्रकार आहे. मुलींच्या कौमार्याचा भंग होऊ नये म्हणून असा प्रकार केला जातो. अत्यंत अमानुष, अमानवी आणि त्रासदायक अशा या प्रकाराला त्या समाजात नैतिक मानले जाते. मात्र आधुनिक समाजाकडून याची सदैव निर्भर्त्सना होत आहे. म्हणजेच नैतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर अवलंबून आहे. आणखी उदाहरण द्यायचे झालेच तर नैतिक सापेक्षतावाद्यांच्या मतानुसार एखादी कृती योग्य की अयोग्य, हे त्या समाजाच्या स्वत:च्या अशा नैतिक संकल्पनांवर अवलंबून असते. एका समाजामध्ये नैतिक असणारी संकल्पना दुसऱ्या समाजात नैतिक असेलच,  असे नाही. याच्या अगदी उलट म्हणजे Ethical Objectivism होय. यांनुसार जर Ethical Relativism चे म्हणणे ग्राह्य़ मानले तर दोन समाजांमध्ये नैतिकतेची कोणतीच समानता राहणार नाही आणि एक वैश्विक समाज या नात्याने जगणे अवघड होऊन जाईल. सर्वच संस्कृतीमध्ये काही समान अशा नैतिक मूल्यांना महत्त्व दिलेले असते/ दिले जावे. उदा. एखाद्याचा खून करणे हे अनतिक, तर पालकांचा आदर करणे हे नैतिक मानले गेले आहे आणि सर्वच समाजामध्ये/ संस्कृतींमध्ये याबाबतीत एकवाक्यता आहे.

काही तत्त्वांबद्दल सापेक्षता असली तरी ही काही नैतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. नैतिकतेची सापेक्ष संकल्पना एकूणच वैश्विक मानवतावादासाठी धोकादायक ठरू शकते. एक मनुष्यप्राणी या नात्याने विश्वातील सर्वच समाजांमध्ये नैतिकतेची किमान काही आधारभूत तत्त्वे असावीत, वाढवली जावीत; जेणेकरून काही अनैतिक प्रथा-परंपरांविरोधात वैश्विक समाजाकडून प्रतिरोध केला जाऊ शकतो. मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, लैंगिक अत्याचार/ छळवणूक,Female Genital Mutilation  सारख्या अघोरी प्रकारांना विरोध करणारी ‘नैतिकता’ सर्वच समाजांसाठी सर्व काळांमध्ये असायलाच हव्या आहेत. मुळात नैतिकतेची संकल्पना ही विश्वातील सर्वच मानवजातीचे कल्याण व्हावे आणि अन्याय दूर व्हावा यासाठीच आहे/असायला हवी. या दृष्टीने विचार करताना नैतिकतेचे उद्दिष्ट, संकल्पना अधिक योग्य आहे/ असायला व्हावी. नैतिकतेत अंतःकरणाचा आवाजही खुप महत्वाचा असतो.
अंतःकरणाचा आवाज (voice of conscience) मानवाला चांगले काय आणि वाईट काय यामधील भेद ओळखण्यासाठी आणि चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करेल. मराठीत यालाच आपण ‘सदसद्विवेकबुद्धी’ असे म्हणतो. आता सदसद्विवेकबुद्धी किंवा सदसद्विवेकाच्या आवाजाकडे लक्ष जावे यासाठी आपण काय, कसे, का करायला हवे तर आपणाला सदसद्विवेकबुद्धीचे विविध आयाम विचारात घ्यावे लागतील. न्यायबुद्धी, समतेचे तत्त्व, विषमताविरहित विचार, मानव अधिकारांची जाणीव.. इ. घटकांचा त्यात समावेश करावा लागेल. आता या बाबींची जाणीव निर्माण होण्यासाठी काय करावे लागेल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्वार्थी’ भाव सोडून आपण या समाजाचे घटक आहोत; मी, माझे, मला यासोबतच माझी समाजाप्रति काय कर्तव्ये आहेत, याची मला जाणीव असणे गरजेचे आहे. राग, लोभ, दंभ, मोह-मत्सर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला की आपोआप सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येतो. समाजामध्ये वावरताना व्यावसायिक जीवनामध्ये आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या; आपले आणि आपल्या पदाचे औचित्य याची जाणीव असणे हीच बाब सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येण्यासाठी आवश्यक ठरते

सद्सद्विवेक असणं खूप गरजेचं असतानाही काही वेळा त्याबाबत गोंधळाची मानसिकता येऊ शकते. विवेकाबद्दल मनुष्याला संकट हे दोन प्रकारचे असू शकते. एकतर विवेकवादी भूमिका काय आहे हेच न कळणे किंवा दोन विवेकवादी भूमिकांमध्ये कशाला प्राधान्य द्यावे यामध्ये गोंधळ उडणे. तसेच बऱ्याचदा विवेकवादी भूमिका काय आहे, हे कळत असूनदेखील ती केवळ बदल्याची भावना (Revenge), परंपरा (Tradition), पूर्वग्रह (Prejudice) आदी कारणास्तव आपण त्या विवेकवादी भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. एक वेळेस विवेकवादी भूमिका माहीतच नसेल तर निर्णय घेणे सोपे असते, विवेकवादी भूमिका काय आहे हे जाणून त्यावर निर्णय घेणे हे त्यापेक्षा अवघड आहे आणि विवेकवादी भूमिका माहीत आहे, पण केवळ वैयक्तिक आकसामुळे तिचे अवलंबन करणे अडचणीचे वाटणे ही सर्वात अवघड बाब आहे. या नैतिक पेचाचे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील उदाहरण देऊन स्पष्टीकरण करता येईल. या निवडणुकांत आम आदमी पक्षाने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना प्रचलित भ्रष्ट व्यवस्थेसाठी जबाबदार धरत संबंध निवडणूक प्रचारात त्यांच्या अध:पतनाची विविध रूपे जनतेसमोर मांडून आपल्या रूपाने स्वच्छ, प्रामाणिक राजकारणाचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच निवडणूक प्रचार आणि निकालानंतरही त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीतदेखील ‘आम्ही कुणाला समर्थन देणार नाही आणि कुणाचे समर्थन घेणार नाही’ अशी भूमिका घेतली.  तथापि, भाजपने सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असूनदेखील जेव्हा सरकार स्थापनेस नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेसने आम आदमी पक्षाला बिनशर्त पािठबा देण्याचे जाहीर केले तेव्हा ‘आप’पुढे जणू विवेकाचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. एका बाजूला निवडणुकीपूर्वी व त्यानंतरदेखील घेतलेली भूमिका आणि दुसऱ्या बाजूला सरकार स्थापन करून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी शिरावर घ्यावी, यासाठी वाढणारा दबाव व अपेक्षा अशा कात्रीत हा पक्ष सापडल्याचे चित्र दिसले.  अर्थात हा पेच व्यक्तिगत, संस्था, संघटनात्मक वा सार्वजनिक जीवनातील अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो.