Saturday, 16 December 2017

सैराटची ऐशीतैशी

#कुबेर_विनोदी_कथा_स्पर्धा

(नागराजअण्णांची माफी मागून आणि चार्लीला वंदन करून)

कथेचं नाव - सैराटची एैशी तैशी


एक छानसं, छोटंसं, टुमदार गाव होतं , इतकी विशेषणं लावलीत म्हणजे ते नक्कीच पुणे असणार हे अनुभवी लोकांना सांगणे न लगे...तर ह्या सुंदर सुंदर गावात तशीच एक छानशी हौसिंग सोसायटी होती, ह्या सोसायटीत आपली हिरोईन अर्चि आणि हिरो परश्या रहात होते. ह्यांची ही नावं त्यांच्या जन्मदात्यांनी जागतिक प्रसिद्धीचा सैराटनामक सिनेमा येण्याआधीच ठेवली होती आणि नंतर ती सिनेमातील मुख्य पात्रांना दिली गेली हा एक निव्वळ योगायोग होता. अर्चिचे पप्पा त्याना ती लहानपणापासून पप्पाच म्हणत होती , तर हे पप्पा महाचिकट मंजे कंजूस माणूस शेणातला पैसा उचलून धुवून वापरणारा, हे स्वतःच्या पैशाने चहा दूरची बात हॉटेलची पाटीसुद्धा वाचत नसत, अशा पप्पांना त्यांच्या एका मित्राने सैराट पिक्चर दाखवला आणि त्याने हे बरेच प्रेरित झाले. घरी आल्याआल्या त्यांनी लेकीला फर्माण सोडले “आरचे, तू आता मला पप्पा म्हणू नको तात्या म्हण. सैराटमधला तात्या बघितला का काय रुबाब आहे तात्या नावात” झालं अर्चिने रडायला सुरवात केली “तुला रडायला काय झालं आता, नुसतं तात्या म्हण म्हणलं तर मुंगी चावल्यासारखी काय रडायला लागलीस” अर्चिने रडत रडत डोळे पुसले “रडू नको तर काय, सैराटमध्ये तो तात्या अर्चिला मारतोSS वर प्रिन्सला ही मर्डरर बनवतो मला नको असले मारकुटे पप्पा” अर्चिने अजून गळा काढला ते ऐकून आतून आई गडबडीत बाहेर आली “काय गोंधळ लावलाय, जरा फेसपॅक लावावा म्हटलं तर झाला तुमचा गलका सुरू” “मम्मी फेसपॅक थोडा ज्यादा भिजव, माझ्याही गालावर पिंपल आलाय” अर्चि रडता रडता आरश्याकडे धावली “फेसपॅक कसला आणलाय , अरे देवा किती पैसे घालवले त्यात” पप्पाना म्हणजे भावी तात्यांना फेसपॅकच्या नावानेच घाम फुटला “विकत नाही हो आणला , मसूरडाळ मिक्सरमधून काढून दुधात भिजवली की झाला फेसपॅक. मेलं तुमच्यासारखा कंजूस नवरा असताना मी फेसपॅक विकत आणेन का? मला माझ्या सौभाग्याची काळजी आहे म्हटलं, बरं ही का रडतेय” आता अर्चिला आपलं आधीच रडणं आणि पप्पांना तात्याची आठवण आली “मम्मी तात्या मला पप्पा म्हण म्हणतायेत, मला नको असले पप्पा” गडबडीत अर्चिने पप्पा आणि तात्या उलटसुलट केले इकडे मम्मी चिंतेत,चिडून आणि आपलं ग्लॅमर अजून टिकून आहे ह्याचा नाही म्हटलं तरी थोडा आनंद ह्या संमिश्र भावात “कोण गं हा , माझ्या लेकीला पप्पा म्हण म्हणतोय” तशी अर्चिला आपली चूक समजली जीभ चावतच “सॉरी सॉरी , अगं पप्पा मला म्हणतात की तात्या म्हणून हाक मार म्हणून, तो सैराट बघून आले ना” तशी अंगावर पाल पडल्यासारखी आई ओरडली “आरचे तू अजिबात तात्या म्हणू नकोस, पप्पाच म्हण. तात्या म्हटलं की मला तो झपाटलेला तात्या विंचू आठवतो. माझा नवरा तात्या विंचू , ओ माँ माताजी चक्करच आली मला, डोळ्यापुढे अंधारीच आली माझ्या, आरचे मला धर,अहो SS” कुणाचं काय तर कुणाचं काय इथं आईचं वेगळंच सुरू झालं तशी अर्चि घाबरीघुबरी झाली “पप्पा, मी रिक्षा आणू का मम्मीला अंधारी आलीय” दाराकडे भराभरा निघालेल्या अर्चिला पप्पा ओरडले “अगं काही अंधारी आली नाही , तुझ्या आईच्या डोळ्यावर काळा गॉगल आहे आणि तिला वाटतंय चक्करच आली” तसा डोळ्यावरचा काळा गॉगल घाईने हटवत आई म्हटली “शी बाई ह्या घरात कुणाला माझी किंमतच नाही, चक्कर आली अंधारी आली तरी माझाच दोष, जळला मेला बायकांचा जन्म.” “पण मी म्हणतो घरात कुणी गॉगल घालतं का , जेव्हा बघावं तेव्हा नटून थटून बसलेला असता. त्या सिरियल्सनी बिघडवलं तुम्हाला, त्या बायका एक जरीच्या साड्या नेसून नुसत्या कटकारस्थानं करत असतात आणि ते बघून तुम्ही हे घरात गॉगल, जरीच्या साड्या आणि टिकल्या तर कसल्या हे एकेक बंदा रुपया जणू” पप्पा तावतावात भाषण मोडवर गेलेले बघून आईने तिथून काढता पाय घेतला आणि क्लासची वेळ झाली म्हणून अर्चिही पळाली.

ह्याच सोसायटीत दोन बिल्डिंग सोडून परश्या रहात असतो, त्याला अर्चि लई मंजे लई आवडायची पण सांगायची गोची. ही अर्चि त्या अर्चिसारखी स्मार्ट न्हवती हे आपलं एकदम बावळट ध्यान होतं. अर्चिला तू मला आवडतेस हे सांगायचं दूरच पण परश्या तिच्या समोरही जात नसे. रात्रंदिवस अर्चिचा विचार करू करू परश्या काट्यावर आला, एकेदिवशी आज साला काय व्हायचं ते होऊ दे कोर्टात जाऊदे अर्चिला सांगायचंच असं परश्यानं ठरवलंच पण च्यामारी तेवढी काय त्याला  डेअरिंग होईना म्हणून ब्रेकअपच्या आधीच आमचा हिरो देवदास झाला आणि सॅडमूडमध्ये त्याने मोबाईलवर गाणं लावलं कुठलं गाणं तर ते नै का एकदा ऐकलं तर दहावेळा ब्रेकअप झाल्याचा फिल येतो ते गाणं “ तेरी मेरी यू टी टूट गये सोनिये जैसे तुटिया अंबर दा तारा” अंबर शब्द आला कि दरवेळी परश्या छपराकडे बघायचा तिकडं काय दिसणार होतं ते त्यालाच माहीत. तितक्यात मोबाईल वाजला हा मेसेज खोलून बघतोय तर दोस्ताचा मेसेज “अर्चि कट्ट्यावर बसलीय” काय, कवा,कुठं पुढचे प्रश्न विचारे पर्यंत मित्र ऑफलाइन, परश्याचे मित्र एकेक कलंदर सैराटमधल्या मित्रांसारखे मार खाणारे न्हवतेच उलट ह्याला अजुन अडचणीत आणणारे होते तरी अर्चिचं नाव ऐकलं की ह्याने चढवले अंगावर कपडे आणि निघाला. अर्चि मस्त कट्ट्यावर मैत्रिणी गोळा करून बसली होती हातात पाचपन्नास राख्या, परश्या लांबूनच बघत होता हिचं काय सुरुये म्हणून. ही येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना थांबवून राखी बांधत होती, “च्यामारी आज राखीपौर्णिमा आहे नाही का अन ही बया काय गावजेवण तसं गावराखीपौर्णिमा साजरी करतेय की काय. देवा मला वाचीव, हिच्या भावी मुलांचा मामा नाही पप्पा व्हायचंय रे मला” असं मनातल्या मनात बडबडत परश्या आल्या वाटेनं मागे गेला. मेसेज करणाऱ्या मित्राला फोनवर भोसडतच परश्या मागे फिरला.

अर्चिची लक्षण बघून , लक्षण म्हणजे ते हेच सार्वजनिक राखीपौर्णिमा वगैरे तर हे बघून पोरगी अरेंज मॅरेज करणार आणि आपल्याला खर्चापासून सुटका नाही हे तिच्या पप्पांना लक्षात आलं, तरी बापही कधी तरुण मुलगा असतोच त्यामुळे तरुणांच्या चाली त्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. परश्याचा अर्चिकडे ओढा आहे हे पप्पांना समजलं तसं त्याना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. चांगला पोरगा बिनखर्चाचा मिळून जाईल, चप्पल झिजवणे, चहा पोहे , लग्न कितीतरी पैसा वाचेल फक्त पोरीने परश्याला हो म्हणायला हवं. काही दिवस गेले तरी पुढची हालचाल दिसेना एकदिवस न राहवून पप्पानी अर्चिला सांगितलंच “तुला करमत नसेल तर परश्याला बोलवत जा गप्पा मारायला, नाही म्हणजे आम्ही नव्या जमान्याचे आहोत आमची हरकत नाही मुलामुलींनी बोललं तरी” अर्चि आपल्याच नादात “करमतंय की मला, कंटाळा आला की मीच संगीकडे जाईन” “अरे वा, छान” मनातल्या मनात “धत 'तेरीकी” काही झालं तरी हे स्थळ जाता कामा नये आणि शक्य तितके पैसे वाचवायचे ठरवून पप्पांनी घराबाहेर घुटमळणाऱ्या परश्याला हटकलं इकडचं तिकडचं बोलताना थेट विचारलंच “इथे सारखा का फिरत असतोस” परश्या गडबडला “परत नाही येणार” म्हणून खाल्ल्या मानेन परश्या निघाला तसा “नै येत जा तू” घसा खाकरत पप्पा “घरात अर्चिशी बोलत बसला तरी चालेल, नाही त्याचं काय आहे तिचाही वेळ जाईल” पप्पांच्या ग्रीन सिग्नलचा परिणाम होऊन परश्या अर्चिच्या घरात येऊजाऊ लागला. हो नाही म्हणता म्हणता पप्पांच्या प्रयत्नाला आणि परश्याच्या प्रेमाला फळं लागली. अर्चि चक्क परश्याच्या प्रेमात पडली, तरी पप्पा आपल्याला काय समजतच नाही दिसतंच नाही असं समजून वागू लागले. एके दिवशी तिच्या मम्मीने विषय काढला “परश्याच्या घरी कधी जायचं बोलणी करायला” कळून सवरून आडाण्याचा आव आणून पप्पा म्हटले “काय, कशाला” “अहो अर्चि परश्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला, त्यांचं प्रेम आहे “ अंगावर पाल पडल्यासारखे पप्पा “मी बोलणी करायला जाणार नाही, प्रेम आहे तर त्यांचं ते पळतील” जीभ चावून “अगं त्यांनी सांगू तर दे मला”. अर्चिपरश्याने दोघानीही आपआपल्या घरी एकदाची ही बातमी फोडली तशी पप्पा लटका नकार घेऊन बसले, परश्याच्या घरच्यांनीही मग ताणून धरलं. शेवटी वाट बघून दोघांनी आळंदीला जाऊन दोनाचे चार हात केले, तसं पप्पांना हुरूप आला आणि चारच दिवसात जंगी रिसेप्शन देऊन टाकलं. अर्चिची पाठवणी करताना डोळे पुसत पप्पा मनात विचार करत होते “नाही मी मुलीच्या सुखापुढे पैशाला महत्व देणारा बाप नाही पण सगळी सोंगं आणता येतात पैशाचं आणता येत नाही, चांगला मुलगा आहे त्यांनी लग्न करावं म्हणून मी किती प्रयत्न केले आता ऐपतीप्रमाणे मी रिसेप्शन करून दिलं” पाया पडणाऱ्या अर्चिला तोंड भरून आशीर्वाद दिला “सुखाचा संसार करा, अष्टपुत्रा भव” 

सुशीला

हि एक सत्यकथा आहे, नावं गाव बदलून लिहितेय. आजूबाजूला खूप विस्मयकारी प्रकार दिसलेले असतात ते लिहावे म्हणतेय. जमेल तसे भाग करून लिहितेय

----

#सुशीला

ओपीडी सुरु होऊन तास उलटला, शहरात राहिलेली शिकलेली निशा पहिलं पोस्टिंग मिळून ह्या आडगावात येऊन पडली होती. चहासाठी उठावं कि पुढचे पेशन्ट तपासावेत ह्या विचारात असतानाच निकम कम्पाऊंडर एका पंचवीशीतल्या तरुणीला घेऊन आत आला
“डॉक्टर मॅडम, हि आमच्या आळीत रहाते. आज सकाळीच न्हाणीघरात चक्कर येऊन पडली. बरं तर नशीब नाहीतर डोक्याला मार बीर लागला असता”
तिला तपासायच्या टेबलावर नेता नेता, निशा मनात विचार करत होती...ह्या गावात येऊन सहा महिने उलटले, गावातले म्हातारेकोतारे, तरणेताठे, लेकरं , बायाबापड्या जवळजवळ सगळे बघून झाले हिला कसं कुठं बघितलं नाही. तपासता तपासता निशा तिच्याशी बोलत होती
“सोबत कुणी आलंय का तुझ्या, तुझी सासू नवरा”
“संगट मामंजी आलेत, मालक घरात न्हाईत”
“गुड न्यूज आहे...म्हणजे चांगली बातमी, बहुतेक तुला दिवस राहिलेत. तीन चार महिने झाले असावेत. उद्या रक्त, लघवी तपासून घे बरं, गोळ्या औषध लिहून देते शेजारच्या मेडिकलमधून घ्या. रिपोर्ट दाखवायला उद्या ये”
हातातली चिठ्ठी चुरगाळत खाल मानेनं सुशीला बाहेर पडली. तशी निकमाना आवाज देत निशा म्हटली “मास्तर तास झाला, चहा द्या गरिबाला”. हातातला ट्रे समोर ठेऊन निकमही समोरच्या खुर्चीत टेकले. निशा इथं आल्यापासून निकमच तिचे केअरटेकर बनले होते, रिटायरमेंटला दीडवर्ष बाकी असलेला निकम मायाळू आणि पापभिरू भाबडा माणूस होता त्याच्या पोटी लेकरू नसल्यानं तो बाकीच्या मुलातच स्वतःला रमवायचा. 
“ती आत्ता गेली तिला दिवस राहिलेत बरका, तिच्या घरी कळवा”
निशाचं वाक्य ऐकून निकमचा चेहराच बदलला, निशाचं तिकडे लक्ष न्हवतं
“हि दिसली नाही कधी, घराबाहेर पडत नाही का, तसं गावही बदललाय हल्ली बायका घोळक्याने का होईना बाहेर पडतात”
“सुशीला घरातच असते, कुठं जात नाही. माहेर तुटलं तिचं, आई बाप आहेत तवर बाईला माहेर बघा. खाऊन पिऊन सुखी आहे तशी ती, आपल्या पुरुषोत्तमची बायको आहे ही, सांगतो तिच्या जावंला घरी जाता जाता” चहाचे कप ट्रेत गोळा करून निकम गेले आणि कंबर लचकवत, बायकी हावभाव करत चालणारा पुरुषांत नसलेला पुरुषोत्तम निशाच्या नजरेसमोर खटकन उभा राहिला. बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा उलगडा व्हायचा होता...पुढचा पेशंट बोलवायला निशाने बेल दाबली
...
रखमाच्या दारापुढं मांडव पडला होता , अगदी साधासा होता. रखमा रांडाव होऊनही दहावर्ष उलटून गेली होती. पदरात दोन लेकरं, मोठा मुलगा बाप असतानाच शिकून शहरात नोकरीला म्हणून जोे गेला तो तिकडचाच झाला. पोरानं मनानचं बायको केली एक मुलंही झालं , गावी आई बहिणीकडे ढुकुणबी बघना झाला. सणासुदीला आधी आधी यायचा तेबी आता येत नाही. पोराच्या पाठीवर आठ वर्षांनी झालेली मुलगी सुशीला दिसायला गोरीगोमटी पण शिक्षणात डोकंच नाही, तसंबी पोरीच्या जातीला डोकं असून काय फायदा, रुपडं चांगलं असल तर झटक्यात उजवून टाकता येती बघा. सोयऱ्यातच एकाने मागणं आणलं त्याच जागी सुशीलाचं लग्न पक्कं झालं. नवऱ्यामागे रखमाची शेती पडीक राहिली होती, दोघी दुसऱ्याच्या रानात कामं करून पोट भरत होत्या.लग्नात देणघेणं जमणारच न्हवतं तसंच मागणं आलं देव पावला म्हणून रखमा खुशीत होती. पोराला बोलवून घेतला होता, सख्ख्या बहिणीच्या लग्नात भाऊ नसला तर गाववाले तोंडात शेण घालतील म्हणून हातापाया पडून पोराला बोलवून घेतलं होतं, तो बी उपकार केल्यासारखा सकाळी आला अन सांजच्या गाडीने परत जातो ह्या बोलीवरच.

भर दुपारी बाराचं लग्न , आत नवरी नटून बसली होती. लै दिवसांनी सुशिलाच्या अंगावर चांगले कपडे होते. हळदी अंगाची, मेंदी रेखल्या हातांची, नवीन लाल जरतारी रुंद हिरव्या काठांची साडी अंगावर ल्यालेली सुशीला उठून दिसत होती. रस्त्यावर ढोलीबाजा वाजू लागला, नवरदेव घोड्यावर चढला, त्याचे आठ दहा दोस्त लोक धमाल नाचत होते. पोरांना नाचाची नशा चढली, बेभान होऊन नाचत होते. एका दोस्तानं गाडीत ठेवलेली फटाकी बाहेर काढली. सुतळी बॉम्ब दणक्यात वाजीवले, मोठ्या फटाक्यांची माळ चेतवली. जो जो फटाके वाजत तो तो नवरदेवाचं घोडं बिथरत होतं. एक मोठी माळ लागली अन घोड्याने जोरदार खिंकाळी मारून पाठीवरचा नवरदेव उडवला, हवेतून उडून जमिनीवर आदळलेल्या त्याच्या छाताडावर घोड्याचे पुढचे पाय आपटले तशी तोंडातून रक्ताची पिचकारी येऊन जागेवरच नवरदेवाचा खेळ आटपला. एका क्षणात वाजंत्री थांबली, सगळी पळापळ सुरु झाली. रखमाचं काळीज लक्कन हाललं, मोठ्याने बोंब मारून ती जागीच चक्कर येऊन कोसळली.

पांढऱ्या पायाची, लग्नाआधीच नवरा खाल्ला गं हिने , असं म्हणून न झालेल्या सासवा, नंदा, जावा सुशिलाच्या नावाने शिमगा करत होत्या. रखमा आता भानावर आली. लग्नाला आलेली माणसं पांगली. नवरदेवाला उचलून घेऊन गेले. लग्नाच्या मांडवाला पार सुतकी कळा आली. सुशीला आतमध्ये हबकून बसली होती, अंगावरचे कपडे बदलावेत कि काय करावं हेही तिला कळत न्हवतं. उंबऱ्यात डोक्याला हात लावून रखमा बसली होती, तोच पोरगा एका माणसाला घेऊन आला.
“आई, हे वऱ्हाडात आले होते, सुशी ह्यांना पसंत आहे. ह्यांचा मुलगा आहे लग्नाचा. आपण हो म्हटलं तर मुलाला घेऊन येतील, संध्याकाळी ह्याच मांडवात लग्न लावून देऊ”
“बरं बाबा, आणा म्हणावं पोराला. तसंबी आता हिचं दुसरीकडं जमणं अवघड झालं. खर्चापाणी पण परत झेपणार नाही”
“अगं काळजी नको करू, घरचं खूप चांगलं आहे. दोनच भाऊ आहेत , 15 एकर बागायती आहे. मोठ्या भावाचं लग्नही झालंय, माझ्यावर विश्वास ठेव”
त्याच मांडवात संध्याकाळी सुशीलाने पुरुषोत्तमच्या गळ्यात माळ घातली


निकम सांगत होते आणि निशा होऊन ऐकत होती, एखाद्या पेशंटमध्ये इतकं गुंतायला नकोय असं निशा स्वतःलाच सांगत होती पण तिच्या डोळ्यासमोरून सुशीलाच भांबावलेला चेहरा हटता हटत न्हवता.

...



शिलाच्या लग्नातला अजब प्रकार ऐकल्यापासून निशा अजूनच अस्वस्थ झाली. लग्नानंतर काय घडलं असावं ह्याचा तिला काहीही अंदाज करता येईना, निकमानाही त्यानंतरच्या घटना माहित न्हवत्या. सुशिलाबद्दल अधिक जाणून घ्यायची उर्मी तर निशाला फार वाटत होती. निशाने सुनीललाही हा प्रकार सांगितला तसा तो बिथरलाच
“तुला काय करायच्या नसत्या उठाठेवी , तू तुझं काम करत जा. नैतर तो जॉब सोडून इथे परत ये इथे तुझा दवाखाना सुरु कर” झालं घरूनच असा दम मिळाल्यावर निशाने सुशीला प्रकरण डोक्यातून काढून टाकलं पण नियतीच्या मनात अजून काही वेगळंच असावं, नियती नशीब तुम्हाला एखाद्या गोष्टी भोवती इतकं फिरवत ठेवते कि ठरवूनही कुणीच त्यातून बाहेर पडू शकत नाही. एका सुस्त दुपारी दवाखान्यात फारशी गर्दी नसताना बाहेर अचानक गलका उठला, धावपळ सुरू झाली. इमर्जन्सी दिसते म्हणून निशा झटकन खुर्चीतून उठली बघते तर बेशुद्ध सुशिलेला उचलून दोन लोक धावतच आले, एक तिचा नवरा पुरुषोत्तम होता आणि दुसरा तिचा सासरा होता. “डॉक्टर मॅडम, हिला तपासा सकाळधरून उलट्या जुलाब करतेय” सुशिलाला तपासून तिला सलाईन चढवलं गेलं , तिला फूड पॉइझनिंग झाल्याचा निशाचा अंदाज होता , सुशीलाच्या पोटाचा आकारही चांगलाच वाढला होता
“काय खाल्लंय हिने, जेवणात शिळं काही खाल्लं का”
“काय खाल्लं काय जनू आम्ही गडी लोक स्वयंपाक घरात कशाला डोकवतोय, तिकडं सगळं ह्याचंच राज्य. मनाला वाटल ते करून खात्यात”
आता मात्र निशाचा आवाज चढला “हे बघा , हा लहान दवाखाना आहे. इथे किरकोळ पेशन्ट ठेवतो आम्ही. दोन तासात फरक पडला नाही तर तालुक्याला न्यावं लागेल, तयारीत रहा. आणि तिने चुकून काही खाल्लं कि तिला मुद्दाम चारलं हेही बघावं लागेल, शंका आली तर पोलीस केस करावी लागेल”
“असं कुठं असतंय का, उलट्या जुलाब झाले म्हणून पोलीस केस. काय मॅडम गंमत करताय गरिबांची. नीट इथंच ईलाज करा कशाला तालुक्याला”
सुशीलाचा सासरा जरा गुर्मीत पण मानभावीपणाचा आव आणून बोलतोय अशी शंका न्हवे खात्रीच वाटत होती निशाला. आराम करायला स्वतःच्या रूमवर जायचा विचार रद्द करून निशा जातीने सुशिलाच्या वॉचवर होती. दोन तासात सुशिलाची पल्स नॉर्मलला यायला लागल्यावर निशाने तिला तालुक्याला पाठवायचा प्लॅन रद्द केला.
दुसऱ्या दिवशी सुशीला चांगलीच भानावर आली, पुरुषोत्तम तिची बऱ्यापैकी काळजी घेत होता. तिला उलटी आली तर भांडं धरत होता, तिच्या पाठीवरून हात फिरवताना त्याच्या डोळ्यातली माया जाणवत होती, पुरुषोत्तम सुशिलेला आणि सुशीला त्याला जीव लावते हे बघणाऱ्याला लगेचच जाणवत होतं. ओपीडी संपली तशी निशा सुशीलाला तपासायला गेली “आता आराम पडतोय ना, सुधारणा आहे परवा घरी जा. तुम्ही बायकाही अशा कशा गं, शिळं अन्न टाकावत नाही तर खाऊन घेता. परत असं करू नको”
अचानक सुशीला ढसाढसा रडायला लागली “डॉक्टरताई , पाया पडते मला घरी धाडू नका, मला परत ते पाला खाया घालतील. मला माझं बाळ पाहिजे. कायबी होऊंदे मी तुमची धुणीभांडी करीन” आता मात्र निशा आवाक झाली

...



(भाग 4)


#सुशीला

पुरुषोत्तम वयात येत होता तसं तसं त्याचं वेगळेपण सगळ्यांच्या ध्यानात येत होतं, गावात त्यांच्या घराला मान होता म्हणून उघड कुणी बोलत न्हवतं पण गुपचूप चर्चा होतच होती. नव्याचे नऊ दिवस सरले तशा ह्या चर्चाबी बंद झाल्या. गावात कुणी पावना आला तर तेवढ्यापुरता त्याने स्वतःहून विचारलं तरच सांगणं होत असे. तोही मनमिळावू होता, सगळ्यांना धावू धावू मदत करायचा त्यामुळं लोकांची त्याच्यावर मायाही होती. त्याची आई गेल्यावर भावाचं लग्न झालं त्याला एक मुलंही झालं आत्ता ह्याचं काय करावं ते त्याच्या बापाला समजेना. भाऊ तालुकाच्या गावी पंचायत समितीत कामाला होता, तिकडंच आठवडाभर रहायचा, घरची शेती बाप आणि पुरुषोत्तम बघायचे, शेतावर कामाला काही गडी माणसंपण ठेवली होती असं सगळं बैजवार चाललं होतं. पुरुषोत्तमच्या वयाच्या पोरांची लग्नं होऊ लागली होती, आता ह्याचं लग्न करायचं तरी कसं , करायचं का नाही ह्याविचारानी त्याचा बाप बेजार झाला. तशातच सुशिलाच्या लग्नातला प्रकार बघून बापाला आयडिया सुचली आणि पुरषोत्तमला पुढं घालून घेऊन आला नि बार उडवून दिला. काय नाही तर एखादी गरीब पोर मार्गी लागल, पुषोत्तमलाहि आधार होईल असा चांगला विचार करूनच बापानं हे पाऊल उचललं होतं.  सुशीला माप ओलांडून घरात आली, जावही प्रेमानं वागली, लग्नानंतरची पूजा, गोंधळ उरकला तशी पावनेरावळे पांगले. पुरुषोत्तम सुशिलेचा शब्द खाली पडू देत न्हवता ती म्हणल तसंच वागत होता, ईळभर घरात असलेला पुरुषोत्तम रात झाली की मळ्यावर झोपायला जात होता, रोज वेगळं कारण सांगून हातावर पाणी पडलं की पसार व्हायचा ते दुसऱ्या दिवशी च्या प्यायलाच हजर व्हायचा , सुशीला एकटी खोलीत असताना तो तिथं टिकतंच न्हवता. हि चुकामुक सुशिलाच्या लक्षात आली, आधीच त्याच्या हावभावावरून तिचं डोकं ठणकलं होतं त्यात हे, काही केल्या तो हाती लागतच न्हवता. आता काय करायचं , कुणाला सांगायचं सुशीला आतून नुसती धुमसत होती पण करायचं काय तिला समजत न्हवतं. लग्न झालं की मालक एक रात सुनी जाऊ देत नाहीत, त्याच्या रसभरीत कथा तिनं मैत्रिणीकडून ऐकल्या होत्या त्या आठवून सुशीला झुरु लागली. एक दिवस दुपारच्या जेवणाच्या भाकरी बांधून घेऊन सुशीला रानात गेली, आज हिकडं वर्दळ तशी कमीच रहाणार होती हे तिला ठाऊक होतं. खोपटात जेवण वाढून तिने नवऱ्याला हाक मारली , घाम पुसंतच तो आला सोबत एक गडीपण होता. नोकराला बघून सुशिलाच्या कपाळावर आठी चढली. नोकरमाणूस खाल मानेन जेवण उरकून पळाला तसा पुरुषाच्या तोंडात घास फिरू लागला. सुशीला मुद्दाम दार अडवून उभी होती,
“दार सोड जाऊ दे, रानात लई कामं पडलीत” त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसतंच होता. खांद्यावरचा पदर पाडून सुशीला त्याला झोंबली, पुरुषाच्या तोंडावर मानेवर मटामटा मुकं घेऊ लागली, दोन्ही हातांनी त्याला घट्ट आवळून धरला. पुरुषोत्तमची ताकत तिच्यातून जास्त होती, त्याने जोर लावून तिला लांब ढकललं तशी भिताडाला आपटून सुशीला खाली पडली. कपाळावर मोठ्ठ टेंगुळ अन उभी रक्ताने न्हायलेली सुशीला त्वेषात त्याच्या अंगावर धावून गेली “असलं लक्षान व्हतं तर लगीन का केलं म्हणते मी, जन्माची नुकसानी झाली माझ्या, आता मी काय करू कुठं जाऊ” सुशीला मोठ्यानं गळा काढून रडू लागली तशी पुरुषाने तिच्या तोंडावर हात दाबला
“वरडू नको, माणसं गोळा व्हतील”
“होऊ दे कि, मी जगाला वरडून सांगणार हाय. फशिवलं मला” तिचे हुंदके सुरूच होते, पुरश्या मनातून कळवळला तिला जवळ घेऊन डोळे पुसताना त्याचेही डोळे भरले होते
“काय करणार आपणतरी, देवानं मला असंच घडवलं तुला माझ्या माझ्यामुळं तरास, माफी कर गं मला” अजूनच हमसत सुशीला रडत होती , घरात राहिलेली टोपी घ्यायला परत आलेला गडी सद्या खिडकीतून हे बघत होता.


दुसऱ्या दिवसापासून सद्याची वागणुक बदलली, उगाचच घराकडं येऊ लागला, सुशीला रानात आली की आजूबाजूला फिरू लागला. दिसायला सद्या देखण्यात जमा होता, आता त्याची रहाणीहि चांगली झाली. केसाचे कोंबडे काढून, गुळगुळीत दाढी केलेला सद्या मिशीला पीळ घालत सुशिलाच्या भवती फिरू लागला. भुकेली वाघीण ती , तिनेही हि खूण बरोब्बर हेरली, अन एका दिवशी दोघांना चान्स मिळाला तशी त्यांनी डाव साधला. एकदा तोंडाला रक्त लागलेली वाघीण अन शरीरसुखाची चव चाखलेली मादी तशी राहती व्हय. दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका सद्या अन सुशिलाचा खेळ रंगू लागला, पुरश्याला हि गोष्ट लक्षात आली पण तो काय करणार बिचारा उलट हे कुणाला कळू नये म्हणून पुरश्या राखण राहू लागला. रानातल्या खोपित सद्या अन सुशीला कपड्याचं भान विसरून एकमेकात रमले होते नि अचानक कुऱ्हाड हाती घेतलेला तिचा सासरा दाराला लाथ मारून आत घुसला तो शिव्या देतच
“भाडखाव, खाल्ल्या घरचे वाशे मोजताना लाज नाही वाटत. आमच्या टोपल्यातली भाकर खातो डुक्कर” हातातली कुऱ्हाड थोडक्यात नेम चुकन डोक्यावर यायची ती खांद्यावर बसली, हाताला लागतील तितके कपडे उचलून सद्या दारातल्या दैताला धक्का देऊन बाहेर पळाला. लुगडं कसंबसं गुंडाळत उभ्या राहिलेल्या सुशिलाच्या झिंज्या धरून “रांड साली, इतकी मस्ती आली व्हती तर आम्हाला सांगायचं चांगली जिरवली असती तुझी. घरात दोन दोन मर्द असताना बाहेर तोंड मारती शिंदळ, तुला दाखवतोच आता हिसका” फराफरा सुशिलाला ओढत घराकडं घेऊन गेला, तिच्या खोलीत तिला ढकलत “खबरदार कुणी आत आलं तर” असं ओरडतच सासरा म्हणणारा तिच्या अंगाला झोंबला. आरडाओरडा ऐकून धावत आलेली जाव चाललेला प्रकार बघून हबकून मागं फिरली. आपली भाकर आपणच खायची परक्याने तिला हात लावलाच कसा हा अजब तर्क असलेल्या सासऱ्याने सुनेबरोबर तोंड काळं केलं


सुशीला रडत तिची कर्मकथा ऐकवत होती, निशा खुर्चीत सुन्नपणे हे ऐकत होती “कसली गं हि लोकं, मुलीसारख्या स्त्रीवर हात टाकताना लाज कशी वाटत नाही म्हणते मी, ह्यांना माणूस तरी कसं म्हणायचं” निशाची फणफण सुरु झाली , मागे भीतीला टेकून उभे असलेले निकम आभाळाकडं बघून “श्रीहरी, विठूराया काय रे हे” असं पुटपुटत हळहळत होते

(दोन तीन ठिकाणी शिव्या लिहाव्या लागल्यात त्याबद्दल दिलगीर आहे, शक्य तितक्या मवाळ लिहिल्यात )


...

(भाग 5)

#सुशीला

आणि मग हे नेहमीचंच झालं, सुशीलाहि गप्प बसून होती. जावेला आपल्या नवऱ्याची काळजी आता तोही हिच्या कडे वळतो कि काय ह्या घोरानं जावेची झोप उडाली. आधीच तो घरी यायचा आठवड्यात दोन दिवस तेही जावेला जड जाऊ लागले, ती नवऱ्याला मिनिटभर एकटा सोडेना, ह्याला त्रासून त्याने तालुक्याच्या गावालाच बिऱ्हाड करायचं ठरवलं, आता इथं गावात सुशीला, पुरुषोत्तम आणि सासरेबुवा तीनच लोक उरले. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं , सुशिलाला आता घरातच नजरकैदेत घातलं गेलं, उंबऱ्याबाहेर पडायची बंदीच आणली तिच्यावर. एकदोन महिने उलटले अन सुशीला गरोदर आहे ही खबर फुटली तशी हे पोर त्या सद्याचं असणार ते पाडून घे म्हणून सासरा तिच्या मागे हात धुवून लागला. आता मात्र सुशिलाच्या अंगातील रणचंडिका जागी झाली ती काही केल्या ह्या गोष्टीला तयार होईना. आता ही बया काही ऐकेना म्हटल्यावर तो बाबा पिसाळला अन जवळच्याच गावच्या एका वैदाकडन पोर पडायचा पाला मिळवला. सुशिलेला अगदी जबरदस्तीनं तो पाला तोंडात कोंबून चारला. त्या पाल्याने पोर काही पडलं नाही पण हिला उलट्या जुलाब सुरु झाले...हि अशी सगळी रामकथा ऐकून आता पुढं काय करावं हा मोठा प्रश्न निशापुढे ठाकला

“पोलिस बोलावते ते सरळ करतील ह्या नीच माणसाला, पण एक गोष्ट कळत नाही आईकडे किंवा भावाकडं जायचं सोडून हे का सहन करत राहिलीस”

“लगीन झालं नि तीन हप्त्यात रानात पान लागून आई गेली, भाऊ तो तसा आधी तरी कुठं बघत व्हता तवा आता बगल म्हणून आधाराला जावं. हिथ पोटाला आधार हाय, कपडालत्ता कशात कमी नाय. एक गोष्टीची कमी हाय पर तेबी चालतंय. हिथून भायेर पडले तर कुत्र्यावानी गत व्हईल माझी. मला माझं पोर पायजे पोरगा पोरगी जे काय असल ते. एवढं एकच कस जमतंय ते बघा तुमचे उपकार जिंदगीभर इसरणार नाय, तुमच्या पायात कातड्याचे जोडे करून घालीन बघा” सुशीला हमसून रडत होती

निशाने ताबडतोब त्या भागाच्या पोलीस चौकीत ह्याची तक्रार नोंदवली, सासऱ्याने जरा दबाव आणायचा प्रयत्न केला पण निशाने ठामपणे बाजू लावून धरली. अटक व्हायच्या भीतीने त्याने ह्यापुढं असं काही होणार नाही असं शपथपत्र लिहून देऊनच प्रकरण सामंजस्याने मिटलं. सुशिलाला वेळच्या वेळी एक छान दणदणीत मुलगा झाला, दिसायला अगदी आईसारखा तोंडवळा असलेला पोरगा पदरात बघून सुशीला हरकून गेली, तिच्या जिंदगीचं सार्थक झाल्यागत तिची अवस्था झाली होती. ते पोरगं चार महिन्यांचं झालं आणि निशा बदली घेऊन शहरात गेली, तिचा संसार तिची वाट बघत होता, निकमही रिटायर झाले. सगळी जिकडं तिकडं पांगापांग झाली, निकम आणि निशा अधूनमधून ख्यालीखुशाली विचारायला फोनवर बोलायचे नंतर नंतर तेही कमी झालं. जवळपास 6 वर्षांनी निकमांचा निशाला फोन आला, नातवाच्या लग्नाला आग्रहाने आमंत्रण देताना निकम हळवे झाले “हल्ली तब्येत साथ देत नाही, एकदा येऊन भेटून जा पोरी” ह्या लग्नाला जायचंच ठरवून निशा चार दिवसासाठी परत त्याच गावात आली. लग्न पार पडलं , जरा निवांतपणा आला तसे निकम तिला घेऊन फिरायला शेतावर गेले. चालताना वाटेल सुशीला आडवी आली, अंगात रंगतदार पाचवारी नेसलेली अंगात गच्च भरलेली बऱ्यापैकी बदललेली सुशीला बघून निशाला आनंद आणि आश्चर्यहि वाटले. दोघींच्या जुजबी गप्पा होऊन सुशीला निघून गेली, सुशीला गेली त्या दिशेला वळून बघत बघत नकळत निशा बोलून गेली
“किती बदल झाला ना हिच्यात”

“खरंय, सासरा गेला तशी हि मनाची मालक झाली. दीरजाव काही हिकडं चुकून बघेनात. पुरुषोत्तम गडीमाणसं हाताशी घेऊन शेती चांगली करतोय. घरात काही कमी नाही बघा, पोरगंबी आता शाळेत घातलंय. पण हिची जुनी सवय काय मोडना बघा, रानातले गडी अलगद उचलती बघा हि. हि सवय काय सुटेना हिची. अंगात मुरलय सगळं हिच्या त्याबिगर तिला जमत नाही. गावात बोलायची कुणाची टाप नाही इतका दरारा आहे हिचा आता, कुणी बोललाच तर त्याच्या दहापिढ्यांचा उद्धार करती. तीचीबी काय चूक आहे म्हणा , देवानं तिची गाठंच नामर्दाशी घालून दिल्यावर हि बाहेर उकिरडे फुकत फिरणारच ना”

“एक सांगा मास्तर , घरातल्या पुरुषाने तिच्यावर बळजबरी केली, पोर पडायचा प्रयत्न झाला तेव्हा ती किती अगतिक दिसत होती आणि आता ही उर्मट, रंगेल, स्वतःच्या मर्जीने पुरुष उपभोगणारी सुशीला किती मस्तवाल दिसतेय ना. तुम्हाला कोणतं रूप आवडलं हिचं”

गालातल्या गालात हसत निकम उद्गारले “मला आजची सुशीला आवडली पोरी”

#समाप्त

#स्वल्पविराम

(स्वल्पविराम अशासाठी कि ह्यापुढे अधूनमधून अशा कथा तुमच्यासमोर मांडत जाणार आहे. लिंकवर पूर्ण कथा वाचा)



Thursday, 14 December 2017

डोळे उघडा डोळे

चार आंधळ्यांची गोष्ट आठवते का, चार आंधळे म्हणजे ते खरोखर आंधळे नसतात तर भ्रमाची पट्टी डोळ्यावर बांधलेली असते. ज्याच्या हाताला सोंड लागतो तो वर्णन करतो "अहाहा, हत्ती म्हणजे लांबच्या लांब नळकांडं जणू" दुसरा कानाला कुरवाळून म्हणतो " हत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक हलतं डुलतं मोठच्या मोठं सूप आहे" तिसरा पाय पकडतो तो म्हणतो "हत्ती म्हणजे चालता बोलता खांब रे खांब" तर चौथ्याच्या हाती लागतं शेपूट त्याला वाटतं हत्ती म्हणजे निव्वळ एक फालतूसं खराटाछाप तोंड असलेला दोरीसारखा प्राणी. डोळ्यावरची पट्टी काढली कि त्यांना दिसलं अरेच्या आपण बघत होतो तो हत्तीचा एक छोटासा भाग होता. जवळ उभं राहून बघितलं तर पूर्ण हत्ती स्पष्ट दिसतंच न्हवता. जरा मागे सरकलं कि हत्तीचा अजून थोडा भाग दिसला, अजून लांब गेलं की हत्तीचा पन्नास टक्के भाग दिसला. हत्तीचा पूर्ण आवाका लक्षात यायला त्यांना अजून जरा लांब सरकावं लागलं.

कुठलीही परिस्थिती, माणूस , जनसमुदाय, संस्था किंवा इतरकाही पुर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर डोळ्यावरच्या पट्ट्या हटवून बघायला हवं, तटस्थपणे अवलोकन करायला हवं, गरज पडल्यास जरा दूर सरकून परिस्थितीचा पूर्ण आवाका लक्षात घ्यावा लागतो. जवळीक डोळ्यावर नाहीनाही त्या पट्ट्या बांधते त्याने सत्य आणि पूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. याही पुढे जाऊन हत्ती खर्राखुर्रा कि भोंडल्यातला हे ओळखायचं असेल तर खूपसाऱ्या पट्ट्या सोडायला लागतील...डोळ्यावरच्या आणि मनावरच्या घट्ट पट्ट्या


Sunday, 10 December 2017

मार्मलेड



“किती भरभर खातोस जरा सावकाश” संध्या राजीव च्या भरभर नाष्टा करण्याला रोजच वैतागायची, तिच्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून राजीवने हसतच तिला खाली ओढलं आणि तिच्या गालावर एक मस्त पापी देऊन टाकली तशी बावरून संध्या जरा दूर सरकली “मस्का काय मारताय साहेब सकाळी सकाळी , ऑफिसला नाही जायचंय का?” संध्याच्या गालावरची रंगपंचमी आणि तिने टवकारलेलेे मोठ्ठे मोठ्ठे काळेभोर डोळे बघून राजीव सुखावला “ऑफिस रोजचंच असतं बाईसाहेब चल आज दोघेच कुठंतरी मस्त लॉंग ड्राइवला जाऊ” राजीवच्या खांद्यावर हनुवटी रोवून संध्या वाकली, तिची बोटं त्याच्या केसात फिरत होती “तू ऑफिसला पळ संध्याकाळी जाऊ आपण , तू तासभर लवकर ये छानपैकी खडकवासल्याला जाऊ खूप दिवसात गेलो नाही, बिट्टूही एन्जॉय करेल” राजीव खुर्चीतून उठला. “अरे थांब तुझं मार्मलेड सँडविच राहिलंय अजून, बॉटल संपली तर काल मी 5 किलोमीटर स्वतः गाडी चालवत जाऊन आणलंय” राजीवने मोठ्ठा आ केला तिच्या हातूनच सँडविचचा घास घेतला “खातो बरं मॅडम, मार्मलेड आणायला तुम्ही चक्क 5 किलोमीटर स्वतः गाडी चालवत गेलात आणि आम्ही तो खाऊ नये; ये बहोत नाईन्साफी झाली गं बाबा”  ब्रीफकेस आणि गाडीची चावी उचलून राजीव ऑफिसला निघालासुद्धा  “ओक्के डन, संध्याकाळी तयार रहा मी ऑफिस सोडताना कॉल करतो” धावतच घराच्या पायऱ्या उतरून रुबाबात गाडीकडे जाणाऱ्या राजीवकडे संध्या अभिमान आणि प्रेमाने बघत उभी राहिली. नोकरमाणसं घरात असूनही राजीव आणि बिट्टूची लहानसहान कामं करायला संध्याला खूप आनंद वाटायचा, मध्यमवर्गीय खाऊनपिऊन सुखी असलेल्या घराची लेक तालेवाराच्या घरात पडली होती, श्रीमंतीचा गर्व वगैरे तिच्या आजूबाजूला सुद्धा न्हवता. मियाबिवी आणि 5 वर्षांचं लेकरू अशी परफेक्ट फॅमिली होती. बिट्टू शाळेत आणि राजीव ऑफिसला आता दुपारपर्यंत संध्या मनाची मालक होती, बेडरूममध्ये घुसता घुसता तिने कुकला कॉफीची ऑर्डर दिली टीपॉयवरचं मासिक उचललं आणि ती बेडवर आरामात बसली. कॉफीचे घोट अलगद घशाला शेकत होते संध्या निवांतपणे कॉफीचा कडवटगोडपणा जिभेवर घोळवत होती तोच तिच्या खोलीच्या दारावर कुणीतरी नॉक केलं , त्या आवाजाने सावरून बसत असतानाच तिच्या मेडचा आवाज आला म्हणून ती उठून बाहेर आली आणि तिच्या खोलीबाहेर मुकेशला बघून थक्क झाली. “मुकेश तुम्ही ह्यावेळी इथे कसे? राजीवने एखादी फाईल वगैरे मागवलीय का घरून, बघा कोणती हवीय” संध्या भराभरा राजीवच्या स्टडीरूमकडे निघाली मेडकडे बघून मुकेशसाठी एक कॉफी पाठव अस फर्माण सोडायला ती विसरली नाही. तिच्या मागोमाग स्टडीमध्ये आलेला मुकेश चेहऱ्यावरून खूप गडबडलेला आणि काळजीत वाटत होता “भाभी कॉफी नकोय मला आणि मी तुम्हाला घ्यायला आलोय, आपल्याला लगेच निघायला हवं” संभ्रमात पडलेल्या संध्येकडे थेट बघायचं टाळून मुकेश पुटपुटला “आपल्याला लगेच निघायचंय, हॉस्पिटलमध्ये जायचंय कार बाहेर उभी आहे” “काय झालंय मुकेश? कशासाठी हॉस्पिटलमध्ये जायचंय ? कोण आहे तिथे?” एकापाठोपाठ संध्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिच्या प्रश्नांची उत्तरं न देता मुकेश घराबाहेर पडला आणि संध्याची वाट बघत कार मध्ये बसून राहिला. त्याला जास्त वेळ वाट बघावीच लागली नाही, संध्या गाडीत बसली तशी ड्राइवरने गाडी सुरू केली. संध्याचा हवालदिल चेहरा बघून तिला खरं कसं सांगावं हा प्रश्न मुकेशला पडला होता पण सांगायला तर हवंच “भाभी, ऑफिसला येताना राजीवच्या गाडीचा अकॅसिडेंट झालाय. काळजी करू नका तो सुरक्षित आहे थोडा जखमी झालाय“ राजीवला अपघात झालाय, जखमी झालाय , आता मात्र संध्या पांढरीफटफटीत पडली तिच्या हातापायाचं बळंच खचलं, कधी राजीवला बघेन असं तिला झालं. गाडी हॉस्पिटलच्या पोर्चला लागताच ती दार उघडून पटकन बाहेर पडली तिच्या मागोमाग मुकेश धावला. काचेच्या दारातून बेशुद्ध राजीवला बघत असताना तिचा संयम ढासळला आणि तिथेच बाकावर बसून तिने रडायला सुरवात केली. राजीवची सेक्रेटरी जेनीने तिला पाठीवर थोपटून शांत करायचा असफल प्रयत्न केला. रडणं थकून उमासे येऊ लागले , संध्या पाय पोटाशी घेऊन तिथेच एका बाकावर बसून होती राजीवच्या ऑफिसचे लोक सगळी धावपळ करत होते तिला काहीही सांगावं लागत न्हवतं. “तुम्ही आता घरी जावा आम्ही इथलं बघतो, बिट्टू घरी आलाय त्याच्याकडे लक्ष द्या” एका खणखणीत आवाजाने संध्या भानावर आली आणि चटकन उठून खाली वाकून तिने अण्णासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. तिला तिथे थांबावं वाटत होतं पण बिट्टूची पण काळजी वाटू लागली बाहेर अंधारून आलं होतं, रात्र झाली तरी मम्मीपप्पा घरी नाहीत म्हणून लेकरु घाबरलं असेल ह्या विचारांनी ती गाडीकडे निघाली. सकाळी लॉंग ड्राईव्हला जायचं प्लॅनिंग करणारा राजीव संध्याकाळी बेशुद्ध पडलेला होता, त्याच्या काळजीने खचलेली संध्या बिट्टूला झोपवून थकून रात्रभर तळमळत होती.

दुसऱ्या दिवशी राजीवचं पाठीच्या मणक्याचं मोठं ऑपरेशन झालं, संध्या ऑपरेशन पार पडेपर्यंत तिथेच बसून होती, 4 तासांनी राजीव शुद्धीवर आलेला बघून संध्याच्या जीवातजीव आला. कालपासून मनातल्या मनात तिने खुपसारे नवस बोलून ठेवले होते ते सगळे फळाला आले. अण्णासाहेब राजीवचे वडील स्वतः जातीने लक्ष ठेऊन होते , संध्या रात्रंदिवस सेवा करत होती, जगातली उत्तमात उत्तम वैद्यकीय सेवा डॉक्टर्स दिमतीला होते, राजीवच्या तब्येतीत भराभर फरक पडू लागला आणि आठच दिवसात तो घरी आला देखील. डॉक्टरांनी त्याला 1 महिना बेडरेस्ट सांगितली होती, त्यानंतर  घरातल्या घरात व्हिलचेअरवर फिरू शकणार होता. काही दिवसांनी पहाटे फोनच्या आवाजाने राजीव झोपेतून खडबडून जागा झाला, मुकेशला इतक्या सकाळी काय बोलायचंय विचार करतच राजीवने कॉल रिसिव्ह केला ,फोनवर बोलताना शेजारी गाढ झोपलेल्या संध्याकडे राजीव बघत होता, फोन कट करून तो कुठल्यातरी विचारात गढून गेला ; संध्या उठून आंघोळ करूनही आली तरी तो विचारातच होता. राजीवच्या मनातली खळखळ कधीच संध्याच्या लक्षात आली होती पण तसे काहीही न दर्शवता तिने राजीवला फ्रेश व्हायला मदत केली. “संध्या माझं एक ऐकशील का?”नाष्टा करता करता राजीवने संध्याला विचारलं, “काही हवंय का? कुठे दुखतंय का?” तिने काळजीने विचारलं तसं राजीवला हसू आलं “मी एकदम फिट आणि फाईन आहे गं, फक्त तुला एक काम सांगायचं होतं” काहीशी रिलॅक्स होत एकीकडे त्याला फळं चिरून देत “हो हो, सांग ना मी काय करू तुझ्यासाठी, तू मला भरभरून सुख दिलंस रे तुझ्या शब्दाबाहेर मी नाही” काहीशी हळवी झाली होती ती, बोलता बोलता तिचे डोळ भरून आले , राजीवने तिच्या गालावर ओघळलेला थेंब अलगद बोटावर उचलला थेंबाकडे निरखून बघताबघता “तू आजपासून माझ्या ऑफिसला जा, मी बरा होत नाही तोवर माझं काम सांभाळ” पटकन राजीव बोलून गेला, तशी संध्या उडालीच. “नको रे, मला नाही जमणार तुझी जागा घेणं. मी कॉलेजातून बाहेर पडले ते थेट तुझ्या सावलीत आले मला इथंच राहू देत, मला नाही जमणार ते...आणि मुकेश आहे की, तुझा स्टाफही खूप चांगला आहे...तू काहीही बोलू लागलास हं, पाठीला मार बसलाय साहेब तुमचं डोकं जागेवर आहे ना” संध्या नकार देण्याचे अनेक बहाने शोधत राहिली आणि न थांबता बोलत राहिली, तिचं बोलणं ऐकता ऐकता राजीवने नाष्टा संपवला “संध्या आवरून घे, तुला तासाभरात ऑफिसात पोचायचंय. मुकेश आणि जेनीला मी निरोप दिलाय, गाडीत ड्राइवर तुझी वाट बघतोय” राजीवचा आवाज निर्णायक होता, ठाम निश्चय त्यात दिसत होता ; आता आपलं काहीएक चालणार नाही हे संध्याला पुरतं समजलं, एक शब्दही न बोलता तिने आवराआवर सुरू केली.

संध्या ऑफिसात जाऊ लागली, मुकेश जेनी आणि इतर स्टाफही मदत करत होताच शिवाय राजीवचेही सारखे फोन, व्हिडीओ कॉल्स सुरू असायचे. बिट्टू शाळेला गेला की राजीवला नाष्टा देऊनच संध्या घर सोडत असे; घरीही आता गप्पांचे विषय बदलले, हळूहळू तिला राजीवच्या कंपनीचं कामकाज समजू लागलं. अण्णासाहेब रोज सकाळी राजीवच्या तब्येतीची चौकशी करायला फोन करायचे तेव्हा हटकून तिच्याशी एखादंतरी वाक्य बोलत असत त्यामुळे तिने राजीवच्या कंपनीत जायला सुरू केल्याचं त्याना ताबडतोब लक्षात आलं नाही तरीही त्यांच्या कानावर ही गोष्ट गेलीच; तशी ती कधीतरी त्यांना समजणार हे राजीवला माहीत होतं आणि त्यांना ते कदापि रुचणार नाही हेही राजीवला ठाऊक होतं. दर  रविवारची अण्णासाहेबांची चक्कर ह्यावेळी 4 दिवस अलीकडं आली, घरात आल्याआल्या ते राजीवला भेटायला त्याच्या खोलीत गेले; खिडकीजवळ व्हीलचेअरवर राजीव एक फाईल घेऊन बसला होता. अण्णासाहेब त्याच्या जवळ आले तसं त्याने खाली वाकून त्याना नमस्कार केला तसं करताना त्याला कष्ट होत होते पण म्हणतात ना लहानपणापासूनचे संस्कार;  अण्णासाहेब जरा घुश्श्यातच होते “हल्ली सुनबाई कामावर वाटतं” “होय अण्णासाहेब” राजीवने खुप शांतपणे ऊत्तर दिलं , दाबून ठेवलेला ज्वालामुखी फुटावा तसे अण्णासाहेब उसळले “अरे पण का? काय गरज होती? आपल्या आख्ख्या खानदानात घरची लक्ष्मी घराबाहेर पडली नाही; सगळी शिकवण मातीत घातली तुम्ही राजेहो. जग कसंय एकतर, ह्या पहिल्यांदा बाहेर पडतायेत , दुनियेची रीत ठावं आहे का? तू पडला बिछान्याला खिळून तरणीताठी बाई काय घ्या कुणावर मन गेलं तर ?” आपण अतीच बोलून गेलं हे ध्यानात आलं तसे अण्णासाहेब गपकन थांबले. बिछान्याला खिळून...हे शब्द ऐकून राजीवच्या काळजावर नाही म्हटलं तरी ओरखडा उठलाच होता तरीही राजीव शांतच होता, जसं कळतंय तसं त्याने पहिल्यांदाच अण्णासाहेबांच्या नजरेला नजर दिली “अण्णा, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय हो, आतापर्यंत संध्याला जगाची रीत माहीत न्हवती. झालेल्या अपघातातून मी नशिबाने वाचलोय; जर मला कमी जास्त काही झालं असतं तर संध्याला कंपनी सांभाळणं जमलं असतं का? मान्य आहे माझा पार्टनर मुकेश खुप चांगला आहे, पण तरीही मी नसताना तो असाच चांगला वागेल ह्याची काय खात्री अण्णासाहेब? तरणीताठी बाई...मी बिछाण्याला खिळलोय” राजीव हसला आणि खिडकीतून बाहेर बघू लागला “माझा संध्यावर विश्वास आहे अण्णा जसा तिचा मी ऑफिसात असताना माझ्यावर असायचा, न जाणो कदाचित तिला पुढेमागे दुसरा कुणी आवडेलही किंवा नाहीही आवडणार...मात्र तिच्या मनात कायम मीच असावा ह्याच्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन हे नक्की. गेल्या पंधरा दिवसात संध्याने खूप प्रगती केलीय, उद्या एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला चाललीय, जेनीही सोबत जातेय. पुढच्या कॉन्फरन्सला मात्र संध्या एकटीच जाईल इतकी तयारी मी करून घेणार आहे. अण्णा, अजून एक महिन्याने आम्ही दोघेही इथलं ऑफिस सांभाळू. मुकेश कलकत्ता ब्रांच बघणार आहे, तिकडे त्याचे आईवडिल थकलेत म्हणून हल्ली तो काळजीत असतो” राजीवने अण्णासाहेबांकडे नजर फिरवली तेव्हा खोलीबाहेर जातानाची त्यांची पाठ राजीवला दिसली, अण्णांचा राग नक्की निवळेल ते वरून फणस तर आतून नरमदिल आहेत हे राजीवला ठाऊक होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच संध्या दिल्लीसाठी रवाना झाली, रात्रीत किमान हं किमान 100 वेळातरी तिने दोन दिवसांचं वेळापत्रक वदवून घेतलं होतं...आणि राजीव मध्ये मध्ये कॉन्फरन्सची तयारी करून घेत होता. बिट्टू शाळेला गेल्यावर राजीव खिडकीशी व्हीलचेअरवर बसला होता... मेड नाष्टा देतेय की नाही मालकीण नाही तर ही बया कोणाशी फोनवर बोलतेय कोण जाणे म्हणून राजीव चरफडत होता तोच मेड आत आली “इतका वेळ कुणाशी बोलत होतीस” राजीवने सहज विचारलं..”संध्यामॅडम होत्या; चेकइन करताकरता फोन केला” राजीवचा प्रश्नार्थक चेहरा बघून मेड हसतच सांगत होती “किचनच्या खालच्या कप्प्यात मार्मलेडची नवीन बॉटल ठेवलीय ती काढ आणि साहेबांना ब्रेडला मार्मलेड लाऊन दे सांगत होत्या” थोड्यावेळाने ब्रेकफास्ट ट्रे मधलं मार्मलेड सँडविच उचलता उचलता विमानाचा आवाज आला… खिडकीतून आकाशात उंच उंच झेपावत जाणारे विमान बघताना राजीवला अतीव समाधान होत होते.

Friday, 8 December 2017

सगळं कसं व्यक्तीसापेक्ष

शाळेतून मुलं टीचरच्या नावाने ओरडत फणफणत घरी आली ना की समजून जायचं पोरांनी होमवर्क तरी केला नाही किंवा शाळेत मस्ती तरी केलीय. विनाकारण रागवायला टीचरचा काही कुणाच्या बांधाला बांध नसतो. हुशार, अभ्यासू मुलं बाईंना आवडतात म्हणून बाईंनी त्यांचे लाड केले तर इतर मुलं म्हणतात ती बाईंची चमची आहे. “ती ना टीचर वर्गात यायच्या आधी फळा पुसून ठेवते, तिच्या घरच्या बागेतले गुलाब बाईंना देते. टीचर्स डे ला तर काय नाटक, बाईंच्या पाया काय पडते. नुसती पुढं पुढं करत असते, म्हणूनच टिचरला ती आवडते”

हे असले एपिसोड माझ्या आणि भावाच्या घरात अधूनमधून सुरू असतात, आमचा विश्वास बसत नाही कारण आम्हाला माहित असतं मुलांनी काहीतरी गडबड केली.

सगळं कसं व्यक्तीसापेक्ष असतं नाही, आपल्या चुका दाखवून देणारा माणूस आपण लगेच बॅडबॉय किंवा बॅडगर्ल म्हणून स्टॅम्पिंग करून मोकळे होतो. मधाळ शब्दात साखरपेरणी करताना कान उघाडणी करणं हे मोठंच कसब आहे, हे ज्याला जमलं त्याने जग जिंकलं. अशा जगजेत्त्या लोकांचं कौतुक करावं तितकं कमी असतं


Tuesday, 5 December 2017

अंग हळदीचे ओले
पाऊले मेंदीने रेखीली
ओलांडता उंबऱ्याला
का ही नजर भिजली

कोण दाटला हा #मेघ
आले भरून आभाळ
ठेव आवरून त्याला
मांड नवाकोरा खेळ

येते कुणाची गं सय
काय शोधते नजर
आला जरी कुणी आता
तुझ्या जन्माला भ्रतार

नको रेंगाळूस आता
पडो पाऊले पुढती
नव्या संसारात सखे
येवो सुखाला भरती

Sunday, 3 December 2017

आमचा लेखनप्रवास



प्रवास म्हणण्या इतकं काही मी लिहिलं नाहीये पण भक्कम शब्द वाटतो म्हणून लिहिलाय हे आधीच स्पष्ट करते ☺ दुसरं म्हणजे ही मतं मागण्यासाठी #जाहिरात एज ईट इज नसून स्वतःला व्यक्त करण्याची संधी समजते, आणि संधीसाधूपणा करून लिहितेय 😁😂

लहानपणापासून वाचनाची खूप गोडी पण लेखन म्हणाल तर शाळेत पेपर सोडवण्यापलीकडे काहीही लिहिलं नाही, नंतर नोकरीत ऑफिसमध्ये कामाची पत्रं आणि नोट्स लिहिणे अशी थोडीशी प्रगती झाली. 2009 पासून फेसबुकवर आहे पण खरं लेखन सुरू झालं ते कुबेरवरच, इतरांच्या पोस्ट वाचून लाईक करणे, जास्त ओळखपाळख नसल्याने भीतभित कमेंट करणे असा प्रकार समूहावर नवीन असताना सुरू असे. श्रावण महिन्यात संतोषभाऊंनी चारोळी स्पर्धा सुरू केल्या, चित्रं बघून त्यावर चारोळ्या लिहायच्या आणि इथेच प्रेरणा मिळाली आणि मी लिहायला लागले. स्पर्धा म्हटली की का कुणास ठाऊक मला ते चॅलेंजिंग वाटतं त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेते(अर्थात झेपेल त्या स्पर्धेत 😛) त्यापुढे समूहाच्या कथास्पर्धेत भाग घेतला तेही जमतंय का बघितलं. हळूहळू धाडस येत गेलं आणि लिहीत गेले त्यातून हिम्मत आली आणि स्वतंत्र पोस्ट लिहू लागले. दाद द्यावी ती कुबेरकरांनीच , भरभरून दाद देतात त्यातून आत्मविश्वास वाढतो हा स्वानुभव आहे. मी कुबेरप्रमुखांचे खूप आभार मानते केवळ त्यांच्यामुळे मी लिखाण करू लागले.

माझा एक मित्र आहे त्याने मला ब्लॉग सुरू करून दिला. तो म्हटला ब्लॉग सुरू कर तर म्हटलं तूच सुरू करून दे, दिला करून बिचाऱ्याने 😃.  तू लिहीत जा म्हणून खुप प्रोत्साहन द्यायचा, मी लक्ष देत नाही म्हटल्यावर त्याने घरचा अभ्यास दिल्यासारखे विषय द्यायला सुरुवात केले 😁😂. तू रणछोडदासवर लिही, कधी अहिल्येवर लिही असं करून भरपूर लिहून घेतलं. हे सगळं लिखाण माझ्या ब्लॉगवर आहे. मत द्या की नका देऊ ब्लॉगला मात्र जरूर भेट द्या

Friday, 24 November 2017

पट्ट्यातली राणी



एलिझाबेथ हि एक श्रीमंत बापाची एकुलती एक लेक, वडिलांच्या मागे अवाढव्य इस्टेटीची एकटी मालकीण म्हणजे एखाद्या राज्याची राणीच जणू. तिच्या इस्टेटीमुळं अनेक होतकरू लग्नाळू मुलगे तिला गटवायला मागे लागलेले असतात. तरीही लिझा वडिलांनी निवडलेल्या मुलाला होकार देते, त्याप्रित्यर्थ तो एक थीम पार्टी देतो. पार्टीच्या थीमनुसार लिझा सिंड्रेलाचा पोशाख घालून पार्टीत जाते. पार्टीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दुसऱ्याच एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत बघते आणि घाईत पार्टी सोडून बाहेर पडते. लंडनच्या गारठणाऱ्या थंडीत आणि धुक्यात रस्त्यावरून पळताना एका गाडीला जाऊन ती धडकते. हि गाडी डॉक्टर बेरी ग्रेसनची असते जो एक अनाथाश्रम चालवत असतो, बेशुद्ध झालेल्या लिझाला तिच्या सिंड्रेलासारख्या कपड्यांवरून बेरी तिला गरीब आणि अनाथ समजून उचलून अनाथाश्रमात घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर लिझाला समजतं कि हे आपल्याला गरीब अनाथ समजतायेत मग ती ते नाटक सुरु ठेवते कारण तिला काही दिवस सुटका हवी असते. बेरी तिच्याहून 18 वर्षांनी मोठा, तिथं रहाताना हळूहळू बेरी व तिच्यात प्रेम निर्माण होतं. पण वयातील अंतर आणि तिथला जबाबदार चालक म्हणून बेरी कायम हे प्रेम नाकारत रहातो, कुंपणाने शेत खाल्ल असं होईल कि काय अशी त्याला भीती वाटत असते. त्यात बेरीची एक जुनी मैत्रीण असते तिचं त्याच्यावर प्रेम असतं पण बेरीचं तस काही नसतं, तर ही बया या दोघांमधील आकर्षण बरोब्बर हेरते. मग काय व्हॅम्प म्हणून ती तिचे कारनामे सुरु करते. त्यातूनही दोघांचं प्रेम फुलत जातं. लिझाचा गॉड फादर असतो ज्याच्यावर तिच्या स्वर्गीय वडिलांनी मुलीची जबाबदारी सोपवलेली असते, त्याच नाव मार्टिन. लिझा पार्टीतुन अचानक गायब झाल्यानं मार्टिन हवालदिल होतो. परत पोलिसात तक्रार देणं तिच्या श्रीमंतीमुळं नको म्हणून खाजगी गुप्तहेर लावून तो अखेरीस लिझाचा पत्ता मिळवण्यात यशस्वी होतो. लिझा आश्रमाच्या कामाला बाहेर पडते तेव्हा मार्टिन तिला रस्त्यात गाठतो आणि घरी परत चल म्हणून विनवतो, ती नकार देऊन बेरी विषयी सांगते. या दरम्यान बेरीची मैत्रीण या दोघांना भेटताना बघते आणि यांच्या विषयी नाही नाही ते बेरीच्या मनात भरवते. लिझाच्या प्रेमात पडलेला बेरी धड तिला प्रेमाची कबुली देऊ शकत नाही न धड तिला दुसऱ्या पुरुषासोबत बघू शकत. या सगळ्या घोळात त्याला तिचं श्रीमंत असणं, गडगंज संपत्तीची वारस असणं अचानक समजतं. आपल्याला तिनं अंधारात ठेवलं दयेचा गैरफायदा घेतला असे आरोप करून लिझाला आश्रम सोडावा लागतो. ती परत आपल्या महालात येते, पण तिचं जगणं हरपून जातं , हसणं नाहीस होत. तिची अवस्था बघून मार्टिन एक आयडिया काढतो आणि चॅरिटीसाठी एक ट्रस्ट बनवून त्यात बेरीला घेतो, त्यानिमित्त त्यांची भेट घडवून आणतो. खूप दिवसांनी समोर आल्यावर कोमेजलेली लिझा बघून बेरीचा जीव कासावीस होतो, त्याच्या केसात वाढलेले रुपेरी केस बघून लिझा घायाळ होते, त्या दोघांना त्या अवस्थेत सोडून मार्टिन काढता पाय घेतो. मग सगळे गैरसमज दूर होऊन राजा राणी एकत्र येतात, आणि शेवटपर्यंत आनंदात रहातात. हे झालं कादंबरीचं कथासार.

एलिझाबेथचं तरुणसुलभ वागणं, तिचं प्रेम , प्रेमापोटी एका अनाथाश्रमात दिवस काढणं, तिचं बेरीसाठी झुरण, केवळ अप्रतिम रंगवलं गेलंय. डॉक्टर बेरी हा चाळिशीतला अविवाहित अनाथाश्रम चालवणारा, त्याला लिझाविषयी वाटणारं आकर्षण तरीही स्वतःला अवरण्याची त्याची धडपड खूप आवडून जाते. ते दोघे दूर कि आपली हळहळ वाढते, हूरहुर वाटते तर ते दोघे एकत्र आले की आपलंच प्रेम मिळालं असं वाटत रहातं आणि हेच लेखिकेचे यश आहे. खूप हळुवार आणि तरल प्रेमकथा आहे ही, छोटंसं पुस्तक आहे मिळालं तर जरूर वाचा.


Sunday, 19 November 2017

सुर्याला थंडी वाजते जेव्हा

सुर्याला थंडी वाजते जेव्हा
चांदण्यांची शाल घेतो
किरणांचा दिवा मालवून
लवकर लवकर झोपी जातो

सूर्याची अवस्था बघून
चंद्रालाही दया येते
सूर्याला सांगतो आराम करा
तुमची ड्युटी मी करतो

सूर्याला काही करमत नाही
उगवल्याशिवाय रहावत नाही
झोपतो झोपतो म्हणता म्हणता
थोडावेळ येऊन जातो

चंद्रराव रागे भरतात
सूर्याला घरी धाडतात
हुरडा माडगं खायला सांगतात
सूर्य त्यांची आज्ञा पाळतो

सूर्य मस्त आराम करतो
पौष्टिक पौष्टिक अन्न खातो
चंद्राचे आभार मानून
आग ओकण्यास सज्ज होतो


Friday, 10 November 2017

लग्नाची गोष्ट

#ती बावळट , चष्मीश , एकटीएकटी रहाणारी पुस्तकात रमणारी. #तो तिच्या शेजारच्या काकूंचा भाऊ, देखणा, तिच्याहून 12 वर्ष मोठा. ती एकटी असे, सगळी मुलंमुली एकत्र खेळताना ती कोपरा गाठून पुस्तकात मान खुपसायची. तिचं एकटेपण त्याला लक्षात आलं, तो तिला इतर मुलात बोलवू लागला पण ती जास्त जात नसे मग तोच तिच्याजवळ येऊन गप्पा मारू लागला तिला बोलतं करू लागला. वडील बदलीमुळे सतत बाहेर , आई जॉईंट फॅमिलीमुळे सतत कामात गुंतलेली, तिला त्याच्यात मित्र आणि पालक मिळाला. हळूहळू दोघे मनाने जवळ आले, बघता बघता मामा म्हणून हाक मारणारी ती त्याला अहो म्हणू लागली, नावाने हाक मारायला कधी जमलंच नाही.
दोघे तसे बाहेर फिरायला वगैरे फार गेले नाहीत, खूप क्वचित घराबाहेर भेटत असत नाहीतर वाड्यातला ओटा हेच त्यांचं बोलायचं भेटायचं ठिकाण. दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ती अकरावीत होती आणि त्याला मिलीटरी इंजिनिअरिंग सर्विसेस मध्ये जॉब नुकताच मिळाला होता. घरी समजल्यावर प्रचंड कल्ला, कारण जात वेगळी आणि वयातील अंतर. वडील म्हटले शिक्षण होऊ दे मग बघू, त्याना वाटलं तो कसचं थांबतो इतका पण तो थांबला. तिचं शिक्षण झालं तरी घरचे निरनिराळी कारणं सांगून ऐकत न्हवते. तिच्या घरचे अजिबात तयार न्हवते , त्यात मिलिटरीतील मित्रांच्या नादाने तो प्यायला पण लागलेला. वैतागुन 4 वर्ष बदली घेऊन तो अरुणाचल प्रदेशला निघून गेला. इकडे तिला पण जॉब मिळाला, तिला घरचे इतर स्थळ आणायचे पण ती हटून बसलेली तोच हवा म्हणून, आईवडील वैतागले. पाठच्या 2 बहिणींची लग्न आधी लावून दिली, दोन्ही लग्नात ती हसत होती. बहिणींची मुलंही तिने आवडीने सांभाळली. मुलगा काही घरी येईना म्हणून त्याच्या आईने कशीबशी लग्नाला परवानगी दिली मग तसं चोख कबूल करून घेऊनच तो पुण्यात आला. तिची बदली नसरापूरला झालेली ती रोज ST ने ये जा करत असे, एक दिवस त्याने खेडशिवापुरला ST अडवली आणि तिला घेऊन थेट रजिस्टारचं ऑफिस गाठलं. सकाळी कामाला घरातून गेलेली ती संध्याकाळी लग्न करूनच नवऱ्यासोबत घरी आली. दोन्ही कुटुंबातील ताण निवळायला वर्ष लागलं. सासूबाईनी आठ दिवसांनी घरगुती विवाहसोहळा करून घेतला आणि छोटं रिसेपशन दिलं.


  1. ती म्हणजे मी , तो म्हणजे आमचे साहेब. अजूनही मला नवरा, पालक म्हणून सांभाळणारा माणूस आहे. काही गोष्टींच्या बाबतीत मी त्यांच्यावर प्रचंड अवलंबून आहे, गाडीत पेट्रोल भरण्यापासून ते सगळा बाजार घरात आणून देण्यापर्यंत सगळं ते करतात. गाडी मी फक्त ऑफिसात जाताना चालवते एरवी कुठेही जाताना मी मागच्या सीटवर बसायचं काम करते. वयातील अंतर कधीही अडसर वाटला नाही, माझ्यापेक्षा तेच जास्त हँडसम आणि तरुण दिसतात. ह्या गृहस्थाने मला का पसंत केलंय इतके नखरे का सहन करतोय हे मला पडलेलं कोंडचं आहे

Monday, 23 October 2017

रस्ता

माझा भाचा तेजस लहान असताना रात्रभर जागायचा आणि दिवसभर झोपायचा, त्यात भर म्हणून रात्री घरात रडून दंगा करायचा. मला झोप कमीच , आयता नाष्टा डब्बा मिळायचा मग काय मी तेजसला घेऊन रस्त्यावर चकरा मारत असे. आमचा वाडा रस्त्यालगत आणि तेव्हा पुण्यात रात्री तशी भीतीही न्हवती. पहाटे 3 पर्यंत मी त्याला घेऊन वाड्याच्या बाहेर फिरत असे पाय दुखले की ओट्यावर बसून त्याला खेळवत असे. सुरवातीला रस्त्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एकदोनदा हटकल त्याना समजून सांगितल्यावर ते काही बोलले नाहीत पण आम्ही बाहेर असेपर्यंत ते मामालोक त्या रस्त्यावर अर्ध्या अर्ध्या तासाला येऊन जात आमच्या सेफ्टीची त्यांनी काळजी घेतलीच. तेव्हापासून मला रस्ता आवडतो एक जिवंतपणा असतो व्हात्या रस्त्यावर. अजूनही सुट्टीच्या दिवशी सगळी कामं उरकली की मी उगाचच एकदोन चौक भटकून येते, आमचा MG रोड तर साक्षात जिवंतपणा आणि तारुण्य. पाडवा पहाटेला पहाटे 3 वाजता निर्मनुष्य रस्त्यावरून गाडी पळवताना एक वेगळाच अनुभव आला. तसंही मला मोकळं वातावरण आवडतं , बांधून घातलं की वेगळंच दडपण येतं फार कशाला लिफ्ट मध्येही मला दडपण येतं, नेमकं मी आत असतानाच लिफ्ट बंद पडली तर असले काहीबाही विचार येऊन जाम टेंशन येतं. हल्ली आता लिफ्टला लाईट गेली  तरी इन्व्हर्टरची सोय आहे लिफ्ट बंद पडणार नाही माहीत असूनही उलटसुलट विचार डोक्यात येतात आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी लिफ्टचं दार उघडलं की आग्र्याहून सुटका झाल्याचं फील येतं. एकंदरच बांधून घालणे प्रकार मानवत नाही म्हणूनच तर रस्त्याचे प्रवाहिपण भुरळ घालत नसेल ना

Tuesday, 19 September 2017

टेबल नंबर 21

एक तरुण जोडपं विवान आणि सिया , एक गेम शो जिंकून फिजी बेटावर ट्रिप बक्षीस मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तिथे जातं आणि सुरू होते त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड उलथापालथ. तिथे त्याना एक खान नावाचा माणूस भेटतो आणि विवान सियाला kbc च्या प्लॉटसारखा एक गेम ऑफर करतो. ह्या गेममध्ये तो ह्या दोघांना 21 प्रश्न विचारणार आणि प्रत्येक प्रश्नानंतर एक टास्क देणार, तो टास्क पूर्ण केला तर 1 कोटी रक्कम प्रत्येक स्टेपवर मिळत जाणार. 21 प्रश्न 21 कोटी रक्कम...विवान आणि सियाला भुरळ पडते आणि तिथंच ते फसतात. एकेका प्रश्नानंतर येणारे टास्क ह्या दोन  नवराबायकोकडून भयंकर गोष्टी करवून घेतात, बरं गेम मध्येच सोडायचा नाही हा नियम सगळीकडे नजर ठेवायला कॅमेरे आणि माणसं, पळूनही जाता येत नाही. ह्या टास्क मध्ये विवानने सियाचे केस कापणे, तिने त्याला मारणे, त्याने स्त्यावर तोडफोड करणे, तिने घाण खाणे अशी लई बेकार बेकार कामं करायला लावलीत.

शेवटचा टास्क म्हणून एक खून करायला विवान एका घरात जातो तर तिथे एक अर्धवट वेडा मुलगा असतो, त्याला बघून विवान सिया थक्क होतात आणि फ्लॅशबँक मध्ये आठवतात त्यांच्या कॉलेजचे दिवस. ज्याचा खून करायला हे तिथे आलेले असतात तो त्यांचा क्लासमेट असतो जो विवान सिया आणि गँगच्या रॅगिंगचा बळी असतो, त्याचं नाव अक्रम. रॅगिंग करताना जेजे विवान आणि सिया अक्रमकडून करून घेतात तेते सगळे टास्कच्या नावाखाली खान त्यांच्याकडून करवून घेतो. आता पश्चताप करून उपयोग नसतो अक्रम पूर्ण खचून वेडा झालेला असतो. मुलाची अवस्था बघून त्याचा बाप बदला तर घेतो पण त्याच्या पदरात काही पडत नाही तो हताश निराश. विवान आणि सिया स्वतःच्या चुका समजून लाजिरवाणी अवस्था झालेले...आणि पिक्चर संपतं

पिक्चरचं नाव टेबल नंबर 21, आर्टिकल 21 हा रॅगिंगविरोधी कायद्याचे कलम आहे

Sunday, 17 September 2017

वेदना

नका टोचू काट्यांनो
कातडी ही राठ नाही

झेलण्या दगडांना
हजर माझी पाठ नाही

छळतात सावल्याही
हल्ली त्यांची माझी गाठ नाही

आसवानी घेतले पाय मागे
त्याला त्यांची जाण नाही

तुझ्यासाठी जरी शून्य मी
हिशेब माझ्याविना पूर्ण नाही

अजुनी बघते वाट तुझी
जरी तुझा हा मार्ग नाही

Tuesday, 5 September 2017

भाऊ कदमचा गणपती



अप्रिय विषयावर लिहितेय कारण खूप उलटसुलट चर्चा वाचतेय, लॉजिकल पोस्ट खूपच कमी दिसतायेत, मी लॉजिकल लिहितेय असं माझं म्हणणं नाही पण मला जे वाटतंय ते लिहितेय. सगळ्यात आधी सांगणं म्हणजे कुणीही माझी जात शोधायला जाऊ नका मी सगळं सोडून बसलेय

1. पहिला मुद्दा भाऊ कदमने गणपती बसवला कदाचित श्रद्धेनं बसवला असेल किंवा तो व्यवसायाचा भाग म्हणून बसवला असेल. तो काम करतो त्या चॅनल्स तर्फे कलाकारांना तशा सूचना दिल्या जातात हे खुपजनांना माहीत आहे, नकार दिल्यास पुढे काम मिळणं अवघड होऊन बसतं हे सत्य आहे.

2. ज्या लोकांना भाऊने गणपती बसवला म्हणून संताप आला त्यांच्या प्रतिक्रिया सहाजिक होत्या. ज्या धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन तो धर्म सोडला त्याच धर्मातील गोष्टी 'आपला' माणूस करतो ह्याच्या यातना आणि त्यातून येणारी चीड आहे ती

3. बहिष्काराचा निषेध करणाऱ्या लोकांत प्रामाणिकपणे निषेध करणारे कमी आणि आता कसा तावडीत सापडलात म्हणून आनंदात पोस्ट टाकून उचकवणारे अधिक होते. ह्याच वेळी व्यक्तीस्वातंत्र्यचा आग्रह धरणाऱ्यानी हीच वर्तणूक कायम ठेवावी ही अपेक्षा

4. अतिशय त्रागा करून बहिष्कार, वाळीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांनी आपण एरवी संविधानाचा पुरस्कार करतो हे ध्यानात ठेवावे आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याबाबत आपली बांधीलकी विसरू नये. स्वधर्मि लोकांचे प्रबोधन करणे हाच एकमेव मार्ग तुमच्या समोर आहे

5. आपण जो धर्म सोडला त्यातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा याविषयी लिहिणं थांबवावे असा काही लोकांना सल्ला देऊ इच्छिते, कारण त्यामुळे कटुते शिवाय काही पदरात पडणार नाही. याबाबत काही लोक अतिशय टिंगल करणाऱ्या आणि थिल्लर पोस्ट लिहितात हे योग्य नाही, हे सोडून द्या

टीप - विषय माहीत नसल्यास कृपया चौकशी करू नये, उलटसुलट कमेंट्सला उत्तर देणार नाही. मी माझं म्हणणं लिहिलंय याउपर चर्चा नको. पटलं तर घ्या नाहीतर सोडा


Tuesday, 22 August 2017

सावळबाधा

सावळबाधा झाली
धार गवताला आली
आले मंद सूर कानी
मुरली मनाची झाली

नको वन्ही चेतवाया
नको जीवाची तलखी
मनी असू दे थंडावा
आग सुखाला पारखी

नको अति धगधग
मनी ऊब असू द्यावी
आग इतकी असू दे
पोळी शेकून निघावी

तुझ्या मनीचे बोल
मी जाणते सगळे
दूरदूर असूनही
नाही आपण वेगळे

ये एकदा फिरून
तुला मोकळे सोडले
तरी तुझ्या वाटेकडे
डोळे आतुर जाहले

नाही सोडणार रिता
काही तुजला देईन
मन मोकळे करून
तुझी ओंजळ भरीन

Wednesday, 16 August 2017

मित्रास पत्र

मित्रा,
आपण मित्र आहोत ना रे, चांगले मित्र. स्त्री पुरुष मैत्री सत्य की भ्रम या वादात न पडता जमलेली, सजलेली आपल्या मैत्रीची भट्टी
कधीकधी असं होतं...हो होतं, आपण जातो मैत्रीच्या सीमा पार करून...कधी आल्याड कधी पल्याड...आणि परत परत स्थिरावतो मैत्रीच्या शाश्वत जमिनीवर
कचकून भांडतो आपण, रुसतो, फुगतो...चक्क बोलचाल बंद करून टाकतो...मग हळूच किलकिलं करतो दार, शोधतो एखादी फट आणि मागचं पाठी टाकून पुनश्च हरी ओम पुटपुटतो
मैत्री आहे म्हणजे नेमकं काय आहे आपल्यात ... कधीकधी दिवसदिवस आपण बोलत नाही, पण मन मोकळं करण्यासाठी साठवत रहातो खुपसारा पसारा आणि भेटलो की मन मोकळं करून टाकतो
तुला आठवतं का ? आपण भांडलो नि बोलणं बंद झालं पण तू जपलीस नात्याची प्रतिष्ठा आणि मीही जपली जीवापाड...तुझ्याबद्दलचा राग, लोभ, मोह मी काहीही माझ्या वागण्यात दिसू दिला न्हवता... वाटायचं चारचौघात थोबाडावा तुला पण मी असं करणार नाही आणि तुही असं करणार नाहीस याचा विश्वास होता तुला नि मला
वादळं येतील जातील, मैत्रीची घट्ट असलेली बंधनं कदाचित सैल होतील...जगात काही शाश्वत नसतं हे ठाऊक आहे मला...आपण दुरावलो तरी तुझ्या माझ्या नात्यातील सौन्दर्य जपून ठेऊ, कडवटपणा आणून त्याच्या ठिकऱ्या नाही होऊ द्यायच्या
मैत्रीचं रेशमी वस्त्र दोघेही जपून ठेऊ...खूप खूप वर्षांनी आठवू मग ह्या वस्त्राचा तलम स्पर्श...रंग गेलेलं, पोत विरलेली आठवण मागे टाकायची आपण  आणि लक्षात ठेवायचा त्या रेशमाचा राजेशाही थाट
आज मी हे वचन देतेय तुला...कदाचित तू अशी कबुली देणारही नाहीस, नको देऊस...वचन न देताही हे सगळं न सांगता तू करशील हे माहीत आहे मला
तुझीच ,

#मैत्रीण

Friday, 4 August 2017

काय देशील देऊन तू देऊनी , जे माझ्याकडे नाही
राहू दे ओंजळ रिक्त ही , मला हवे ते तुझ्याकडे नाही

मला हवा झोपाळा लाकडी , जो झुलवेल नि खुलवेल मला
झुलवणे खुलवणे तुझे काम नाही, मला हवे ते तुझ्याकडे नाही

हिरवागार गालिचा पावले अनवाणी, स्पर्श मुलायम रेशमी
हि हिरवळ तुझ्या अंतरात नाही,मला हवे ते तुझ्याकडे नाही

इतका विश्वास असू दे राहू दे, झेलितो वार दगडांचे मीही
अपेक्षा दुसरी मलाही नाही, ,मला हवे ते तुझ्याकडे नाही

तुझ्या भरदार छातीशी बिलगूनी, काही हवे हवेसे बरळू दे
दुसरे अधिक काही मागणे नाही, मला हवे ते तुझ्याकडे नाही

#अर्चना

Thursday, 3 August 2017

प्रेमाला ते व्यभिचार म्हणतात
इतके कसे कृपावंत होतात

किती येतात किती जातात
काही क्षणांचे मोती होतात

वेदना सोसवेना डोळे भरले
खानदानी जाणीवा पदर टाकतात

तुझे येणे आता होत नाही
कसले काटे हे तुला बोचतात

मी जाणते रोख नजरेचा तुझ्या
उगाच का पापण्या खाली झुकतात

Wednesday, 2 August 2017

ब्लू व्हेल एक फॅन्टसी

ब्लू
व्हेल एक फॅन्टसी
माझी फॅन्टसी जसा तू
तुझी मी असो नसो...

सत्य न येणारं स्वप्न
न अवतरणारे ब्रम्ह
न उकलणारे कोडं
हाती न लागणारे विश्व
हे सगळं तूच...तुझी मी असो नसो

क्षणात तोळा क्षणात मासा
आता असा तर मग तसा
आधी होकार मग नकार
नकारातून होकाराकडे
झुकलेला पिसाचा मनोरा तू...तुझी मी असो नसो

फॅन्टसी एक मोह गहिरा
ती एक भ्रम केवळ
तरीही ती असणे जिवंतपणा
फॅन्टसीविना जगणे बेचव
जगण्यातले चवदार नमक तू...तुझी मी असो नसो

अडते कुठे कुणाचे
दिन रात येते जाते
चक्र जगाचे सुरू रहाते
मावळतीला सूर्य ढळतो
सायंआकाशातली रंगपंचमी तू...तुझी मी असो नसो

कृष्ण सावळा माझा प्रियकर
तुला आवडतो भोळा शंकर
हरीच्या रुपातला हरेश्वर तू...तुझी मी असो नसो

ती फॅन्टसी जीवघेणी
मरगळल्या मला प्राण देणारा जीवदायी तू...तुझी मी असो नसो

ब्लू व्हेल एक फॅन्टसी
माझी फॅन्टसी जसा तू
तुझी मी असो नसो...

Sunday, 30 July 2017

दानत

विळखा सैल होताना
तो दूर जाताना
येईल का लकाकी
कात सुटताना

भास दूर जावे
रुदन खरे असावे
प्रतिमा क्षीण हसावी
आरशात स्व बघताना

स्पर्शातले खुलासे
मिटवून टाकले मी
लावली कवाडे
तो दूर दूर जाताना

कोकीळ दूर गातो
फुलवी मोर पिसारा
फसव्या कल्पना या
सत्य रुक्ष असताना

सूर्य चंद्र तारे सुगंध
नदी समुद्र अन किनारा
सौन्दर्य कसे लिहावे
जग कुरूप दिसताना

तुझ्या दानतीचा
अंदाज मजला आला
का पदर पसरावा
कंगाल तू असताना

Monday, 17 July 2017

वांझ

"कुणा कुणाला उत्तर देऊ मी आता, आत्ता भाजी घ्यायला गेले तर तिथल्या बायका विचारत होत्या. मागच्या आठवड्यात लग्नात सगळ्यांनी तोच प्रश्न विचारून हैराण केलं. घराबाहेर जाऊच नये असं वाटतंय" ती वैतागून आणि रागाने फणफणतच घरात आली

"काय झालं इतकं भडकायला, एकच सुट्टी असते त्यातही कटकट नको यार, चहा टाक बरं एक" तो शांतपणे रिमोटवर चॅनल बदलत

"काय झालं काय, सकाळपासून तीन चहा झाले तुझे. मी काय बोलतेय लक्ष तरी आहे का. कुठंही गेलं की गुड न्यूज कधी, पेढे कधी देणार, बस करा आता प्लॅनिंग हे असलं काय काय मला ऐकावं लागतं. तुला कसं कुणी बोलत नाही सगळ्यांना मीच बरी दिसते"

"आपलं वय गेलंय का, लग्नाला आताशी कुठं 6 वर्ष झालीत , होईल सगळं नीट. तू कशाला लोकांचं बोलणं मनावर घेतेस. चल सोड ते चहा करतेस की जाऊ चौकात तिथल्या अमृततुल्यचा चहा चांगला असतो आणि परत डोक्याला ताप नसतो. घरात बसलं की कटकट असते तुझी नुसती"

"तुला कारणच पाहिजे बाहेर सटकायला, आठवडाभर मीही बाहेरच असते. रविवारी आठवड्याचे कपडे धुणे,इस्त्री, भाज्या, दळण बरीच कामं असतात. तुला कधीही मदत करावं वाटत नाही. नुसता तो टीव्ही, पेपर आणि तू काही बोललं की बाहेर पळतोस ते थेट रात्री येतोस. हे बघ मी परत सांगते मी उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतेय आपण दोघेही जाऊन येऊ"

"मी ही तुला आत्ताच सांगतोय मी डॉक्टरकडे येणार नाही, मी कशाला तपासून घेऊ तूच तपासून घे. मी चांगला धडधाकट आहे, व्यायामाने कमावलेलं शरीर आहे माझ्यात खोट असूच शकत नाही. हवा बदलली की अंग धरणारी तू नक्की तुझ्यातच दोष असेल. डॉक्टरकडे जायला मी नामर्द नाही तुझी कमतरता माझ्यावर ढकलायचा उद्योग आहे तुझा ...वांझ कुठली" धाडकन दार आपटून तो बाहेर गेला

"वांझ ...अरे आपण अजून तपासून तरी घेतलंय का? आधीच मला दोषी करून टाकलंस तू" मनाने आणि शरीराने ढासळणारी ती

Sunday, 2 July 2017

सांज

ही सांज आज गीत घेऊन आली
तुझी पावले सूर देऊन गेली

पुन्हा आठवे शब्द तो एक कानी
त्या शब्दात गाथा सांगून  झाली

कोलाहल अंतरीचा शांत होत नाही
सर पावसाची आग लावून गेली

तू कोण माझा करू कसला खुलासा
नको नाव रस्त्यास या, ठेऊ निनावी ही गल्ली

नको वाद कसले जरा शांत राहू
राहू देे सामने व्हायचे  काही निकाली

कोसळत आहे हा पाऊस कधीचा
कोरड्या मनाची कड झालीय ओली

Thursday, 29 June 2017

बदल चिरंतन आहे...

कुठल्याही व्यक्तीला मिळणारा सन्मान हा प्रथमदर्शनी कशावर असतो? तुमचं राहणीमान क्लासी असेल,सगळं श्रीमंती थाटात असेल तर मान देणारे देतात ते तुमच्यातल्या व्यक्तीला नसून तुमच्या कडच्या पैशाला मान देतात. हा मिळणारा सन्मान तात्पुरता असतो जर तुम्ही माणूस म्हणून चोख नसाल तर पैशालाही कुणी विचारत नाही. माझ्या बघण्यात अशी एक बाई आहे , भरपूर पैसा असलेली , हरएक काम पैसा टाकून करून घेणारी...हळूहळू सगळ्यांना समजत गेलं की इथे तर आपण विकलो गेलो, आणि ती बाई लोकांच्या मनातून उतरत गेली पण लोकं इतके उपकराच्या ओझ्याखाली दबले गेले होते की ती सांगेल ती कामं ही लोकं निमूट करून देत. मागे तिला शिव्या देत पण तोंडावर मॅडम मॅडम करून कौतुकं करण्याशिवाय गत्यंतरच न्हवतं. ह्या प्रकरणात मिळणारा मान मिथ्या आणि विकतचा असतो.

अजून एक प्रकार म्हणजे दिखावा. कॅराक्टर म्हणजे चारित्र्य कसेही असलं तरी स्वच्छ , शुद्ध असल्याचा दिखावा करून बेमालूनपणे इतरांकडून मान सन्मान मिळवणारी मंडळी आजूबाजूला पोत्यानी सापडतील. रात्री पिऊन झिंगायचं, नळ्या फोडून , सगळी लफडी करून सकाळी अंघोळ पांघोळ करून हरी ओम म्हणायला मोकळे. चार भिंतीच्या आत घातलेला गोंधळ बाहेर गेला नाही की तुम्ही साजूक असता. अंतर्बाह्य पावित्र्य मिळणं जवळपास दुरापास्त आहे आणि तसा अट्टाहासही कुणी करू नये.

तुमची प्रतिष्ठा, रेप्युटेशन, मिळणारा मान हा बरेचदा तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता यावर असतो भले तुम्ही तसे नसलात तरीही पण एकदा का भ्रमाचा भोपळा फुटला की लोकांच्या नजरेतून उतरने सहन करायला मोठी ताकद लागते, भले भले इथे गारद होतात. मी पणा सगळ्यात घातक असतो, मी पणा करणारे कितीही थोर असले तरी फार काळ लोकांच्या मनात घर करू शकत नाहीत. मी पणा, गर्व सगळ्या कर्तबगारीवर पाणी फिरवतो.

आपल्या पैशाला, आपण कुणाच्या उपयोगी पडतो म्हणून जर कुणी आपला आदर आणि सन्मान करत असेल तर समोरची व्यक्ती स्वार्थी असते आणि आपली एकाअर्थी व्यक्ती म्हणून हार असते. फक्त पैशाने सन्मान मिळतो म्हणजेच तुमच्यातला माणूस कुणीच मोजला नाही.

स्वच्छ, शुद्ध चारित्र्य सांगून समजत नाही, जो सांगतो मी चारित्र्यवान आहे तो खोटारडा असतो...ही गोष्ट न सांगता इतरांना जाणवायला हवी.

चारित्र्याच्या कल्पना समाजनिहाय बदलत असतात. एखाद्या समाजात दारू पिणे, अनेक स्त्रियांशी संबंध असणे म्हणजे नीचपणा असतो पण ह्याच गोष्टी दुसऱ्या समाजात सर्वसामान्य असतात. आपण ज्या समाजात रहातो त्या चौकटीतील नियम पाळले की तुम्ही चारित्र्यवान असता नाहीतर गयेगुजरे, बिघडलेले म्हणून ठप्पा बसलाच समजा. रहाता तिथले नियम गुमान पाळा नाहीतर चारित्र्यहीन म्हणवून घ्या.

समाजाच्या चौकटी मोडायला धमक लागते आणि अशी भरपूर माणसं आपल्या समाजात होवून गेलीत. आपले सगळे समाजसुधारक चौकटी मोडून जगले आणि इतरांसाठी एक मार्ग प्रशस्त करून गेले. अजुन बऱ्याच भिंती तोडायच्या बाकी आहेत, काही नवीन भिंती बांधल्या जातात...

Monday, 26 June 2017

वेडी कुठली

जखमांचे हिशेब आता मी ठेवत नाही
वाहू देते त्यांना पुन्हा पुन्हा शिवत नाही

जखमा लपवायला सारखी हसत असते
म्हणूनच तर आता मी आनंदी दिसत असते

उघड उघड जखमांचा दोष तुला का देऊ
काही गोष्टीतरी जरा उंबऱ्याच्या आत ठेऊ

तू म्हटलास आरसा बघ, तो कुठे स्वच्छ होता
अहंकाराचा पडदा तू त्याच्यावर टाकला होता

हातावर मेंदी आता पहिल्यासारखी रंगत नाही
तिलाही आता तुझ्या नजरेची संगत नाही

तू दिसलास काल रस्त्याच्या पलीकडून जाताना
तिथेच नेमकी चप्पल तुटली मी परत येताना

दिसलास तरी मनात असून हाक मी मारत नाही
खांद्यावरचा तुझा हात मनातून वजा होत नाही

न बोलावता एकदा सहज असा येऊन जा
बघ जमलं तर घट्ट रुतलेलं तुझं नाव खोडून जा

खूप मळमळ साठलेली कवितेत या लिहून टाकली
बघ वाचून समजलं तर नाही तर म्हण वेडी कुठली

Saturday, 24 June 2017

मेघ

पावसाच्या सरी कोसळत आहेत बाहेर, मी बघतेय घरातून त्यांचं कोसळत रहाणे. सध्या तरी खिडकीतून पाऊस एन्जॉय करणं जास्त बरं वाटतंय. पाऊस अंगावर घ्यावा तो एकटंएकटं असताना नको, तू सोबत असतानाच पावसात भिजावं. तुझं असणं म्हणजे मीठ, बेचव आणि अळणी आयुष्याला चव येते ती तुझ्यामुळे... म्हणून मी जरा लांबच ठेवते तुला , तुला जास्त जवळ करून जिंदगी खारट नाही करून ठेवायचीय.

कभी किसींको मुक्कल जहाँ नहीं मिलता
कही जमी तो कही आस्मा नहीं मिलता

सगळ्यांना सगळंच मिळत नाही, एक मिळालं की दुसरं सुख सुटून जातं. छोट्या गोधडीत तोंडावर घेतलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले की तोंड उघडं रहातं... अशी ही सुखाची चिरंतन ओढाताण सुरू असते...म्हणूनच तू भेटूनही भेटत नाहीस

तेरे जहाँ मे ऐसा नहीं के प्यार न हो
जहाँ उम्मीद हो इसकी वहा नहीं मिलता

भरभरून प्रेम मिळतंय, कुणाचीही नजर लागेल इतकं सुख ओसंडून जात असतानाही ही कसली हुरहूर आणि अतृप्तता भरून राहिलीय...सगळीकडून सुखाची बरसात होत असताना अतृप्त धरणी पहात रहाते एका #मेघाकडे...तिची तहान भागवणारा तोच असावा का. कितीही पाऊस पडला तरी तिचा एक कोपरा न भिजणारा, कायम तहानलेला असेल त्या एका मेघाची वाट पाहत. जोपर्यंत त्याचं कोसळणं होत नाही तोवर ही अशीच भिजूनही कोरडी आणि मिळूनही रिती.

प्रेम आणि पाऊस नुसता येऊन चालत नाही...ते तिथूनच मिळावं लागतं जिथून मनाला हवंय...तोच #मेघ बरसावा लागतो जीसपें दिल आया है

युं तो बहोत चाहनेवाले है जमानेमें
ये कम्बक्त दिल है की गलत जगेह फिसल गया ❤

Wednesday, 21 June 2017

वारी

दिवस - दरवर्षी पुण्यात पालख्या आगमन होतो तो

रोजच्याप्रमाणे आज आरामात उठून चालत नाही, भल्या पहाटे उठून अंघोळपांघोळ करून , घरातलं आवरून शक्य तितक्या लवकर घर सोडायचं. हे लवकर म्हणजे सकाळचे 6 च्या आसपास असतं बरका. कितीही लवकर निघालं तरी पोलीस कसे काय आपल्याआधी रस्ते अडवतात तेच समजत नाही. इकडे रस्ता अडवलेला असला की तिकडे वळ असं करतकरत कसेबसे मेंटल कॉर्नरला जाऊन धडकते. तिथे परत पोलिसांनी रस्ता अडवलेलाच असतो. छोटी स्कुटी जायला सुद्धा रस्ता देत नाहीत मग कधी ऑफिसचे आयकार्ड दाखवा, कधी ओ पोलिसमामा रस्त्याच्या पलीकडे तर जायचं आहे सोडा की मी जाते हळूहळू अशी विनवणी करायची. नेम लागला तर आणि चुकून सोडलं तर जायचं पलीकडे नाहीतर गाडी अलीकडेच मेंटलच्या जवळ एखादया झाडाखाली पार्क करून वन टू करत ऑफिस गाठायचं.या दिवशीच एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस चुकूनही रागवत नाहीत, दुर्लक्ष करून हसून कुणी ऐकलेच नाहीतर ए माऊली पाया पडतो म्हणायलाही पोलीस कमी करत नाहीत.

इतकी यातायात करून ऑफिसला पोचेपर्यंत तास दिडतास सहज लागतो. आमच्या ऑफिसच्या आवारात एक दिंडी उतरते, त्या वारकऱ्यांच्या लगबगीने सगळं वातावरण फुलून गेलेलं असत. लवकर पोचल्यामुळे कामं करायला वेळच वेळ असतो. आणि मी एकटी नाही हं आमच्या प्रिमाइसिस मधल्या सगळ्या ऑफिसेसचा स्टाफ असाच ऑफिसला आलेला असतो. आमचा स्टाफ वर्गणी काढून ह्या दिंडीसाठी दुपारचं जेवण ठेवतो. आचारी बाहेर अंगणात जेवण तयार करतात आमच्यातले कुणी भाज्या चिरून दे वगैरे मदत करत असतात. वारकऱ्यांना जेवण वाढायला आमचीच लोकं असतात. गंमत म्हणजे इतका त्रास होऊनही शक्यतो दांडी कुणी मारत नाही.

दुपारी एकच्या आसपास लोकांचे निरोपावर निरोप येऊ लागतात पालखी दिघीत आली हं 15 मिनिटात इथे पोचेल, 15 मिनिटांनी परत कुणीतरी सांगत पालखी भोसरीत आली मॅडम. पालखी कुठपर्यंत आली ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते, अखेर कुणीतरी पळत येतं चौकात आली चला लवकर तशी आमची धावपळ उडते. भराभर चालत रस्त्यावर उभं रहायचं. आता रस्ता चौपदरी केलाय. पालखी ह्या लाईनीतून (लेन)जाणार की त्या यावर परत तिथं चर्चा असतेच. 10 मिनिटात येणारी पालखी काही अर्धा तास होतोतरी येत नाही. पाय भरून येतात रस्त्यावरून वारकऱ्यांची गर्दी टाळ मृदुंग वाजवत पुण्याच्या दिशेने अविरत जात असते. आणि अचानक कुठूनतरी गलका येतो आली रे पालखी, वारकरीपण जास्त दिसू लागतात. दूरवरून चांदीच्या पालखीचा कळस झळाळतो आणि इकडे अंगावर सरसरून काटा उभा रहातो. जशी पालखी जवळ येईल हळूहळू अंदाजाने सगळे पुढे धावतात रथाला, पालखी पुढच्या अश्वाला हलकासातरी स्पर्श करायला मिळावं म्हणून सगळे धडपडत असतात. भराभर पालखी पुढेही निघून जाते आणि मी त्या पालखीच्या मागे पुढच्या दत्तमंदिरातील विसाव्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पुन्हा ऑफिसला येते. एक वेगळी शांती एक भारावलेपण अनुभवायला मिळतं. एखाद्या दिवशी जाऊदे नको दर्शनाला जायला म्हणून कंटाळा केला तर एक गिल्टी फिलिंग येतं आणि त्याचा मनावरचा अंमल काही जात नाही भारावून टाकणारं वातावरण असतं. वारकरी, सेवेकरी , जागोजागी दर्शनासाठी झुंबड करणारे नागरिक. पालखीच्या मार्गावर लोटांगण घालणारे, दिसेल त्या वारकऱ्यांच्या पाया पडणारे, एकमेकांच्या पाया पडणारे भाविक बघितलं की विठ्ठल ह्या गर्दीतच भारून राहिल्याचा फिलिंग येतं.

संतसाहित्य वगैरे फार उशिरा समजलेला प्रकार, जाणीवपूर्वक वाचून अर्थ माहीत करून घेतलेला (अजून नीटशी माहिती नाही हे सांगू इच्छिते) संतांचं आगमन आमच्या आयुष्यात जन्मतः आहे. आमचा वाडा भवानी पेठेत. ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या मुक्कामाला नाना आणि भवानी पेठेत असतात, सगळ्या पेठेला वारकरी छावणीचे रूप प्राप्त होतं. माझ्या पहिल्या पोस्टिंगच ऑफिस ज्ञानेश्वरपादुका चौकात होतं, दोन्ही पालख्या संध्याकाळी त्या चौकात येतात. माझं घर, दोन्ही ऑफिस सगळीकडे पालख्या आणि वारकरी मला भेटत आले त्यांचं नि माझं नातं काहीतरी आहे हे नक्की. कितीही त्रास झाला, घाण अस्वछता वाढली तरी पालख्या आणि वारी नको असं मला कधीही वाटलं नाही. सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणणारी वारी मला कायम भुरळ घालत आली आहे, फार नाही पुणे सासवड वारी एकदातरी करायची मनापासून इच्छा आहे. बघू कसं जमतंय

Friday, 16 June 2017

रंगीला रे

सौन्दर्य आणि गोरा रंग यांचा परस्पर संबंध लावला जातो. त्यावर सावळ्या आणि काळ्या रंगाचा सौन्दर्याचीसुद्धा चर्चा होते. बाह्यरुप महत्वाचं नाही मन बघा, स्वभाव बघा तसेच गोरा रंग दो दिनमें ढल जायेगा वगैरे गप्पा आपण ऐकत असतो. बाह्यरूपाला महत्व न देता मन, स्वभाव बघणारी नक्की किती लोकं आहेत हे आजूबाजूला बघितलं तरी सहज कळतं. मुलींच्या ग्रुप मध्ये सुंदर आणि उठून दिसणाऱ्या मुलींच्या मागेच मुलांचे घोळके लाळ गाळत असतात. 15,20 वर्षानंतरही भेटलेल्या वर्गमित्रांमध्ये चर्चा होते ती वर्गातल्या एकतर देखण्या मुलीची नाहीतर चालू मुलीची. खालमानेने अभ्यास करणाऱ्या टॅलेंटेड काळ्यासावळ्या मुलींची चर्चा क्वचितच होत असेल.

बाह्यरुपाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं म्हणून तर कपडे घेताना आपल्या अंगावर छान दिसतील असेच कपडे आपण निवडतो. फार लांब कशाला टीव्ही, फ्रीज घेतानाही त्यातल्या स्पेसिफिकेशनसह मॉडेल कसं दिसतं हेही आपण बघतच असतो. गोऱ्या रंगाला महत्व आहेच वधू पाहिजे वर पाहिजे जाहिरातीत गोरी मुलगी पाहिजे हे लिहिलं जातं, हटकून मुद्दाम कुणी सावळी किंवा काळी मुलगी हवी अशी  लिहिलेली जाहिरात माझ्या बघण्यात नाही. गोरं अपत्य होण्यासाठी गरोदरपणात गावठी उपाय जसं दूधकेशर प्याल जातं हे गोऱ्या रंगाचा आकर्षणाचा आहे म्हणूनच न.

मी स्वतः वर्णद्वेषी नाही, मुद्दाम गोरं अपत्य व्हावं म्हणून लोकांचा आटापिटा का होतो त्यामागे मानसिकता काय व कशी असते ह्याचा अंदाज सगळ्यांनाच असतो. गोरा म्हणजे मनाने काळा आणि काळा म्हणजे स्वभाव चांगलाच असेल असे सरसकट म्हणता येत नाही. रूपाने चांगली असणारी लोकं स्वभावाने सुद्धा चांगली असू शकतात त्याच्या उलट प्रकार सुद्धा असतातच.

गोरा रंग म्हणजे पांढरी पाल, पांढरं फटफटीत दिसतं त्यापेक्षा सावळा रंगच छान असं म्हणणं म्हणजे आत्मवंचना असते, गोऱ्या रंगाचं आकर्षण नसतं तर लोकांनी फोटो एडिट करून टाकलेच नसते. सावळा रंगही चेहरा सुंदर असेल तरच उठून दिसतो, गोऱ्याचं तसं नसतं नाकीडोळीचे फ़ॉल्ट्स गोरा रंग झाकून टाकतो म्हणून तर गोरी हजार गुण चोरी ही म्हण तयार झाली आहे.

रंगरूपाचा गर्व किंवा न्यूनगंड बाळगू नये कारण त्यात आपलं स्वतःचे काहीच कर्तृत्व किंवा दोष नसतो हे मात्र जाणीवपूर्वक अधोरेखित करू इच्छिते. रंग कसाही असला तरी अपटूडेट राहून आपल्या रुपाला खुलणारी वस्त्रे आणि मेकअप करून आपण स्वतःच व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रेझेंट करू शकतो, हे आपल्या हातात आहे

टीप - पोस्टलेखिका स्वतः रंगाने डार्क म्हणजे काळी आहे 😂😂😂😂😂

Wednesday, 14 June 2017

बचत

पैसा कमवायला कष्ट पडतात. गरिबीमुळे आलेला पैसा जपून वापरण्याची वृत्ती अंगात इतकी भिनत जाते की परवडत असूनही बरेचदा चैन करायचं धाडस होत नाही. तशी मी खूप हौशी नाटक, सिनेमा बघणे , हॉटेलिंग करणे, उगाचच भटकत रहाणं मला खूप आवडतं आणि खिशाला परवडेल इतकी चैन लग्नाआधी आणि नंतरही मी करत असते. तासभर कॉलेजला पायीपायी जा ये करून बसचे पैसे वाचवून सिनेमे बघायची हौस आम्ही भागवली. लग्नानंतरही सगळ्या हौशी करतो पण लिमिटमध्ये. आमच्याघरी ह्यांना हॉटेलिंग अजिबात आवडत नाही तरीही निव्वळ मला आवडतं म्हणून ते सोबत येत असत. घरी आल्यावर क्वचित गप्पा मारताना हॉटेलमध्ये खाणं मला आवडत नाही उगाचच पैसे वाया जातात, त्या बिलात 8 दिवस गाडीत पेट्रोल भरून झालं असतं असं बोललं जायचं. काहीही कर पिठलंभात कर पण घरीच जेवू असं ह्यांचं कायमच म्हणणं असतं. अमुक एकाच सेलिब्रेशन करावं म्हणून हॉटेलिंग करणं हे माझंही हळूहळू बंद होत गेलं. गेल्या कित्येक दिवसात आम्ही सहकुटुंब हॉटेलात असे गेलोच नाही, त्याच काही वाईटपण वाटत नाही. एखादि गोष्ट सेलिब्रेट करायला घरातच सगळ्यांना आवडणार जेवण बनवलं जातं, हे सगळी मदत करत असतात. भाज्या चिरून देणे, मसाले तयार करून देणे सगळं करतात फक्त फोडण्या देणे आणि पोळ्या लाटणे दोनच कामं माझ्या करता रहातात.

मी मुक्त विचारसरणी बाळगणारी स्त्री आहे तरीही मी स्वतःला मर्यादा घालून जगते, ही माझी स्वतःची चॉईस आहे. मला स्वतःला साधं रहाणं आवडतं तरीही मी वस्तू ब्रॅंडेड प्रिफर करते ही अजून एक गंमत आहे, चमकधमक मला न झेपणारी आहे. पैसा आहे म्हणून वारेमाप खर्च करणे मला जमत नाही, कायम हाताशी सेविंग असावं असं माझं मत असतं. उद्याचा दिवस सांगून येत नाही, आजची बचत हीच उद्याची कमाई हेच माझं तत्व आहे ह्याचा अर्थ मी दात कोरून जगा असं म्हणते असा नाही हं. सगळ्या हौशी, मौजी, चैनी करा पण मर्यादा ओळखून कराव्यात असं माझं तरी तत्व आहे.

हे लिहायचं कारण 2,3 दिवसांपूर्वी कुणाचीतरी (नाव आठवत नाही, हल्ली विस्मरण होतंय 😁) पोस्ट वाचली की पैसा असून उपयोग नाही त्याचा उपभोग घेता यायला हवं, त्या पोस्टवर मीही हो बरोबर आहे ह्यार्थी कमेंट केली होती 😜😝. पण हे बरोबर नाही , आहे तो पैसा उडवून ढुंगाला हात पुसणे योग्य न्हवे. Enjoy life but in limits कारण उद्या आपल्यालाच आपली सोय करायचीय तिथे कुणीही सल्लागार उपयोगी पडणार नाहीत

Tuesday, 13 June 2017

अहिस्ता अहिस्ता

हिंदी सिनेमाचं तसं मला हल्ली हल्ली वावडं आहे, न आवडणारेच प्रकार असतात. हिंदी आणि मराठीही जुनेच सिनेमे चांगले असं माझं नेहमीच मत असतं. माझ्या आवडी माझ्या आईच्या पिढीतल्या आहेत त्याला कारण आई सिनेमा बघायला मला घेऊन जायची त्यामुळं तिला आवडणाऱ्या हिरोहिरॉइन्सचे सिनेमे जास्त बघून झालेत. त्यामुळे आमच्या वेळच्या अनिल कपूर, सनी देओल, अक्षय आणि शारूख पेक्षा मला सगळे कुमार, कपूर लोक्स आणि देवसाब आवडतात. मी 7वीत असेल किंवा 6वीत एक पिक्चर बघायला आई आणि आम्ही अजून दोघी तिघी गेलो. तो पिक्चर हाऊसफुल्ल होता, A सर्टीफाईड पिक्चर आता काय करायचं. सारसबाग जवळच होती मनात म्हटलं  तिथं भेळ खाऊन घरी जायची वेळ येते की काय. तेवढ्यात ब्लॅकने तिकीट विकणारे तिथे आले 2 तिकिटं तिप्पट भावात घेतली आणि आई आणि काकू बघायला गेल्या, आम्ही उरलेल्या तिघी हिरमुसलं तोंड घेऊन न घशाखाली न उतरणारी भेळ खाऊन घरी आलो. पुढे तो पिक्चर थेटरात जाऊन दोनदा आणि टीव्हीवर बरेचदा बघितला. वेगळं कथानक आणि सदाबहार गाण्यांमुळे तो सिनेमा खूप आवडून गेलाय ह्या पिक्चरच नाव अहिस्ता अहिस्ता.

कुणाल कपूर सारखा अजिबात अभिनय न येणारा हिरो असूनही सिनेमा सुपरडूपर हिट ठरला तो पद्मिनी कोल्हापूरे, नंदा, शशिकला, शम्मी कपूर ह्यांच्या अभिनयाने. शशिकलाने साकारलेली मावशी तर बेफाम जमलीय तिचं ठुमकणं, साडी नेसायची पद्धत, तपकीर ओढण लाजवाबच. शम्मी कपूर उतारवयातला तरी ग्रेसफुल कशाला म्हणतात ते बघण्याजोगा. गिरीश कर्नाड थोडाच वेळ येऊन जातो पण त्याच्या दर्जेदार शैलीत छाप उमटवून जातो. अरुणा इराणी आणि देवेन वर्मा ह्यांचं छोटे उपकथानक आहे, कजाग बाहेरख्याली शेजारीण आणि गरीब अज्ञाधारक नवरा या दोघांनी रंगवलाय.

संगीता (नंदा) एक देवदासी, पदरात एक मुलगी असलेली आणि कजाग मावशीच्या (शशिकला) पंजात अडकलेली. ते रहात असलेल्या शहरात पोलीस पकडापकडी करतात म्हणून नवीन शहरात येतात, एक छानसं घर जे की एका मालदार माणसाचं असतं तिथे रहातात. हा माणूस म्हणजे धनी(कादरखान) रोज रात्री ठराविक वेळ येऊन आपली गरज भागवून जाणारा. मुलगी चंद्रा (पद्मिनी कोल्हापूरे) ह्या धणीलाच बाप समजत असते. ह्या कुटुंबाच्या समोरच्या घरात रहाणारं कुटुंब म्हणजे शम्मीकपूर त्याची 2 मुलं आणि बायको. शम्मी मस्त दिलदार आणि आधुनिक विचारसरणीचा तर बायको टिपिकल भारतीय नारी. मुलगा कुणाल (कुणाल कपूर) आणि मुलगी. समोरची चंद्रा ह्या घरी पूजेला येऊ लागली , ह्या दोन मुलांसोबतच शाळेत जाऊ लागली. तरुण वयात आल्यावर चंद्रा आणि कुणाल एकमेकांच्या प्रेमात पडतात. दरम्यान धणीचा मृत्यू होतो आणि चंद्राला आईकडून समजतं की ते तिचे वडीलच न्हवते. चंद्रा आईला खोदून खोदून विचारते पण संगीता मुलीला वडिलांचे नाव काही सांगत नाही.

चंद्रा आणि कुणालाचे प्रेम कुणालच्या आईला पसंत पडत नाही ती मुलाला समजवायचा प्रयत्न करते पण मुलगा हटून बसतो , वडीलही कुणालच्या बाजूने असतात. एक दिवस शम्मीचा मित्र चंद्रकांत (गिरीश कर्नाड) त्यांना भेटायला येतात. जेवत असताना समोरच्या घरातून सतारीचे ओळखीचे सूर कानावर आल्यावर चंद्रकांत अस्वस्थ होतो आणि एक काम आहे असं निमित्त करून तिथून बाहेर पडतो आणि गुपचूप समोरच्या घरात जातो तिथे त्याला संगीता दिसते. संगीता ही चंद्रकांतची हरवलेली बायको असते आणि चंद्रा ही त्या दोघांची मुलगी ही नवीन माहिती आपल्याला आणि चंद्रालाही समजते. बापाला बघून खुश झालेली चंद्रा तिला काय करू आणि काय नको असं होतं, ती वडिलांच्या गळ्यात पडते आणि नेमकं समोरून कुणाल ते बघतो, त्याचा गैरसमज होतो. दुसऱ्या दिवशी चंद्रा वडिलांनी दिलेली हिऱ्याची अंगठी कुणालला दाखवते तेव्हा कुणाल तिला वेश्या म्हणतो आणि रागाच्या भरात निघून जातो. कुणाल चंद्रावर इतका चिडतो की आईचं ऐकून तो लग्नाला तयार होतो. चंद्रकांतच्या मुलीशी त्याचं लग्न होतं.

कुणालाच लग्न होतं आणि चंद्रा खचते, इकडे मावशी तिला देवदासी बनवायला टपूनच असते. चंद्राचे प्रोफेसर तिला पुढे शिकवायला तयार असतात ते तिला स्वतःची मुलगी मानत असतात पण चंद्राच्या मनात काही वेगळंच सुरू असत. ती मावशीला सांगून देवदासी व्हायचं मान्य करते. त्यांच्या प्रथेप्रमाणे तिचं देवाशी रीतसर लग्न लावलं जातं, त्यानंतर तिच्या साठी निवडलेला मालक तिच्याशी संबंध ठेऊ शकतो. मावशी ह्या माणसाकडून भरपूर पैसा उकळणार असते. चंद्रा नवीन आयुष्याची सुरवात करण्यापूर्वी समोरच्या घरात आशीर्वाद घ्यायला जाते. तिथे तिचे जन्मदाते वडीलही असतात , सगळ्यांच्या पाया पडून निघताना चंद्रा खाली कोसळते , तिने वडिलांनी दिलेल्या अंगठितला हिरा गिळलेला असतो. आत्ता वडिलांना पाझर फुटतो आणि रडू लागतात, तेव्हा सगळ्यांना समजतं चंद्राचे खरे वडील म्हणजेच चंद्रकात. सगळं समजल्यावर कुणाल हताश होतो. मुलीचा शेवट बघून आईपण जीव सोडते आणि बॅकग्राऊंडला गाणं वाजत रहातं

कभी किसींको मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कही जमी तो कही अस्मा नहीं मिलता

सिनेमाचा शेवटचा भाग बघताना खिन्न व्हायला होतं. देवदासी बनवताना देवाशी लग्न लावण्याचे विधी सविस्तर दाखवलेत अगदी हळद, वरात पण काढतात हे सगळे प्रसंग अंगावर येणारे आहेत. अजूनही समाजातला एक घटक ह्याच प्रकारे आयुष्य जगतय हे वास्तव जळजळीत पणे समोर येतं. कुठंतरी कितीतरी संगीता , चंद्रा अशाच जगत असतील...


Monday, 12 June 2017

प्रकाश

टोळ्या इथल्या मुजोर झाल्या
कुंपणाला शिरजोर झाल्या

न दिसे का वेदना कुणाची
डोळे असूनही कशा अंध झाल्या

पावसातही नसे ओल काही
संवेदना कोरड्या ठाक झाल्या

येशील का परतूनी पुन्हा तू
पाट्या मनाच्या आता साफ झाल्या

ओरखडे उठले मना मनावर
श्वापदांच्या भुका फार झाल्या

निसर्गा तुझे उपकार फार झाले
अंधारात तारका प्रकाश झाल्या

नको हाय खाऊ, घे मना तू उभारी
एक वार आला ढाली हजार झाल्या

Monday, 29 May 2017

वणवा

नैतिकतेच्या कोण मारतो गप्पा इथे
चिरून गळे ठरतो कोणी साव इथे

कुणी न शहाणा ठोशास ठोसा मिळतो इथे
कत्तली करून साधूचा असतो आव इथे

धारदार झाल्या गुलकंदि पाकळ्या
रसदार ओठांनाही फुटते संगीण इथे

पेटतो गुलमोहोर उठतो रक्ताळूनी
शांत डोहासही लागते आग इथे

असूनी शांत संन्यस्त संयमी
अंतरात सुनामीचा कल्लोळ इथे

Wednesday, 24 May 2017

स्त्री_सक्षमीकरण

कधी न्हवे ते मराठी चॅनल लावलं कुठलं होतं आठवत नै पण बातम्या होत्या. बातम्यांत लग्नाची वरात परतपरत दाखवत होते, आयला म्हटलं वरातीत काय एवढं म्हणून किचनमधून बाहेर डोकावलं तर एका मुलीची वरात होती.  बातम्यात सांगत होते की मुलीची मुलासारखी हौस करायची म्हणून लग्नाआधी नवरदेव मिरवतात तसं मिरवत होते. मुलीची हौस म्हणून वरात ठीक आहे तिथं आक्षेप घ्यायचं कारणच न्हवतं पण मुलासारखं हा शब्द खटकला, कुणासारखं आपण का वागावं. मुलाची बरोबरी म्हणून घोड्यावर मिरवणे, तसे ड्रेस घालणे, गाड्या उडवणे, सिग्रेटी फुकणे, दारू पिणे वगैरे तत्सम गोष्टी करायच्या असतात का. हे वरवरचे बदल म्हणजेच स्त्री सक्षमीकरण असतं का?

वरातितली मुलगी वयाने लहानच दिसत होती, 20 च्या आतबाहेर, शिक्षण तरी पूर्ण झाले असेल की नाही शंकाच वाटत होती, इतक्या लहान वयात लग्न लावून मुलासारखी हौस म्हणून घोड्यावर मिरवत होते. अरे लोकांनो मुलीला मुलासारखी अजिबात वाढवू नका, ती स्त्री आहे त्यामुळे स्त्रीसुलभ सगळ्या भावभावनासहित तिला जगू द्या.

स्त्रीला सक्षम करायची असेल तर तिला शिकवा, स्वतःच्या पायावर उभी करा, तिचे निर्णय घेण्याची तिला मुभा द्या, निर्णय चुकलाच तर चुकीची फळं भोगायची कणखरता तिला शिकवा. कपडे , राहणीमान ह्या वरवरच्या गोष्टींना मी तरी महत्व देत नाही, अर्थात याबाबत स्त्रीच्या इच्छेलाच प्राधान्य असेल




Saturday, 20 May 2017

सुरा

ओरखडा पुरेसा दाट न्हवता
हा सुरा धारदार न्हवता

किती डसल्या इंगळ्या जरी
त्याला विषारी दात न्हवता

अळणी फिकी हेटाळणी ही
तितका का तू घायाळ न्हवता

नको उडवू शिंतोडे जराही
आरसा तुझाही साफ न्हवता

का लावावा बोल जहरी
आपला तसा घरोबा न्हवता


Thursday, 18 May 2017

वळण

युद्धात जिंकुनी तहात हरले मी
कशी कुठल्या शब्दात फसले मी

तो बहाणा किरकोळ फार होता
जरी स्वतःस उद्धवस्त केले मी

त्या अश्रूंनी करतब असे केले
जिंकूनही डाव हरले मी

ग्लानी प्रतारणेची चढली अशी की
तो वळला अन भानावर आले मी

तो रस्ता दूर गेला वळणावळणाने
तू सोडले तिथेच उरले मी

Friday, 12 May 2017

पाठीतला सुरा

पाठीतल्या सुऱ्याचे उपकार लाख झाले
आपले समजले ते गेले फरार झाले

ठरलेे ते खालसा करार झाले
सराईत गुन्हेही क्षणात माफ झाले

कज्जे इस्टेटीचे  निकाली निघाले
आरशातले चित्र पुसून साफ झाले

क्षण पालटूनी गेला कुणी हद्दपार झाले
गिरद्यात लोळताना तुजविण कंगाल झाले

क्षण आला तो गेला हाल बेहाल झाले
सुरा कसा अघोरी त्यानेच मुक्त केले

Thursday, 11 May 2017

वेदना

आता तरी पळावे, टळावे वेदनांनी
सुखाच्या बहरात का रहावे वेदनांनी

गुलकंद झाला तू दिल्या गुलाबांचा
कशास बरे इतुके मुरावे वेदनांनी

अत्तराचा फाया झाला चोळामोळा
सुगंध बनून उरावे आता वेदनांनी

सोडला जरी तेव्हा मी सुटकेचा श्वास
प्राणवायू बनुनी उरावे वेदनांनी

तुझे छळणे तसे फार कठोर न्हवते
व्हावे आता जरा हळुवार वेदनांनी